विवेचन सारांश
यज्ञकर्माचे वेदसंमत प्रकार व ज्ञानयज्ञाचे श्रेष्ठत्व.

ID: 2333
मराठी
रविवार, 22 जानेवारी 2023
अध्याय 4: ज्ञानकर्मसन्यासयोग
3/3 (श्लोक 21-42)
विवेचक: गीता विशारद डॉ आशू गोयल जी


प्रथेनुसार प्रार्थना व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. आपण सर्वजण गीतेचे शुद्ध उच्चारण शिकत आहोत. विवेचन ऐकून त्यावर चिंतन व मनन सुद्धा करू लागलो आहोत. आपले पूर्व सुकृत व ईश्वर कृपा याचेच हे फलित आहे. गोस्वामी तुलसीदासजींच्या शब्दात सांगावयाचे तर,
यह गुन साधन ते नहिं होई | तुम्हरी कृपा पाव कोई कोई |
केवळ साधनेने प्राप्त होणारे हे फळ नाही. ईश्वरी कृपा ही असावी लागते. जोपर्यंत ही कृपा होत नाही तोपर्यंत भाव निर्माण होत नाही. गीतेचा आपण इतका प्रचार करतो, लोकांना त्यातील तत्त्वांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा हजारात दहा लोक गीता वर्गात सामील होतात.
या चौथ्या अध्यायातील श्लोक हे सागरातील रत्नांसमान आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण सिद्धांत यात पहावयास मिळतात. आत्तापर्यंतच्या श्लोकांमध्ये आपण कर्म सिद्धांताविषयी जाणून घेतले. त्यातही 'अकर्म' जे चिंतनदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे, त्याची व्याख्या पाहिली. आसक्ती रहित कर्म ते अकर्म होय. एकोणिसाव्या श्लोकात आपण पाहिले की ज्याप्रमाणे भाजलेल्या चण्यापासून रोपे तयार होत नाहीत त्याप्रमाणे ज्ञानाच्या अग्नीने आवृत्त झाल्यावर कर्मापासून फळ निर्माण होत नाही. ज्या साधकाचे कर्मफळ ज्ञानाच्या अग्नीमध्ये तावून-सुलाखून निघते, त्या साधकाला कर्मफळ भोगावे लागत नाही. इतकेच नाही तर त्याच्याकडून जे कर्म घडते त्यापासून फळ निर्माणही होत नाही. काही क्रिया केली म्हणजेच कर्म घडते असे नाही.  कधी कधी काही न करताही कर्म घडते व त्याचे फळ भोगावे लागते. आईने भाजी बनवली. मुलीने वडिलांना वाढली. वडिलांना वाटले की भाजी मुलीनेच बनवली आहे. त्यांनी तिची प्रशंसा केली. आई गप्प राहिली. मुलीचे चांगले कौतुक होते आहे तर होऊ दे. मुलगीही काही बोलली नाही. हे दोघींकडून जे झाले ते विकर्मच होय. अफगाणिस्तानात बुद्धाची प्रतिमा तालिबान्यांनी तोफेने उडवली. भारताने निषेध व्यक्त केला. बौद्ध देश असूनही श्रीलंकेने काहीच विरोध नोंदवला नाही. हे अशुभ कर्मच नाही का? ज्या ठिकाणी बोलणे हे कर्तव्य आहे त्या ठिकाणी गप्प बसणे हा अपराधच होय. भाव हे कर्माचे कारण बनू शकते हे ध्यानात ठेवले पाहिजे.

4.21

निराशीर्यतचित्तात्मा, त्यक्तसर्वपरिग्रहः।
शारीरं(ङ्) केवलं(ङ्) कर्म, कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्॥4.21॥

ज्याने अतःकरण व इंद्रियांसह शरीर जिंकले आहे आणि सर्व भोग सामग्रीचा त्याग केला आहे, असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीरासंबंधीचे कर्म करीत राहूनही पापी होत नाही.

निराशी म्हणजे इथे निराशावाद असा अर्थ अपेक्षित नाही. निराशी म्हणजे आशा रहित रहावे. आपल्याजवळ जे नाही त्याची आपण आशा धरतो व ती पूर्ण होण्याच्या आशेतच जीवन व्यतीत करतो. आपण मुलांकडून त्यांनी कसे वागावे याविषयी अपेक्षा करतो व त्या पूर्ण न झाल्यास दुःखी होतो. आपल्या अपेक्षाच आपण कमी केल्या पाहिजेत. श्री दत्तात्रेय भगवान म्हणतात,
आशा हि परमं दुःखं नैराश्य परमं सुखम्
यथा संछिद्य कान्ताशां सुखं सुष्वाप पिंगला
यतचित्तात्मा म्हणजे 'स्व' वर नियंत्रण. कर्मेंद्रिये, ज्ञानेन्द्रिये, मन, बुद्धी, चित्त यांचा या स्व मध्ये समावेश होतो. मी बघणार नाही, खाणार नाही, ऐकणार नाही, या इंद्रियांद्वारे केल्या जाणाऱ्या कर्मांवर नियंत्रण ठेवणे हे तुलनेने सोपे. परंतु मन, बुद्धी, चित्त हे अतिशय सूक्ष्म आहे. गतिशील व शक्तिशाली आहे. त्यामुळेच त्यांच्या क्रियांवर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. मी एखाद्या गोष्टीचा विचार करणार नाही, वाईट स्वप्न बघणार नाही, अशा प्रकारचे नियंत्रण करणे खूप कठीण आहे. हे नियंत्रण कशाप्रकारे करावे हे पुढे सांगितले आहे.
त्यक्त सर्वपरिग्रह म्हणजेच परिग्रह वृत्तीचा त्याग करा. स्वामित्वाची भावना असणे हे परिग्रह वृत्तीचे मूळ आहे. घर कोणाच्या नावावर आहे हे कुटुंबातील भांडणाचे कारण होते. दिवाळीत फटाके उडताना पाहून आनंद होण्यापेक्षा मी फटाका उडवला ही भावना जास्त सुखकारक असते. क्रिकेट मॅच खिलाडू वृत्तीने पाहण्यापेक्षाही आपल्या देशाच्या खेळाडूने दुसऱ्या देशाच्या खेळाडूला धावचीत केल्याचा आनंद मोठा वाटतो. अशा मीपणाच्या भावनेमुळे सुखदुःख निर्माण होते. म्हणूनच अपरिग्रह वृत्तीने जगावे.
शारीरं केवलं कर्म याचा अर्थ पाण्याबरोबर झाडाचे एखादे पान जसे वाहत जाते तसेच सहज जगायला शिकावे.  कमळाचे फूल पाण्यातच आपले जीवन व्यतीत करते, परंतु त्याला पाण्याचा स्पर्शही होत नाही. तसे या संसाररूपी सागरात राहून आपण येथील घटकांना सहजपणे स्वीकारावे.  संसारातील घटकांना अवास्तव महत्त्व न देता अलिप्त रहावे.
'तेरा रामजी करेंगे बेडा पार' अशा सहजपणे जो जगतो तो शुभ-अशुभ पाप-पुण्य यापासून मुक्त होतो.

4.22

यदृच्छालाभसन्तुष्टो, द्वन्द्वातीतो विमत्सरः।
समः(स्) सिद्धावसिद्धौ च, कृत्वापि न निबध्यते॥4.22॥

जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थांत नेहमी संतुष्ट असतो, ज्याला मत्सर मुळीच वाटत नाही, जो सुखदुःख इत्यादी द्वंद्वांच्या पूर्णपणे पार गेलेला आहे, असा सिद्धीत व असिद्धीत समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असूनही त्याने बांधला जात नाही.

हा कर्मयोगी जेवणात आज भाजी आहे किंवा नाही, तूप आहे किंवा नाही इत्यादींचा विचार न करता जे भोजन मिळेल त्यात संतुष्ट राहतो. परगावी गेल्यावर, स्टेशनवर उतरल्यावर, कोणी न्यायला आले किंवा नाही आले, गाडीची सोय केली किंवा नाही केली तरी तो कष्टी होत नाही व आपले सामान उचलून मुक्कामाच्या ठिकाणी चालू लागतो.
मत्सर म्हणजे ईर्षा. आपल्या परिचयातील लोकांबरोबर प्रतिष्ठा, कमाई, घर, गाडी, बंगला इत्यादी विषयांवरून आपण तुलना करतो. त्यातूनच ईर्षा निर्माण होते. अशी ईर्षा जो करत नाही तो 'विमत्सरः|' हर्ष-शोक, लाभ-हानी, यश-अपयश अशा द्वंद्वांना तो आपल्या जीवनात थारा देत नाही. या द्वंद्वांपासून जो मुक्त असतो, तो द्वंद्वातीत होय. अशा प्रकारे सिद्धी व असिद्धी यांमध्ये समभाव ठेवणारा कर्मयोगी बंधमुक्त असतो.
सूक्ष्म विचार केला तरच कोण कोणाच्या बंधनात आहे हे समजून येते. एकदा एक शेतकरी गाईच्या गळ्यात दोरी बांधून तिला घेऊन जात होता. गुरूंनी शिष्याला विचारले की इथे कोण कोणाच्या बंधनात आहे ते सांग पाहू. शिष्याने पटकन उत्तर दिले की गाय शेतकऱ्याच्या बंधनात आहे. गुरुजींनी मागून जाऊन हळूच कात्रीने दोरी कापली. गाय मोकळी होऊन पळू लागली. आता शेतकरी गाईच्या मागे धावू लागला. ते बघून गुरुजींनी शिष्याला पुन्हा तोच प्रश्न विचारला. त्यावेळी बंधन या शब्दाचा अर्थ शिष्याच्या लक्षात आला. भोगांचा आश्रय हा जीवाला बंधनात टाकतो. गाडी खरेदी केली की ती नीट ठेवण्याची चिंता सतत मनाला बंधनात टाकते. मग त्या गाडीवर एखादा ओरखडा जरी उठला तरी मन दुखी होते. एखादा जमिनीचा तुकडा विकत घेतला तरी त्यावर कोणी कब्जा तर करणार नाही ही चिंता भेडसावत राहते. राजा ययातीने आपल्या चार पुत्रांना सांगितले होते की जो त्याला आपले तारुण्य देईल त्याला तो राज्यपद देईल. पुरु या पुत्राने ययातीला आपले तारुण्य बहाल केले. दीडशे वर्षे ययातीने तारुण्य भोगले. परंतु त्याच्या लक्षात आले की त्याची भोगलालसा पूर्ण कधीच झाली नाही, कमी पण झाली नाही तर उलट वाढतच गेली. शेवटी त्याने ते तारुण्य पुरुला परत केले व सांगितले की मी ही जी चूक केली ती तू कधीच करू नकोस. प्रत्यक्षात आपण भोग भोगत नाही तर भोगच आपल्याला भोगतात. म्हणून यज्ञमय जीवन जगा असे भगवंत सांगतात.

4.23

गतसङ्गस्य मुक्तस्य, ज्ञानावस्थितचेतसः।
यज्ञायाचरतः(ख्) कर्म, समग्रं(म्) प्रविलीयते॥4.23॥

ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे, जो देहाभिमान आणि ममत्व यांनी रहित आहे, त्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे, अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसाची संपूर्ण कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात.

ज्याची आसक्ती पूर्णपणे कायमची नष्ट झाली आहे, ज्याचे चित्त केवळ परमात्म ज्ञानात स्थिर झाले आहे, देह अभिमान व ममता यांचा ज्याने त्याग केला आहे असा मनुष्य जे जे काही करतो ते परमेश्वरासाठीच करतो. त्याचे जीवन यज्ञमय होऊन जाते. पुढील श्लोकांमध्ये भगवान 12 प्रकारचे यज्ञ सांगत आहेत.

4.24

ब्रह्मार्पणं(म्) ब्रह्म हवि:(र्), ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम्।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं(म्), ब्रह्मकर्मसमाधिना॥4.24॥

ज्या यज्ञात अर्पण अर्थात् स्रुवा आदिही ब्रह्म आहे आणि हवन करण्याजोगे द्रव्यसुद्धा ब्रह्म आहे, तसेच ब्रह्मरुप कर्त्याच्याद्वारे ब्रह्मरुप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रियाही ब्रह्म आहे, त्या ब्रह्मकर्मांत स्थित असणाऱ्या योग्याला, मिळण्याजोगे फळसुद्धा ब्रह्मच आहे.

बारा यज्ञांमध्ये पहिला हा ब्रह्म यज्ञ. या यज्ञात अर्पण केले जाणारे द्रव्य हे सुद्धा ब्रह्मच असते. ब्रह्मणा म्हणजे कर्ता. अहं ब्रह्मास्मि या भावाने तो यज्ञ करतो. येथे सर्व काही ब्रह्ममय होऊन जाते. या यज्ञाचे फळ देखील ब्रह्मप्राप्तीच.

4.25

दैवमेवापरे यज्ञं(म्), योगिनः(फ्) पर्युपासते।
ब्रह्माग्नावपरे यज्ञं(म्), यज्ञेनैवोपजुह्वति॥4.25॥

दुसरे काही योगी देवपूजारुप यज्ञाचे उत्तमप्रकारे अनुष्ठान करतात, इतर योगी परब्रह्म परमात्मारुपी अग्नीत अभेददर्शनरुप यज्ञाच्याद्वारेच आत्मरुप यज्ञाचे हवन करतात.

दुसरा यज्ञ हा देव यज्ञ. देवतांना प्रसन्न करण्यासाठी केला जाणारा हा यज्ञ पूर्वापार प्रचलित आहे. नवग्रह पूजन, लक्ष्मीपूजन, गृहप्रवेशाच्या वेळी केला जाणारा होम ही देवयज्ञाची उदाहरणे होत. असे यज्ञही विधिपूर्वक जरूर केले पाहिजेत.
तिसरा यज्ञ हा आत्मरुपी यज्ञ सांगितला आहे. कर्मयोग हे या यज्ञाचे स्वरूप आहे. कर्ता, करण व कर्म हे तीनही ब्रह्मरूप होतात, हे या यज्ञाचे वैशिष्ट्य होय.

4.26

श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये, संयमाग्निषु जुह्वति।
शब्दादीन्विषयानन्य, इन्द्रियाग्निषु जुह्वति॥4.26॥

दुसरे काही योगी 'कान' इत्यादी इंद्रियांचे संयमरुप अग्नीत हवन करतात तर इतर योगी शब्द इत्यादी सर्व विषयांचे इंद्रियरुप अग्नीत हवन करतात.

चौथा यज्ञ हा इंद्रिय संयम यज्ञ. यालाच अनासक्त योग असेही म्हटले जाते. मी काय पाहीन, काय बोलीन, काय खाईन या क्रियांवर ज्याने ताबा मिळवला, त्याचे जीवन संयमित झाले.
पाचवा यज्ञ हा विषयरूप हवन यज्ञ. सर्वकाही इंद्रियेच करतात. मला भूक लागली की हात पोळी उचलतो. तोंड ती पोळी खाते. मी काहीच करत नाही. या क्रिया हा इंद्रियांचा विषय आहे हा भाव ठेवणे हाच विषय रुपी हवन यज्ञ.

4.27

सर्वाणीन्द्रियकर्माणि, प्राणकर्माणि चापरे।
आत्मसंयमयोगाग्नौ, जुह्वति ज्ञानदीपिते॥4.27॥

अन्य योगी इंद्रियांच्या सर्व क्रिया आणि प्राण्यांच्या सर्व क्रिया यांचे ज्ञानाने प्रकाशित जो आत्मसंयमयोगरुप अग्नी त्यात हवन करतात.

सहावा यज्ञ हा अंतःकरण संयम यज्ञ म्हणजेच मनाचा संयम करून केलेला यज्ञ. पतंजली योग सूत्र हे पूरक रेचक व कुंभक यावर आधारित आहे. पूरक म्हणजे श्वास घेणे, रेचक म्हणजे श्वास सोडणे व कुंभक म्हणजे श्वास रोखून धरणे. पूर्ण दिवसात 21 हजार 600 श्वास घेतले जातात. या श्वासाची गती आपण मोजू शकतो. एक मिनिटासाठी हाताचे बोट नाकाखाली धरा. सामान्यपणे एका मिनिटाला पंधरा श्वास अशी गती असावी. त्यापेक्षा जास्त गती असल्यास आजारपणाकडे कल आहे असे समजावे. ज्याची गती १५ पेक्षा कमी असते तो अत्यंत स्वस्थ मनुष्य समजावा. ही गती १३ असेल तर योगी व त्याहीपेक्षा कमी असेल तर तो सिद्ध पुरुष समजावा.

4.28

द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा, योगयज्ञास्तथापरे।
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च, यतयः(स्) संशितव्रताः॥4.28॥

काही पुरुष द्रव्य विषयक यज्ञ करणारे असतात. काहीजण तपश्चर्यारुप यज्ञ करणारे असतात. तसेच दुसरे काहीजण योगरुप यज्ञ करणारे असतात. कितीतरी जण अहिंसा इत्यादी कडक व्रते पाळणारे यत्नशील पुरुष स्वाध्यायरुप ज्ञानयज्ञ करणारे असतात.

सातवा यज्ञ म्हणजे द्रव्य यज्ञ करोनाकाळात बऱ्याच लोकांनी/संस्थांनी अन्नदान केले. हा द्रव्य यज्ञच होय. ज्या वस्तूंची किंवा गोष्टींची आवश्यकता समाजात भासते, त्याची पूर्ती करणे हा द्रव्य यज्ञ समजला जातो.
आठवा यज्ञ म्हणजे तपोयज्ञ. अध्यात्म मार्गावर चालताना प्रसन्नता पूर्वक कष्ट सहन करणे हा तपोयज्ञ होय. प्रसन्नता पूर्वक हा शब्द महत्त्वाचा आहे. एकादशीच्या दिवशी निराहार राहणे हे तपच आहे. जेव्हा ते प्रसन्नता पूर्वक केले जाते व त्याचा उद्देश भगवद्प्राप्ती असतो तेव्हा तो तपो यज्ञ होतो.
नववा यज्ञ योगयज्ञ होय. सर्व काही भगवंतांप्रीत्यर्थ करणे हा या यज्ञाचा उद्देश. जे काही घडत आहे ते भगवंतच करून घेत आहेत ही भावना ठेवणे म्हणजे योगयज्ञ.
करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है |
मेरा आपकी कृपा से, सब काम हो रहा है |
दहावा यज्ञ हा पंचव्रती यज्ञ आहे. याचा अर्थ सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह व ब्रह्मचर्य या पाच नियमांचे पालन करून जीवन जगणे.
अकरावा यज्ञ हा स्वाध्याय यज्ञ होय. यामध्ये साधक एकाच शास्त्र वचनाचा किंवा गुरु वचनाचा अंगीकार करत आपले जीवन श्रेष्ठ बनवतो. सतत नर्मदा परिक्रमा करत राहणे, पूर्ण दिवस सुंदर कांडाचे वा ज्ञानेश्वरीचे वाचन करणे, ही या यज्ञाची उदाहरणे आहेत.

4.29

अपाने जुह्वति प्राणं(म्), प्राणेऽपानं(न्) तथापरे।
प्राणापानगती रुद्ध्वा, प्राणायामपरायणाः॥4.29॥

अन्य काही योगीजन अपानवायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात. तसेच दुसरे योगी प्राणवायूमध्ये अपानवायूचे हवन करतात. त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर असणारे पुरुष प्राण व अपानाची गती थांबवून प्राणांचे प्राणांतच हवन करीत असतात.

बारावा यज्ञ हा प्राणयज्ञ. याचा अर्थ प्राणायाम द्वारा प्राणाची गती रोखून धरणे. वाल्मिकी ऋषी, च्यवन ऋषी, ध्रुव बाळ यांनी असा यज्ञ केला होता.

4.30

अपरे नियताहाराः(फ्), प्राणान्प्राणेषु जुह्वति।
सर्वेऽप्येते यज्ञविदो, यज्ञक्षपितकल्मषाः॥4.30॥

त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर असणारे पुरुष प्राण व अपानाची गती थांबवून प्राणांचे प्राणांतच हवन करीत असतात. हे सर्व साधक यज्ञांच्याद्वारे पापांचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत.

काही लोक प्राणायाम पद्धतीने यज्ञ करतात. हे लोक प्राणवायूची अपान वायू मध्ये व अपान वायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात. ही अत्यंत श्रेष्ठ विद्या आहे. केवळ योग मार्गी लोकच हे करू शकतात.

4.31

यज्ञशिष्टामृतभुजो, यान्ति ब्रह्म सनातनम्।
नायं(म्) लोकोऽस्त्ययज्ञस्य, कुतोऽन्यः(ख्) कुरुसत्तम॥4.31॥

त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर असणारे पुरुष प्राण व अपानाची गती थांबवून प्राणांचे प्राणांतच हवन करीत असतात. हे सर्व साधक यज्ञांच्याद्वारे पापांचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत.

या बारा यज्ञांपैकी एक तरी यज्ञ आपण आचरणात आणला पाहिजे. त्याशिवाय या जीवनात उत्तम गती लाभणार नाही. इथेच जीवन सुधारले नाही तर परलोकाबद्दल काय बोलावे? जो विद्यार्थी विद्यार्थी दशेतवाईट मार्गाला लागतो, त्याचे भविष्य पुढे चांगले कसे होईल?

4.32

एवं(म्) बहुविधा यज्ञा, वितता ब्रह्मणो मुखे।
कर्मजान्विद्धि तान्सर्वान्, एवं(ञ्) ज्ञात्वा विमोक्ष्यसे॥4.32॥

अशाप्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितले गेलेले आहेत. ते सर्व तू मन, इंद्रियें आणि शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत, असे समज. अशाप्रकारे तत्वतः जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनातून पूर्णपणे मुक्त होशील.

या बारा यज्ञांशिवाय इतरही हजारो प्रकारचे यज्ञ आहेत, ज्यांचा वेदांमध्ये उल्लेख आहे. हे अर्जुना, हे सर्व यज्ञकर्म तू जाणून घे. जेव्हा समष्टीसाठी म्हणजेच सर्वांसाठी कर्तव्य कर्म केले जाते, तेव्हा तो यज्ञ होतो व एक प्रकारे ही भगवंताची उपासना होते. असे सर्व यज्ञ ब्रह्मप्राप्ती करून देतात.

4.33

श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्, ज्ञानयज्ञः(फ्) परन्तप।
सर्वं(ङ्) कर्माखिलं(म्) पार्थ, ज्ञाने परिसमाप्यते॥4.33॥

हे परंतप अर्जुना! द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे. तसेच यच्चयावत सर्व कर्मे ज्ञानात समाप्त होतात.

या सर्व वेदसंमत यज्ञांच्या मुख्यतः दोन श्रेणी आहेत एक म्हणजे साधन अथवा द्रव्य यांनी केला जाणारा द्रव्य यज्ञ व दुसरा म्हणजे स्वतःवर नियंत्रण करून केला जाणारा ज्ञानयज्ञ. द्रव्य यज्ञाने संसार रुपी इच्छांची पूर्ती होते. ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ मानला जातो. तो मनुष्याला कृतार्थ करतो. त्याचे सारे कर्म या यज्ञात समाप्त होते.

4.34

तद्विद्धि प्रणिपातेन, परिप्रश्नेन सेवया।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं(ञ्), ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः॥4.34॥

ते ज्ञान तू तत्वसाक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने, परमात्मतत्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील.

ज्या ज्ञानयज्ञाने सर्व कर्म समाप्त होते, ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी तत्त्वज्ञानी गुरूकडेच जावे लागते. पूजा, कर्मकांड करणारे जे गुरू असतात, त्यांची दृष्टी सामान्यतः नामरूपावर असते. भरपूर दक्षिणा व उत्तम भोजन देणाऱ्यांवर ते प्रसन्न होतात. त्यांचे ज्ञान हे सामान्य संसाराविषयी असते. शालेय शिक्षण हे देखील सामान्य ज्ञानच झाले. अध्यापक, पुजारी हे संसाराविषयीचे ज्ञान देतात. परंतु तत्त्वज्ञानी महात्मा मात्र तीन गोष्टी पाहतो - विनम्रता, पात्रता व भूक. तो कुठल्याही भेटवस्तूने प्रभावित होत नाही. सच्चा गुरू केवळ या तीन गोष्टींनी शिष्याचे परीक्षण करतो. म्हणून हे अर्जुन, अशा अध्यात्मिक गुरूंकडे तू जा. त्यांना नम्रपणे दंडवत घाल. याद्वारे अहंकार समर्पित कर. हात जोडून कर्तृत्व समर्पित कर. मी जड आहे व तुम्ही चेतना आहात, आपण सांगाल ते मी करीन, असा पूर्ण समर्पित भाव मनात ठेव. ही खरी विनम्रता होय.
शिष्य होण्याची पात्रता ही गुरुची सेवा करूनच लाभते. शबरी व भरत यांचे उदाहरण समोर ठेवावे. लक्ष्मणानेही रामाची सेवा केली, परंतु भरताने चौदा वर्षे दूर राहूनही केलेली रामाची सेवा ही श्रेष्ठ ठरली. श्रीराम वनवासात भेटणाऱ्या प्रत्येकाला सांगत, 'तुम मम प्रिय भरतहि सम भाई.'
कबीरदास तर स्वतःला रामाचे चाकर म्हणवून घेत.
कबिरा कुत्ता राम का, मोतिया मेरा नाम |
गले राम की जेवरी, जित खैंचे तित जाऊं |
हे अर्जुन, गुरूंना सरलता पूर्वक प्रश्न विचार. तुझी जिज्ञासा पाहून ते तुझ्या ज्ञानाची भूक शमवतील. असा तत्त्वज्ञानी गुरु मिळणे कठीण असते. असा गुरु मिळाल्यावर त्याचे चरण सोडू नकोस. आता आपण आपल्या गुरूंचे स्मरण करूया.

जीवन तो हमें कई बार मिला, गुरू ऐसा ना बारम्बार मिला
हम भी कुछ करम कमा लेते, अवसर ना हमें हर बार मिला,
जीवन तो हमें कई बार मिला, गुरू ऐसा ना बारम्बार मिला॥
जो जनम जनम से बिछड़ा था, इस जनम में आकर अब है मिला,
अब तर जायेंगे भव सागर, इस बार जो तुमने थाम लिया,
जीवन तो हमे कई बार मिला, गुरू ऐसा ना बारम्बार मिला॥ १॥
गोविन्द कृपा इस बार हुई, जो साथ तुम्हारा पाया है,
मैं बड़भागी मेरा भाग्य जगा, नारायण नर अवतार मिला,
जीवन तो हमे कई बार मिला, गुरू ऐसा ना बारम्बार मिला॥ २॥
इस भ्रम के गहरे सागर में, बिन तेरे कुछ नहीं है मेरा,
मेरा ध्यान भी तू मेरा ज्ञान भी तू, जित देखा तेरा रूप मिला,
जीवन तो हमे कई बार मिला, गुरू ऐसा ना बारम्बार मिला॥ ३॥
हम भी कुछ करम कमा लेते, अवसर ना हमें हर बार मिला,
जीवन तो हमे कई बार मिला, गुरू ऐसा ना बारम्बार मिला॥

अशा प्रकारे समर्पण, सेवा व जिज्ञासा हे तीन भाव आपल्याला गुरूचरणाचे दर्शन घडवतात व ज्ञानाचा प्रकाश आपले जीवन उजळून टाकतो.

4.35

यज्ज्ञात्वा न पुनर्मोहम्, एवं(म्) यास्यसि पाण्डव।
येन भूतान्यशेषेण, द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि॥4.35॥

हे जाणल्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीस, तसेच हे अर्जुना! या ज्ञानामुळे तू सर्व प्राणिमात्र पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर मज सच्चिदानंदघन परमातम्यात पाहशील.

अशा प्रकारे ज्ञान प्राप्त झाल्यावर मोह दूर होतो. जो हा आहे तो मीच आहे व जो तू आहेस तोही मीच आहे. अशी एकरूपता हेच ब्रह्मदर्शन.
 प्रेम गली अति सांकरी, जामे दो न समाय |
जब हरि था तब मैं नही, अब हरि है मैं  नाहीं |
पुढील तीन श्लोकांमध्ये भवसागर पार करण्यासाठी तीन मार्ग सांगितले आहेत.

4.36

अपि चेदसि पापेभ्यः(स्), सर्वेभ्यः(फ्) पापकृत्तमः।
सर्वं(ञ्) ज्ञानप्लवेनैव, वृजिनं(म्) सन्तरिष्यसि॥4.36॥

जरी तू इतर पाप्यांहूनही अधिक पाप करणारा असलास, तरीही तू ज्ञानरुप नौकेने खात्रीने संपूर्ण पापसमुद्रातून चांगल्याप्रकारे तरुन जाशील.

उपासना पद्धती, गुरु, जप व नाम हे सर्व नौके समान आहे. यांपैकी कोणत्याही एका पद्धतीचे आचरण हा भक्तिमार्ग आहे, ज्यायोगे तू हा भवसागर पार करू शकशील.

4.37

यथैधांसि समिद्धोऽग्नि:(र्), भस्मसात्कुरुतेऽर्जुन।
ज्ञानाग्निः(स्) सर्वकर्माणि, भस्मसात्कुरुते तथा॥4.37॥

कारण हे अर्जुना! ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो, तसाच ज्ञानरुप अग्नी सर्व कर्मांची राखरांगोळी करतो.

अग्निमध्ये जसे छोटे रोप जळून जाते व हजारो वर्षे जुना वृक्षही जळून खाक होतो. तसे ज्ञान मार्गावर चालताना या जन्माचे कर्म नष्ट होते व जन्मोजन्मीचे कर्म सुद्धा नष्ट होते. ज्ञानरूपी पवित्र नौकेमधून तो हा भवसागर तरुन जातो.

4.38

न हि ज्ञानेन सदृशं(म्), पवित्रमिह विद्यते।
तत्स्वयं(म्) योगसंसिद्धः(ख्), कालेनात्मनि विन्दति॥4.38॥

या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही. ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपल्या आत्म्यात आपोआपच प्राप्त करुन घेतो.

आपण जेव्हा एखादे भांडे धुतो तेव्हा जल ते भांडे स्वच्छ करते. परंतु जोपर्यंत वायूमुळे ते सुकत नाही, तोपर्यंत ते शुद्ध मानले जात नाही. वायू हा पवित्र मानला गेला आहे. कर्मयोग हा वायूसमान आहे. कर्म मार्ग हा आपली अपवित्र कर्मे सुद्धा पवित्र करतो.

4.39

श्रद्धावाँल्लभते ज्ञानं(न्), तत्परः(स्) संयतेन्द्रियः।
ज्ञानं(म्) लब्ध्वा परां(म्) शान्तिम्, अचिरेणाधिगच्छति॥4.39॥

जितेंद्रिय, साधनतत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो आणि ज्ञान झाल्यावर तो तत्काळ भगवत्प्राप्तीरुप परम शांतीला प्राप्त होतो.

श्रद्धा विरहित जिज्ञासा काही उपयोगाची नाही. मनात संशय धरू नये. श्रद्धा ठेवावी. श्रद्धावान माणसालाच ज्ञान प्राप्त होते व त्यायोगे परम शांतीचा लाभ होतो.

4.40

अज्ञश्चाश्रद्दधानश्च, संशयात्मा विनश्यति।
नायं(म्) लोकोऽस्ति न परो, न सुखं(म्) संशयात्मनः॥4.40॥

अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो. संशयी माणसाला ना हा लोक, ना परलोक आणि ना सुख.

अश्रद्ध माणूस अज्ञानीच राहतो. अशा माणसाचे पतन निश्चित असते.

4.41

योगसन्न्यस्तकर्माणं(ञ्), ज्ञानसञ्छिन्नसंशयम्।
आत्मवन्तं(न्) न कर्माणि, निबध्नन्ति धनञ्जय॥4.41॥

हे धनंजया! ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सर्व संशयांचा नाश केला आहे, अशा अंतःकरण स्वाधीन असलेल्या पुरुषाला कर्मे बंधनकारक होत नाहीत.

अशा प्रकारे ज्ञानप्राप्तीने ज्याने सर्व कर्मे समाप्त केली, अशा आत्मस्थित पुरुषाला कर्माचे बंधन रहात नाही.

4.42

तस्मादज्ञानसम्भूतं(म्), हृत्स्थं(ञ्) ज्ञानासिनात्मन:।
छित्त्वैनं(म्) संशयं(म्) योगम्, आतिष्ठोत्तिष्ठ भारत॥4.42॥

म्हणून हे भरतवंशी अर्जुना! हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या संशयाचा विवेकज्ञानरुप तलवारीने नाश करुन समत्वरुप कर्मयोगात स्थिर रहा आणि युद्धाला उभा रहा.

हे अर्जुन, अज्ञानामुळे निर्माण झालेला संशय ज्ञानरूपी तलवारीने भेदून टाक. उठ, उभा रहा, कर्मयोगात स्थित होऊन युद्धाला सिद्ध हो.
हरिभजनाने विवेचन सत्र समाप्त झाले व प्रश्न उत्तर सत्र सुरू झाले.
                       
प्रश्नोत्तरे
१.त्रिवेणीजी चोप्रा - आपण कर्म करीत राहतो. धर्म काय आहे? कर्म काय आहे, हे लक्षात येत नाही.
तिसऱ्या अध्यायाचे विवेचन यासाठी आपण जरूर पुन्हा ऐकावे. त्यामध्ये ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे. मनुष्याने चारही धर्मांचे पालन केले पाहिजे. एक म्हणजे परंपरेनुसार जे कर्म, ते केले पाहिजे. दुसरे म्हणजे वर्ण स्वधर्म म्हणजे आपल्याला चार वर्णांपैकी जो वर्ण प्राप्त झाला आहे, त्याप्रमाणे कर्तव्य कर्म करणे. तिसरा रुचिस्वधर्म, यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण एखादे काम करतो व चौथा आपद्धर्म कर्म , यामध्ये संकटकाळी एखाद्याला मदत करणे हा आपला धर्मच समजावा. या चारही प्रकारांमध्ये विवेकाच्या सहाय्याने, समत्व राखून, परिस्थिती व योग्यतेनुसार कर्म करावे. हे थोडे कठीण वाटू शकते. यासाठी गुरूची आवश्यकता असते. कोणतेही कर्म करताना इतरांची अपेक्षा लक्षात घेऊ नये. ते कष्टदायक असते. त्या ऐवजी विवेकाने कृती करणे योग्य असते.
२.माधुरी जी - भगवद्भक्ति ची काय लक्षणे आहेत? काय करावे म्हणजे पूर्णपणे त्यात लीन होऊन जाऊ.
परमेश्वराचे दर्शन करणे आवडत असेल, ईश्वराच्या गोष्टी ऐकणे आवडत असेल, तर हे भगवंत भक्तीचे लक्षण समजावे. भक्तीमध्ये लीन होण्यासाठी आत्ता तुम्ही जिथे आहात तेथूनच पुढे जावे. सत्संग करावा. त्याने प्रसन्नता लाभते.

यानंतर समापन प्रार्थनेने सत्राची सांगता झाली.