विवेचन सारांश
मन बुद्धीचे समर्पण
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः| गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः||
आपल्यापैकी काही जण गीतेच्या पहिल्या, काही दुसऱ्या तर काही चौथ्या स्तरात गीतेचा अभ्यास करत आहेत. अभ्यासाचे स्तर जरी वेगवेगळे असले तरी आपण सर्व जण साधक आहोत. गीतेचे पठण, चिंतन करून, त्यातील संदेशाचे आचरण करण्याचा रोज प्रयत्न आपण करतो आहोत.
व्यवस्थापनाचा प्रदीर्घ अभ्यास, अनुभव, अथवा व्यवस्थापन शास्त्रावरील निरनिराळी प्रशिक्षणे या सर्वांचे सार कशात आहे असा विचार केला तर ते सर्व भगवद्गीतेत सामावलेले आहे असे लक्षात येते. मानसशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर देखील समुपदेशनाचा उत्तम ग्रंथ जर कोणता असेल तर तो भगवद्गीता होय असे लक्षात येते. मानसशास्त्रावरील पाश्चात्य ग्रंथ breakdown अथवा विघटनावर भर देतात. आपल्यात कोणता दोष निर्माण झाला की त्याच्या विश्लेषणासाठी या पद्धतीचा प्रयोग केला जातो. आपल्याकडील शास्त्रांमध्ये मात्र असा दोष निर्माणच कसा होणार नाही याचा विचार केलेला आढळतो. आपली शास्त्रे नियमित उपचारांवर, देखभालीवर भर देतात. गाडीमध्ये बिघाड झाला की तिला breakdown service, अर्थात आपत्कालीन सेवेची गरज पडते. आपण नियमित देखभालीवर भर देतो. भगवद्गीता अशी नियमित देखभाल कशी करावी हे सांगते.
अर्जुनाला आपत्कालीन परिस्थितीत गीतेचा उपदेश भगवंतांनी केला. भगवंतांनी हा उपदेश करताना तो सर्व समाजाच्या कल्याणासाठी उपयोगी ठरावा या पद्धतीने केला. या उपदेशाचे नियमित चिंतन, मनन केले तर अर्जुनासारखी आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याआधी किंवा होऊ नये म्हणून आपल्याला त्याचा फायदा होईल. भगवद्गीता हा स्वयंव्यवस्थापनावरील उत्तम ग्रंथ आहे. वारंवार पठण, चिंतन, मनन करताना जितके अधिक असे चिंतन करू तितक्या अधिक नवनवीन गोष्टी या ग्रंथातून प्राप्त होतात असे लक्षात येते. त्यामुळेच भगवंतांनी आपल्याला गीता शिकण्याची, कंठस्थ करण्याची दिलेली ही संधी म्हणजे आपण अत्यंत भाग्यवान असल्याचे लक्षण आहे.
भगवद्गीता सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. ती अल्पमतींना अथवा बुद्धिमंतांना, सर्वांना मार्ग दाखवते. भगवद्गीतेत सांख्य अथवा ज्ञानाचे विवेचन आहे तसेच कर्मयोग सांगितला आहे. भगवद्गीतेत भक्तियोग देखील येतो. ती सर्वांना एकाचा शिखराकडे घेऊन जाते. कोणी पूर्वेकडून पश्चिमेला जातो तर कोणाला पश्चिमेकडून पूर्वेला प्रवास करावा लागतो. तुम्ही कोठे उभे आहात यावर तुमचा मार्ग ठरतो. आपल्याला कोणी विचारले की मी गंगेच्या किनाऱ्यावर आहे आणि पलीकडच्या किनाऱ्यावर जायचे आहे; तुमच्या पूर्वानुभवानुसार तेथे जाण्यासाठी ज्यावर भरवसा करू शकतो असा उत्तम नावाडी सांगा. त्यावर तुम्ही म्हणाल, "गंगेच्या किनाऱ्यावर म्हणजे नक्की गंगोत्री, ऋषिकेश, हरिद्वार, त्रिवेणी संगम, वाराणसी की गंगासागर यापैकी कोणत्या तटावर आहात ते कळले तरच नावाड्याची शिफारस करता येईल." तसेच तुमच्यासाठी ज्ञानयोगाची, कर्मयोगाची की भक्तियोगाची नौका उत्तम आहे हे तुम्ही कोठे उभे आहात यावर अवलंबून आहे.
भक्तियोग अत्यंत सरळ, समजण्यास सोपा आणि स्पष्ट आहे. सगुणाची भक्ती करणारे श्रेष्ठ की निर्गुणाची असा प्रश्न अर्जुनाने विचारला आहे. प्रश्न विचारणारा अर्जुन देखील श्रेष्ठ आहे. त्याच्यामुळे आपल्या मनातील शंकांचे निरसन झाले आहे. अर्जुन वत्स, बछडा आहे. उपनिषदे, वेदांतील ज्ञान गायीप्रमाणे आहे. भगवान श्रीकृष्ण या गायीचे दोहन करत आहेत. त्यातून प्राप्त झालेले गीतामृतरूपी दूध अर्जुन प्राशन करतो आहे.
सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः।
पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत।।
त्याच्या निमित्ताने आपल्याला देखील ते प्राप्त होते आहे. त्यामुळे अर्जुन श्रेष्ठ आहे. अर्जुनाच्या निमित्ताने वाहणाऱ्या या ज्ञानारसात अर्जुन पहिला प्रश्न करतो.
12.1
अर्जुन उवाच
एवं(म्) सततयुक्ता ये, भक्तास्त्वां(म्) पर्युपासते|
ये चाप्यक्षरमव्यक्तं (न्), तेषां(ङ्) के योगवित्तमाः||12.1||
श्रीभगवानुवाच
मय्यावेश्य मनो ये मां(न्), नित्ययुक्ता उपासते|
श्रद्धया परयोपेता:(स्), ते मे युक्ततमा मताः||12.2||
शबरी हे भक्तांचे उत्तम उदाहरण आहे. मतंग ऋषींच्या आश्रमात ती तिच्या बाल्यावस्थेतच गेली होती. तिच्या पित्याने तिच्या विवाहासाठी गावातील अनेक मेंढ्याबरोबर तिच्या जवळील कोकराला मारून गावजेवण देण्याचा बेत आखला होता. आपल्या विवाहासाठी इतक्या मुक्या प्राण्यांचा बळी जाणार हे समजल्यावर विवाहच नको म्हणून शबरी रातोरात गाव सोडून निघून गेली. पित्याने तिच्या शोधार्थ अनेकांना तिच्यामागे पाठवले. त्यांची चाहूल लागली की शबरी झाडावर चढून बसे. रात्री प्रवास करायचा दिवसा झाडावर बसायचे असे ती करत होती. एके दिवशी सकाळी तिला एक आश्रम दृष्टीस पडला. तिथे भगवी वस्त्रे परिधान केलेले खूप सात्त्विक वृतीचे लोक तिला दिसले. त्यातील काही झाडून काढत होते, कोणी सडा संमार्जन करत होते, कोणी फुले गोळा करत होते तर कोणी स्वयंपाकाची तयारी करत होते. इतक्यात एक वयोवृद्ध, चेहऱ्यावरून अत्यंत सात्त्विक आणि प्रेमळ ऋषी तिला दिसले. त्यांची सर्वांप्रती असलेली प्रेमळ वागणूक पाहून शबरीला आपण या आश्रमात राहावे असे वाटले. मतंग ऋषींनी तिला आश्रमात राहण्याची परवानगी दिली. शबरी आश्रमात राहू लागली. तेथील सेवाकार्यात मदत करू लागली. एक दिवस मतंग ऋषींनी सर्व शिष्यांना बोलावले आणि माझा आज आश्रमातून जाण्याचा दिवस आला आहे असे त्यांनी सर्वांना सांगितले. त्यांनी सर्वांना काही प्रश्न असतील तर विचारण्यास सांगितले. गुरूजी आश्रम सोडून निघाले आहेत, सर्वांना जाण्यापूर्वी प्रश्न विचारण्यास सांगत आहेत; मी तर इतकी लहान आहे, मी काय विचारणार असा प्रश्न शबरीला पडला. प्रश्न विचारण्याची पाळी आल्यावर, मला भगवंत भेटतील का, कधी भेटतील, कोठे भेटतील असे शबरीने विचारले. मतंग ऋषींनी तिला भगवंत तुला इथेच या आश्रमात भेटतील असे सांगितले आणि ऋषी आश्रम सोडून निघून गेले.
शबरी रोज भगवंतांची प्रतीक्षा करू लागली. हळूहळू सर्व शिष्य देखील आश्रम सोडून मार्गस्थ झाले. शबरी आश्रमात एकटीच राहिली. ती भगवंत येतील म्हणून रोज झाडून घेऊ लागली. सकाळी उठल्यावर ती पूर्व दिशेचा मार्ग स्वच्छ करू लागली. भगवंत कोठून येणार हे तर आपल्याला माहित नाही असे लक्षात आल्यावर मग ती चारही दिशांचे मार्ग झाडू लागली, निष्कंटक करू लागली. भगवंतांना देण्यासाठी पाणी असावे म्हणून रोज नदीवरून पाणी आणू लागली. भगवंतांना भूक लागली तर खायला देण्यासाठी फळे गोळा करू लागली. ती तिचे अस्तित्वच विसरली. जे काही करत होती ते भगवंत येतील, त्यांच्यासाठी करू लागली. नदीवरून पाणी आणताना जे काही अंगावर सांडे तेच तिचे स्नान होते. भगवंतांना देण्यासाठी आणलेली फळे मधुर आहेत की नाही हे ती चाखून बघत असे. ते चाखणेच तिचे भोजन होते. हा तिच्या नित्यक्रम झाला. असे करता करता वर्षे लोटली. लहान शबरी, वृद्ध झाली. ती प्रतीक्षा करत राहिली. गुरूजींनी सांगितले म्हणजे भगवंत नक्की येणार असा तिचा दृढ विश्वास होता. प्रभू श्रीराम येतील याची तिला खात्री होती. त्यांच्यासाठी ती फुले गोळा करत असे, सर्व आश्रमात पसरत असे. दुसऱ्या दिवशी ते निर्माल्य टाकून नवी फुले आणून पुन्हा ती आश्रम सजवत असे. शबरीने झोप देखील सोडली. एकदा झोपेत असताना तिला वाटले, प्रभू रात्री आले तर ? प्रभू दिवसा येतील की रात्री हे गुरूजींनी कुठे सांगितले आहे. आपण नित्य जागृत राहायला हवे या विचाराने मग ती रात्री देखील जागू लागली. नित्ययुक्ता उपासते असा भगवंतांच्या भेटीचा नित्य ध्यास तिने घेतला. शबरी भक्तशिरोमणी आहे. जेंव्हा भगवान श्रीराम तिच्या आश्रमात आले तेंव्हा ती त्यांच्या चरणांवर पडून रडू लागली. तिच्या अश्रुंनी त्यांचे पादप्रक्षालन झाले.
भगवंताच्या पादप्रक्षालनाची अशी संधी केवटाला देखील मिळाली होती. भगवंतांच्या चरणस्पर्शाने अहिल्येचा उद्धार झाल्याचे तो ऐकून होता. भगवंतांचे चरण आपल्या नौकेला लागले आणि तिचे रूपांतर जर स्त्रीत झाले तर आपल्या उपजीविकेचे साधन जाईल अशा भाबड्या विचाराने त्याने भगवंतांचे चरण रगडून स्वच्छ केले होते. ज्या भगवान श्रीरामांनी राजा जनकाला देखील वरपूजेवेळी आपले पाय धुवू दिले नव्हते ते श्रीराम केवटाकडून आपले चरण धुवून घेत आहेत याचे लक्ष्मण आणि सीतेला देखील खूप आश्चर्य वाटले होते. केवट आणि शबरी भक्तांची उत्तम उदाहरणे आहेत. गंगापार केल्यानंतर भगवंतांना केवटाला सेवेचे मूल्य द्यायचे होते. त्यांनी तर सर्व संग्रहाचा त्याग केलेला होता त्यामुळे जवळ काहीच नव्हते. त्यांच्या मनातील भाव सीतेने जाणले आणि तिने तिच्या बोटातील अंगठी केवटाला देण्यासाठी भगवंतांना दिली. भगवंतांनी ती केवटाला देऊ केली. केवटाने ती नाकारली. केवट भावुक झाला. तो म्हणाला, "मी अत्यंत भाग्यवान आहे. मला तुमचे नाम घेत तुम्हाला गंगापार करण्याची संधी मिळाली. गंगा तुमच्या चरणस्पर्शासाठी उचंबळत होती. नौकेत प्रवेश करू नकोस अशी विनंती मला तिला करावी लागली." केवट गात होता,
श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करूं
जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी
ही दैवाची उलटी रेघ
माथ्यावरचा ढळवूं मेघ
भाग्य आपुलें अपुल्या हातें अपुल्यापासुन दूर करूं
श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करूं
जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी
श्री विष्णूचा हा अवतार
भव-सिंधूच्या करतो पार
तारक त्याला तारुन नेऊं पदस्पर्शाने सर्व तरु
श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करूं
जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी
जिकडे जातो राम नरेश
सुभग सुभग तो दक्षिण देश
ऐल अयोध्या पडे अहल्या पैल उगवतिल कल्पतरू
श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करूं
जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी
कर्तव्याची धरुनी कांस
राम स्वीकरी हा वनवास
दासच त्याचे आपण कां मग कर्तव्यासी परत सरूं
श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करूं
जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी
अतिथि असो वा असोत राम
पैल लाविणे अपुलें काम
भलेंबुरें तें राम जाणता आपण अपुलें काम करूं
श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करूं
जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी
गंगे तुज हा मंगल योग
भगिरथ आणि तुझा जलौघ
त्याचा वंशज नेसी तूंही-दक्षिण देशा अमर करूं
श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करूं
जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी
पावन गंगा पावन राम
श्रीरामांचें पावन नाम
त्रिदोषनाशी प्रवास हा प्रभु नाविक आम्ही नित्य स्मरूं
श्रीरामांचे नाम गात या श्रीरामाला पार करूं
जय गंगे जय भागिरथी
जय जय राम दाशरथी
-- गीतरामायण - ग. दि. माडगुळकर
केवट प्रभूंना म्हणाला, "प्रभू आपण समव्यावसायिक आहोत. समव्यवसायिक एकमेकांकडून सेवामूल्य घेत नाहीत. मी लोकांना गंगापार करतो. आज मला तुम्हाला गंगापार करण्याचे सौभाग्य लाभले. तुम्ही भवसागर पार करता. माझी ही सेवा उधार राहील. माझी वेळ येईल तेंव्हा तुम्ही मला भावसागरातून पार करा."
असे श्रेष्ठ भक्त श्रद्धेने युक्त असतात.
ये त्वक्षरमनिर्देश्यम्, अव्यक्तं(म्) पर्युपासते|
सर्वत्रगमचिन्त्यं(ञ्) च, कूटस्थमचलं(न्) ध्रुवम्||12.3||
सन्नियम्येन्द्रियग्रामं(म्), सर्वत्र समबुद्धयः|
ते प्राप्नुवन्ति मामेव, सर्वभूतहिते रताः||12.4||
भूतमात्रांमध्ये सर्व चराचर येतात. चराचरातील सर्वांमध्ये भगवंताचे अस्तित्व आहे. त्यामुळेच आपण नागपंचमीला नागाची, बैलपोळ्याला बैलाची, रोज गायीची, वसुबारसेला गाय आणि वासराची पूजा करतो. आपण वृक्षांचे पूजन करतो. पिंपळ पूज्य आहे, तुळस पूज्य आहे तसेच वट सावित्रीला वडाची पूजा होते. गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते. आपल्याला गंगेसारख्या नद्या पूज्य आहेत. नारळीपौर्णिमेला आपले कोळीबांधव सागराची पूजा करतात. आपण सूर्याला अर्ध्य देतो. पंचमहाभूतांमध्ये भगवंत आहेत असे आपण मानतो.
जे असे सर्वभूतहिते रता: असतात त्यांना सर्वत्र परमात्म्याचे अस्तित्व जाणवते त्यामुळे ते समबुद्धयः समबुद्धी होतात. त्यांच्यासाठी कोणी लहान मोठा नसतो. ते मुंगीला साखर देतात आणि हत्तीला देखील फळ देतात. त्यांचा सर्वांप्रती सम भाव असतो. असे लोक मलाच येऊन मिळतात असे भगवंत सांगतात.
क्लेशोऽधिकतरस्तेषाम्, अव्यक्तासक्तचेतसाम्|
अव्यक्ता हि गतिर्दुःखं(न्), देहवद्भिरवाप्यते||12.5||
तू ही है सर्वत्र व्याप्त हरि ! तुझमें यह सारा संसार । इसी भावना से अंतर भर, मिलूँ सभी से तुझे निहार ।। अशी भावना असते. ते निर्गुण रुपात भगवंतांना भजतात. हा मार्ग कठीण आहे. क्लेशोऽधिकतर -- यात अधिक क्लेश आहेत. ज्यांना देहाभिमान असतो, जे व्यक्त रूपात स्वतःला जाणतात, ज्यांना आजूबाजूच्या सृष्टीचे व्यक्त स्वरूपात ज्ञान होते त्यांना अव्यक्त, निर्गुण निराकाराचे ज्ञान होणे कठीण असते. हे समजण्यास क्लिष्ट आहे. या मार्गाने भगवंताची प्राप्ती कठीण आहे. अशांना सगुण रूपाची सुलभ नौका भवसागर तरुन जाण्यास योग्य ठरते.
है जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में…
मेरा निश्चय है बस एक यही,
एक बार तुम्हे पा जाऊं मैं,
अर्पण करदूँ दुनिया भर का,
सब प्यार तुम्हारे हाथों में…
जो जग में रहूँ तो ऐसे रहूँ,
जैसे जल में कमल का फूल रहे,
मेरे सब गुण दोष समर्पित हों,
करतार तुम्हारे हाथों में…
यदि मानव का मुझे जन्म मिले,
तो तेरे चरणों का पुजारी बनूँ,
इस पूजा की एक एक रग का,
हो तार तुम्हारे हाथों में…
जब जब संसार का कैदी बनू,
निष्काम भाव से कऱम करूँ,
फिर अंत समय में प्राण तजूं,
निराकार तुम्हारे हाथों में…
मुझ में तुझ में बस भेद यही,
मैं नर हूँ तुम नारायण हो,
मैं हूँ संसार के हाथों में,
संसार तुम्हारे हाथों में…
अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में,
है जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में…
कार्पण्यदोषोपहतस्वभावः, पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः।
यच्छ्रेयः स्यान्निश्चितम् ब्रूहि तन्मे, शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्।।२.७।।
अर्जुन इथे म्हणतो, करुणाव्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हांला विचारीत आहे की, जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे, ते मला सांगा. कारण मी तुमचा शिष्य आहे. म्हणून तुम्हांला शरण आलेल्या मला उपदेश करा. अर्जुनाने संपूर्ण समर्पण केले, तो शरण गेला आणि शिष्यत्व स्वीकारले तेंव्हाच भगवंतांनी त्याला गीतेचा उपदेश केला. अर्जुनाने जीवनाचे सारथ्य भगवंतांना दिले, त्याने केवळ घोड्यांचा लगाम त्यांच्या हाती दिला नव्हता. भगवंतांसाठी त्याने भगवंतांच्या एक अक्षौहिणी सेनेचा त्याग केला होता. युद्धापूर्वी जेंव्हा अर्जुन आणि दुर्योधन भगवंतांना भेटायला गेले तेंव्हा अर्जुन भगवंतांच्या चरणाशी बसला तर दुर्योधन मस्तकाजवळ बसला. खरे तर दुर्योधन आधी आला होता पण चरणाशी बसलेल्या अर्जुनाला भगवंतांनी प्रथम मागणी करण्याची संधी दिली. अर्जुनाने निःशस्त्र भगवंतांना मागितले.
युद्ध सुरू होताना जेंव्हा शंखनाद झाले तेंव्हा युधिष्ठिर पादत्राणे काढून रथातून खाली उतरला आणि कौरवसेनेच्या दिशेने चालू लागला. पांडवांच्या राजाने पादत्राणे त्यागून आपल्या सेनेकडे चालत येणे म्हणजे शरणागती पत्करणे असे काही कौरवांना वाटले. युधिष्ठिर चालत पितामह भीष्मांच्या रथापाशी येऊन थांबला. त्याने वाकून माथा टेकून पितामहांना नमस्कार केला. कोणत्याही कार्याचा आरंभ करण्यापूर्वी ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यायचे या प्रथेप्रमाणे त्याने पितामहांना वंदन केले. पितामहांसाठी हा कसोटीचा प्रसंग होता. कुळाच्या रीतीप्रमाणे वंदन करणाऱ्या कनिष्ठांना आशीर्वाद देणे आवश्यक होते. त्यांनी युधिष्ठिराला 'विजयी भव' असा आशीर्वाद दिला. पांडवांचा विजय इथेच नक्की झाला. विनम्रतेत ही ताकद असते.
घरातील मोठ्या माणसांना घरातून बाहेर पडताना रोज नमस्कार करून बाहेर जावे. रोजच्या कुरबुरींना अशा नम्रतेतून विराम मिळतो, क्लेश संपुष्टात येतात.
ये तु सर्वाणि कर्माणि, मयि सन्न्यस्य मत्पराः|
अनन्येनैव योगेन, मां(न्) ध्यायन्त उपासते||12.6||
भगवंत म्हणतात, मत्परायण होऊन जो सर्व कर्मे मला अर्पण करतो तो योगीच होतो. तो माझेच ध्यान, उपासना करतो. भगवंतांनी इथे अत्यंत अद्भुत गोष्ट सांगितली. तू ही है सर्वत्र व्याप्त हरि ! तुझमें यह सारा संसार ।
मी घरातून बाहेर पडेन तेंव्हा तुझी प्रदक्षिणा असेल अशी भावना असावी. भगवान आद्य शंकरचार्यांनी त्यांच्या प्रार्थनेत हेच म्हटले आहे -
आत्मा त्वं गिरिजा मति: सहचरा: प्राणाः शरीरं गृहं
पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधिस्थिति: ।
संचारः पदयोः प्रदक्षिण विधिः स्तोत्राणि सर्वा गिरा
यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनाम ।।
भगवंता माझा आत्मा तू आहेस, बुद्धी माता पार्वती आहेत, प्राण तुमचे गण आहेत. माझा देह तुमचे घर आहे, विषयभोगांची रचना तुमची पूजा आहे, निद्रा समाधी आहे, पायाने चालणे, फिरणे तुमची प्रदक्षिणा आहे, तथा माझ्या वाणीतून बाहेर पडणारे शब्द तुमचीच स्तुती आहे. मी जे काही कर्म करतो, ते तुमच्या अखिल शिवस्वरूपाची आराधना आहे.
या काव्यात केवढा समर्पण भाव आहे. माझ्या वाणीतून येणारे शब्द स्तोत्राप्रमाणे तुमची स्तुती आहेत असा विचार केल्यावर तोंडाने कधीही कोणाविषयी अपशब्द येणार नाही. यातून आपोआप अंतर्मनाचे परिवर्तन सुरू होते.
तेषामहं(म्) समुद्धर्ता, मृत्युसंसारसागरात्|
भवामि नचिरात्पार्थ, मय्यावेशितचेतसाम्||12.7||
मय्येव मन आधत्स्व, मयि बुद्धिं(न्) निवेशय|
निवसिष्यसि मय्येव, अत ऊर्ध्वं(न्) न संशयः||12.8||
गुरू शरणानंद महाराजांबरोबर काही शिष्य रोज फिरायला जात. शरणानंद महाराज प्रज्ञाचक्षू होते. त्यांना चर्मचक्षू नव्हते. ते फिरायला जाताना काठी घेऊन जात असत. एकदा फिरून झाल्यावर ते एका झाडाखाली बसले. तिथे पडलेला एक दगड त्यांनी उचलला. त्याला प्रेमाने कुरवाळले आणि म्हणाले, "मी उद्या पुन्हा येईन. माझी वाट बघ." असे म्हणून त्यांनी दगड ठेवला. बरोबरच्या लोकांपैकी काहींना वाटले हा वेडपटपणा आहे. दुसऱ्या दिवशी महाराज फिरून झाल्यावर पुन्हा त्याच झाडाखाली येऊन बसले, त्यांनी पुन्हा तोच दगड उचलला आणि म्हणाले, "मी म्हणालो होतो ना, उद्या येईन. बघ मी आलो आहे." त्या शिष्यांपैकी एका शिष्याची बुद्धी साशंक होती, समर्पण झाले नव्हते. त्याला वाटले महाराज पावले मोजत असले पाहिजेत, त्यामुळे झाड कोठे आहे, तो दगड कोठे आहे हे त्यांना कळत असणार. त्याखेरीज बरोबर तोच दगड उचलणे शक्य नाही. महाराजांनी उठताना पुन्हा त्या दगडाला पुनर्भेटीचे वचन दिले. आता या बुद्धिवादी भक्ताने परीक्षा करण्याचे ठरवले. त्याने तो दगड जिथे होता तेथून उचलून पन्नास पावले पुढे चालत जाऊन उजव्या दिशेला फेकला. त्याने विचार केला आता बघू उद्या काय होते, आता काही हा दगड महाराजांना मिळणार नाही. पुढील दिवशी महाराज पुन्हा शिष्यांबरोबर बाहेर पडले. चालत जाताना नेहमीच्या झाडाच्या पन्नास पावले आधीच ते थांबले. वाटेतील तोच दगड त्यांनी उचलला आणि त्याला म्हणाले, "अरे तुला पाय कसे फुटले." असे म्हणून त्यांनी तो दगड पुन्हा त्या झाडाखाली आणून ठेवला. हे बघितल्यावर ज्या साशंक बुध्दीच्या शिष्याने हे केले होते, त्याने महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि क्षमा मागितली. तो म्हणाला, "महाराज मी शंका घेऊन तो दगड झाडाखालून उचलून इथे आणून टाकला होता. कृपा करुन मला हे कसे होते आहे ते सांगा." यावर शरणानंद महाराज म्हणाले, "मुला, प्रत्येक दगडात तेच चैतन्य असते. तुम्ही अंतःकरणापासून साद घातलीत तर ते चैतन्य जागृत होते."
म्हणूनच दगडापासून मूर्ती घडवली जाते. भक्तांच्या प्रेमातून, त्यांच्या आर्त हाकेतून त्या मूर्तीतील चैतन्य जागृत होते. पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाला लाखो वारकरी दरवर्षी शेकडो किलोमीटर आंतर पायी चालून येतात. त्या मूर्तीच्या पायावर माथा टेकतात, लोटांगण घालतात. विठोबाच्या मूर्तीतील चैतन्य या असंख्य भक्तांच्या प्रेमातून, श्रद्धेतून किती जागृत असेल ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मन आणि बुद्धी दोहोंचे समर्पण होणे आवश्यक आहे. यातूनच पुढे योग साधतो. यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार ही योगाची बहिरंग साधने आहेत. धारणा, ध्यान आणि समाधी या अंतरंग साधनांकडे जाण्यासाठी प्रथम मनाचे समत्व साधावे लागते. भगवंत तेच सांगत आहेत.
अथ चित्तं(म्) समाधातुं(न्), न शक्नोषि मयि स्थिरम्|
अभ्यासयोगेन ततो, मामिच्छाप्तुं(न्) धनञ्जय||12.9||
भगवान बुद्धांना एका शिष्याने विचारले मोक्ष जर सुलभ आहे तर तो सर्वांना का प्राप्त होत नाही. बुद्धांनी त्याला, 'तुम्हाला आयुष्यात काय हवे आहे', असा प्रश्न ज्या घरी तू भिक्षेसाठी जाशील तिथे विचार असे सांगितले. शिष्य भिक्षा मागून परत आल्यावर बुद्धांनी त्याला विचारले, "मोक्ष हवा असे सांगणारा तुला कोणी भेटला का ?" शिष्याने उत्तर दिले, "महाराज, कोणाला धन हवे आहे, कोणाला भार्या हवी आहे तर कोणी आजारातून मुक्त व्हायचे आहे. मोक्ष कोणालाच नको आहे." कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी प्रथम तिची इच्छा मनात धरावी लागते.
भगवंत म्हणतात, "तुला माझी प्राप्ती करायची असेल तर प्रथम माझी इच्छा मनात धरावी लागेल, मग प्राप्तीचा अभ्यास करावा लागेल." अभ्यास करणे देखील शक्य नसेल तर भगवंत म्हणतात, "हरकत नाही. तू माझा आहेस. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुला अभ्यास अवघड वाटत असेल तर याहून सोपा उपाय सांगतो." भगवंतांनी अर्जुनाला कोणता सोपा उपाय सांगितला हे पुढच्या सत्रात पाहूया. आता प्रश्नोत्तरे घेऊया.
प्रश्न: मला नवव्या श्लोकातील धनञ्जय आणि ततो या दोन शब्दांचे अर्थ स्पष्ट करून सांगाल का?
उत्तर: धनंजय म्हणजे ज्याने धनावर विजय प्राप्त केला आहे तो. पांडवांना हस्तिनापुरातून बेदखल करण्यात आले होते. त्यांनी स्वतःचे नगर वसवले. ते नगर वसवण्यासाठी अर्जुनाने अनेक राजांशी युद्ध करून खूप धन जमा केले होते म्हणून त्याचे धनंजय असे नाव पडले.
ततो अर्थात ततः चा अर्थ होतो तर. जर, तर मधील हा तर आहे. जर तू मन माझ्यात ठेवण्यास असमर्थ असशील तर - असा इथे ततो चा अर्थ होतो.
प्रह्लाद भैय्या
प्रश्न: कोणत्याही चांगल्या कार्यात, जसे गीता परिवाराच्या कार्यात, जर कोणी अडथळा आणत असेल तर काय करावे ?
उत्तर: प्रथम आपण आपली कर्तव्य पूर्ण केली पाहिजेत. बाकीची सेवाकार्य नंतर येतात. आपण घरच्यांप्रती असलेली आपली कर्तव्य, वेळप्रसंगी लवकर उठून, अधिक कष्ट घेऊन पूर्ण करायला हवीत आणि मग अतिरिक्त वेळ गीतापरिवारासारख्या सेवाकार्याला देऊ शकता. कर्तव्य पूर्ण केल्यानंतर देखील जर कोणी अडथळा आणत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना क्षमा करावी. आपण स्वतः आपला उद्धार करू शकतो. भगवंतांनी यासाठी म्हटले आहे
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥
आपणच आपले मित्र, बंधू आणि शत्रू आहोत. आपणच आपला उद्धार करू शकतो त्यामुळे बाहेरचा कोणीही अशा उद्धारात अडथळा आणू शकत नाही.
बजरंग भैय्या
प्रश्न: मुस्लिम मूर्तिपूजा करत नाहीत. मग ते निर्गुणाची पूजा करतात का ?
उत्तर: हो ती निर्गुणाचीच पूजा होय. पण त्यासाठी देखील श्रद्धेची आवश्यकता असते. सगुणाची पूजा देखील अंतिमतः निर्गुणाकडे घेऊन जाते. आपण गणपती उत्सव करतो आहोत. मूर्तीची सगुण रूपात दहा दिवस पूजा होते. दहाव्या दिवशी मूर्तीचे विसर्जन केले जाते. विसर्जन म्हणजे विस्ताराने सृजन. मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यावर ती जलमय होते. आपल्या मनातील भावाचा विस्तार होतो. मूर्तिरूपातून जलरूपात तेच तत्त्व आहे असा भाव होतो. ही सगुणाकडून निर्गुणाकडे वाटचाल आहे. भगवंतांनी एक मला शरण ये असे सांगितले आहे - सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज। सर्वात शेवटी एकच तत्त्व आहे.
आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् |
सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति ||
आकाशातून पडणारे पाणी शेवटी सर्व मार्गांनी सागराला मिळते तद्वत कोणत्याही देवाला केलेला नमस्कार अंततः भगवान श्रीकृष्णाप्रती पोहोचतो. हेच अंतिम सत्य आहे.
दीनदयाळ राठी भैय्या
प्रश्न: आपण अनुनासिकाचा उच्चार कधी म, कधी न असा निरनिराळा करतो. तो केंव्हा कसा करावा हे कसे समजेल ?
उत्तर: यासाठी वर्ण उच्चार, अनुनासिक उच्चार यांचे व्याकरण नियम आहेत. त्यासाठी व्याकरणाचा वेगळा वर्ग आहे.
विद्वत्ता दीदी
प्रश्न: आजच्या युगात तर्क आणि शास्त्राला खूप महत्त्व आहे. शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या सहाय्याने पडताळून पहाण्यावर भर असतो. कोणतीही गोष्ट पुराव्याशिवाय स्वीकारू नये असेच आपल्याला शिकवले जाते. याने मन नेहमीच साशंक अवस्थेत असते. अशा वेळी समर्पण कसे करावे ? श्रद्धेने तुम्ही दगडात चैतन्य जागृत करू शकाल असे तुम्ही विवेचनात सांगितलेत, पण माझ्या साशंक मनाने मी श्रद्धा ठेवू शकेन का असा देखील प्रश्न पडतो.
उत्तर: अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि, मत्कर्मपरमो भव | ह्यावरच पुढील सत्रात आपण आणखीन भाष्य करणार आहोत. अभ्यास करण्यास देखील जर असमर्थ असशील तर तुझे कर्म माझ्यासाठी करतो आहेस या भावनेने कर असे भगवंतांनी सांगितले आहे. एवढे जरी करता आले तरी हळूहळू श्रद्धा उत्पन्न होऊ लागते. आई आपल्याला हे तुझे बाबा अशी ओळख करून देते तेंव्हा आपण तिच्यावर श्रद्धा ठेवून ते खरे मानतोच ना. तिथे काही DNA चाचणी करून मग ठरवू असे म्हणत नाही. श्रद्धेशिवाय पुढे जाता येणार नाही. आपण गीता शिकतो आहोत त्या काळात तरी भगवंत सांगतात त्याप्रमाणे कर्म भगवंतांना अर्पण करण्याचा प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. एकदा हे जमले की भगवंतच पुढचा मार्ग सुलभ करतील, त्यातूनच श्रद्धा उत्पन्न होईल. भगवंतांना आपल्या मनात प्रवेश द्यायचा असेल तर आपणच दरवाजा थोडा उघडला पाहिजे.
उमा दीदी
प्रश्न: यम, नियम काय आहेत ?
उत्तर: यम पाच आहेत, नियम पाच आहेत. ज्या वर्ज्य गोष्टी आहेत त्या न करणे म्हणजे यम. असत्य बोलू नये, म्हणजे सत्य यम आहे. हिंसा करू नये, म्हणजे अहिंसा यम आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य हे पाच यम आहेत. नियमित कोणत्या गोष्टी कराव्यात त्या नियमांमध्ये येतात. यम, नियम अष्टांगयोगाची साधने आहेत. भगवान पतंजलींनी सूत्ररूपात अष्टांगयोगाची मांडणी केली, त्यात हे सर्व येते. पण मुख्य तत्त्व योगेश्वर भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये कथन केले. सूत्ररूपात सांगितलेली पतंजली सूत्रे संक्षिप्त असल्याने समजण्यास कठीण आहेत. गीतेच्या सहाव्या अध्यायात, आत्मसंयमयोगात हे विस्ताराने आलेले आहे. गीता समजण्यास सुलभ आहे. गीता शिकलात की हे सर्व आपोआप समजू लागेल.
कैलाश भैय्या
प्रश्न: मन आणि बुद्धी अर्पण करण्याचा सरळ, सोपा मार्ग कोणता ?
उत्तर: मन आणि बुद्धी एकाकार झाल्याखेरीज कार्यात यश मिळत नाही. हा आपला अनुभव आहे. परीक्षेत यश मिळवायचे असेल तर शिक्षक शिकवत असताना मन वर्गात असणे गरजेचे असते, बुद्धी त्याच वेळी विषयावर केंद्रित होणे आवश्यक असते. मन जर कुठे बाहेर भटकत असेल तर फक्त बुद्धी केंद्रित करता येत नाही. हे दोन्ही जेंव्हा विषयवस्तूशी एकरूप होतात तेंव्हाच यश प्राप्त होते. मन आणि बुद्धी अर्पण करण्यासाठी भगवद्गीतेत सविस्तर विवेचन केलेले आहे. ह्याची सुरूवात सहाव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे प्रथम नीट बसण्याने होते. बसताना मान, पाठीचा कणा एका रेषेत सरळ, स्थिर असले पाहिजेत. यानंतर नासिकग्रावर लक्ष केंद्रीत करावे. प्राणांवर नियंत्रण आणावे. साक्षीरूपाने श्वासोच्छ्वासावर लक्ष द्यावे, याने प्राणांचे समत्व साधते. सरळ बसण्याने छाती मोकळी होते, फुप्फुसे सहज प्रसारण पावतात आणि जास्ती प्राणवायू श्वासाद्वारे आत येतो. याने सर्व शरीराला प्राणवायूचा योग्य प्रमाणात पुरवठा होतो. समत्वाची सुरूवात अशी देहाचे समत्व साधण्याने होते. मग पुढे मनाचे समत्व साधता येते. याचा अभ्यास दिवसातून ५-६ वेळा केला तरी पुरतो. आपण अवश्य प्रयोग करुन पहा.
गिरिजा जी
प्रश्न: दैनंदीन जीवनात गीता कशी उपयोगात येते ?
उत्तर: भगवद्गीता व्यवस्थापनाचा उत्तम ग्रंथ आहे. गीतेत विकारांवर विजय कसा प्राप्त करावा, उदाहरणार्थ क्रोध नियंत्रणात कसा आणावा हे सांगितले आहे. हे जरी जमले तरी आयुष्यातील निम्म्याहून अधिक प्रश्न सुटतील. क्रोधाने प्रश्न वाढतात हा आपला अनुभव आहे.
यानंतर समापन प्रार्थना आणि हनुमान चालीसा पठणाने सत्राची सांगता झाली.
।।श्रीकृष्णार्पणमस्तु।।