विवेचन सारांश
नश्वर जगातील परमेश्वराचे अस्तित्व

ID: 3827
मराठी
रविवार, 15 ऑक्टोबर 2023
अध्याय 9: राजविद्याराजगुह्ययोग
2/3 (श्लोक 12-21)
विवेचक: गीता विशारद डॉ आशू गोयल जी


अतिशय सुंदर अशी प्रार्थना आणि दीपप्रज्वलनाने या अध्यायाची सुरुवात झाली. 

वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्।
देवकीपरमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुम्॥

योगेशं सच्चिदानंद वासुदेवं व्रजप्रियम्।
धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्॥

भगवंताची मंगलमय कृपा आपल्यावर असल्याने आपल्या जीवनाचे सार्थक करण्यासाठी व आपले जीवन मंगलमय बनविण्यासाठी आपण गीतेचे उच्चारण, अर्थ, तत्त्वज्ञान जाणण्याच्या या सगळ्या अभ्यासाला प्रारंभ केला आहे. आपले पूर्वजन्मीचे पुण्य, आपल्या पूर्वजांचे सुकृत किंवा यापूर्वीच्या काही जन्मांत मिळालेले संत महात्म्यांचे आशीर्वाद यामुळे आपला भाग्योदय होऊन  गीता शिकण्यासाठी आपली निवड झाली आहे. 

मानवाच्या कल्याणासाठी भगवद्‌गीतेसारखा इतर कोणताही ग्रंथ नाही. इहलोकात व परलोकात देखील जीवन जगण्याचे मार्गदर्शन केवळ ह्या एका ग्रंथातच मिळू शकते.

संत-महात्मे म्हणतात, भगवद्‌गीता पूर्णपणे समजण्यास हवी, हा अ‌ट्टाहास धरू नये. ज्याप्रकारे सूर्यदेवाला आपण संपूर्णपणे जाणत नसूनही सूर्यदेव पृथ्वीवरील सर्वांना समान उष्णता प्रदान करतो, त्याचप्रकारे भगवद्‌गीतेच्या सानिध्यात आलेल्या प्रत्येकाला हा ग्रंथ कल्याणकारी उष्णता प्रदान करतो.

आपण 'राजविद्याराजगुह्ययोग' घ्या नवव्या अध्यायाचे चिंतन करीत आहोत. भगवंतांनी सातव्या अध्यायापासून 'ज्ञान-विज्ञानयोग' कथन करण्यास आरंभ केला. त्यातून अर्जुनाला पडलेल्या प्रश्नांचे निराकरण त्यांनी आठव्या अध्यायात केले आहे. नवव्या अध्यायात पुन्हा एकदा भगवंत ज्ञानविज्ञानयोगाचा पुढील भाग प्रस्तुत करीत आहेत.

मागील सत्रात आपण पाहिले, कशाप्रकारे भगवंत अर्जुनाला सांगतात की, "सर्व प्राणीमात्रांत माझा अंश आहे पण तरीही मी ह्या सर्वांच्या पलीकडे आहे."

अवजानन्ति मां(म्) मूढा, मानुषीं(न्) तनुमाश्रितम्।
परं(म्) भावमजानन्तो, मम भूतमहेश्वरम्।।९.११।।
माझ्या परम भावाला न जाणणारे मूर्ख लोक मनुष्यशरीर धारण करणार्‍या मला - सर्व भूतांच्या ईश्वराला तुच्छ समजतात. अर्थात आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्यरूपात वावरणाऱ्या मला परमेश्वराला सामान्य मनुष्य समजतात.

येथे मूढ हा शब्द भगवंतांनी अशा पंडितांना उद्देशून वापरला आहे की जे लिहिणे वाचणे तर जाणतात तरीही अज्ञानी असतात.

जर कोळसा आणि हिरा शेजारी शेजारी ठेवले, तर सामान्य मनुष्याच्या( थोडक्यात अज्ञानी) नजरेत हिरा सर्वात मौल्यवान आहे. परंतु रसायनशास्त्रज्ञाच्या( थोडक्यात ज्ञानी) मते दोन्हींचे तत्वतः मूल्य समानच आहे, कारण हजारो वर्षांनंतर याच कोळश्याचे रूपांतर हि-यात होणार आहे. त्याचप्रमाणे संत-महात्म्यांची वचने आपल्या सर्वांना वेगवेगळ्या प्रकारे समजतात. आपला भूतकाळ, आपले पूर्वग्रह, आपली विचार करण्याची क्षमता हया सर्व घटकांवर तो विचार अवलंबून असतो.

इथे मूढचा अर्थ असा आहे की ज्याला एखादी गोष्ट समजून घेण्याची क्षमता नाही तो त्या विषयातला मूढ आहे. प्रत्येकाला सर्वकाही समजते असे नाही. उदाहरणार्थ, कॉमर्सच्या विद्यार्थ्याला फिजिक्स आणि केमिस्ट्री नीट समजत नाही आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्याला कॉमर्स नीट समजत नाही, त्यामुळे ते एकमेकांच्या विषयासाठी मूढ ठरतात. अशा प्रकारचा मूर्खपणा माणसांमध्ये नेहमीच पहावयास मिळतो. ढोंगी माणसाला परमेश्वर मानणे आणि परमेश्वराला फसवे समजणे हा मूर्खपणा आहे.

कौरवांच्या सभेत जेव्हा भगवंतांनी आपले वैश्विक रूप दाखवले तेव्हा ते पाहून भीष्म आणि विदुर उत्साहित झाले आणि त्यांना नतमस्तक झाले तर दुर्योधन, दुःशासन, शकुनी, कर्ण यांनी या तेजापासून आपल्या डोळ्यांचे रक्षण केले. भीष्म आणि विदुर त्या तेजरसात धन्य झाले तर दुर्योधन, दुःशासन, कर्ण आणि शकुनी ते तेज सहनही करू शकले नाहीत. तेज जरी एकच होते तरी त्यांच्या डोळ्यांवर मूढतेची छाया होती.

जेव्हा रामायणात आपण सतीचा प्रसंग पाहतो, तेव्हा हे कळून येते की राम हेच परमब्रह्म आहेत हे सतीला जाणवत नाही, हा एक मूढतेचाच प्रकार आहे आणि ह्या मूढतेमुळे सतीला स्वतःच्या शरीराचा त्याग करावा लागला.

भागवतात एक प्रसंग आहे. ब्रह्माजींनी सुद्धा कृष्णाचा स्वभाव पाहून त्याच्या स्वरूपाबद्दल खात्री करण्यासाठी सर्व गाई व गोपाळांना एका गुहेत बंद करून ठेवले होते. एक दिवसानंतर (ब्रह्माजींचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरचे सहा महिने होत.) परत येऊन पाहतात तर सर्व गाई व गोपाळ श्रीकृष्णांबरोबर बाहेर खेळत होते. ब्रह्माजींनी पुन्हा गुहेत जाऊन पाहिले तर तिथेही सर्व गाई गोपाळ होतेच. ही सर्व लीला पाहून ब्रह्माजींना परब्रह्माची खात्री पटली की गोकुळात बाळलीला करणारा श्रीकृष्ण हा भगवंतांचेच स्वरूप आहे.

आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा जेव्हा आपण आपल्या धर्मग्रंथांना, पुराणांना, श्रद्धेला विरोध करतो, तेव्हा आपण मूर्ख असतो. तात्पर्य असे आहे की एखाद्या गोष्टीला नकळत विरोध करणे हा मूर्खपणा आहे. भगवंत म्हणतात की जितका मूर्खपणा वाढेल तितकी आसुरी प्रवृत्ती वाढेल.

9.12

मोघाशा मोघकर्माणो, मोघज्ञाना विचेतसः।
राक्षसीमासुरीं(ञ्) चैव, प्रकृतिं(म्) मोहिनीं(म्) श्रिताः।।9.12।।

ज्यांची आशा व्यर्थ, कर्मे निरर्थक आणि ज्ञान फुकट असे विक्षिप्त चित्त असलेले अज्ञानी लोक राक्षसी, आसुरी आणि मोहिनी प्रकृतीचाच आश्रय करून राहतात.

हे अर्जुन!, मोघाशा (व्यर्थ आशा), मोघकर्म (व्यर्थ कर्म) आणि मोघज्ञान (व्यर्थ ज्ञान) यामुळे माणूस मोहित होतो आणि तो आसुरी व राक्षसी मतांकडे आकर्षित होतो.

आपल्या आशा काळाबरोबर बदलत राहतात पण कधीच संपत नाहीत. म्हणून भगवंत म्हणतात की या सर्व आशा व्यर्थ आहेत कारण आपल्या आशा पूर्ण झाल्या तरीही आपण समाधानी नसतो आणि नेहमी अधिकची अपेक्षा करतो.

आपल्या आशा जितक्या मजबूत होतात, तितकेच आपण त्या आशा पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस काम करतो. अनेकवेळा आपण पाहतो की आपण आपल्या आयुष्याचा एक मोठा भाग त्या आशा पूर्ण करण्यात वाया घालवला आहे, ज्या पूर्ण केल्यानंतर आपल्याला वाटते की आपण खूप मोठी चूक केली आहे. व्यर्थ आशा बाळगून व्यर्थ कर्म केल्यावर, अशी परिस्थिती येते जेव्हा आपण व्यर्थ ज्ञान देऊ लागतो. “लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण” म्हणजे आपण इतरांना सल्ला देतो पण स्वतः त्याचे पालन करत नाही.

कधी कधी लोकांचा इतरांना उपदेश देण्यामागचा हेतूही  चांगला नसतो. यासंबंधात रामायणामध्ये एक चांगले उदाहरण आहे.- श्रीराम वनवासात असताना शूर्पणखेच्या कथानकातील प्रसंगात जेव्हा खरदूषणाचा श्रीरामांबरोबरच्या युद्धात पराभव होतो व त्याचे कैक हजार सैनिक मारले जातात तेव्हा शूर्पणखा आपले बदला घेण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी रावणाच्या दरबारात जाते व त्याला उपदेश करते.

करसि पान सोवसि दिनु राती । सुधि नहिं तव सिर पर आराती ॥
राजनीति बिनु धन बिनु धर्मा। हरिहि समर्पे बिनु सतकर्मा॥
बिद्या बिनु बिबेक उपजाएँ। श्रम फल पढ़ें किएँ अरु पाएँ॥
संग तें जती कुमंत्र ते राजा। मान ते ग्यान पान तें लाजा॥
प्रीति प्रनय बिनु मद ते गुनी। नासहिं बेगि नीति अस सुनी

रावणाच्या राजमहालात जाऊन शूर्पणखा म्हणते की तू सारा दिवस मद्यपान करून पडून राहतोस, तुला कल्पनाही नाही की शत्रू तुझ्या राज्याच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचला आहे. नीतीशिवाय राज्य, धर्माशिवाय धन, समर्पणभावाशिवाय उत्तम कर्म आणि विवेकाशिवाय विद्या प्राप्त केली तर ते केवळ श्रमच होतात. हाती काहीच लागत नाही. सफलता प्राप्त होत नाही. नम्रता नसेल तर प्रेम नष्ट होते आणि अहंकारामुळे गुणी माणूस सुद्धा लवकरच नाश पावतो अशी नीती मी ऐकली आहे.

रिपु रुज पावक पाप प्रभु अहि गनिअ न छोट करि।
अस कहि बिबिध बिलाप करि लागी रोदन करन॥
शत्रू, रोग, अग्नी, पाप, गुरु आणि सर्प यांना कमी लेखू नये. असे म्हणत शूर्पणखा अनेक प्रकारांनी विलाप करत रडू लागली.

हे सर्व ज्ञान रावणाला सांगण्यामागे शूर्पणखेचा एकच उद्देश होता की माझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मी रावणाला प्रवृत्त करीन. परंतु तिला असेही वाटले की केवळ एवढेच ऐकून माझ्यासाठी रामाचा बदला घेण्यासाठी रावण कदाचित जाणार नाही म्हणून तिने सीतेबद्दल रावणाचे मन आकर्षित करण्याचाही प्रयत्न केला होता.

सुरुवातीस नीतीच्या गोष्टी करून ज्या शूर्पणखाने रावणाला असा सल्ला दिला, अशा शूर्पणखेला आपण ज्ञानी मानावे का? हे मोघज्ञान होते. रावणाला ज्ञान देण्याचा तिचा उद्देश अजिबातच पवित्र नव्हता. त्यामागे केवळ बदला घेण्याचा हेतू होता. रामाने तिच्याशी विवाह करण्यास नकार दिला होता व लक्ष्मणाने तिचे नाक कापले होते त्यामुळे तिचा अपमान झाला होता.

विचेतसः म्हणजे चित्त ठिकाणावर नसणे. सहसा क्रोधामुळे मनुष्याची अशी अवस्था होते. एक जोडपे होते. पतीचा पगार जेमतेम ५,००० रुपये होता. सामान्यपणे त्यांचा निर्वाह होत होता. पत्नीने एकदा तिच्या मैत्रिणीकडे काचेचा छान डिनर सेट बघितला. तिलाही आपल्या घरी तो हवा अशी इच्छा झाली. परंतु त्याची किंमत ४,००० रुपये होती. पतीने तिला समजावले की हे आपल्याला परवडण्यासारखे नाही. परंतु पत्नीच्या मनातून ती गोष्ट काही जात नव्हती. दर पंधरा दिवसांनी या गोष्टीवरून दोघांमध्ये भांडण होत असे. असे सहा महिने गेले. दिवाळी आली. पतीने तिला सांगितले की आता मला बोनस मिळेल तेव्हा तुला हवा तसा डिनर सेट आपण घेऊ.

बोनस मिळाल्यानंतर दोघे दुकानात गेले व त्यांनी डिनर सेट खरेदी केला. घरी आल्यावर काचेच्या नवीन प्लेटमध्ये पत्नीने जेवण वाढले. जेवण वाढताना ती म्हणाली की "मला हिरव्या रंगाचा सेट हवा होता." तेव्हा पती म्हणाला "मी तर तुला हवा तो सेट घे म्हणून सांगितले होते." जेवायचे सोडून ते दोघे एकमेकांना दूषणे देत राहिले. पत्नी खुश नव्हती व ती काही ना काही बोलतच राहिली. ते ऐकून पतीला राग आला व त्याने प्लेट फेकून दिली. नवीन डिनर सेटचा चक्काचूर झाला. नंतर त्यालाच पश्चात्ताप झाला. क्रोधामुळे त्याचे चित्त मोहित झाले होते.

मोह हा अतिशय वाईट आहे. तो कधीकधी आपल्याला संकटात देखील टाकतो. यासंबंधात भस्मासुराची कथा प्रसिद्ध आहे. भस्मासुर हा राक्षस असून श्रेष्ठ तपस्वी देखील होता. त्याने बऱ्याच देवतांना आपल्या तपस्येने जिंकून घेतले होते. प्रसन्न होऊन वर देण्यासाठी आलेल्या सर्व देवांना त्याने परत पाठवले होते कारण त्याला अमरत्वाचाच वर हवा होता. हजारो वर्षे तप केल्यानंतर शिवजी प्रसन्न झाले. त्यांच्याकडेही त्याने अमर होण्याचेच वरदान मागितले परंतु शिवजींनी ते शक्य नसल्याचे सांगितले. शिवजींनी त्याला त्यामागचा उद्देश विचारला तेव्हा भस्मासुर म्हणाला की मला वाटेल त्याचा मी वध करू शकेन असे झाले पाहिजे. तेव्हा शिवजी म्हणाले मी तुला त्यासाठी अस्त्र देतो परंतु भस्मासुराने तेही नाकारले व त्याने असा वर मागितला की माझ्या हातामध्ये अशी शक्ती द्या की मी ज्याला हात लावीन तो भस्म होऊन जाईल.
पहा! एवढी तपस्या करून सुद्धा त्याने शिवजींकडे काय मागावे! भक्ती न मागता त्याने हे असे वरदान मागितले. शंकरांनी तथास्तु म्हटले. आता भस्मासुराच्या मनात वेगळीच शंका आली की इतक्या पटकन शिवजींनी आपल्याला हे वरदान दिले खरे परंतु हे वरदान खरे होईल याचा काय भरवसा, मला आत्ताच याची परीक्षा करून बघितली पाहिजे. ही परीक्षा मी कशी करू? त्याच्या मनात विचार आला की शिवजींवरच मी ही परीक्षा करून बघतो. त्याच्या मनातील हा विचार अंतर्यामी शिवजींना समजला तेव्हा ते तिथून निघून त्वरेने नारायण विष्णूंकडे आले.
भगवान विष्णूंना त्यांनी यावर मार्ग काढण्याची विनंती केली. ज्या रस्त्याने भस्मासुर येत होता त्या मार्गात भगवान विष्णूंनी एका नगराची निर्मिती केली. तेथेच त्यांनी मोहिनी अवतार धारण केला. मोहिनीचे नृत्य चालू असताना भस्मासुर तेथे आला. त्याने मोहिनीला विचारले की "आपण शिवजींना येथून जाताना पाहिले का?" ते ऐकून मोहिनी म्हणाली की "माझ्यासारखी एवढी सुंदर स्त्री समोर असताना तुम्ही हा काय प्रश्न विचारत आहात?" तेव्हा भस्मासुराने तिला विचारले की "तू माझ्याशी विवाह करशील का?" तेव्हा मोहिनी म्हणाली की " मी नृत्यांगना आहे व नृत्य येत असणाऱ्या पुरुषाशीच मी विवाह करीन." मोहिनी भस्मासुराला म्हणाली, "तुला प्रथम नृत्य शिकावे लागेल." भस्मासुर तयार झाला. मोहिनी त्याला नृत्याचे पदन्यास शिकवू लागली. नृत्यातील एक मुद्रा शिकवता शिकवता तिने स्वतःचे हात स्वतःच्या डोक्यावर ठेवले. भस्मासुराने देखील तसेच केले व तिथेच त्याचा अंत झाला.

आपण सर्वजण भस्मासुराचे प्रतीक आहोत. आपणही आपली अनेक मौल्यवान वर्षे व्यर्थ आशांची पूर्ती करण्यात वाया घालवतो. त्यासाठी आपण कितीतरी नाती गमावतो पण आपण आपली आशा सोडू इच्छित नाही. जर आपण आपल्या व्यर्थ आशा सोडल्या तर आपण या भस्मासुराच्या दुष्ट अवस्थेतून सुटू शकतो.

9.13

महात्मानस्तु मां(म्) पार्थ, दैवीं(म्) प्रकृतिमाश्रिताः।
भजन्त्यनन्यमनसो, ज्ञात्वा भूतादिमव्ययम्।।9.13।।

परंतु हे कुंतीपुत्रा! दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला सर्व भूतांचे सनातन कारण आणि अविनाशी अक्षर स्वरूप जाणून अनन्य चित्ताने युक्त होऊन निरंतर भजतात.

हे पार्था दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले महात्मे, मी सर्व भूतांचे आदिस्थान व अव्ययी पुरुषोत्तम आहे असे जाणून अनन्य भावाने मला भजतात. 

9.14


सततं(ङ्) कीर्तयन्तो मां(य्ँ), यतन्तश्च दृढव्रताः।
नमस्यन्तश्च मां(म्) भक्त्या, नित्ययुक्ता उपासते॥9.14॥

ते दृढनिश्चयी भक्त निरंतर माझ्या नामाचे व गुणांचे कीर्तन करीत माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात. तसेच वारंवार मला प्रणाम करीत नेहमी माझ्या ध्यानात मग्न होऊन अनन्य प्रेमाने माझी उपासना करतात.

जे माझे दृढनिश्चयी भक्त आहेत ते नेहमी माझे नाम आणि गुण जपत राहतात. ते मला नमस्कार करत असतात आणि माझी अखंड पूजा करत असतात. भगवंताला कीर्तन करणारे भक्त फार प्रिय असतात. भक्तीचे उत्तम फळ कीर्तनानेच मिळते. एक सुंदर भजन सादर केले आहे -

मधुर सुमंगल नाम
भजो रे मन हरि हरि
हरि हरि हरि हरि
हरि हरि हरि हरी...
*रघुकुल राजा राम*
भजो रे मन हरि हरि...

मधुर सुमंगल नाम
भजो रे मन हरि हरि
हरि हरि हरि हरि
हरि हरि हरि हरी...
*पतित पावन नाम*
भजो रे मन हरि हरि...

मधुर सुमंगल नाम
भजो रे मन हरि हरि
हरि हरि हरि हरि
हरि हरि हरि हरी...
*जय जय सीता राम*
भजो रे मन हरि हरि..

मधुर सुमंगल नाम
भजो रे मन हरि हरि
हरि हरि हरि हरि
हरि हरि हरि हरी...
*पावन पावन नाम*
भजो रे मन हरि हरि..

मधुर सुमंगल नाम
भजो रे मन हरि हरि
हरि हरि हरि हरि
हरि हरि हरि हरी...
*पायो मन विश्राम*
भजो रे मन हरि हरि...

मधुर सुमंगल नाम
भजो रे मन हरि हरि..., भजो रे मन हरी हरी .......... हरी हरी 

कीर्तनाने मन स्थिर होते व भगवंताच्या ठिकाणी जोडले जाते. कीर्तन हा मनाला भगवंताशी जोडण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. म्हणून आपण सर्वांनी दररोज काही काळ एकटे किंवा समूहाने भगवंताचे कीर्तन करावे.

9.15

ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये, यजन्तो मामुपासते।
एकत्वेन पृथक्त्वेन, बहुधा विश्वतोमुखम्।।9.15।।

दुसरे काही ज्ञानयोगी मज निर्गुण निराकार ब्रह्माची ज्ञानयज्ञाने अभेदभावाने पूजा करीतही माझी उपासना करतात आणि दुसरे काही अनेक रूपांनी असलेल्या मज विराट स्वरूप परमेश्वराची नाना प्रकारांनी उपासना करतात.

कीर्तन करणारेच भक्तियोगी झाले असतील तर इतर मार्गाने भक्ती करणाऱ्यांचे काय? भगवंत म्हणतात की माझ्या उपासनेचे मार्ग हे केवळ भक्ती मार्ग आणि ज्ञानमार्ग नाहीत तर इतरही अनेक मार्ग आहेत.
   
जे ज्ञानाच्या यज्ञातून एकरूप होऊन माझी पूजा करतात, तोच ज्ञानमार्ग आहे.  जे कर्मयोगात रमून जातात आणि जगाची सेवा हे आपले निश्चित कर्तव्य मानतात, हे शरीर भगवंताचे आहे आणि भगवंताने सर्वांची सेवा करण्यासाठी हे शरीर दिले आहे, ते कर्मयोगाद्वारे ईश्वराची पूजा करतात.

आपल्या सर्वांना भुकेची भावना सारखीच आहे, आपल्या सर्वांना  समाधानाची भावनाही सारखीच आहे. अन्न खाल्ल्यानंतर पोट भरल्यावर प्रत्येकाला तृप्तीची एकसारखीच भावना असते, पण कोणाला किती अन्न तृप्त करेल याची स्थिती प्रत्येकाची वेगळी असते. काहींना पोळी खाल्ल्यानंतर समाधान वाटते, काहींना भात खाल्ल्यानंतर समाधान वाटते, काहींना दोन पोळ्या खाल्ल्यानंतर तर काहींना पाच खाल्ल्यानंतर समाधान वाटते. प्रत्येकाच्या भोजन तृप्तीसाठी अन्नपदार्थाचा प्रकार व त्याची मात्रा भिन्न असू शकते. तसेच परमेश्वर प्राप्तीची इच्छा करणाऱ्याला ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, भक्तीमार्ग असे अनेक मार्ग उपलब्ध आहेत.

एकम सत्यम, विप्रा बहुधा वदन्ति। सत्य एकच आहे, वेगवेगळे लोक ते वेगवेगळ्या प्रकारे सांगतात.

9.16

अहं(ङ्) क्रतुरहं(य्ँ) यज्ञः(स्), स्वधाहमहमौषधम्।
मन्त्रोऽहमहमेवाज्यम्, अहमग्निरहं(म्) हुतम्॥9.16॥

श्रौतयज्ञ मी आहे. स्मार्तयज्ञ मी आहे. पितृयज्ञ मी आहे. वनस्पती, अन्न व औषधी मी आहे. मंत्र मी आहे. तूप मी आहे. आणि हवनाची क्रियाही मीच आहेअग्नी मी आहे .

भगवंत म्हणतात हे अर्जुन ! मी निर्माता आहे, मीच यज्ञ आहे, मीच स्वधा आहे, मीच औषध आहे, मीच मंत्र आहे, मीच तूप आहे, मीच अग्नी आहे आणि मीच हवनाचा विधीही आहे.

जे वैदिक ब्राह्मण वैदिक पद्धतीने वैदिक मंत्रोच्चारासमवेत हवन करतात त्याला क्रतु म्हणतात. आपण जे हवन करतो त्याला यज्ञ म्हणतात. स्वधा म्हणजे पितरांना अर्पण केलेले अन्न होय. 

तात्पर्य असे आहे की मनुष्य जे काही कर्म करतो ते यज्ञस्वरूपच असते व ते करणारा कर्ता, कर्म करण्याची रीत व कर्म करण्यासाठी लागणारे साधन हे देखील परमात्मा स्वरूपच असते.

दुसऱ्या अध्यायात सोळावा श्लोक तत्त्वज्ञानी पुरुषांचे स्वरूप सांगतो.
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥ २-१६ ॥
असत्‌ वस्तूला अस्तित्व नाही आणि सत्‌ वस्तूचा अभाव नसतो. अशा रीतीने या दोहोंचेही सत्य स्वरूप तत्त्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे.

9.17

पिताहमस्य जगतो, माता धाता पितामहः।
वेद्यं(म्) पवित्रमोङ्कार, ऋक्साम यजुरेव च।।9.17।।

या जगाला धारण करणारा व कर्मफल देणारा, आई-वडील, आजोबा, जाणण्याजोगा पवित्र ओंकार, तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे.

भगवंत म्हणतात हे अर्जुन ! सर्वांना आधार देणारा, म्हणजेच सर्वांचे पालनपोषण करणारा, कर्माचे फळ देणारा, मीच माता, पिता, पितामह आहे. पवित्र ओंकार, ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद देखील मीच आहे.

संतांच्या मते, या श्लोकात भगवंतांना पितामह म्हटले आहे कारण आपण ब्रह्मदेवांना पिता म्हणून पाहतो, परंतु ब्रह्मदेवांचा जन्म भगवान विष्णूच्या नाभीतून झाला होता, म्हणून भगवान विष्णू ब्रह्मदेवांचे पिता झाले. म्हणजेच आपले पितामह झाले.

ॐ हे ओंकारासाठी प्रतीक म्हणून वापरले जाते पण ॐ हे नादब्रह्म आहे. जर कोणी ब्रह्मदेवाच्या सर्वात जवळचे मानले जात असेल तर ते नादब्रह्म आहे. या शब्दाची तुलना ब्रह्माशी केली आहे. भगवंत म्हणतात तो नादब्रह्म ॐ देखील मीच आहे.

भगवंत इथे तीनच वेदांबद्दल सांगत आहेत. मुळामध्ये वेद एकच आहे. त्यातील विशिष्ट मात्रेमध्ये असलेले जे श्लोक आहे त्यांना ऋचा म्हणतात. त्यांचा समावेश ऋग्वेदामध्ये केला गेला आहे. वेदांमधील जे श्लोक गेय आहेत त्यांचा समावेश सामवेदामध्ये केला गेला आहे. विशिष्ट मात्रांचा समावेश नसलेले श्लोक हे यजुर्वेदाचा भाग आहेत.

अथर्व वेदामध्ये मात्र ६४ कलांचे वर्णन आलेले आहे. केवळ लौकिक क्रिया अथवा भौतिक विद्या असलेल्या अथर्ववेदाची उपेक्षाच केली गेली आहे. या अथर्ववेदातील श्लोकांवरून जर्मनीने अणुबॉम्बचा शोध लावला. अथर्ववेदाचा बराचसा भाग आजही जर्मनीत सुरक्षित आहे. भगवंत म्हणतात की मी संपूर्ण वेद आहे.

9.18

गतिर्भर्ता प्रभुः(स्) साक्षी, निवासः(श्) शरणं(म्) सुहृत्।
प्रभवः(फ्) प्रलयः(स्) स्थानं(न्), निधानं(म्) बीजमव्ययम्।।9.18।।

प्राप्त होण्याजोगे परमधाम, भरण-पोषण करणारा, सर्वांचा स्वामी, शुभाशुभ पाहणारा, सर्वांचे निवासस्थान, शरण जाण्याजोगा, प्रत्युपकाराची इच्छा न करता हित करणारा, सर्वांच्या उत्पत्ति-प्रलयाचे कारण, स्थितीला आधार, निधान आणि अविनाशी कारणही मीच आहे.

भगवंत म्हणतात हे अर्जुन ! प्राप्त होऊ शकणारे परमधाम, पालनपोषण करणारा, सर्वांचा स्वामी, चांगल्या-वाईटाचा द्रष्टा, सर्वांचे आश्रयस्थान, प्रतिशोध न घेता सत्कर्म करणारा, उत्पत्ती आणि विनाशाचे कारण, सर्व परिस्थितीचा आधार, पाया आणि अविनाशी कारण मी एकटाच आहे.

भगवंत म्हणतात की तुम्ही जे काही विचार करता, त्या सर्व गोष्टींमध्ये मी तत्त्वरूप आहे. या सर्व गोष्टी माझ्याचमुळे घडतात.

9.19

तपाम्यहमहं(व्ँ) वर्षं(न्), निगृह्णाम्युत्सृजामि च।
अमृतं(ञ्) चैव मृत्युश्च, सदसच्चाहमर्जुन॥9.19॥

मीच सूर्याच्या रूपाने उष्णता देतो, पाणी आकर्षून घेतो व त्याचा वर्षाव करतो. हे अर्जुना! मीच अमृत आणि मृत्यू आहे आणि सत् व असत् ही मीच आहे.

सूर्याप्रमाणे जळणारा मीच आहे असे भगवंत म्हणतात. सूर्याला असलेली उष्णता माझ्याकडूनच प्राप्त होते. पावसाला आकर्षित करणारा मीच आहे, पाऊस पाडणारा मीच आहे. मीच अमृत आहे, मीच मृत्यू आहे आणि मीच सत्य आणि असत्य आहे.

जगातील काही पंथांमध्ये, देव आणि दानव हे दोन घटक बनले आहेत. पण सनातन वाङमयामध्ये असे म्हटले आहे की “एको ब्रह्म, द्वितियां नास्ती” म्हणजे एकच ब्रह्म आहे, दुसरा कोणी नाही. म्हणूनच भगवंत म्हणतात की मी सत् आणि असत् दोन्ही आहे.

9.20

त्रैविद्या मां(म्) सोमपाः(फ्) पूतपापा,
यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं(म्) प्रार्थयन्ते।
ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकम्,
अश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान्।।9.20।।

तिन्ही वेदांत सांगितलेली सकाम कर्मे करणारे, सोमरस पिणारे, पापमुक्त लोक माझी यज्ञांनी पूजा करून स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात. ते पुरुष आपल्या पुण्याईचे फळ असणार्‍या स्वर्गलोकाला जाऊन स्वर्गात देवांचे भोग भोगतात.

हे अर्जुन! जे तीन वेदांमध्ये सांगितलेले सकाम कर्मकांड करतात आणि सोमरस पितात, ते पापरहित लोक जे यज्ञ करून माझी पूजा करतात आणि स्वर्गप्राप्तीसाठी प्रार्थना करतात. त्यांच्या सत्कर्मामुळे त्यांना पवित्र इंद्रलोकाची प्राप्ती होते आणि स्वर्गातील देवतांचे दैवी सुख प्राप्त होते.

भगवंत म्हणाले - जो कोणी तीन वेदांमध्ये सांगितलेली फलदायी क्रिया विधीपूर्वक करतो आणि त्या सर्व कर्मांचे पालन करतो, त्याला त्या वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे स्वर्ग प्राप्त होतो आणि अशा प्रकारे त्याला उत्कृष्ट आनंद प्राप्त होतो.

सोमरस म्हणजे दारू नव्हे. सोमवल्ली नावाची एक वेल असते. सर्पाप्रमाणे तिचा आकार असतो. पाऱ्याचे चूर्ण आणि सोमवल्लीचे भस्म वापरून एका विशिष्ट पद्धतीने सोमरस बनवला जातो. हा रस बल वर्धक असतो. हे पेय पवित्र मानले गेले आहे. देवता सुद्धा सोमरसाचा भोग घेतात असे मानले जाते. त्याचे प्राशन केल्यावर बऱ्याच काळापर्यंत तहानभूक लागत नाही. त्यामुळे तपस्या करताना पूर्वी ऋषीमुनी त्याचे प्राशन करीत व हजारो वर्ष तपस्या करीत रहात. आता दारूप्रेमी लोक देखील म्हणतात की दारू पिऊन आमचीही तहानभूक विसरते त्यामुळे अशी उपमा प्रचलनात आली असावी. दारू हे निषिद्ध पेय असून त्याचे दुष्परिणाम भयंकर आहेत.

9.21

ते तं(म्) भुक्त्वा स्वर्गलोकं(व्ँ) विशालं(ङ्),
क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं(व्ँ) विशन्ति।
एवं(न्)  त्रयीधर्ममनुप्रपन्ना,
गतागतं(ङ्) कामकामा लभन्ते॥9.21॥

ते त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्याई संपल्यावर मृत्यूलोकात येतात. अशा रीतीने स्वर्गप्राप्तीचे साधन असणार्‍या, तिन्ही वेदांत सांगितलेल्या, सकाम कर्मांचे अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार ये-जा करीत असतात. अर्थात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्यूलोकात येतात.

आपण एखाद्या उत्तम फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जातो. तेथे आपले क्रेडिट कार्ड वापरून काही रक्कम जमा करतो व तेथे सुट्टीचा आनंद उपभोगतो. चार-पाच दिवस आपल्याला हॉटेल व्यवस्थापनाकडून उत्तम सेवा मिळते. त्यानंतर एक दिवस सकाळी मॅनेजर आपल्याला येऊन सांगतो की अजून राहायचे असेल तर तुम्हाला अजून रक्कम जमा करावी लागेल नाहीतर अकरा वाजता चेक आउट करावे लागेल.

अगदी तसेच या सकाम कर्मे करून स्वर्गप्राप्ती केलेल्या लोकांचे बाबतीत घडते. स्वर्गामध्ये उत्तम भोग भोगताना ज्या पुण्यकर्मामुळे त्यांना स्वर्गप्राप्ती झालेली असते त्या पुण्याची जमा राशी हळूहळू खर्ची पडते. खात्यामध्ये पुण्याचा संचय असेपर्यंत इंद्रदेव त्यांना स्वर्गात राहू देतो. त्यानंतर मात्र त्यांना पृथ्वीवर परतून यावेच लागते. पुनरपि जननं। पुनरपि मरणं । पुनरपि जननी जठरे शयनम्। ह्या फे-यात ते परत येतात.

यानंतर एक मिनिटाच्या हरिनाम संकीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली आणि प्रश्नोत्तरांचे सत्र सुरू झाले.

प्रश्नोत्तरे

प्रश्नकर्ता :- उर्मिला दीदी.

प्रश्न:- जीवनात आत्मविश्वास कसा आणायचा?

उत्तर:- आत्मविश्वासाची गुरुकिल्ली म्हणजे छोटी उपलब्धी. जीवनात छोटी-छोटी ध्येये ठेवली पाहिजेत आणि मग ती पूर्ण करावीत. जी माणसे आयुष्यात मोठी ध्येये ठेवतात, जेव्हा ती पूर्ण होत नाहीत तेव्हा त्यांचा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते कारण जेव्हा आपण मोठी ध्येये ठेवतो तेव्हा आपली क्षमता तेवढी नसते, मग आपण त्यात अपयशी होतो आणि आपला आत्मविश्वास गमावून बसतो. त्यामुळे जीवनात छोटी-छोटी ध्येये ठेवून ती पूर्ण करायला हवीत. यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. सुरुवातीला तुमचे ध्येय छोटे ठेवावे, नंतर सरावाने ते मोठे करून ते साध्य करावे. यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो.

प्रश्नकर्ता : प्रफुल्ल भैय्या.

प्रश्न:- तुम्ही एका चर्चेत म्हणाला होता की दात घासल्याने उपवास मोडतो?

उत्तर :- मी तसे म्हटले नाही. उपवासाच्या वेळी आपण तोंडात मीठ घालत नाही आणि सर्व पदार्थांमध्ये मीठ असते, त्यामुळे जर आपण त्याचे सेवन केले तर मिठामुळे आपला उपवास मोडू शकतो. त्यामुळे बोटांनीच घासत राहायला हवे. त्यात कोणतीही पेस्ट नसावी, फक्त टूथब्रशचा वापर करावा. घासण्याला विरोध नाही. आजकाल, प्रत्येक जाहिरातीमध्ये असे म्हटले जाते की टूथपेस्टमध्ये मीठ असते, यामुळे आपला उपवास मोडू शकतो.

प्रश्नकर्ता : स्मिता दीदी.

प्रश्न:- या जगाच्या आशा कधीच संपत नाहीत, पण जेव्हापासून आपण गीता परिवारात सामील झालो तेव्हापासून आपल्याला मोक्ष मिळण्याची इच्छा होऊ लागली का?

उत्तर :- आपण जगाची आशा सोडून देवाची आशा ठेवली पाहिजे कारण जगाच्या आशा दुःख देतात आणि भगवंताच्या आशा सुख देतात.

प्रश्नकर्ता :- विशाल भैय्या.

प्रश्न:- माझा अडीच वर्षांचा मुलगा काही खात नाही, पीत नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यासमोर जेवण नेले की तो घाबरतो आणि रडतो. त्याला फोबिया तर नसेल ना? डॉक्टरांच्या अहवालातही सर्व काही नॉर्मल आहे. गीतेत काही उपाय असेल तर कळवा का?

उत्तरः जर मुलाचे वजन योग्य असेल आणि तो चांगला खेळत असेल तर तो जेवढे खात आहे ते पुरेसे आहे. आजकाल सर्व पालकांना असे वाटते की आपले मूल जेवत नाही. जर तुमच्या मुलाचे वजन कमी होत नसेल, तर त्याचा अर्थ असा आहे की तो त्याची सर्व शक्ती घेत आहे आणि जेव्हा त्याला भूक लागते तेव्हा तो काहीतरी खाईल.

प्रश्नकर्ता :- पूनम दीदी.

प्रश्न - आपण रोज हनुमान चालीसा वाचतो पण जेव्हा महिलांना पूजा करायची नसते तेव्हा त्या हनुमान चालीसा वाचू शकतात का?
 
उत्तर : हनुमान चालीसा भक्तिभावाने वाचण्यास हरकत नाही. अशा स्थितीत तुम्ही जरी ऐकले तरी तुम्हाला तेच फळ मिळते. यातही काही दोष नाही.

प्रश्नकर्ता: गुरुमती दीदी

प्रश्न: युद्धिष्ठिराबरोबर एक श्वान देखील सशरीर स्वर्गारोहण करण्यास गेला होता असे ऐकिवात आहे हे खरे आहे का?

उत्तर: जेव्हा युधिष्ठिराला स्वर्गारोहणासाठी देवदूत नेण्यास आले होते तेव्हाच युधिष्ठिरांना लक्षात आले की एक श्वान देखील त्यांच्यासोबत आला आहे. तेव्हा त्यांनी देवदूताला सांगितले की हा श्वान देखील माझ्याबरोबर स्वर्गारोहण करण्यास येईल.  तेव्हा देवदूतांनी हे नाकारले व केवळ तुम्ही एकटेच सशरीर स्वर्गारोहणासाठी जाऊ शकता असे सांगितले. त्यावेळी युधिष्ठिर म्हणाले की मी एक वेळ स्वर्ग त्याग करीन परंतु मी माझ्या धर्माचा त्याग करणार नाही. हा श्वान मला शरणागत आला आहे तर त्याला सोबत नेणे हे माझे कर्तव्य आहे. तेव्हा श्वानरूपात असलेल्या धर्मराजांनी युधिष्ठराला दर्शन दिले आणि सांगितले की मी तुझी परीक्षा घेण्यास आलो होतो आणि तू त्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहेस. श्वानरूपात स्वतः धर्मराज होते.

प्रश्न: मी कोणत्याही गुरूंकडून दीक्षा घेतलेली नाही. परंतु मला मंत्रजाप करण्यास आवडते. तर सर्व देवतांचे मंत्र मी एका वेळेस म्हटले तर त्याने काही हानी होऊ शकते का?

उत्तर:  आपण जीवनातील साधे साधे विषय शिकण्यासाठी सुद्धा गुरु निवडतो, त्या गुरूंकडून शिक्षा घेतो. येथे आपल्या संपूर्ण जीवनाचा प्रश्न आहे त्यामुळे एक गुरु जरूर असावा. केवळ पुस्तकातून वाचल्याने समग्र ज्ञान प्राप्त होत नाही. गुरूंकडून आपण आपल्या जीवनाच्या कोणत्या टप्प्यावर आहोत हे समजते. त्यामुळे जरूर एक गुरु निवडावा व त्यांच्याकडून दीक्षा घ्यावी.

अशाप्रकारे प्रश्न उत्तरांचे सत्र संपल्यानंतर विवेचनाचे समापन झाले.