विवेचन सारांश
श्रद्धापूर्वक भक्तीने निष्काम कर्मयोग केल्यास असा भक्त परमगतीला प्राप्त होतो.
आपण अतिशय भाग्यवान आहोत, आपल्याला भगवंताच्या मुखारविंदातून अर्जुनाच्या माध्यमातून भगवद्गीता ऐकण्याचे परमभाग्य मिळाले आहे. या शाश्वत आनंदाचा अनुभव आपल्याला मिळतो आहे. हतोत्साहित अर्जुनाला प्रेरणा देण्यासाठी भगवंताने भगवद्गीता अर्जुनाला सांगितली. विषण्ण जीवाला प्रसन्न करण्यासाठी हे गीत सांगितले गेले असे गुरुदेव म्हणतात. राजविद्याराजगुह्ययोग हा भगवद्गीतेचा मध्यम अध्याय असून त्याच्या अंतरंगात पोहोचण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. हा अद्भुत असा अध्याय आहे. यात ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग यांचा त्रिवेणी संगम दिसतो. ज्यांची वाणी ज्ञानमय आहे, ज्यांच्या मुखातून भक्तीने ओतप्रोत अशी ज्ञानाची गंगा वाहते आहे, ज्यांनी भक्तांच्या जीवनात कर्मयोगाच्या माध्यमातून भक्तिरस परिपूर्ण रीतीने देण्याचा प्रयत्न केला अशा गुरुदेवांच्या मुखातून हे कथामय विवेचन ऐकणे ही एक आनंदमय अनुभूती आहे. त्यामुळेच असे म्हणतात
गुरुने दिला ज्ञानरूपी वसा ।
आम्ही चालवू हा पुढे वारसा ll
या सूत्रानुसार गुरुदेवांनी दिलेले ज्ञान सर्वांबरोबर वाटून घेण्याचा हा प्रयत्न आहे. हा ज्ञानेश्वर महाराजांचा अत्यंत प्रिय अध्याय आहे. हा अध्याय त्यांना का प्रिय होता कारण या अध्यायात त्यांनी अर्जुनासाठी आपली सर्व रहस्य उघडून दाखवली आहेत. हे रहस्य सांगताना, सृष्टीमध्ये ते कसे विराजमान आहेत, देवतांच्या माध्यमातून पृथ्वीचे कार्य ते कशाप्रकारे करतात आणि निसर्गाच्या चक्राचे वर्णन भगवंत १९ व्या श्लोकात करतात हे आपण पाहिले.
तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च।
अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन ll ९.१९ ll
असा परमात्मा आहे त्याच्याकडून भक्ती उपासना आणि यज्ञांद्वारा देवतांच्या माध्यमातून आपल्याला जे हवे ते वरदान आपण मिळवू शकतो. हे सगळे आपल्या वैदिक संस्कृतीत अभिभूत आहे. सृष्टीत येऊनही भगवंताची उपासना न करता राहणारे लोकही पृथ्वीवर आहेत. हे लोक वेदांत सांगितलेली उपासना सकाम यज्ञयागाद्वारे करतात. हे चुकीचे नाही. नैतिक मार्गाने हे केल्यास अभ्युदयाबरोबरच नि:श्रेयस ही प्राप्त होते. त्यासाठी मार्ग प्रस्फुटीत होतो. यासाठी यज्ञयाग केले पाहिजे. उपासना केली पाहिजे. पण हे लोक त्यामध्येच अडकतात. ते माझ्यापाशी येत नाहीत असे भगवंत अर्जुनाला सांगतात. यज्ञाद्वारे पद प्रतिष्ठा, मानसन्मान धनप्राप्ती ते करतात. याचे वर्णन पुढील २० आणि २१ व्या श्लोकात आले आहे.
9.20
त्रैविद्या मां(म्) सोमपाः(फ्) पूतपापा,
यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं(म्) प्रार्थयन्ते।
ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकम्,
अश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान्।।9.20।।
ते तं(म्) भुक्त्वा स्वर्गलोकं(व्ँ) विशालं(ङ्),
क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं(व्ँ) विशन्ति।
एवं(न्) त्रयीधर्ममनुप्रपन्ना,
गतागतं(ङ्) कामकामा लभन्ते॥9.21॥
सोमप: म्हणजे रसमय जीवन जगणारे, चांगले अन्नरस प्राशन करणारे जे पापरहित लोक आहेत, ते पूतपापा याचा अर्थ पवित्र जे आहेत, ते यज्ञाद्वारे, उपासनेद्वारे माझे पूजन करतात. पण परमात्म्याची उपासना करताना ते भोगाची कामना करतात. हे भोग भोगताना ते पद, सन्मान व प्रतिष्ठा प्राप्त करतात. हा मानसन्मान प्रतिष्ठा प्राप्त झाल्यावरही वारंवार पूजा, अर्चना, यज्ञयाग करणारे स्वर्गप्राप्तीची कामना करतात. चांगले भोग भोगण्याची इच्छा प्रदर्शित करतात.
ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक याचा अर्थ स्वर्गलोक किंवा अर्थसंपन्न ऐश्वर्ययुक्त जीवन जगण्याची इच्छा ते करतात. अश्नन्ति अशा स्वर्गलोकात जाऊन अत्यंत दिव्य भोग भोगतात. पण पुण्य कमी झाल्यावर ते परत मृत्यू लोकात परत येतात. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति l ते जन्म मृत्यूच्या चक्रात अडकतात. भोग भोगल्यानंतर त्यांचे पुण्य खर्च होते. त्यामुळे त्यांना मृत्यूलोकात परत यावे लागते.
गतागतं कामकामा लभन्ते l असे लोक पुन्हा पुन्हा मृत्युलोकात परत येतात परत पुण्य करतात आणि परत स्वर्गलोकात जातात. आपण फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेल्यावर आपले खूप स्वागत होते. जेवणात छान छान पदार्थ असतात. अनेक प्रकारच्या सोयी असतात. सेवक काय हवे काय नको विचारत असतात. पण एकदा आपले पैसे संपल्यानंतर, बँक बॅलन्स संपल्यानंतर आपले सामान बाहेर काढले जाते. आपल्याला ते हॉटेल सोडावेच लागते, तीच गोष्ट या ठिकाणी घडते. असे लोक गतागतं म्हणजे पुन्हा पुन्हा मृत्युलोकात येतात. परत स्वर्गात जातात आणि या चक्रात अडकतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात- पुण्याची पावतीसरे तर इंद्र पणाची उटी उतरे l स्वर्गात इंद्राचे आसन आहे. तिथे संपन्नता आहे. पण हे नेहमीच मिळेल असे नाही. जीवन बदलणारे असते. आपले पुण्य संपल्यावर आपल्याला परत मृत्युलोकात यावेच लागते. स्वर्गलोकापर्यंत ते जातात पण ते माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मग माझ्यापर्यंत कोण पोहोचतो हे पुढील श्लोकात सांगितले आहे.
अनन्याश्चिन्तयन्तो मां(य्ँ), ये जनाः(फ्) पर्युपासते।
तेषां(न्) नित्याभियुक्तानां(य्ँ), योगक्षेमं(व्ँ) वहाम्यहम्॥9.22॥
या ठिकाणी विडंबनाची बाब अशी आहे की माझाच परमात्मा खरा आहे, इतरांनीही त्याचीच आराधना केली पाहिजे, जर त्यांनी ही आराधना केली नाही तर मी त्यांना माझ्या धर्मात आणेन, असे वाटणे म्हणजे अनन्यता नाही. मात्र राम असो, कृष्ण असो, देवी असो, दत्त असो, येशू असो किंवा अल्ला असो, तरी तो म्हणजे मी एकमेव परमात्माच आहे असे समजणे म्हणजे अनन्यता.
आपले भूतपूर्व राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम हे मुस्लिमधर्मीय होते. त्यांचे वडील रामेश्वरला राहात होते. त्यांचा एक मित्र लक्ष्मण हा रामेश्वराच्या मंदिरातील पुजाऱ्याचा मुलगा होता. दोघांची खूप मैत्री होती. त्या दोघांच्या वडिलांनी त्यांना सांगितले होते, मस्जीद मधील बांग आणि मंदिरातील घंटा या दोहोंचा नाद समान आहे. यातील मर्म आपण जाणून घ्यायला हवे. ये जना: पर्युपासते l तेषां नित्याभियुक्तानाम्। याचा अर्थ नित्य भगवंताच्या अनुसंधानात राहणारा, चारी बाजूंनी भगवंताला चिकटणारा, नित्य म्हणजे निरंतर. जो मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त या चारी बाजूंनी परमात्म्याला धारण करणारा असतो, त्याचा योगक्षेम मी चालवितो असे भगवंत म्हणतात.
योगक्षेमं वहाम्यहम्। हे LIC चे बोधवाक्य आहे. भगवद्गीतेतून अशी अनेक सूक्त बोधवाक्य म्हणून घेतली गेली आहेत. वायुसेनेचे नभ: स्पृशं दीप्तम् हे बोधवाक्य अकराव्या अध्यायातील सूक्त आहे. योग म्हणजे जे आजपर्यंत मिळाले नाही ते मिळणे आणि क्षेम म्हणजे त्याचे रक्षण करणे. अनेक गोष्टी मिळवण्यासाठी आणि त्याचे रक्षण करण्यासाठी आपण संघर्ष करत असतो. भगवान म्हणतात अनन्य भक्तांसाठी मी या दोन्ही गोष्टी करतो. या ठिकाणी भक्ताला सुंदर अभिवचन भगवंतांनी दिले आहे. हे देताना अनन्यतेची अट मात्र ठेवली आहे.
भक्ती करताना साधन आणि साध्य हे दोन्ही भगवान असायला हवे. भगवंत जीवनात हे येणे महत्त्वाचे आहे. एक घर आहे तर दुसरे घर मिळवून देणे, किंवा एक फॅक्टरी आहे तर दुसरी मिळवून देणे ही गोष्ट भगवंत करत नाहीत. आवश्यकतेनुसार ते भक्ताला काही देत असतात. ज्याप्रमाणे आईच्या गर्भात दुधाची निर्मिती करून बालकाचे रक्षण करणारा परमात्मा असतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनात योगक्षेम चालवणारा भगवंत असतो. संतांच्या जीवनात ही गोष्ट आपल्याला जाणवते. न मिळो खावया तरी हा संत कृपा करी l असे संत असतात.
तुकाराम महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. ते म्हणत एक नारायण सोडून मला काही नको. शिवाजी महाराजांनी त्यांच्या सेवकांच्या मार्फत त्यांना नजराणा पाठवला. त्यांची विपन्नावस्था बघून त्यांच्या बायकोसाठी सुंदर वस्त्रे आणि दागिने पाठवले. मुलांसाठी अंगावर घालायला भरजरी वस्त्रे पाठवली. तुकारामांनी बाहेरून आल्यावर हे बघितले आणि ते सेवकांना म्हणाले हे सर्व तुम्ही परत घेऊन जा. मला या गोष्टी नको कारण याचीच मला सवय होईल. त्यामुळे माझा विठ्ठल माझ्यापासून दूर होईल. यालाच अनन्यता म्हणतात.
ठाकूर रामकृष्णांच्या जीवनातही असाच प्रसंग आहे. त्यांचे भाऊ गदाधर यांनी त्यांना असे सांगितले होते जगदंबा ही आपली माता आहे, तिची सेवा तू आता कर. ते जगदंबेच्या सेवेत इतके रममाण झाले, त्यांना वेदांत शिकवण्यासाठी हिमालयाच्या कुशीतून तोतापुरी महाराज आले हे सुद्धा त्यांना दिसले नाही. ते वेदांती होते. त्यांनी जेव्हा रामकृष्णांची ध्यानावस्था बघितली, तेव्हा ते म्हणाले मी तुला वेदांत शिकवण्यासाठी आलो आहे. रामकृष्णांना आतून जगदंबेचा आवाज आला, "रामकृष्ण मीच तुला वेदांत शिकवण्यासाठी यांची व्यवस्था केली आहे." हे ऐकताच रामकृष्ण समाधीतून जागे झाले आणि त्यांनी तोतापुरी महाराजांचे पाय धरले.
साक्षात जगदंबेला समोर बघितल्यावर तोतापुरी महाराजांचा सगुण साकार मूर्तीवर विश्वास बसला. ते म्हणाले मला आज सगुण भक्ती काय असते हे समजले. मी निर्गुण भक्ती करणारा, आता पुढे सगुण भक्ती करणार आणि ते सगुण भक्ती करू लागले.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-
सगुण निर्गुण ज्याची दोन्ही अंगे
तो आम्हा संगे क्रीडा करी
आपलीच तहानभूक नेणे
तान्हीयानी निके ते माऊलीच करणे
पैसे अनुसरले मग प्राणी
तयाची सर्व व्यवस्था मी करी l
जसे तान्ह्या बाळाला तहान भूक समजत नसली तरी त्याची गरज माऊली जाणते तसेच सगुण आणि निर्गुण ही दोन्ही ज्याची रूपे आहेत असा परमात्मा भक्तांची सर्व काळजी वाहत असतो.
जे सांप्रदायिकता मानतात, शैव आणि वैष्णव यांच्यात फरक करतात त्यांच्या करता भगवंत नाही. यानंतर अधिक स्पष्ट करण्यासाठी एक उदाहरण दिले आहे. आईचे काम होण्यासाठी, आई काम करताना बाळासमोर काही खेळणी टाकते. थोड्यावेळ खेळल्यानंतर बालक कंटाळतो. तो आईला हाक देतो. त्याच्या 'आई' या हाकेने आई हातातील काम टाकून धावत येते आणि मुलाला जवळ घेते त्याचप्रमाणे भगवंताची अनन्य भक्ती ज्यांच्यात असते, त्यांच्या हाकेला भगवंत धावून येतो. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी अशा आळशी भक्तांसाठी तो येत नाही. त्यासाठी कर्तुत्व आणि वैराग्य याचे दोन्ही पंख ज्याच्याजवळ असतात त्याला उडण्यासाठी भगवंत मदत करतो.
चक्षु पंखाविना आहे त्याला तुम्ही पंख द्या अशी शरणागती भगवंताकडे असायला हवी. मात्र सर्वच लोक अशी अनन्यता जाणत नाहीत. ते देवी देवतांची पूजा करतात. ज्याप्रमाणे आपले एक केंद्रीय सरकार असते आणि इतर राज्य सरकारची खाती त्यांना मदत करण्यासाठी असतात त्याचप्रमाणे परमात्मा हा मुख्य अधिकारी असून त्याने सामर्थ्य दिलेल्या इतर देवदेवता सृष्टीच्या कार्यात मदत करत असतात. हे कार्य कसे होते ते पुढील श्लोकात सांगितले आहे.
येऽप्यन्यदेवता भक्ता, यजन्ते श्रद्धयान्विताः।
तेऽपि मामेव कौन्तेय, यजन्त्यविधिपूर्वकम्।।9.23।।
या ठिकाणी एक उदाहरण दिलेले आहे. गुरुदेवांचा एक शिष्य होता. तो विष्णूचा भक्त होता. विष्णूचे दर्शन झाल्याशिवाय तो अन्नग्रहण करत नसे. एके दिवशी तो एका गावात आला. त्या ठिकाणी विष्णूचे त्याला दर्शन होऊ शकले नाही. आता काय करायचे? या गावातील एका मनुष्याने सांगितले, आमच्याकडे दत्ताचे मंदिर आहे. त्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू व महेश तिघांचेही दर्शन होऊ शकेल. या शिष्याने आपल्याबरोबर दोन कापसाचे वस्त्र घेतले. मंदिरात गेल्यावर त्याने शिव आणि ब्रह्माची मूर्ती झाकली आणि विष्णूचे दर्शन घेऊन उपास सोडला. खरे तर या सर्वांमध्ये परमात्माच वसत आहे हे आपण लक्षात ठेवायला हवे. परमात्म्याकडूनच आपल्याला ऊर्जा मिळते व तेच सत्य आहे.
अहं(म्) हि सर्वयज्ञानां(म्), भोक्ता च प्रभुरेव च।
न तु मामभिजानन्ति, तत्त्वेनातश्च्यवन्ति ते।।9.24।।
यान्ति देवव्रता देवान्, पितॄन्यान्ति पितृव्रताः।
भूतानि यान्ति भूतेज्या, यान्ति मद्याजिनोऽपि माम्।।9.25।।
मद्याजिनोऽपिमाम् लहान मुलांना खुश करणे सोपे असते. त्यांना छोट्या भेटवस्तू दिल्यावर ते खुश होतात. पण मोठ्या माणसांना खुश करणे तेवढेसे सोपे नाही. भगवंताला खुश करणे अर्जुनाला कठीण वाटते. परब्रह्म परमात्मा तर सृष्टीचा कर्ता असल्याने त्याला काय काय द्यावे हे सांगणारा पुढचा श्लोक आहे.
पत्रं(म्) पुष्पं(म्) फलं(न्) तोयं(य्ँ), यो मे भक्त्या प्रयच्छति।
तदहं(म्) भक्त्युपहृतम्, अश्नामि प्रयतात्मनः॥9.26॥
चातुर्मासात आपण शिवाला बिल्वदल अर्पण करतो. त्याशिवाय सोमवारचा उपवास सोडत नाही. वास्तविक बिल्वदल ईश्वराने निर्माण केले आहे. परमात्म्यानेच निर्माण केलेले बीज आपण पेरतो आणि त्यातून निर्माण होणारे फळ, फूल त्यालाच अर्पण करतो. आपल्या मनात अहंकार निर्माण होऊ नये असा भाव भक्ताच्या मनात असावा. तेरा तुझको अर्पण यामध्ये अहंकार राहत नाही.
उत्तराच्या जीवनातला एक प्रसंग आहे. उत्तरा अभिमन्यूची पत्नी होती. उत्तरेच्या गर्भात अभिमन्यूचा पुत्र होता. अभिमन्यूला तर षडयंत्राने मारले होते आणि आता अभिमन्यूच्या पुत्रावर ब्रह्मास्त्र चालवले गेले. त्यामुळे गर्भातील बालकाची हालचाल बंद झाली. उत्तरेने अतिशय आर्ततेने बालकाचे रक्षण करण्यासाठी भगवंताला बोलवले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले तू मला काहीतरी अर्पण कर मग मी तुझ्या बालकाचे रक्षण करतो. उत्तरा म्हणाली मी तर माझ्या पतीला गमावले आहे आता मी काय तुला देऊ? यावर भगवंतानी तिला तिचे मातृत्व मागितले. तू माझी माता बन असे ते म्हणाले. उत्तरेने आपले मातृत्व दिल्यावर गर्भात शिरून भगवंताने त्या बालकाचे रक्षण केले.
द्रोपदीच्या वस्त्रहरण प्रसंगी द्रोपदीने सर्वांना मदतीसाठी आवाहन केले. पण तिच्या पतीसह कोणीच तिच्या मदतीला धावले नाही. असहाय्य झाल्यावर तिने अत्यंत आर्ततेने श्रीकृष्णाला बोलवले. वस्त्र पुरवून श्रीकृष्णाने तिला मदत केली.
गुरुदेव म्हणतात शुद्ध अंत:करणाने बालकांनी शाळेत जाताना देवाला एक फूल अर्पण करावे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -
परि भक्ती मी एक जाणे
परि सान थोर न म्हणे
आम्ही भावाचे पाहुणे.
पत्र, पुष्प, फळ हे केवळ निमित्त आहे. अर्जुन भगवंताला म्हणतो युद्धभूमीवर तुम्ही पत्र, पुष्प, फळ अर्पण करायला सांगता, मी कुठून आणू? त्यावर भगवंत म्हणतात शुद्ध अंत:करणाने जे काही कर्म करशील ते मला अर्पण कर.
यत्करोषि यदश्नासि, यज्जुहोषि ददासि यत्।
यत्तपस्यसि कौन्तेय, तत्कुरुष्व मदर्पणम्।।9.27।।
कर प्रणाम तेरे चरणोंमें लगता हूँ अब तेरे काज।
पालन करनेको आज्ञा तव मैं नियुक्त होता हूँ आज॥
अन्तरमें स्थित रहकर मेरी बागडोर पकड़े रहना।
निपट निरंकुशचंचल मनको सावधान करते रहना॥
अन्तर्यामीको अन्तःस्थित देख सशंकित होवे मन।
पाप-वासना उठते ही हो नाश लाजसे वह जल-भुन॥
जीवोंका कलरव जो दिनभर सुननेमें मेरे आवे।
तेरा ही गुण-गान जान मन प्रमुदित हो अति सुख पावे॥
तू ही है सर्वत्र व्याप्त हरि! तुझमें यह सारा संसार।
इसी भावनासे अन्तरभर मिलूँ सभीसे तुझे निहार॥
प्रतिपल निज इन्द्रिय-समूहसे जो कुछ भी आचार करूँ।
केवल तुझे रिझानेको, बस, तेरा ही व्यवहार करूँ॥
यदश्नासि म्हणजे जे काही मी खातो, ते तुलाच अर्पण करतो ही भावना असावी. अत्यंत श्रेष्ठ संत गोंदवलेकर महाराज चहा पिताना म्हणत, रामा चहा घ्या. चहा पिताना रामाची आठवण काढत.
यज्जुहोषि ददासि यत् जे हवन करतो, वेदांत करतो, शेतात काम करतो ते मलाच अर्पण कर असे भगवंत म्हणतात. आपण विद्यादान, अन्नदान, वस्त्रदान अवयवदान करतो. जे जे काही दान केले ते परमात्म्यासाठीच द्यावे. समोर व्यक्ती असेल तर अपेक्षा निर्माण होते. परमात्मा समोर आहे तोपर्यंत अपेक्षा निर्माण होत नाही. इथे भक्तियोग कर्मयोगात बदलला आहे. भगवद्गीता या श्लोकाद्वारे अत्यंत सुंदर रीतीने धन्यवादापर्यंत नेते. जे काही मी केले ते तुम्हीच केले असे कबीर म्हणतात .
ना कछु किया न करि सका, नाँ करने जोग सरीर। जो कछु किया सो हरि किया (ताथै) भया कबीर कबीर॥
ते क्रिया जात आघवे जे जैसे निपजेल स्वभावे
ते भावना करूनी करावे माझीया मोहरा ll
प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. म्हणूनच मराठीत म्हण आहे व्यक्ती तितक्या प्रकृती l आपल्या अंतरंगातून मी केले हा भाव धुवून काढावा. भगवंता तू माझ्यासाठी एवढे केले ते मी तुला अर्पण करतो हा भाव मनात असावा. व्यापक परमात्म्यासाठी ही भावना किती सुंदर आहे. एखाद्याने आपल्याला अंगठी दिल्यावर आपण त्याला लगेच धन्यवाद देतो. पण ही अंगठी घालण्यासाठी ज्याने बोट दिले त्याचे आभार मानायला विसरू नये. भगवंत म्हणतात, असे जर तू केलेस तर अर्जुना शुभ आणि अशुभ या दोन्ही फलांपासून तु मुक्त होशील.
शुभाशुभफलैरेवं(म्), मोक्ष्यसे कर्मबन्धनैः।
सन्न्यासयोगयुक्तात्मा, विमुक्तो मामुपैष्यसि।।9.28।।
समोऽहं(म्) सर्वभूतेषु, न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः।
ये भजन्ति तु मां(म्) भक्त्या, मयि ते तेषु चाप्यहम्।।29।।
या संदर्भात शंकराचार्य एक सुंदर दृष्टांत देतात. अतिशय कडाक्याच्या थंडीत शेकोटी पेटवली आहे आणि सगळे त्याची उब घेत आहेत. एक मनुष्य मात्र दूर उभा राहून शेकोटीची ऊब मिळवण्याचा प्रयत्न करतो पण ती त्याला मिळू शकत नाही. अशावेळी तो म्हणतो की अग्नि पक्षपाती आहे. भगवान म्हणतात की जर तुम्ही माझ्याशी निष्काम भक्तीने वागलात तर मी सर्वांसाठी समान आहे. यापुढे भगवंत महत्त्वपूर्ण सिद्धांत सांगतात. या सिद्धांतामुळेच ज्ञानेश्वर महाराजांना हा अध्याय महत्वपूर्ण वाटतो.
अपि चेत्सुदुराचारो, भजते मामनन्यभाक्।
साधुरेव स मन्तव्यः(स्), सम्यग्व्यवसितो हि सः।।9.30।।
जीवन निरर्थक जाने न पाए
ये मन ना जाने क्या क्या कराये
कुछ बन ना पाए मेरे बनाये
कुछ बन ना पाए मेरे बनाये
हे नाथ अब तो ऐसी दया हो
जीवन निरर्थक जाने न पाए
ऐसा जगा दो फिर सो ना जाऊँ
अपने को निष्काम प्रेमी बनाऊँ
तुमको ही चाहु तुमको ही पाऊँ
संसार का भय कुछ रह ना पाए
ये मन ना जाने क्या क्या कराये
कुछ बन ना पाए मेरे बनाये
हे नाथ अब तो ऐसी दया हो
जीवन निरर्थक जाने न पाए
वो योग्यता दो सत्कर्म करलू
ह्रदय में अपने सद्भाव भरलू
नर तन है साधन भवसिन्धु तरलू
ऐसा समय फिर आये न आये
ये मन ना जाने क्या क्या कराये
कुछ बन ना पाए मेरे बनाये
हे नाथ अब तो ऐसी दया हो
जीवन निरर्थक जाने न पाए
क्षिप्रं(म्) भवति धर्मात्मा, शश्वच्छान्तिं(न्) निगच्छति।
कौन्तेय प्रतिजानीहि, न मे भक्तः(फ्) प्रणश्यति।।9.31।।
योग्यांसाठी ते म्हणतात योगसिद्धीद्वारा तो माझ्याजवळ येऊन पोहोचतो. क्षिप्रम् याचा अर्थ लगेच. अनुतापतीर्थाने न्हालेला तो म्हणतो ही चूक मी पुन्हा करणार नाही. अशी धारणा ज्याच्या मनाची असेल अशा शरणागत आलेल्या भक्ताला भगवान कधीही न संपणारी शांती मिळवून देतात. भगवान म्हणतात शपथपूर्वक मी सांगतो असा भक्त कधी नष्ट होत नाही. नदीचे मूळ आणि साधूचे कुळ कधी विचारू नये. याप्रमाणे आधी तो कोण होता हे बघू नये. कोणीही भक्त अशा प्रकारे वागू शकतो.
मां(म्) हि पार्थ व्यपाश्रित्य, येऽपि स्युः(फ्) पापयोनयः।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रा:(स्), तेऽपि यान्ति परां(ङ्) गतिम्।।9.32।।
लोक या ठिकाणी प्रश्न विचारतात की भगवान स्त्रियांना पाप योनीत का समजतात? पण असे नाही. गुरुदेवांनाही हा प्रश्न अनेकांनी विचारला, तेव्हा ते म्हणाले की स्त्रिया आपल्या दैनिक जीवनामध्ये इतक्या व्यग्र असतात,घर संसार चालवायचा असल्याने कधीकधी ध्यानधारणा करायला वेळ मिळत नाही. वैश्य व्यापार करणारे असल्याने त्यांना असे वाटते की राम नाम घेतल्याने त्यांना काय मिळणार आहे? सेवाव्रतींचे जीवन तर संपूर्णपणे कार्यरत असते. त्यामुळे त्यांना भगवंताचे नाम घ्यायला किंवा ध्यान करायला वेळच मिळत नाही. म्हणून या ठिकाणी असे म्हटले गेले आहे.
आपल्या सनातन धर्मात गार्गी, मैत्रेयी या फार मोठ्या विदूषी होऊन गेल्या. मंडनमिश्र यांच्या पत्नी भारती होत्या. त्या शंकराचार्य आणि त्यांचे पती यांच्यातील शास्त्र चर्चेतील प्रमुख निर्णय घेत. यावरून असे लक्षात येते की आपल्या धर्मात स्त्रीला हीन दर्जा दिलेला नव्हता. स्त्रिया विद्वान असल्याने जर दैनिक जीवनात ध्यान करून माझ्यापर्यंत पोहोचू शकल्या तर त्या मलाच प्राप्त करू शकतात.
किं(म्) पुनर्ब्राह्मणाः(फ्) पुण्या, भक्ता राजर्षयस्तथा।
अनित्यमसुखं(म्) लोकम्, इमं(म्) प्राप्य भजस्व माम्।।9.33।।
भगवान इथे सृष्टीचे वर्णन करतात. ते म्हणतात सर्व क्षणभंगुर आहे. सुख सुद्धा सर्वकाळ टिकत नाही. एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की ती केव्हा आपल्याकडून निघून गेली हे सुद्धा आपल्याला कळत नाही. सुख मिळाल्यावर त्या सुखाचे महत्त्व कमी होते. प्रत्येक क्षण सृष्टी बदलणारी आहे परंतु ती अपरिवर्तनशील परमात्म्याशी जोडली गेली आहे. भगवंत म्हणतात, परिवर्तनशील सृष्टीत जी क्षणभंगुरता आहे, तिला दूर करून जर तुम्ही माझ्याशी जोडले गेलात तर मला प्राप्त करू शकता.
मन्मना भव मद्भक्तो, मद्याजी मां(न्) नमस्कुरु।
मामेवैष्यसि युक्त्वैवम्, आत्मानं(म्) मत्परायणः।।9.34।।
मनातून परमात्म्याचाच संकल्प करावा. काहीं लोक इतरांचा द्वेष करतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिशुपाल आणि रावण.
दुसरा भक्तिमार्ग आहे. त्यात भगवंतांसाठी कार्य करण्यास तत्पर व्हावे. पूर्ण शरणागती स्वीकारावी. अशाप्रकारे भगवंतांपर्यंत पोहोचता येते. आत्म्याला जर परमात्म्यापर्यंत पोहोचवले तर मुक्त होता येते. परमात्माच सर्वात प्रमुख आहे.
अर्जुनासाठी परमात्मा सर्वश्रेष्ठ नाही कारण त्याच्यासमोर त्याचे आप्तस्वकीय, गुरुवर्य उभे आहेत. पितामह भीष्म, द्रौणाचार्य त्याला परमात्म्यापेक्षाही श्रेष्ठ वाटतात. श्रीकृष्ण परमात्म्याने त्याच्या रथाचे सारथ्य केले होते. एवढे असूनही त्याला संसार महत्त्वाचा वाटत होता. भगवान म्हणतात जेव्हा तुला माझे महत्त्व समजेल तेव्हा मी तुझ्या केंद्रस्थानी असेन. अशावेळी तू माझीच भक्ती करशील आणि मलाच प्राप्त करून घेशील.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-
तू मन हे मीचि करीं l
माझीया भजनी प्रेम धरी l
सर्वत्र नमस्कारीं l मज एकाते ll
अशा प्रकारे मनाला नमस्कार कर. मन परमात्म्याला अर्पण कर.
हे सर्वात मोठे ज्ञान आहे आणि हे गुह्यतर शास्त्र आहे.
कोणत्याही खेळाडूला किंवा वैज्ञानिकाला ध्येयसिद्धीसाठी संकल्प करावा लागतो आणि संकल्प करताना त्यावर प्रेमही असावे लागते. एखादा वैज्ञानिक आपल्या शोधावर सुरुवातीला प्रेम करतो नंतर ते मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यासाठी कार्य करतो. आपणही आपल्या जीवनात परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी सुरुवातीला त्याच्यावर प्रेम आणि नंतर त्याला प्राप्त करण्याचा संकल्प करायला हवा.
अशाप्रकारे हा अत्यंत सुंदर अध्याय आहे. तो आपल्याला भौतिक गोष्टी आणि परमात्म्याला कसे प्राप्त करायचे हे शिकवतो म्हणूनच याला राजविद्याराजगुह्ययोग असे परमात्म्याने म्हंटले आहे. या सुंदर विवेचन सत्रानंतर प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली.
प्रश्न उत्तरे -
१- पद्मजा दीदी - जर भगवंताला शरण गेलो तर पापी लोकांचे पाप कमी होईल का?
उत्तर- परमात्मा आपल्या जीवनाचा सूत्रधार आहे. तो आपल्या जीवनात बदल घडवू शकतो. आपण केलेले पूजापाठ, आराधना या गोष्टी दोष कमी करण्यासाठीच असतात. जर आपले प्रारब्ध मंद स्वरूपाचे असेल तर ते कमी होऊ शकते मात्र तीव्र असेल तर ज्याप्रमाणे सुटलेला बाण परत येऊ शकत नाही त्याप्रमाणे ते कमी होऊ शकत नाही. मात्र आपल्याजवळ असलेला बाण आपण नष्ट करू शकतो. ज्ञानेश्वर महाराज सर्वांच्या उद्धारासाठी भगवंताकडे पसायदान मागतात.
२- प्रतिमा दीदी - आपण वृद्धांची सेवा करतो आणि ते गेल्यानंतर त्यांचे श्राद्ध करतो. आपल्याला पितृदोष लागू शकतो का? हा लागू नये म्हणून काही उपाय आहे का?
उत्तर- हे जन्म कुंडली वरून समजते. पितर हे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामध्ये राहतात. जर पितर असंतुष्ट असतील तर आपली अर्चना त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि ते मोक्ष मिळवू शकत नाहीत. म्हणून त्यांना मुक्ती मिळण्यासाठी श्राद्धतर्पण करायला हवे. यामुळे आपले अंत:करणही शुद्ध होऊन जाते.
३- मुनेश दीदी - आमची मुले आमचं ऐकत नाही तर मग मानसिक शांती कशी मिळू शकेल?
उत्तर - आपण मुलांना चांगले सांगण्याचा प्रयत्न करावा. ते ऐकावे किंवा न ऐकावे हा त्यांचा प्रश्न आहे . श्रीकृष्णाने अर्जुनाला नेमकी हीच गोष्ट सांगितली होती. यथेच्छसि तथा कुरु ॥
प्रश्नोत्तरानंतर समापन प्रार्थना आणि हनुमान चालीसाने विवेचनाची सांगता झाली.
।।श्रीकृष्णार्पणमस्तु ।।