विवेचन सारांश
आहार, यज्ञ आणि तप यांचे प्रकार

ID: 5658
Marathi - मराठी
शनिवार, 05 ऑक्टोबर 2024
अध्याय 17: श्रद्धात्रयविभागयोग
2/2 (श्लोक 13-28)
विवेचक: गीता प्रवीण कविता जी वर्मा


परंपरेनुसार आरंभिक प्रार्थना आणि दीपप्रज्वलन करून विवेचनाला सुरुवात झाली. गुरुपरंपरेला वंदन करण्यात आले. भगवद्गीतेचा सतरावा अध्याय  श्रद्धात्रयविभागयोग याचा पूर्वार्ध आपण बघितला. भोजनाविषयी  भगवान आपल्याला वर्णन करून सांगतात. भोजन तीन प्रकारचे असते. सात्त्विक, राजसी आणि तामसी. भगवान आता यज्ञ, दान आणि तप याविषयी विस्ताराने सांगणार आहेत. सात्त्विक आणि राजसी यज्ञाचे वर्णन आपण बघितले.

अफलाकांक्षी 
याचा अर्थ फळाच्या अपेक्षेशिवाय जो यज्ञ केला जातो तो सात्त्विक असतो. श्रीकृष्णप्रीत्यर्थ करोमि  श्रीकृष्णाच्या प्रीतीसाठी हा यज्ञ केला जातो. त्यानंतर राजसी यज्ञ अभिसंधाय तु फलम्  म्हणजे फळासाठी केला जातो. काहीतरी इच्छा पूर्ण करण्यासाठी संकल्प करून अनुष्ठान केले जाते. सतरावा अध्याय आपल्याला तर्पणाविषयी सांगतो. आपण कुठल्या गुणाची निवड जीवनात करावी हे हा अध्याय वाचल्यावर आपल्याला समजते. आपल्या चुका समजल्यावर आपण आपले जीवन सुधारू शकतो. काही लोकांना आपल्या चुका समजतात पण ते ही गोष्ट मानत नाहीत. जर आपण चुका समजून, त्या चुका दूर करण्याचा प्रयत्न केला तर आपल्यात सुधारणा होऊ शकते. जीवनात जर सात्त्विकता असेल तर आपल्याला असे करणे आवडते.

आपण आरशामध्ये चेहरा बघतो, तो जर चांगला दिसला तर आपल्याला आवडतो. जर राजसी आणि तामसी वृत्ती असेल तर चेहरा मलिन दिसतो. असा चेहरा बघायला आपल्याला आवडत नाही. चांगल्या गोष्टी जीवनात आणल्या तर आपण सात्त्विक बनू शकतो. भगवान आपल्याला फक्त आरसा दाखवत नाहीत तर त्यावर असणारी धूळ कशी दूर करायची हे सांगतात. म्हणूनच सतरावा अध्याय हा फार महत्त्वाचा आहे.

17.13

विधिहीनमसृष्टान्नं(म्), मन्त्रहीनमदक्षिणम्|
श्रद्धाविरहितं(म्) यज्ञं(न्), तामसं(म्) परिचक्षते||17.13||

शास्त्राला सोडून, अन्नदान न करता, मंत्रांशिवाय, दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात

विधि - विधी याचा अर्थ यज्ञ करताना जे करायला पाहिजे ते.
विधिहीनम् जिथे शास्त्राचे पालन केले जात नाही. यज्ञ जर शास्त्रानुसार केला नाही तर तो तामसी असतो.
असृष्टान्नम - या यज्ञात अन्नाचे वितरण केले जात नाही. भगवान सांगतात की यज्ञाच्या शेवटी जर अन्नदान जरूर करावे.
मन्त्रहीनम् - काही वेळा लोकांना दाखवण्यासाठी यज्ञ केला जातो. वेळ कमी असल्याने भराभर मंत्र म्हटले जातात. काही मंत्र मनातल्या मनातच म्हटले जातात. असा मंत्रहीन यज्ञ निषिद्ध समजला जातो. 
अदक्षिणम् - जो ब्राह्मण यज्ञ करतो त्याला पूर्ण दक्षिणा द्यायला हवी. इतर ठिकाणी आपण पैसे खर्च करतो परंतु दक्षिणा देताना एवढी दक्षिणा कशाला द्यायची त्याची आवश्यकता नाही असे समजून कमी दक्षिणा दिली जाते. यज्ञ करण्यापूर्वी दक्षिणा ठरवून घ्यावी.
श्रद्धाविरहित - यज्ञ केला जातो पण त्यात श्रद्धा नसून देखाव्यासाठी तो केला जातो.
यज्ञ धर्मध्वजित्वम्  असा असावा. जो धर्माला सोडून अशा प्रकारे यज्ञ केला जातो त्याला तामसी यज्ञ असे म्हणतात.

17.14

देवद्विजगुरुप्राज्ञ, पूजनं(म्) शौचमार्जवम्|
ब्रह्मचर्यमहिंसा च, शारीरं(न्) तप उच्यते||17.14||

देव, ब्राह्मण, गुरु व ज्ञानी यांची पूजा करणे तसेच पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप म्हटले जाते.

या श्लोकात भगवान शारीरिक तपाविषयी सांगतात. तपाचे विभाजन तीन भागात करतात. शारीरिक, मानसिक आणि वाणीचे तप. या प्रत्येक प्रकारात सात्त्विक, राजसी आणि तामसी असे आणखी तीन तीन प्रकार पडून तपाचे एकूण नऊ प्रकार होतात.
देवद्विजगुरुप्राज्ञ- देव आणि द्विज्, गुरू आणि बुद्धीमान लोक यांची पूजा करायला हवी. द्विज याचा अर्थ ज्यांचा दोन वेळा जन्म होतो. ब्राह्मणाचा जन्म दोन वेळा होतो. पहिला जन्म आईच्या गर्भात आणि दुसरा जन्म सोळा संस्कारांपैकी उपनयन संस्काराने होतो. दात दोन वेळा येतात. पहिले दुधाचे दात आणि नंतर कायमचे दात. यालाही द्विज असे म्हंटले  जाते.
ब्राह्मण, विद्यागुरू, दक्षिणागुरू, बुद्धीमान आणि विद्वान लोक या सर्वांची पूजा करायला हवी. द्विज आणि प्राज्ञ यापैकी प्राज्ञ हा शब्द फक्त ब्राह्मणांसाठीच वापरलेला नाही. क्षत्रिय, वैश्य, शूद्र यापैकी कोणताही वर्ण प्राज्ञ या संज्ञेत गणले जातात. ते विद्वान असल्याने त्यांची पूजा करावी.
शौचम् - याचा अर्थ शुद्धता. आंतरिक आणि बाह्य दोन्ही दृष्टीने शुद्ध असावे. साधना करताना मन शुद्ध असले तर आंतरिक शुद्धता आहे तर बाह्य शुद्धतेची काय आवश्यकता आहे असे वाटते. शरीर नश्वर आहे ते काही काळाने नष्ट होणार आहे. आत्मा नित्य आहे. असे असताना स्नान करण्याची काय आवश्यकता आहे असे वाटते. स्वामीजी यावर उत्तर देतात की जोपर्यंत शरीराला प्राणवायू, भोजन व जल याची आवश्यकता आहे तोपर्यंत स्नान आणि घरशुद्धी करूनच अनुष्ठान करावे. जो त्रिगुणातीत असतो त्याच्यासाठी या नियमाची आवश्यकता नाही. पण इतरांनी नियमांचे पालन करावे नाहीतर पाप लागेल. 
आर्जवम् - याचा अर्थ मनाची सरलता. जे मनात आहे तेच ओठातून बाहेर पडावे. काही वेळा मनात काही वेगळे आणि वाणीतून काही वेगळेच बोलले जाते. साधकांसाठी असे वागणे योग्य नाही. जीवनात सरलता आवश्यक आहे.
ब्रह्मचर्य - ब्रह्मचर्य म्हणजे ज्याचे मन नेहमी संन्यासी वृत्तीत राहते किंवा तो तसा प्रयत्न करतो त्याला ब्रह्मचारी असे म्हणतात. जो नित्य ब्रह्माच्या चिंतनात राहतो त्याला ब्रह्मचारी म्हणतात. संन्यास विदुषम् आणि अविदुषम् (ज्ञानी लोकांचा संन्यास आणि अज्ञानी लोकांचा संन्यास) असा दोन प्रकारचे असतो. ब्रह्मचर्यात इंद्रियांना नियंत्रित करायचे आहे मात्र जबरदस्तीने आपण  त्यावर नियंत्रण ठेवता कामा नये. दररोज आपण यज्ञ, दान आणि तप करत असू, आपले मन पवित्र आणि सरळ असेल तर सहज रूपाने आपले मन गीता म्हणण्यात आणि एकादशी करण्यामध्ये लागते. त्यासाठी मनाला जोर द्यावा लागत नाही.
अहिंसा -  शरीर मन आणि वाणी याने कोणाची हिंसा करू नये याचा अर्थ शारीरिक क्लेश कोणाला देऊ नये. वाणीने दुसऱ्यांना दुखवू नये. दुसऱ्यांच्या मनाचा विचार करावा. असे जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला शारीरिक तप म्हटले जाते.

17.15

अनुद्वेगकरं(म्) वाक्यं(म्), सत्यं(म्) प्रियहितं(ञ्) च यत्|
स्वाध्यायाभ्यसनं(ञ्) चैव, वाङ्मयं(न्) तप उच्यते||17.15||

जे दुसऱ्याला न बोचणारे, प्रिय, हितकारक आणि यथार्थ भाषण असते ते, वेदशास्त्रांचे पठण आणि परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास- हेच वाणीचे तप म्हटले जाते.

अनुद्वेगकरं वाक्यम् - याचा अर्थ कधी कधी आपण असे शब्द बोलतांना वापरतो त्यामुळे दुसऱ्यांचे मन दुखावले जाते. या श्लोकात भगवान वाणीच्या तपाविषयी सांगतात. आपले बोलणे सत्य असावे मात्र ते प्रिय आणि हितकारक असावे. काही लोक नेहमी चांगलेच बोलतात की जे लोकांना आवडेल.

याविषयी एक कथा आहे. एका राज्यातील राजा आपले भविष्य जाणू इच्छितो. तो तशी दवंडी पिटवतो. त्यानुसार दोन भाऊ भविष्य सांगायला पुढे येतात. पहिला भाऊ सांगतो की राजा तुझ्यासमोर तुझे सगळे आप्त  नातलग मरून जाणार आहेत. एवढे तुझे आयुष्य राहील. राजा संतापतो आणि त्याला कैदेत टाकतो. दुसरा भविष्य सांगताना विचारपूर्वक सांगतो. तो म्हणतो की तू एवढा भाग्यवान आहेस की आयुष्यामध्ये तू तुझे नातू, पणतू सगळ्यांना बघणार आहेस. ऐकल्यावर राजा खूप खुश होतो आणि त्याला बक्षीस देतो. संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे 
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात ब्रूयान्नब्रूयात् सत्यंप्रियम्।
प्रियं च नानृतम् ब्रुयादेषः धर्मः सनातनः।।
सत्य बोलावे पण तेच सत्य बोलावे जे सर्वांना प्रिय असेल, जे कटू, अप्रिय सत्य बोलू नये. त्याच बरोबर सर्वांना प्रिय वाटणारे असले तरी असत्य बोलू नये. हाच सनातन धर्म आहे. 

स्वाध्याय-
स्वाध्यायाचा अर्थ शास्त्रग्रंथांचा अभ्यास करणे. निरनिराळे शास्त्रावरील ग्रंथांचे वाचन, सत्संगांचे श्रवण स्वाध्यायात येते. भगवद्गीता सुरुवातीला शिकताना आपल्याला खूप आवडते. जसा काळ पुढे जातो तसं तसं भगवद्गीता शिकण्याचा कंटाळा येतो. आपण जर सतत गीता म्हणत गेलो तर आपल्याला त्याची आवड निर्माण होऊ शकते. प्रवचन श्रवणाचा लाभ घ्यायला हवा. ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात त्या शास्त्राच्या अभ्यासाने आपल्याला कळतात. आपल्या चुका कळतात आणि त्यामुळे आपल्याकडून पाप होत नाही.

श्रीकृष्णाने सांगितलेली भगवद्गीता जर आपण पूर्ण वाचली नाही पण त्यातील एक श्लोक जरी वाचला आणि त्याचे चिंतन आणि मनन करून ते आचरणात आणले तर भगवद्गीता आपल्या जीवनात येऊ शकते. पण हे अत्यंत कठीण काम आहे. आपण गीता शिकून दुसऱ्यांना शिकवतो याला वाणीचे तप म्हणता येईल. गीतापरिवारात दररोज सकाळी सहा वाजता आणि रात्री नऊ वाजता गीतेचे अध्याय म्हटले जातात. दर एकादशीला चिंतनिका स्वरूपात तीन अध्यायांचे वाचन आणि चिंतन होते. हे करणे एक प्रकारचे तपच आहे. आपले मन नेहमी सात्त्विक राहील असे नाही. मात्र अभ्यासाने आपण तसे बनवू शकतो याला वाङ्मय तप असे म्हणतात.

17.16

मनः(फ्) प्रसादः(स्) सौम्यत्वं(म्), मौनमात्मविनिग्रहः|
भावसंशुद्धिरित्येतत्, तपो मानसमुच्यते||17.16||

मनाची प्रसन्नता, शांत भाव, भगवत्चिंतन करायचा स्वभाव, मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील भावांची पूर्ण पवित्रता हे मनाचे तप म्हटले जाते.

मनाच्या स्तरावर आपण काय काय करू शकतो हे या श्लोकात सांगितले आहे. 
मन:प्रसाद:- याचा अर्थ मनाची प्रसन्नता. हे मानसिक तप आहे. अनुकूलता असली तर मन प्रसन्न होते.आणि प्रतिकूल परिस्थिती असली तर मन दु:खी होते. प्रसन्नता आपल्या अंत:करणात आहे कारण आपण आनंदस्वरूप आहोत. आनंदी राहणे हे आपल्याच हातात असते हे श्रीकृष्णांनी वारंवार आपल्याला सांगितले आहे. एका घरात चार लोक राहतात त्यातील काही स्वभावानुसार नेहमी प्रसन्न तर काही अप्रसन्न राहतात. आपली प्रसन्नता बाह्य परिस्थितीवर अवलंबून असते. पण जर आपलं अंत:करण शुद्ध असेल आणि मनात षड्विकार नसतील तर प्रसन्नता आपोआप येते. क्रोध, लोभ, मोह यांचे आवरण आपण भगवत चिंतन आणि गीतापठणाने दूर करू शकतो.

सौम्यत्व -
अंतःकरणाची प्रसन्नता आपल्याला महापुरुषांच्या चेहऱ्यावर दिसते. कुठेही आपण रामाचे चित्र बघितले तर त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला हलकेसे हास्य नेहमी दिसते. कुठेही उदासीनता दिसत नाही. ही प्रसन्नता भौतिक गोष्टींवर अवलंबून नसते. ऋषी नेहमी छोट्या कुटीत राहतात पण परमसुखाचा आनंद घेत असतात. यासाठी आपली वाणी नेहमी सौम्य असावी. काही लोकांना बघून बालक घाबरतात. त्यांच्या चेहऱ्यावर कठोरता दिसून येते.

मौन -
  याचा अर्थ वाणीने काहीच बोलू नये असा नाही. मन शांत ठेवावे. मनात भलते विचार येऊ देऊ नये. प्रयत्नाने मन कमीत कमी विचारात ठेवावे.

आत्मविनिग्रह -
मनाचा निग्रह असणे आवश्यक आहे.

भावसंशुद्धि -
मनातील विचारांमध्ये  शुद्धी असावी. लोकांबद्दल द्वेष, ईर्षा मनातून काढून टाकावी. कोणाचा निग्रह आणि अंत:करणाची शुद्धता व पवित्रता याला मनाचे तप असे म्हणतात.

17.17

श्रद्धया परया तप्तं(न्), तपस्तत्त्रिविधं(न्) नरैः|
अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः(स्), सात्त्विकं(म्) परिचक्षते||17.17||

फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषांकडून अत्यंत श्रद्धेने केलेल्या वर सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या तपाला सात्विक तप म्हणतात.

अफलाकांक्षी - जे पुरुष कोणत्याही कर्मापासून फळाची अपेक्षा ठेवत नाही आणि श्रद्धेने तिन्ही प्रकारच्या तपांचे आचरण करतात त्यांच्या तपाला सात्त्विक तप असे म्हणतात. योगी पुरुष अशा स्वभावाचे असतात.

17.18

सत्कारमानपूजार्थं(न्), तपो दम्भेन चैव यत्|
क्रियते तदिह प्रोक्तं(म्), राजसं(ञ्) चलमध्रुवम्||17.18||

जे तप सत्कार, मान व पूजा होण्यासाठी तसेच दूसऱ्या काही स्वार्थासाठीही स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जाते, ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप येथे राजस म्हटले आहे.

सत्कारमानपूजार्थ - जेव्हा कोणतेही कर्म, तप, व्रत, मौन, गुरुची पूजा केवळ देखाव्यासाठी, सत्कारासाठी, आपल्याला मान मिळावा, आपले नाव व्हावे यासाठी केले जाते तेव्हा अशा तपाला राजस तप  असे म्हणतात.
चलमध्रुवम - असे तप अनिश्चित फळ देणारे असते. कधी कधी यापासून पुण्यही घडते. पण ते काही काळाने नाहीसे होते. कोणत्याही फळाच्या अपेक्षेशिवाय जेव्हा तप केले जाते ते कायमस्वरूपी फळ देणारे असते. त्यापासून पुण्य मिळतेच पण परमात्म्याची प्राप्ती होते.

17.19

मूढग्राहेणात्मनो यत्, पीडया क्रियते तपः|
परस्योत्सादनार्थं(म्) वा, तत्तामसमुदाहृतम्||17.19||

जे तप मुर्खतापूर्वक हट्टाने, मन, वाणी आणि शरीराला कष्ट देऊन किंवा दुसऱ्याचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते, ते तप तामस म्हटले गेले आहे.

तामसी तप मूढतेने केले जाते. काहीवेळा एखादा संकल्प पाखंडीपणे केला जातो. एखादा नवस काम पूर्ण होण्यासाठी केला जातो. पण हे करताना आपल्याला खूप त्रास होतो. 
परस्योत्सादनार्थ - दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी त्यांना हानी पोहोचवण्यासाठी हे तप केले जाते. शत्रूचा नाश करण्यासाठी कधी कधी तपाचा वापर करतात. हे तामसी तप समजावे. याप्रकारे भगवंत येथे नऊ प्रकारचे तप सांगतात.

17.20

दातव्यमिति यद्दानं(न्), दीयतेऽनुपकारिणे|
देशे काले च पात्रे च, तद्दानं(म्) सात्त्विकं(म्) स्मृतम्||17.20||

दान देणेच कर्तव्य आहे', ह्या भावनेने जे दान देश, काळ आणि पात्र मिळाली असता उपकार न करणाऱ्याला दिले जाते, ते दान सात्विक म्हटले गेले आहे.

या श्लोकात भगवंत दानाविषयी सांगतात. यज्ञ, दान आणि तप गृहस्थासाठी अत्यंत आवश्यक आहे. 
दातव्यमिति यद्दानं - दान देणे हे माझे कर्तव्य आहे असे वाटून जे देश, काल आणि पात्रानुसार दिले जाते त्याला सात्त्विक दान असे म्हंटले जाते. दुष्काळ पडला असता दुष्काळग्रस्त लोकांना अन्न देणे किंवा एखादी व्यक्ती आतून दुःखी असते, तिची व्यथा ऐकून तिला वेळ देणे हे ही एक प्रकारचे दान आहे. आपण दुसऱ्यांना हसवू  शकलो तर तेही दान असते. जेव्हा एखादी व्यक्ती टाळी वाजवते तेव्हा इतरही लोक टाळ्या वाजवतात. प्रसन्नतेचे संक्रमण हास्यामुळे होऊ शकते.
गीतापरिवारात सेवा देणारे सगळेच श्रम आणि वेळेचे दान देतात. इथे देणगीबद्दल कोणी बोलत नाही पण काही लोक स्वतःहून गुप्त दान देतात. बारा हजार लोक गीता परिवारात सेवा देत असतात. याचा समावेश सात्त्विक दानात होतो .
कुठल्याही इच्छेशिवाय, फळाची अपेक्षा न ठेवता  देशे कालेच पात्रेच  म्हणजे योग्य वेळेनुसार पात्र व्यक्तीला दान देणे सात्त्विक दानात मोडते. भुकेल्या व्यक्तीला भोजन द्यावे. ते वेळ बघून असावे. दोन मित्र असतात. एका मित्राने दुसऱ्या मित्राला पैसे मागितल्यावर ते पैसे त्याला देत नाही. अचानक चोर येऊन ते पैसे हिसकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खिशातील पैसे तो पटकन दुसऱ्या मित्राला देतो. असे लबाडीने वागणे सात्त्विक  दानात येत नाही. दान नेहमी सत्पात्री असावे.  

17.21

यत्तु प्रत्युपकारार्थं(म्), फलमुद्दिश्य वा पुनः|
दीयते च परिक्लिष्टं(न्), तद्दानं(म्) राजसं(म्) स्मृतम्||17.21||

परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतूने किंवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते, ते राजस दान म्हटले आहे.

यत्तु प्रत्युपकारार्थ - जे दान परतफेडीच्या अपेक्षेने केले जाते तसेच त्यापासून जे फळ मिळेल या आशेने दिले जाते त्याला राजस दान असे म्हणतात. सात्त्विक दानात उपकाराची भावना नसते. एखादी आई आपल्या बालकाला जेव्हा वाढवते तेव्हा तिच्या मनामध्ये हा विचार असतो की म्हातारपणी हा आपल्याला आधार देइल. मित्रासंबंधी ही असाच देण्याघेण्याचा व्यवहार असतो. काही वेळा दान देण्याची इच्छा नसते पण द्यावे लागते. असे क्लेशपूर्वक दिलेले दान राजस दान असते.

17.22

अदेशकाले यद्दानम्, अपात्रेभ्यश्च दीयते|
असत्कृतमवज्ञातं(न्), तत्तामसमुदाहृतम्||17.22||

जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी, अयोग्य काळी आणि कुपात्री दिले जाते, ते दान तामस म्हटले गेले आहे.

यानंतर भगवान तामसी दानाबद्दल सांगतात. चुकीच्या व्यक्तीला, सत्काराशिवाय किंवा तिरस्कार करून जेव्हा दान दिले जाते तेव्हा ते तामस दान असते. मकर संक्रांतीला दान देताना जर ब्राह्मण मिळाला नाही तर जी व्यक्ती समोर येईल तिला दान देणे हे यात मोडते. रात्रीच्या वेळी थंडीच्या दिवसात लोकांना आईस्क्रीम खायला देणे चुकीचे आहे. एखाद्याला मदत करताना तिरस्कार दर्शवून अपमान करून वागले तर हे तामस दान असते. श्रीकृष्णाने सुदाम्याला जेव्हा मदत केली तेव्हा अतिशय सन्मानपूर्वक त्याला वागवले. बरेच वेळा भिकारी दिसला तर त्याच्या अंगावर पैसे फेकून मदत केली जाते. या प्रकारच्या दानाने पुण्य फारच कमी पण पाप मात्र जास्त मिळेल.

17.23

ॐ तत्सदिति निर्देशो, ब्रह्मणस्त्रिविधः(स्) स्मृतः|
ब्राह्मणास्तेन वेदाश्च, यज्ञाश्च विहिताः(फ्) पुरा||17.23||

ॐ' , तत्, सत् अशी तीन प्रकारची सच्चिदानंदघन ब्रह्माची नावे सांगितली आहेत. त्यापासून सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण, वेद आणि यज्ञादी रचले गेले आहेत.

या श्लोकात भगवान आपल्याला नवीन विषय सांगतात. ॐ तत् सत् हे तीन शब्द म्हणजे सच्चिदानंदघन ब्रह्माचे नाव आहे. यातूनच ब्राह्मण, वेद आणि यज्ञ रचले गेले. 

17.24

तस्मादोमित्युदाहृत्य, यज्ञदानतपः(ख्) क्रियाः|
प्रवर्तन्ते विधानोक्ताः(स्), सततं(म्) ब्रह्मवादिनाम्||17.24||

म्हणून वेदमंत्रांचा उच्चार करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ, दान व तपरुप क्रियांचा नेहमी 'ॐ' या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करुनच प्रारंभ होत असतो.

ब्रह्मवादिनाम् (ऋषीमुनींचा) मोठमोठे यज्ञाचा आरंभ ॐ या शब्दाने होत असतो. या शब्दामुळे परमात्म्याचे स्मरण होते. ॐ म्हणजे शब्दब्रह्म.

17.25

तदित्यनभिसन्धाय, फलं(म्) यज्ञतपः(ख्) क्रियाः|
दानक्रियाश्च विविधाः(ख्), क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभि:||17.25||

तत्' या नावाने संबोधिल्या जाणाऱ्या परमात्म्याचेच हे सर्व आहे, या भावनेने फळाची इच्छा न करता नाना प्रकारच्या यज्ञ, तप व दानरुप क्रिया कल्याणाची इच्छा करणाऱ्या पुरुषांकडून केल्या जातात.

तत् - हे सगळे परमात्म्याचेच आहे या भावनेने फळाची इच्छा न करता यज्ञ, दान तप केले जाते. मी या देवतेला मानतो किंवा मी श्रीकृष्णाला मानतो असा अर्थ यात आहे. या शब्दात परमात्म्याचे स्वरूप आहे.

17.26

सद्भावे साधुभावे च, सदित्येतत्प्रयुज्यते|
प्रशस्ते कर्मणि तथा, सच्छब्दः(फ्) पार्थ युज्यते||17.26||

सत्' या परमात्म्याच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच हे पार्था! उत्तम कर्मातही 'सत्' शब्द योजला जातो.

सद्भावे साधुभावेच -सत् म्हणजे सदैव राहणारा. तो काल होता, आज आहे आणि उद्याही राहणार आहे असा. त्या स्वरूपाचा परमात्मा आहे. आम्ही सर्व परमात्म्याचे अंश आहोत. जेव्हा चांगली क्रिया घडते तेव्हा सत् या शब्दाचा वापर केला जातो.

17.27

यज्ञे तपसि दाने च, स्थितिः(स्) सदिति चोच्यते|
कर्म चैव तदर्थीयं(म्), सदित्येवाभिधीयते||17.27||

तसेच यज्ञ, तप व दान यांमध्ये जी स्थिती (आस्तिक बुद्धी) असते, तिलाही सत् असे म्हणतात आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने 'सत्' असे म्हटले जाते.

यज्ञ, दान आणि तप करण्याची दृढता सत् मुळे असते. परमात्म्यासाठी जे कर्म केले जाते ते  सत् या शब्दामुळे होते.

17.28

अश्रद्धया हुतं(न्) दत्तं(न्), तपस्तप्तं(ङ्) कृतं(ञ्) च यत्|
असदित्युच्यते पार्थ, न च तत्प्रेत्य नो इह||17.28||

हे अर्जुना! श्रद्धेशिवाय केलेले हवन, दिलेले दान, केलेले तप आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल, ते सर्व 'असत्' म्हटले जाते. त्यामुळे ते ना इहलोकात फलदायी होत ना परलोकात.

श्रद्धा नसताना अश्रद्धेने जे दान, यज्ञ किंवा तप केले तर भगवान म्हणतात हे सगळे असत् असल्याने या इहलोकातच नाही तर परलोकातही फायदेशीर नसते. मात्र पूर्ण श्रद्धा ठेवून कर्मफळाची अपेक्षा न ठेवता जर कर्म केले तर त्यामुळे निश्चितच परमात्म्याची प्राप्ती होते.
अतिशय सुंदर अशा श्रद्धात्रयविभागयोग या सतराव्या अध्यायाच्या विवेचनात आपण सविस्तरपणे यज्ञ, दान आणि तप याचे सविस्तर वर्णन बघितले. यानंतर प्रश्न उत्तरांना सुरुवात झाली.

प्रश्नोत्तरे --
- साधना दीदी - या अध्यायाच्या १८ व्या आणि १९ व्या श्लोकात दंभाचे वर्णन आलेले आहे. गीतापरिवारातील गोष्टी आम्ही मित्रांशी शेअर करतो, आम्ही गीतेचा प्रचार करतो तर हे चुकीचे असेल तर सांगा.
उत्तर- तुम्ही प्रचारक असल्याने हे सगळे नक्कीच शेअर करायला हवे. मात्र त्या गोष्टीचा दिखावा करू नये.

एकोणिसाव्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे क्लेशदायक बोलल्याने पाप लागते का? असे बोलल्याने कोणी आपल्याला शाप देईल का?
उत्तर- पूर्वी ऋषी मुनी यांचे खूप तप असायचे. त्यामुळे त्यांनी दिलेले शाप खरे ठरत. सामान्य लोकांचे शाप कधी खरे ठरत नाहीत. मात्र आपल्याला कर्मानुसार त्याचे फळ नक्की मिळते 

३- अमोलजी -
ॐ आणि सत् त्या दोघांमध्ये काय फरक आहे?
उत्तर-ॐ ही परमात्म्याची प्रथम उत्पत्ती आहे. सत् हा शब्द नेहमी राहणार या अर्थाने वापरला जातो.

३- शशी दीदी - मी गीतापरिवारात येते. मी प्रचारक आहे. या ठिकाणी मुस्लिम लोक जास्त आहेत. ते गाईंना मारतात. अशावेळी मी हिंदू धर्माचा प्रचार करू इच्छिते तर हे चुकीचे आहे का?
उत्तर- या ठिकाणी सांप्रदायिकतेचा विचार करू नये. सर्वभूतहीतेरता: यानुसार तुम्ही जे करता ते योग्य आहे.

४- रेखा दीदी - बरेच वेळा एखादी गोष्ट करण्याची इच्छा नसते. मात्र आपण असे केले नाही तर पाप लागेल या भीतीने ती गोष्ट जबरदस्तीने करावी लागते. दान देताना विशेषतः ही गोष्ट घडते.
उत्तर- सुरुवातीला आपल्याला असे वाटते. आपण उगीच दान दिले पण जेव्हा आपण खूप वर्षे सात्त्विकतेने राहिलो तर आपल्या मनात असा विचार अजिबात येणार नाही. आपोआप भगवंताची पूजा करण्याची इच्छा निर्माण होईल. दान देण्याची वृत्ती वाढेल. जेव्हा आपण दान देतो तेव्हा आपला अहंकार नाहीसा होतो. तुम्ही दान द्या किंवा नका देऊ देवाला याने कधीच फरक पडत नाही.

५- दिलीप भैय्या - संसारात एखादी पूजा करताना म्हणजे यज्ञ करताना आपल्या मनात सात्त्विक, राजसी आणि तामसी तिन्ही प्रकारचे विचार येतात. जसे आपण सत्यनारायणाच्या पूजेचा संकल्प सोडतो. फळाच्या अपेक्षेने  केल्याने येथे राजसी श्रद्धा येते. सत्यनारायण करावा हा विचार सात्त्विक आहे. गुरुजी पूजेचे साहित्य इकडून तिकडून आणतात, त्यामुळे आपल्याला राग येतो हा तामसी श्रद्धेचा प्रकार आहे.
उत्तर - या ठिकाणी आपण मनाच्या भावानुसार प्रत्येक गोष्ट घ्यावी. पूजा करताना मन शुद्ध असायला हवे. गुरुजींना दक्षिणा देताना मागे पुढे पाहू नये. तुम्हाला जर दान द्यायचे असेल तर त्याचे पुढे काय होणार याचा विचार तुम्ही करू नये.

प्रश्नोत्तरानंतर समापन प्रार्थना आणि हनुमान चालीसाने या विवेचनाची सांगता झाली. 
। । श्रीकृष्णार्पणमस्तु । ।