विवेचन सारांश
आहार, यज्ञ, दान आणि तप यांचे प्रकार आणि ॐ तत् सत् ची व्याख्या

ID: 5968
मराठी
रविवार, 01 डिसेंबर 2024
अध्याय 17: श्रद्धात्रयविभागयोग
2/2 (श्लोक 11-28)
विवेचक: गीता विशारद डॉ आशू गोयल जी


परंपरेनुसार प्रारंभिक प्रार्थना आणि दीप प्रज्वलनाने विवेचनाचा शुभारंभ झाला. भगवंताची आपल्यावर असणारी असीम कृपा म्हणून आपण भगवद्गीता शिकत आहोत आणि आपल्या जीवनाचे सार्थक करण्यासाठी भगवद्गीतेचे  चिंतन करीत आहोत. आपले पूर्वजन्मीचे संचित किंवा संत महात्म्यांची कृपा म्हणूनच या दैवी परिवाराला आपण जोडले गेलो आहोत.   

आज गीता परिवार सुवर्ण इतिहास रचतो आहे. अकरा डिसेंबरला होणारी मोक्षदा एकादशी साजरी करण्यासाठी जवळजवळ चाळीस देशांमध्ये एक हजार ठिकाणी गीतेचे नित्य पारायण आणि विविध कार्यक्रम गीतापरिवार आयोजित करत आहे. २६ नोव्हेंबरपासून १३ डिसेंबरपर्यंत अनेक ऑफलाइन कार्यक्रम होणार आहेत. अकरा डिसेंबरला सकाळी साडेसहा वाजल्यापासून छत्तीस तास अखंड गीता पारायण केले जाणार आहे. या षडविशंती पारायणात साडेतीन लाख साधक सहभागी होणार आहेत. गीता जयंती उत्सव असाच धुमधडाक्यात साजरा होणार आहे. 

भगवद्गीतेचा सतरावा अध्याय श्रद्धात्रयविभागयोग आहे. श्रद्धा म्हणजे काय याचे स्पष्टीकरण भगवंत यात देतात. ज्याप्रमाणे एखादा रंग दाखवायचा असेल तर त्या रंगाची एखादी वस्तू किंवा पदार्थ दाखवावा लागेल त्याचप्रमाणे जर श्रद्धेचे वर्णन करायचे असेल तर ते अनुभवानेच स्पष्ट करावे लागेल. अनुभवाशिवाय श्रद्धा म्हणजे काय हे सांगताच येणार नाही. माझी श्रद्धा पुस्तक वाचण्यात आहे, माझी श्रद्धा सेवा करण्यात आहे, माझी श्रद्धा गीता वाचनात आहे असे आपण म्हणतो. श्रद्धा तिन्ही प्रकारची असू शकते - सात्विक, राजसी आणि तामसी. जो काही न करता आळसात पडून राहतो, झोपून राहतो तो माणूस तामसी प्रकारचा असतो. जो पूजापाठ, धार्मिक कार्यक्रम यात रुची ठेवतो तो सात्विक असतो. जो सतत काही ना काहीतरी कर्म करत राहतो तो राजसी असतो. ज्याची ज्यामध्ये श्रद्धा असेल त्यानुसार तो बनतो. भगवान आपल्याला हे अनेक प्रकाराने समजावून सांगतात.

तीन प्रकारचे आहार सांगताना त्यांच्या परिणामांचाही विचार भगवंत करतात. सात्विक आहार आयुष्य, बुद्धी, बळ, सुख आणि प्रीती वाढवणारा असतो. राजस आहार दुःख, काळजी व रोग उत्पन्न करणारा असतो. तामसी आहार घेणारे कोणत्याही परिणामांची पर्वा न करता बेपर्वा जीवन जगतात. तामसी लोक आळशी व अपवित्र असतात.

आहारानंतर भगवान यज्ञाविषयी सांगतात. भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायात बारा प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत. हवन करणे म्हणजे यज्ञ असे सामान्यपणे मानले जाते.  मात्र अग्नीकुंडातील हवन हा यज्ञाचा एक प्रकार आहे. यज्ञ शुद्ध सात्विक, राजसी आणि तामसी प्रकारचे असतात असे आपण म्हणू शकत नाही. कारण संपूर्ण ब्रह्मांड सत्व, रज आणि तम या तिन्हीपासून बनले आहे. त्यामुळे सर्वांमध्येच हे तिन्ही गुण असतात. संत महात्म्यांमध्ये सत्व हा प्रधान असतो. पण त्यांच्यातही तमोगुण असतोच कारण त्यांनादेखील झोपेची आवश्यकता असते. अर्थात तमाची मात्रा प्रत्येकामध्ये कमी जास्त असते. सात्विक गुण वाढून पुढे मनुष्य गुणातीत होतो. गुणातीत मनुष्य अफलाकांक्षी (कोणत्याही फळाची कामना न करणारा) असतो.

17.11

अफलाकाङ्क्षिभिर्यज्ञो, विधिदृष्टो य इज्यते|
यष्टव्यमेवेति मनः(स्), समाधाय स सात्त्विकः||17.11||

जो शास्त्रविधीने नेमून दिलेला यज्ञ करणे कर्तव्य आहे, असे मनाचे समाधान  करुन फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषाकडून केला जातो, तो सात्विक यज्ञ होय.

यष्टव्यम् अर्थात माझी कार्यासाठी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे हे माझे कर्तव्यकर्म आहे या भावनेने मी ते करतो. मी आईच्या भूमिकेत असो, वडिलांच्या भूमिकेत असो, शिक्षकाच्या भूमिकेत असो किंवा सेवेकऱ्याच्या भूमिकेत असो, माझे कर्तव्यकर्म करताना मी अफलाकांक्षी  (फळाची इच्छा न करणारा) असेन तर तो सात्विक यज्ञ असतो. माता पित्यांना नमस्कार करताना आशीर्वादाची अपेक्षा इथे नसते. केवळ कर्तव्याच्या भावनेने नमस्कार केला जातो ही वृत्ती सात्विक मनुष्याची असते. मला कोणाचे आशीर्वाद नको म्हणून मी प्रणाम करणार नाही असे तामसी व्यक्तीला वाटते. ज्या ठिकाणी माझी बुद्धी काम करत नाही पण शास्त्राने सांगितले तसे मी करीन हा भाव म्हणजे सात्विक श्रद्धा आहे. मी शास्त्रानुसार वागणार नाही ही तामसी श्रद्धा आहे. आणि जो सत्वगुणाच्या पलीकडे जाऊन कर्तव्य म्हणून कर्म करतो तो गुणातीत आहे.

17.12

अभिसन्धाय तु फलं(न्), दम्भार्थमपि चैव यत्|
इज्यते भरतश्रेष्ठ, तं(म्) यज्ञं(म्) विद्धि राजसम्||17.12||

परंतु हे अर्जुना! केवळ दिखाव्यासाठी किंवा फळ नजरेसमोर ठेवून जो यज्ञ केला जातो, तो यज्ञ तू राजस समज.

सत्वगुणी आणि रजोगुणी दोघेही कर्म करतात पण दोघांमध्ये अंतर आहे. फलदृष्टी कशी आहे यावरून हे समजते. मी चांगले काम केले आहे तेव्हा त्याचे फळ मिळावे ही इच्छा करणारा राजसी असतो. सात्विक व्यक्ती अफलाकांक्षी असतो. राजसी गुण असणारा दंभाचारी असतो. त्याला वाटते, काम मी केले तेव्हा माझेच नाव व्हावे, दुसऱ्याचे नाव होऊ नये. या उलट दुसऱ्याचे नाव झाले तरी चालेल पण मी माझे काम पार पाडेन असे सात्विक वृत्तीच्या माणसाला वाटते. बरेच वेळा असे घडते की, आपण एखादी कल्पना सुचवतो आणि त्यानुसार दुसरा काम करतो आणि त्याचे श्रेय स्वतःकडे घेतो. श्रेयाचा विचार न करणारा सात्विक असतो. गीतापरिवारात कोणतेच काम नावासाठी केले जात नाही. सेवा निःस्वार्थ भावनेने केली जाते. मी जगण्यासाठी लायक बनतो आहे म्हणून भगवंताला धन्यवाद दिले पाहिजेत. जेव्हा श्रेय मिळत नाही म्हणून एखादा मनुष्य दुसऱ्याचे काम बिघडवतो तो तामसी समजावा.

17.13

विधिहीनमसृष्टान्नं(म्), मन्त्रहीनमदक्षिणम्|
श्रद्धाविरहितं(म्) यज्ञं(न्), तामसं(म्) परिचक्षते||17.13||

शास्त्राला सोडून, अन्नदान न करता, मंत्रांशिवाय, दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात

विधिहीनम् म्हणजे शास्त्राला सोडून, अन्नदान न करता, मंत्रहीनम् म्हणजे मंत्राशिवाय, श्रद्धाविरहितम् म्हणजे श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात. आजकाल कामचलाऊ यज्ञ केले जातात. वेळ कमी असल्याचे कारण देत दुप्पट दक्षिणेची लालूच दाखवून ब्राह्मणाला झटपट यज्ञ संपन्न करायला सांगितले जाते. भगवान तामस यज्ञाचे वर्णन यथार्थपणे करतात. हे अधिक स्पष्ट करण्यासाठी महाभारतातील एक उदाहरण दिलेले आहे.

द्रुपद आणि द्रोणाचार्य गुरुकुलात गुरुकडे अध्यापनासाठी होते. गुरूंनी त्यांना अस्त्र शस्त्रविद्या शिकवली. ते बालपणी चांगले मित्र होते. शिक्षण घेत असताना द्रुपद द्रोणाला म्हणाला मी जर एखाद्या राज्याचा राजा बनलो तर अर्धे राज्य मी तुला देईन. त्यानंतर अनेक वर्षे उलटली. द्रुपद राजा झाला आणि द्रोणाचार्य अतिशय हालअपेष्टा सहन करत जगत होते. एके दिवशी त्यांचा मुलगा अश्वत्थामा याने दुधासाठी हट्ट धरल्यावर त्यांची पत्नी कृपी हिच्यावर पिठात पाणी मिसळून त्याला देण्याची वेळ आली. अतिशय उद्विग्न अवस्थेत ती पतीला म्हणाली की, तुम्ही तुमच्या मित्राकडे जाऊन मदत का मागत नाही? कमीत कमी एक गाय तरी त्याला मागा. पत्नीच्या सांगण्यावरून अतिशय लाचारीने द्रोणाचार्य द्रुपद राजाकडे गेले. द्रुपद पांचाल देशाचा राजा होता. त्यांच्या येण्याची सूचना द्रुपदापर्यंत गेली. दोघे एकमेकांना भेटले. द्रोणाचार्यांनी  द्रुपद राजाला आपल्या मैत्रीची आठवण करून दिली आणि वचनानुसार अर्ध्या राज्याच्या मदतीची याचना करताच तो म्हणाला लहानपणची मैत्री आता मी विसरलो. कुठे मी राजा आणि कुठे तू गरीब ब्राह्मण. द्रुपदाचे हे बोलणे ऐकताच द्रोणाचार्य अतिशय संतापले. ते अत्यंत स्वाभिमानी आणि अहंकारी होते. तिथून ते हस्तिनापुरला गेले. तिथे ते कौरव पांडवांचे गुरू बनले.

त्यांनी कौरव पांडवांना शस्त्रविद्येत तरबेज बनवले आणि त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वतःच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी राजा द्रुपदला बंदी बनवण्यास शिष्यांना सांगितले. एकट्या अर्जुनाने द्रुपद राजाचा पराभव केला. अर्जुनासारखा जावई आपल्याला मिळावा अशी भावना द्रुपदाच्या मनात आली. त्याला कोणतेही संतान नव्हते. जो द्रोणाचार्याचा वध करेल असा पुत्र व्हावा यासाठी त्याने पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याची इच्छा आपले कुलपुरोहित याग यांच्याकडे व्यक्त केली. हा तामसी यज्ञ असल्याने मी तो करणार नाही असे यागांनी सांगितले. त्यांचा लहान भाऊ उपयाज याने दक्षिणेच्या आशेने तो पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्याचे फळ म्हणून द्रुपदला कन्यारत्न आणि पुत्रप्राप्ती झाली. यज्ञापासून प्राप्त झाल्याने कन्येचे नाव याज्ञसेनी असे ठेवण्यात आले. ती कृष्ण वर्णाची असल्याने तिला कृष्णा आणि द्रुपदाची मुलगी म्हणून द्रौपदी असेही म्हणत. तिच्या पूर्वजन्मीच्या वरदानाचे फळ म्हणून अर्जुनाने पणात जिंकल्यावरही तिला पाच पतींशी विवाह करावा लागला.

द्रुपद राजाचा पुत्र धृष्टद्युम्न याचा जन्म द्रोणाचार्यांना मारण्याच्या इच्छेने झाला होता. मात्र द्रोणाचार्यांचा युद्धात पराभव करू शकेल अशी शस्त्रविद्या शिकवण्यासाठी संपूर्ण देशात दूसरा कोणताच गुरु नव्हता. शेवटी द्रुपद द्रोणाचार्यांकडेच आपल्या मुलाला शस्त्रविद्या शिकवण्यासाठी घेऊन आला. शत्रुत्व असूनही याचना करणाऱ्याला परत पाठवायचे नाही या तत्वानुसार द्रोणाचार्यांनी धृष्टद्युम्नला शस्त्रविद्येत पारंगत बनवले. तो मोठा होऊन पांडवांचा सेनापती बनला. अशाप्रकारे कर्तव्यकर्म करणाऱ्या द्रोणाचार्यांचा यज्ञ सात्विक होता. वास्तविक हा मुलगा आपल्याला मारणार आहे हे द्रोणाचार्यांना आधीच माहीत होते. तरीही त्यांनी कर्तव्यात कसूर केली नाही. कथेनुसार द्रोणाचार्यांचा यज्ञ सात्विक होता आणि द्रुपदाचा यज्ञ तामसी होता हे स्पष्ट होते.

17.14

देवद्विजगुरुप्राज्ञ, पूजनं(म्) शौचमार्जवम्|
ब्रह्मचर्यमहिंसा च, शारीरं(न्) तप उच्यते||17.14||

देव, ब्राह्मण, गुरु व ज्ञानी यांची पूजा करणे तसेच पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप म्हटले जाते.

यज्ञानंतर आता भगवान तपाचे वर्णन करतात. तप शारीरिक, मानसिक आणि वाणीचे असते. शारीरिक तप म्हणजे उपास करणे, एका पायावर उभे राहून तपश्चर्या करणे, सतत जप, तप, ध्यान करणे असे मानले जाते. याशिवाय  देवतांचे पूजन सुद्धा करायला हवे. हे केले नाही तर आपल्याला दोष लागतो. अनेक ऋणापैकी आपल्यावर देवऋण देखील असते. आद्य शंकराचार्य म्हणतात प्रत्येकाने विष्णू, शिव, देवी, गणेश आणि सूर्य या पाच देवतांचे पूजन करावे. इष्टदेवाला मध्ये ठेवून बाकी देवांना त्याच्या बाजूला ठेवावे. याशिवाय ब्राह्मणांचे आणि सदगुरूंचे पूजन करावे. महापुरुष हे सर्वकाही करत असतात. आपण मात्र दररोजची पूजा करण्याचाही आळस करतो.

शौच  म्हणजे पवित्रता. बिना आंघोळीने पूजा करणे यात शौच नाही. याला शारीरिक तप म्हणता येणार नाही. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी आंघोळ करून पूजा केल्याशिवाय आहार घेणार नाही असे गृहस्थाने ठरवायला हवे.

आर्जवम् -  मनाची सरलता. आपण जसे असू तसे दाखवणे. नसलेल्या गोष्टींचा दिखावा करू नये. अष्टावक्रगीतेत आर्जव हा सर्वश्रेष्ठ गुण मानला आहे. 

ब्रह्मचर्य - प्रत्येक अवयवात संयम ठेवणे अर्थात इंद्रियसंयम असा याचा अर्थ आहे. बोलताना, चालताना, खाताना आपण संयमित रहावे. किती खावे, कोणाशी बोलताना किती बोलावे, पायी चालताना किती चालावे  हे ठरवावे.

अहिंसा-
या ठिकाणी अहिंसेचा अर्थ माझ्या क्रियेने कोणाला दुखवू नये असा आहे. अध्यात्माच्या दृष्टीने आपल्या वाणीने कोणालाही कष्ट होऊ नये. दुसऱ्याच्या कष्टाची जाणीव म्हणजे अहिंसा. भर उन्हात काम करण्याने कामगारांना त्रास होईल याचा संवेदनापूर्वक विचार करणारे आणि त्यादृष्टीने पावले उचलणारे लोक अहिंसक असतात.  

17.15

अनुद्वेगकरं(म्) वाक्यं(म्), सत्यं(म्) प्रियहितं(ञ्) च यत्|
स्वाध्यायाभ्यसनं(ञ्) चैव, वाङ्मयं(न्) तप उच्यते||17.15||

जे दुसऱ्याला न बोचणारे, प्रिय, हितकारक आणि यथार्थ भाषण असते ते, वेदशास्त्रांचे पठण आणि परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास- हेच वाणीचे तप म्हटले जाते.

अनुद्वेग म्हणजे दुसऱ्याला न बोचणारे, सत्य, प्रिय आणि हितकारक असे चार प्रकारचे वाणीचे तप आहे. माझ्या बोलण्याने कोणाला दुःख व्हायला नको. अप्रिय आणि असत्य बोलू नये. मी खरं बोललो तर पुढच्या व्यक्तीला राग येईल असे जेव्हा वाटेल त्यावेळी मौन राखावे.
सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् , न ब्रूयात् सत्यम् अप्रियम् ।
प्रियं च नानृतम् ब्रूयात् , एष धर्मः सनातन: ॥
सत्य आणि प्रिय बोलावे. अप्रिय असे सत्य बोलू नये. नेहमी सत्य आणि हितकारीच बोलावे. जगात सगळी भांडणे वाणीमुळेच होतात आणि वाणीमुळेच मनुष्य महान बनतो. कोणाशीही पाच मिनिटे बोलल्यानंतर आपल्याला लगेच कळते की तो कसा आहे.
म्हणूनच,
शब्द सम्हारे बोलिए, शब्द के हाथ न पाँव। एक शब्द औषधि करे, एक शब्द करे घाव।।​ - संत कबीर 
शब्द नेहमी जपून वापरावेत कारण चांगले शब्द ऐकणाऱ्यासाठी औषधाचे काम करू शकतात आणि कटू शब्द ऐकणाऱ्याच्या मनावर आघात देखील घालू शकतात. 

17.16

मनः(फ्) प्रसादः(स्) सौम्यत्वं(म्), मौनमात्मविनिग्रहः|
भावसंशुद्धिरित्येतत्, तपो मानसमुच्यते||17.16||

मनाची प्रसन्नता, शांत भाव, भगवत्चिंतन करायचा स्वभाव, मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील भावांची पूर्ण पवित्रता हे मनाचे तप म्हटले जाते.

मन:प्रसाद - प्रसादाचे दोन अर्थ आहेत. प्रसन्नता आणि खाण्याचा प्रसाद. आपण जेवण तयार झाल्यानंतर नैवेद्याचे ताट भगवंतासमोर ठेवतो. भगवंताला प्रणाम करून नैवेद्य दाखवतो आणि मग तो प्रसाद बनतो. बरेच वेळा आपल्याला असे वाटते की या समोरील व्यक्तीमुळे आपण दुःखी आहोत. मात्र कोणतीच अपेक्षा नसेल तर दुसऱ्यांचा व्यवहार आपल्याला कधीच दुःखी करू शकणार नाही. कोणतीही बिकट परिस्थिती आली, कितीही दुःख झाले तरी प्रसन्न राहावे. 
सीताराम सीताराम सीताराम कहिए। जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए।
मन प्रसन्न ठेवणे हे मनाचे तप आहे.
सौम्यत्वम् - वागणे, बोलणे यात सौम्यता असावी. आचरणात कठोरता नसावी. काही लोक उठता बसता आवाज करत असतात. त्यांच्या ठिकाणी सौम्यतेचा अभाव आढळतो.
मौनम् - केवळ वाणीचे मौन नव्हे तर मानसिक पातळीवर मनन. विवेचनाचे चिंतन करणे, त्याच्यावर विचार करणे, त्याचा उपयोग जीवनात करणे याला मौन म्हणतात.
आत्मविनिग्रह -
मन आपल्याला सांगत असते हे कर ते कर. पण संयमाने त्याच्यावर विचार करून ती गोष्ट न करणे याला म्हणतात मनाचा निग्रह.
भावसंशुद्धी - यालाच अंतकरणाची शुद्धता असे म्हणतात. आपण किती वेळ ध्यान केले, किती जप केला, याला महत्त्व नाही. कारण हे सगळे करून जर भांडणाची वृत्ती असेल तर त्याला भाव संशुद्धी म्हणता येणार नाही. एकीकडे पूजापाठ करायचा आणि दुसरीकडे संपत्तीच्या वाटणीसाठी भांडायचे, मला काहीच नको असे वरवर म्हणायचे पण मनातून सगळे पाहिजे असते याला अंतःकरणाची शुद्धता म्हणता येणार नाही. गीता वाचणे, त्याचे मनन करणे हे सर्व उत्तम कर्म आहे मात्र त्याने मन शुद्ध होते की नाही ते तपासून पहावे.

श्रीरामांना मर्यादापुरुषोत्तम का म्हटले जाते याचे उत्तम उदाहरण बालकांडात आहे. त्यांनी सीतेला पहिल्यांदा पाहिले तेव्हा ते लक्ष्मणाला म्हणाले
मोहि अतिसय प्रतीति मन केरी।
जेहिं सपनेहुँ परनारि न हेरी॥

जागेपणीच नाही तर स्वप्नातही कधी माझ्या मनात परस्त्रीचा विचार आला नाही तर आज सीतेविषयी मनात प्रेम का जागृत झाले आहे ! त्यांच्या मनाची शुद्धता एवढी होती.
हे सगळे मनाचे तप आहे.

17.17

श्रद्धया परया तप्तं(न्), तपस्तत्त्रिविधं(न्) नरैः|
अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः(स्), सात्त्विकं(म्) परिचक्षते||17.17||

फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषांकडून अत्यंत श्रद्धेने केलेल्या वर सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या तपाला सात्विक तप म्हणतात.

सात्विक तपाचे वर्णन करताना भगवान म्हणतात, कोणताही योगी पुरुष शारीरिक तप, वाणीचे तप आणि मनाचे तप कोणत्याही फळाची अपेक्षा न करता जेव्हा श्रद्धेने करतो तेव्हा त्याला सात्विक तप असे म्हणतात.

17.18

सत्कारमानपूजार्थं(न्), तपो दम्भेन चैव यत्|
क्रियते तदिह प्रोक्तं(म्), राजसं(ञ्) चलमध्रुवम्||17.18||

जे तप सत्कार, मान व पूजा होण्यासाठी तसेच दूसऱ्या काही स्वार्थासाठीही स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जाते, ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप येथे राजस म्हटले आहे.

एखादे कार्य करताना त्याचा गवगवा व्हावा, लोकांकडून मान मिळावा किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी केले जाणारे तप जे पाखंडीपणाने केले जाते, ते अनिश्चित स्वरूपाचे आणि क्षणभर फळ देणारे  राजस तप असते.

17.19

मूढग्राहेणात्मनो यत्, पीडया क्रियते तपः|
परस्योत्सादनार्थं(म्) वा, तत्तामसमुदाहृतम्||17.19||

जे तप मुर्खतापूर्वक हट्टाने, मन, वाणी आणि शरीराला कष्ट देऊन किंवा दुसऱ्याचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते, ते तप तामस म्हटले गेले आहे.

जे तप मूर्खपणाने, दुसऱ्याला त्रास देण्यासाठी, शरीर, मन आणि वाणी यांना कष्ट देणारे व दुसऱ्यांचे अहित करणारे असते अशा तपाला तामस तप म्हटले जाते. 

17.20

दातव्यमिति यद्दानं(न्), दीयतेऽनुपकारिणे|
देशे काले च पात्रे च, तद्दानं(म्) सात्त्विकं(म्) स्मृतम्||17.20||

दान देणेच कर्तव्य आहे', ह्या भावनेने जे दान देश, काळ आणि पात्र मिळाली असता उपकार न करणाऱ्याला दिले जाते, ते दान सात्विक म्हटले गेले आहे.

आता भगवान आपल्याला दानाबद्दल सांगतात. धर्माचे चार चरण सांगितले आहे. सत्य, दया, तप आणि दान. सत्ययुगात या चारही गोष्टी होत्या. त्रेतायुगात सत्य गेले पण बाकी तीन राहिले. द्वापार युगात पहिल्या दोन गोष्टी गेल्या आणि दोन राहिल्या. कलियुगात केवळ दान शिल्लक राहिले.
प्रगट चारि पद धर्म के कलि महुँ एक प्रधान।
जेन केन बिधि दीन्हें दान करइ कल्यान॥
म्हणून आज दानाचे फार महत्त्व आहे. दान तीन प्रकारचे असते. सात्विक, राजसी आणि तामसी.
दान देणे माझे कर्तव्य आहे त्यामुळे ज्या देशात किंवा ज्या काळात ज्या वस्तूचा तुटवडा आहे, ती वस्तू पुरवून, प्राण्यांची सेवा करण्यास तो देश आणि तो काळ योग्य समजला जातो. भुकेलेले, अनाथ आणि दुःखी रोगी तसेच भिकारी, असमर्थ इत्यादींना अन्न, वस्त्र, औषधे पुरवून त्यांची सेवा करणे तसेच श्रेष्ठ आचरणाचे ब्राह्मण, विद्वान यांना धन देणे योग्य समजले जाते. मात्र हे करताना उपकार केल्याची भावना नसल्यास त्याला सात्विक दान असे म्हणतात.

आपल्याकडे बृहस्पती नीती आणि शुक्र नीती नुसार दान केले जाते. आपल्या शुद्ध मिळकतीचा दहावा हिस्सा (१० %) दान अनोळखी व्यक्तीला द्यावे आणि दहा टक्के आपल्या नात्यातील निर्धनांना द्यावे. केवळ धनाचे दान करावे असे नाही तर चोवीस तासातील सव्वा दोन तास गीतेला समर्पित करावेत. हे सुद्धा दानच आहे. गीतापरिवारात काम करणारे बारा हजार कार्यकर्ते आपल्या योग्यतेचे आणि वेळेचे निःस्वार्थ भावाने दान देत आहेत.

17.21

यत्तु प्रत्युपकारार्थं(म्), फलमुद्दिश्य वा पुनः|
दीयते च परिक्लिष्टं(न्), तद्दानं(म्) राजसं(म्) स्मृतम्||17.21||

परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतूने किंवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते, ते राजस दान म्हटले आहे.

या श्लोकात भगवान राजस दानाबद्दल सांगतात. दान देणे हे माझे कर्तव्य आहे पण माझी इच्छा असेल तर मी देईन किंवा नाही देणार असे लोकांना वाटते. मला भगवंताने जे अधिक दिले आहे ते मी गरजू लोकांना द्यायला हवे. दान देताना त्यात उपकाराची भावना नसावी. मी दान दिले त्याच्या बदल्यात मला काही नको असा भाव असावा. माझा सन्मान नको. माझे नाव नको. पण आज आपण कामवालीला जेव्हा साडी देतो तेव्हा तिने कुठल्याही परिस्थितीत सुट्टी घेऊ नये अशी आपली अपेक्षा असते. केलेल्या कामाची जाहिरात करायला लोकांना आवडते. अशा दानाला राजस दान असे म्हणतात. 

कलकत्त्याला एक अतिशय श्रीमंत व्यापारी होते. त्याकाळी बंगालमध्ये भीषण दुष्काळ पडला. त्यांनी सढळपणे दुष्काळातील लोकांना मदत केली. लोकांनी जेव्हा त्यांचा सन्मान केला तेव्हा ते रडू लागले. ते म्हणाले, मी जेवढे या भूमीतून कमावले तेवढेही परत देऊ शकलो नाही तर कोणत्या कारणासाठी माझा सन्मान केला जातोय?

17.22

अदेशकाले यद्दानम्, अपात्रेभ्यश्च दीयते|
असत्कृतमवज्ञातं(न्), तत्तामसमुदाहृतम्||17.22||

जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी, अयोग्य काळी आणि कुपात्री दिले जाते, ते दान तामस म्हटले गेले आहे.

दान देताना तिरस्कारपूर्वक ते देणे, खाण्याचे पदार्थ अंगावर फेकून देणे हे तामस दान होय. पैसे मिळाल्यावर दारूचे सेवन किंवा मांस भक्षण केले जाईल हे माहित असूनही ते जर दिले तर त्याला अदेशकाले, अपात्रे दान असे म्हणतात. याचे स्पष्टीकरण करताना एक उदाहरण दिले आहे. लखनऊला अनेक ठिकाणी उन्हाळ्यात मंगळवारी भंडारा दिला जात असे. त्यासाठी गरजवंत लोक येत. मात्र आज तेथे शंभर शंभर मीटर अंतरावर भंडारा लावला जातो. लोक त्या ठिकाणी गर्दी करतात. अनेक ठिकाणचे अन्न घेऊन जास्तीचे अन्न टाकून देतात. काही जण अन्नाची साठवण करतात तर काही लोक अन्न खराब झाल्यावर फेकतात. या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. अशा परिस्थितीत तो भंडारा लावणे उपयोगाचे नाही.
उन्हाळ्याच्या दिवसात ठिकठिकाणी पाणपोई लावून थंड पाणी लोकांना पाजणे उपयोगाचे असल्याने त्याला सत्पात्री दान म्हणता येईल. सत्काराशिवाय तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी, अयोग्य काळी जे दान दिले जाते ते तामस होय. 

17.23

ॐ तत्सदिति निर्देशो, ब्रह्मणस्त्रिविधः(स्) स्मृतः|
ब्राह्मणास्तेन वेदाश्च, यज्ञाश्च विहिताः(फ्) पुरा||17.23||

ॐ' , तत्, सत् अशी तीन प्रकारची सच्चिदानंदघन ब्रह्माची नावे सांगितली आहेत. त्यापासून सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण, वेद आणि यज्ञादी रचले गेले आहेत.

ॐ हा ब्रह्माचा संकेत आहे. निराकार आणि साकार दोघांमध्येही हा आहे. अद्वैत वेदाकार हा शब्द वापरतात. सर्व अध्यायांच्या शेवटी आणि धार्मिक प्रवचनकार विवेचनाच्या अखेरीस ॐ तत् सत् हे शब्द वापरतात. शास्त्राचे अभ्यासकही ॐ या अक्षराचा वापर करतात. ॐ म्हणजे संपूर्ण. ही तीन अक्षरे तीन प्रकारच्या सच्चिदानंदघन ब्रह्माची नावे आहेत. यापासूनच सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण, वेद आणि यज्ञ रचले गेले.

17.24

तस्मादोमित्युदाहृत्य, यज्ञदानतपः(ख्) क्रियाः|
प्रवर्तन्ते विधानोक्ताः(स्), सततं(म्) ब्रह्मवादिनाम्||17.24||

म्हणून वेदमंत्रांचा उच्चार करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ, दान व तपरुप क्रियांचा नेहमी 'ॐ' या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करुनच प्रारंभ होत असतो.

 ॐ परिपूर्ण असल्याने आणि वेदमंत्र म्हणणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ दान आणि तप यांचा प्रारंभ ॐ या अक्षरानेच होतो. एवढे याचे महत्त्व आहे.

17.25

तदित्यनभिसन्धाय, फलं(म्) यज्ञतपः(ख्) क्रियाः|
दानक्रियाश्च विविधाः(ख्), क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभि:||17.25||

तत्' या नावाने संबोधिल्या जाणाऱ्या परमात्म्याचेच हे सर्व आहे, या भावनेने फळाची इच्छा न करता नाना प्रकारच्या यज्ञ, तप व दानरुप क्रिया कल्याणाची इच्छा करणाऱ्या पुरुषांकडून केल्या जातात.

परमात्म्यासाठी तत् हे संबोधन वापरले आहे. हे सगळे परमात्म्याचेच आहे. अशी भावना मनात ठेवून फळाची इच्छा न करता ज्यांना आपले कल्याण व्हावे असे वाटते ते लोक यज्ञ, दान आणि तप या क्रिया निःस्वार्थ भावनेने करतात.

17.26

सद्भावे साधुभावे च, सदित्येतत्प्रयुज्यते|
प्रशस्ते कर्मणि तथा, सच्छब्दः(फ्) पार्थ युज्यते||17.26||

सत्' या परमात्म्याच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच हे पार्था! उत्तम कर्मातही 'सत्' शब्द योजला जातो.

सत् हे संबोधन परमात्म्याच्या नावासाठी वापरताना त्याचा प्रयोग सत्यभावात आणि श्रेष्ठ भावात केला जातो. भगवान अर्जुनाला म्हणतात, पार्थ! उत्तम प्रकारच्या चांगल्या कर्मातही सत् हा शब्द वापरला जातो.

17.27

यज्ञे तपसि दाने च, स्थितिः(स्) सदिति चोच्यते|
कर्म चैव तदर्थीयं(म्), सदित्येवाभिधीयते||17.27||

तसेच यज्ञ, तप व दान यांमध्ये जी स्थिती (आस्तिक बुद्धी) असते, तिलाही सत् असे म्हणतात आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने 'सत्' असे म्हटले जाते.

     याशिवाय यज्ञ, दान आणि तप यातील आस्तिक बुद्धी म्हणजे सत्. जे कार्य परमात्म्यासाठी केले जाते त्याला सत् असे म्हंटले जाते. ज्या ठिकाणी हा शब्द वापरला जातो ते कार्य सर्वोत्तम होऊन जाते.

17.28

अश्रद्धया हुतं(न्) दत्तं(न्), तपस्तप्तं(ङ्) कृतं(ञ्) च यत्|
असदित्युच्यते पार्थ, न च तत्प्रेत्य नो इह||17.28||

हे अर्जुना! श्रद्धेशिवाय केलेले हवन, दिलेले दान, केलेले तप आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल, ते सर्व 'असत्' म्हटले जाते. त्यामुळे ते ना इहलोकात फलदायी होत ना परलोकात.

या श्लोकात भगवान अर्जुनाला श्रद्धेचे महत्त्व सांगतात. ते म्हणतात हे अर्जुना! श्रद्धेशिवाय केलेले हवन, दिलेले दान, केलेले तप आणि इतर शुभ कार्य ते सर्व असत् असते. ते या लोकातच नव्हे तर परलोकातही फलदायी होत नाही. म्हणूनच यज्ञ, दान आणि तप श्रद्धापूर्वक करावे. हा संदेश दिल्यानंतर हरी शरणम् या भगवत संकीर्तनानंतर प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली.

प्रश्नोत्तरे :-
१ - रजनीश भैय्या - भूतप्रेतांची पूजा करतात ती तामस पूजा असते. तर आपले पूर्वज ही पूजा का करीत?
उत्तर- भूतप्रेत ही कमजोर योनी आहे. ती वायुतत्वाची आहे. मनुष्यशरीर पंचमहाभूतांनी बनले आहे त्यामुळे शक्तिशाली असते. ज्यांची मानसिकता दुर्बल असते ते लोक भूतप्रेतांची भीती बाळगतात. भैरव देवता किंवा देवीची पूजा रक्ताने केली जाते त्यालाच भूतप्रेताची पूजा असे म्हणतात. भूत प्रेतांची भीती वाटू नये म्हणून ही पूजा केली जात असे.
२- यक्षाची पूजा केली जाते ती कोणत्या प्रकारात मोडते?
 उत्तर- तिला राजसी पूजा म्हणावे.
३ - यज्ञात आपण हवन करतो तेव्हा कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवू नये असे म्हणतात पण जर आपण कोणाच्या चांगल्यासाठी यज्ञ केलेला असेल तर त्यात फळाची अपेक्षा राहिल का?
उत्तर- या यज्ञाला पण राजसी यज्ञ म्हणता येईल. मात्र फळाची अपेक्षा नसेल तर तो सात्विक होईल.

२- रुक्मिणी देवी - गीतेचे पठण करताना अर्थ आणि व्याख्या यासाठी कोणते पुस्तक वापरावे?
उत्तर- गीताप्रेस चे साधक संजीवनी हे पुस्तक वाचावे.

३ - गीता जी - मी यु.के. मध्ये राहते. मला गीता जयंती साजरी करायची आहे. त्यासाठी मी एक ग्रुप तयार केला तेव्हा चोवीस लोक जोडले गेले. त्यांनी मला विविध प्रकारच्या कल्पना (idea) दिल्या. तुम्ही पण माझ्या भागात राहणाऱ्या लोकांची यादी देऊ शकाल का?
उत्तर - https://Geetajayanti.Com  या साइटवर जाऊन तुम्हाला तुमच्या शहरातील स्वयंसेवकांची (Volunteers) यादी मिळेल. ते सर्व प्रकारची मदत करतील.

४ - आरती जी - गीता शिकताना किंवा विवेचन ऐकताना मुली खूप आवाज करतात. त्यामुळे मन एकाग्र होत नाही तर मी काय करावे?
उत्तर- तुम्ही तुमचे काम मन लावून करा. त्यांना त्यांचे काम करू द्या. तिकडे जास्त लक्ष देऊ नका.

प्रश्नोत्तरानंतर समापन प्रार्थना आणि हनुमान चालीसाने या सुंदर विवेचनाची सांगता झाली.
। । श्रीकृष्णार्पणमस्तु । ।