विवेचन सारांश
अविनाशी, अमृत, ब्रह्माश्रयी त्रिगुण

ID: 6465
मराठी
शनिवार, 22 फेब्रुवारी 2025
अध्याय 14: गुणत्रयविभागयोग
2/2 (श्लोक 9-27)
विवेचक: गीता विशारद डॉ आशू गोयल जी


 प्रार्थना, दीप प्रज्वलन व जगद्गुरु, विश्वगुरू श्रीकृष्ण भगवंतांना वंदन करून विवेचन सत्राचा प्रारंभ झाला. भगवंताच्या असीम कृपाशीर्वादामुळेच आपण या भगवद्गीता यज्ञात सहभागी झालो आहोत. मानवी जीवनाचा परमोच्च सदुपयोग करून घेण्यासाठी आपण यामध्ये सहभागी झालो आहोत. कदाचित आपले या जन्मीचे सौभाग्य असेल, पूर्वजन्मीची पुण्याई असेल, आपल्या पूर्वजांनी काही सत्कृत्य केलेलं असेल किंवा एखाद्या संत, महात्मा, साधूपुरुषाची आपल्यावर कृपादृष्टी असेल, एक मात्र निश्चित आहे की यापैकी एखाद्या संचिताचे फल म्हणून भगवद्गीतेच्या या उपक्रमात आपण सामील झालो आहोत. भगवंताच्या कृपाशीर्वादाशिवाय कोणीही गीता शिकण्यास प्रवृत्त होऊ शकत नाही. आपण भाग्यशाली आहोत की या सत्कृत्यासाठी भगवंताकडून आपली निवड केली गेली आहे. कुंभ पर्वाच्या पुण्यसोहळ्यात गीता परिवाराच्या विविध देशातील, विविध प्रांतातील गीता प्रचारक कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदविला. कुंभ महापर्वात भगवद्गीतेचा महाप्रचार करणारे हे भाग्यशाली देवदूतच आहेत. असो.
मागील सप्ताहात आपण चौदाव्या अध्यायातील आठ श्लोकांचे चिंतन केले. या अध्यायाचे नावच आहे ‘गुणत्रयविभागयोग’, म्हणजे तीन गुणांबद्दल चे सविस्तर विवेचन. हे तीन गुण म्हणजेच सत्त्व, रज, तम. ही संपूर्ण प्रकृती या तीन गुणांनीच बनली आहे. जे काही आपण पाहतो, ऐकतो, आकलन करून घेतो, समजून घेऊन उपयोगात आणायचा प्रयत्न करतो ते सर्व ज्ञान या तीन गुणांवरच आधारित आहे. भूतलावर जेवढ्या व्यक्ती आहेत, जे आकाशव्यापी ग्रह, तारे, नक्षत्र आहेत, जी वृक्षवेली, नद्या इत्यादी चराचर जड प्रकृती आहे, ती सर्व काही या त्रिगुणांनीच युक्त आहे. स्वयम् ब्रह्मदेवसुद्धा या त्रिगुणांचीच निर्मिती आहेत. प्रश्न असा येतो की, हे तीन प्राथमिक गुण या सर्वांच्या निर्मितीचे मूळ कसे होऊ शकतात?
एका छोट्या उदाहरणावरून समजून घेऊया _
कधीतरी एखाद्या महत्त्वाच्या बाबीसाठी आपल्याला कलर प्रिंट काढावी लागते. जेव्हा आपण कलर प्रिंट पाहतो तेव्हा लक्षात येतं की त्या एवढ्या अशा छोट्या उपकरणामधून विविध रंगछटा असलेले चित्र प्रिंट होऊन आलेले आहे. आपल्या मनात स्वाभाविकच असा प्रश्न उपस्थित होतो की, या यंत्रामध्ये विविध रंगछटा समाविष्ट केल्या असाव्यात का? प्रत्यक्ष उपकरणाची रचना पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या कलर प्रिंट मध्ये केवळ C, M, Y, K ( श्याम, मॅजेंटा, येलो व ब्लॅक ) असे रंग समाविष्ट केलेले आहेत. केवळ या चार रंगांच्या सहाय्याने सोळा मिलियन रंगछटांची निर्मिती केली जाते. छोट्या आकाराच्या, कमी किमतीच्या प्रिंटर मधून इतक्या विविध रंगछटांची निर्मिती होते. अधिक क्षमतेच्या प्रिंटर मधून याहून जास्त रंगछटा निर्मिल्या जातात. विशेष म्हणजे हे उपकरण मानवनिर्मित आहे. मनुष्यनिर्मित अशा उपकरणामधून करोडो विविध रंगछटांची निर्मिती होऊ शकते तर या प्रचंड सृष्टीचा निर्माता भगवंत या तीन मूळ तत्त्वांच्या सहाय्याने केवढी प्रचंड निर्मिती करू शकेल याची कल्पनाच केलेली बरी.
आज आपण कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, झूम अशा विविध साधनांचा उपयोग करून असंख्य रंगछटा निर्माण करू शकतो. या सर्व आधुनिक साधनांची स्क्रीन केवळ R, G, B (रेड, ग्रीन & ब्ल्यू ) या तीन मूळ रंगांनी बनविलेली आहे. आपण अनुभवतो की या केवळ तीन मूळ रंगांवरून रंगांची निर्मिती केली जाते त्याचप्रमाणे सत्त्व, रज, तम या तीन मूलभूत गुणांवर या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली गेली आहे. यापैकी एखादे तत्त्व सुद्धा पूर्णपणे लोप पावू शकत नाही किंवा एखादे तत्त्व पूर्णतः (शंभर टक्के) व्यापून रहात नाही. या तीनही तत्त्वांचा योग्य मिलाप होत असतो. कोणत्याही पदार्थ, वस्तू, कल्पना, व्यक्ती, परिस्थितींची या तीन गुणांशिवाय निर्माण होऊच शकत नाही. या तीन गुणांच्या मात्रा वेगवेगळ्या असू शकतात परंतु एक मात्र निश्चित आहे की ना कोणी शून्य असतो ना कोणी शंभर टक्के परिपूर्ण असतो. या विवेचनासाठी आणखी एक सोपे उदाहरण पाहूया _.
पाक कौशल्य स्पर्धा ठेवली. हजार महिलांना बटाट्याची भाजी आणि पोळी बनवायला सांगितले. सर्वांना एकाच कंपनीचे गव्हाचे पीठ, एकाच प्रकारचे बटाटे, एकाच कंपनीचे मसाले दिले गेले. पदार्थ बनविल्यानंतर परीक्षण केले असता असे दिसून येते की प्रत्येकीने बनविलेल्या पदार्थाची चव वेगवेगळी होती. वास्तविक पदार्थ एकसारखे म्हटल्यानंतर पदार्थाची चवही एकसारखीच असायला पाहिजे, परंतु वास्तवात असे घडत नाही. विविध महिलांनी बनवलेले पदार्थ पहायलाही वेगवेगळे दिसतात आणि चवीलाही वेगवेगळे लागतात कारण पदार्थ एकच असला तरी बनविण्याची पद्धती वेगळी असल्यामुळे त्या पदार्थाच्या रंग, रूप, चव यामध्ये स्वाभाविकरीत्या बदल होणारच. हीच बाब भगवंताच्या सृष्टी निर्मितीबाबत ही लागू पडते.
या तीन गुणातला कोणताही गुण समाप्त होऊ शकत नाही. उदाहरणार्थ तमोगुण पूर्णपणे काढून टाकायचा ठरवला तरीही तो पूर्णपणे समाप्त होऊ शकत नाही किंवा सत्त्वगुणी असलेली व्यक्ती निरंतर, सातत्याने सत्त्वगुणीच राहते असेही दिसून येत नाही. आपण आपल्या स्वतःचे परीक्षण केले तरीही आपल्याला समजून येते की संपूर्ण दिवसभरात आपल्यात एकच एक गुण दिसून येवू शकत नाही. समजा आपण अतिशय सत्त्वगुणी आहोत तरीही प्रसंगानुसार आपल्यातला रजोगुण वा तमोगुण अचानक वाढलेला दिसतो. रोज नामस्मरण एकाग्रतेने करणाऱ्या आपल्या स्वतःलाच एखादे दिवशी महत्प्रयासानेही आपले मन नामजपात लागत नाहीय असा अनुभव येऊ शकतो. आपण मात्र म्हणत राहतो की का कोणास ठाऊक आज मनच लागत नाही. या मागचे खरे कारण असते की प्रत्येक क्षणाला आपल्या मनातले विचार बदलत राहतात आणि कधीकधी या विचारांना नियंत्रित करणे आपल्याला अशक्य होते. एखादी व्यक्ती एखाद्या क्षणी आपले सर्वस्व समर्पित करायला तयार होते तर एखाद्या क्षणी एखाद्या क्षुल्लक कारणावरून टोकाचा वैरभाव निर्माण होणारी भांडणे होतात. मग हे गुण ओळखायचे तरी कसे? भगवंत म्हणतात _

14.9

सत्त्वं(म्) सुखे सञ्जयति, रजः(ख्) कर्मणि भारत।
ज्ञानमावृत्य तु तमः(फ्), प्रमादे सञ्जयत्युत॥14.9॥

हे अर्जुना! सत्त्वगुण सुखाला, रजोगुण कर्मांना तसेच तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमाद करण्याला ही प्रवृत्त करतो.

हे अर्जुन, सत्त्वगुण सुखासक्त असतो, रजोगुण कर्मासक्त असतो आणि तमोगुण मनुष्याला बेसावध करून अज्ञानात ठेवू पाहतो. म्हणजेच तमोगुण ज्ञानाला झाकोळून प्रमाद करायलाही प्रवृत्त करतो.
भगवंत सांगत आहेत की एखादी व्यक्ती कोणत्या वेळी, कोणत्या गुणांनी युक्त आहे हे कसे ओळखायचे? जेव्हा मनुष्य सुखात असेल, आंतरिक आनंदात असेल, संतुष्ट असेल तेव्हा तो मनुष्य सत्त्वगुणी आहे हे समजून घ्यावे. कोणत्याही बाह्य सुखासीन प्रवृत्तींचा आधार न घेता अंतर्मनाच्या उर्मीने आनंदीत बनलेला मनुष्य संतुष्ट, समाधानी वा तृप्त दिसतो म्हणजेच तो सत्त्वगुणी आहे हे समजून घ्यावे. त्या क्षणी त्याच्यात सत्त्वगुणाचा अधिक प्रभाव झालेला आहे हे ओळखावे.
जी व्यक्ती अतिशय चंचल असते, ज्या व्यक्तीच्या हाताला क्षणभर ही शांतता नसते, सतत कोणता ना कोणता चाळा चालू असतो, ज्या व्यक्तीला एकाच वेळी विविध कर्म प्रवृत्ती आकर्षित करीत असतात अशा व्यक्ती रजोगुणी आहेत हे ओळखावे. अशा व्यक्ती स्थिर व शांत न बसता पाय हलवतील, पदराशी, केसांची चाळा करत रहातील, किंचितशा आवाजानेही कान टवकारतील असे विविध क्षुल्लक स्वरूपाचे चाळे या व्यक्ती सतत करीत राहतात कारण त्यांच्यात रजोगुणाचा अधिक प्रभाव असतो.
तिसरा गुण आहे तमोगुण. भगवंत म्हणतात, हा गुण 'ज्ञानम् आवृत्तम्' म्हणजेच हा तमोगुण ज्ञानालाच झाकून टाकतो. सगळ्या कृतींना निष्क्रिय बनवितो. या गुणामुळे आळशीपणा वाढून निष्क्रियता येते. एखादे काम करायचे, आता त्वरित करायचे असे मनाने ठरवूनसुद्धा शरीर, इंद्रिये साथ देत नाहीत, ते काम नंतर करूयात म्हणून पुढे ढकलले जाते हिंदीमध्ये ‘अभी नही तो कभी नही ' असा छान शब्दप्रयोग आहे जो तमोगुणाचे नेमके वर्णन करू शकतो.
भगवंतांजवळ यावरही उपाय आहे

14.10

रजस्तमश्चाभिभूय, सत्त्वं(म्) भवति भारत।
रजः(स्) सत्त्वं(न्) तमश्चैव, तमः(स्) सत्त्वं(म्) रजस्तथा॥14.10॥

आणि हे अर्जुना! रजोगुण आणि तमोगुण यांना दडपून सत्त्वगुण वाढतो. सत्त्वगुण व तमोगुणाला दडपून रजोगुण वाढतो. तसेच सत्त्वगुण व रजोगुणाला दडपून तमोगुण वाढतो.

 भगवंत म्हणतात, हे अर्जुना, रजोगुण आणि तमोगुण यांना दडपून टाकून सत्त्वगुण प्रबळ होतो. सत्त्वगुण व तमोगुणाना दडपून रजोगुण वाढतो आणि सत्त्वगुण व रजोगुणाला दडपून तमोगुण वाढतो.
 भगवंतांचे असे म्हणणे आहे की एखाद्या कुणाला महत्त्व द्यायचे असेल, एखाद्या गुणाचे प्राबल्य वाढवायचे असेल तर बाकीच्या दोन गुणांना दडपून टाकावे लागते, त्यांचे महत्त्व कमी करावे लागते. आपण एखाद्या गुणाला निष्प्रभ करू शकतो अस्तित्वहीन करू शकत नाही. जसे रजोगुण तमोगुणाला न्यून, निष्प्रभ करून सत्त्वगुण वाढवू शकतो परंतु हे दोन्ही गुण पूर्णपणे काढून टाकू शकत नाही. आपण इतकेच करू शकतो की जो गुण आपल्यामध्ये वाढवायचा असेल त्या प्रकारचे विचार, त्या प्रकारची आपली प्रवृत्ती बनली पाहिजे. त्याप्रकारच्या खास प्रवृत्ती निर्मितीसाठी विशेष वेळ दिले पाहिजे व विशेष लक्ष ही दिले पाहिजे. उदाहरणार्थ दिवसातले चोवीस तास आपल्याकडे असतात त्यापैकी सहा तास झोपेसाठी, एक दोन तास शारीरिक क्रियाकर्मासाठी घालविले तर उरलेल्या सोळा तासात आपण कोणत्या गुणाला किती प्राधान्य देणार आहोत त्यावर आपल्या सत्त्व, रज, तम या गुणांचे भविष्य अवलंबून राहील. जर या उरलेल्या सोळा तासात सतत सद्भावना, सदाचार, सद्विचार, सकृत्य अशा सात्त्विक भावना वाढविणाऱ्या कृती करीत राहिलो तर निश्चितपणे सत्त्वगुण प्रबळ होणार या उलट सत्त्वगुणांच्या कृतींना बगल देऊन वेगळ्या कृतींमध्ये गुंतून राहिलो तर रजोगुण प्रबळ झाला असे समजावे आणि या इतर क्षुल्लक क्रिया ही नंतर करू आता पहिल्यांदा आराम करूया म्हणून कोणतीही कृती न करता जो आरामाने निष्क्रिय झाला, जो आळसाने निष्क्रिय झाला त्याचा तमोगुण प्रबळ झाला. म्हणूनच झोपला तो झोपला, थांबला तो संपला असे निष्क्रिय व्यक्तीबद्दल म्हटले जाते.
 सावधपणे, जागरूकपणे कार्य केले तर सत्त्वगुण वाढतो. जागरूकपणाची विभागणी झाली तर रजोगुणात वाढ झाली आणि जागरूकता लुप्त झाली तर तमोगुणाचे प्राबल्य झाले.
 या तीन गुणांमध्ये रजोगुण विशेष महत्त्वाचा ठरतो कारण रजोगुण म्हणजे क्रियाशीलता. ही क्रियाशीलता जर चांगल्या कर्माकडे, सत्कृत्याकडे झुकली तर परिणामतः ती व्यक्ती सत्त्वगुणी बनते. उदाहरणार्थ सत्संग करेन, नामजप करेन, सहकार्य करेन, सेवाभावी वृत्तीने एखादी कृती करेन अशा भावना बाळगून कृती करणारी व्यक्ती सत्त्वगुणी बनते. या उलट रजोगुणातील क्रियाशीलता मद्यपान करणे, आळसाने निष्क्रिय बनणे, निंदानालस्ती करणे, दुष्कृत्य करण्यास प्रवृत्त होणे यासारख्या वाईट कृत्यांच्या दिशेने झुकली तर ती व्यक्ती तमोगुणी होते 
( सत्त्वगुण > रजो गुण > तमोगुण ) असे थोडक्यात स्वरूप सांगता येईल.

14.11

सर्वद्वारेषु देहेऽस्मिन्, प्रकाश उपजायते।
ज्ञानं(म्) यदा तदा विद्याद्, विवृद्धं(म्) सत्त्वमित्युत॥14.11॥

ज्यावेळी या देहात तसेच अंतःकरणात व इंद्रियांत चैतन्य आणि विवेकशक्ती उत्पन्न होते, त्यावेळी असे समजावे की, सत्त्वगुण वाढला आहे.

ज्यावेळी या देहात तसेच अंतःकरणात चैतन्य व विवेकशक्ती उत्पन्न होते त्यावेळी सत्त्वगुण वाढतो म्हणजेच अंतःकरणातील विवेक शक्ती देहाला पुष्टी देते. इंद्रियांतून देहाला ज्ञान मिळते तेव्हा सत्त्वगुण वाढतो. चेतना म्हणजे चैतन्य. दिवसभर इंद्रियांना, देहाला व मनाला मिळणारी ऊर्जा म्हणजे चैतन्य. विवेकशक्ती म्हणजे कर्तव्यांबाबतच्या प्राधान्यक्रमांची कसोटी. काय करावे? कोणत्या वेळी काय करावे? कशा पद्धतीने करावे? हे ओळखण्याची क्षमता म्हणजे विवेक शक्ती. इंग्रजीमध्ये यासाठी शब्द आहे (clearity of mind). नि:संदेहता म्हणजे विवेकशक्ती. ज्या चांगल्या कार्याचा विचार मनात येतो तत्क्षणी ते कार्य त्वरित करणे म्हणजे विवेकशक्ती.
या श्लोकात भगवंतांनी 'सर्वद्वारेषु देहेस्मिन' असा उल्लेख केलेला आहे. पाचव्या अध्यायात याच संदर्भात भगवंत, ‘नवद्वारे पुरे देही’ असा उल्लेख करतात. इथे पुरुष या संज्ञेचा अर्थ शरीर धारण करणारा जीवात्मा असा होतो. नवद्वारांमध्ये पाच ज्ञानेंद्रिये व चार अंत:करणांचे अंत:करणचतुष्ट्य यांचा समावेश आहे. इंद्रियांद्वारे काय करायचे व काय नाही करायचे, काय पहायचे व काय नाही पाहायचे, काय ऐकायचे व काय नाही ऐकायचे, कोणत्या वस्तूला स्पर्श करावयाचा कोणत्या वस्तूला स्पर्श नाही करायचा या सर्वांसंबंधीची स्पष्टता म्हणजे विवेकशक्ती. सामान्य मनुष्याचे मन संदिग्ध असते. कार्पण्यदोष पहतस् स्वभाव: म्हणजेच अनेक गोष्टींबाबत केवळ ऊहापोह असतो. असते. ही संदिग्धता दूर करून या इंद्रियांमध्ये, अंतःकरणामध्ये, देहामध्ये चेतना व विवेकशक्ती जागृत होतात. यामुळेच सत्त्वगुण वाढतो असे भगवंत म्हणतात.

14.12

लोभः(फ्) प्रवृत्तिरारम्भः(ख्), कर्मणामशमः(स्) स्पृहा।
रजस्येतानि जायन्ते, विवृद्धे भरतर्षभ॥14.12॥

हे अर्जुना! रजोगुण वाढल्यावर लोभ, प्रवृत्ती, स्वार्थाने प्रेरित होऊन फळाच्या इच्छेने कर्मांचा आरंभ, अशांती आणि विषयभोगांची लालसा ही सर्व उत्पन्न होतात.

भगवंत म्हणतात, लोभ प्रवृत्ती बळावली की रजोगुणांची वृद्धी होते आणि रजोगुणांच्या वृद्धीमुळे कर्मारंभी आणि अशांत मनामध्ये विषय भोगांची तीव्र इच्छा म्हणजेच स्पृहा उद्भवते. तात्पर्य रजोगुण वाढल्यानंतर लोभ, प्रवृत्ती, स्वार्थ भाव यांनी प्रेरित होऊन केवळ फळाच्या इच्छेने कर्माचा आरंभ, अशांती आणि विषयोपभोगांची लालसा हे सर्व उत्पन्न होतात. भगवंतांनी इथे प्रथम रजोगुण वाढला की लोभ निर्माण होतो हे सूचित केले आहे. एक चौपाई  - 'जीव ते लाभ लोभ अधिक आए।' अर्थात धनिकांना जेवढा धनाचा लोभ अधिक असतो तेवढा गरिबांना नसतो. कुंभ पर्वाच्या निमित्ताने अर्धा भारत प्रयागराजमध्ये होता. कुंभ पर्वासाठी येणाऱ्यांच्या मानसिक प्रवृत्तींचा कानोसा घेतला तर दिसून येते की केवळ भक्तीभावाने आलेले काही भाविक होते, टुरिझम म्हणजे पर्यटनाच्या आनंदासाठी आलेले काही पर्यटक होते. ज्यांच्याजवळ धन नव्हतं ते केवळ श्रद्धाभावाने आलेले होते. त्यांच्यापैकी कोणीही व्हीआयपी घाट कोठे आहे? गाडी कुठे पर्यंत जाऊ शकते? चांगल्या सुविधा कोठे उपलब्ध होतील? असले कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. आपलं सामानसुमान, आपले माता पिता, लेकरं बाळ घेऊन दहावीस किलोमीटरचे अंतर पायी चालत, ‘जय गंगा मैया' असे श्रद्धाभावाने म्हणत गंगा स्नान करीत होते. आपल्या जवळच्या तुटपुंज्या रकमेमध्ये पंडितजींकरवी अतिशय श्रद्धाभावाने गोदान, तिलक, पितृपिंडदान, अन्नदान हे सर्व विधीही करत होते. श्रद्धाभावाच्या मानसिकतेच्या सात्त्विक गुणाचे हे एक टोक होते. दुसरे ही टोक याच कुंभ पर्वात अनुभवायला मिळाले. लाखो रुपये खर्च करण्याची ऐपत असूनसुद्धा दानधर्माच्या पुण्यकर्मात पंडितजींच्या बरोबर घासाघीस करून कमी खर्चात श्रद्धा विरहित कर्म करून पुण्य कमावण्याच्या रजोगुणवृत्तीचे दर्शन ही इथेच अनुभवले. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की धन वाढले की उदारता कमी होते. सहकार्याच्या बाबतीतही आपलं धोरण आज पूर्णपणे बदललेले आहे. गरजू व्यक्तीला सहकार्य करायचे हा सात्त्विक विचार मागे पडून त्या ऐवजी भविष्यात आपल्याला कोण उपयोगी पडू शकेल त्या व्यक्तीला सहकार्य करण्याचे धोरण आज अवलंबले जात आहे. कुंभ पर्वा बद्दल एका व्यक्तीचे उद्गार अतिशय समर्पक आहेत. ती व्यक्ती म्हणते, कुंभ पर्वात जेवढ्या व्हीआयपी व्यवस्थेचा विचार डोक्यात घेऊन जी व्यक्ती येते, तेवढी नाराज होऊन ती व्यक्ती तेथून परत जाते.
रजोगुणामुळे असंतोष वाढतो. पुष्कळ अंशाने कितीही धन मिळाले तरीही थोड्या अंशाने न मिळालेल्या धना बद्दल एखादी व्यक्ती नाराज असते. असंतुष्ट असते. धनाचा लोभ, पदाचा लोभ या लोभाच्या हव्यासापायी मिळालेल्या बाबींची संतुष्टता, समाधान जाऊन आणखी जादाच्या लोभाची असंतुष्टता निर्माण होते. येनकेन प्रकारे अप्राप्य गोष्टी प्राप्त करण्याची प्रवृत्ती बळावते. घरात गाडी आली परंतु भावाची गाडी त्याहीपेक्षा मोठी आहे हे पाहिल्यानंतर आपण घेतलेल्या गाडीचा आनंद मावळून गेला. कामना वाईट नाहीत परंतु त्या पूर्ण करण्यासाठी वापरले जाणारे वाम मार्ग वाईट आहेत. न्याय युक्त मार्गाने मिळवलेले धन, यश हे गृहस्थांसाठी हानिकारक नाहीत परंतु लोभाच्या आकर्षणातून प्राप्त झालेले धन, प्राप्त करून घेतलेले यश हे निश्चितच हानिकारक आहे. जो सत्त्वगुणी असतो त्याचे नेत्र पटल स्थिर असतात. या उलट जो रजोगुणी असतो त्याचे नेत्र चंचल असतात. जशी दृष्टी तशी सृष्टी म्हणून दृष्टी बदला, दृष्टिकोन आपोआप बदलतो. स्पृहा या शब्दाचा अर्थ आहे अत्याधिक विषय वासना. उदाहरणार्थ एक लाडू खाल्ला, वासना बळावली परंतु पाच दहा वर्षानंतरही त्या मागे खाल्लेल्या लाडूची चव आठवणे म्हणजे स्पृहा. स्पृहा रजोगुणाला पुष्टी देते.

14.13

अप्रकाशोऽप्रवृत्तिश्च, प्रमादो मोह एव च।
तमस्येतानि जायन्ते, विवृद्धे कुरुनन्दन॥14.13॥

हे अर्जुना! तमोगुण वाढल्यावर अंतःकरण व इंद्रिये यांत अंधार, कर्तव्यकर्मांत प्रवृत्ती नसणे, व्यर्थ हालचाली आणि झोप इत्यादी अंतःकरणाला मोहित करणार्‍या वृत्ती, ही सर्व उत्पन्न होतात.

भगवंत इथे तमोगुणाविषयी सांगत आहेत. सत्त्वगुणाच्या बरोबर उलटी प्रवृत्ती म्हणजे तमोगुण. सत्त्वगुणात प्रकाश आहे तमोगुणात अप्रकाश, सत्त्वगुणात प्रवृत्ती आहे तमोगुणात अप्रवृत्ती आहे. सगळंच उलट सुलट. तमोगुणाची वृद्धी झाली की अविवेकी वृत्ती बळावते. तमोगुणामुळेच कर्तव्य कर्मात कसूर, अभाव आणि आलस्य या प्रवृत्ती वाढीस लागतात. एखाद्याने एखाद्या व्यक्तीला त्याच्या भल्यासाठी एखादी गोष्ट सांगितली तरीही तमोगुणी वृत्तीचे हे महाशय भांडायलाच उठतात. अप्रवृत्तीमुळे प्रमाद वाढतो. करायचे महत्त्वाचे काम सोडून फालतू काम करीत राहतो. परिणामतः पंचतंत्रातल्या कथेप्रमाणे वानराचे काळीज पाहिजे या असल्या फालतू लोभापायी रोज मिळणाऱ्या मधुर जांभळांचा आनंद तो मगर गमावून बसतो. अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींनाही सात्त्विक आनंदाला मुकावे लागते.

14.14

यदा सत्त्वे प्रवृद्धे तु, प्रलयं(म्) याति देहभृत्।
तदोत्तमविदां(म्) लोकान्, अमलान्प्रतिपद्यते॥14.14॥

जेव्हा हा मनुष्य सत्त्वगुण वाढलेला असताना मरण पावतो, तेव्हा तो उत्तम कर्मे करणाऱ्यांच्या निर्मळ दिव्य स्वर्गादी लोकांत जातो.

या श्लोकातून भगवंत ज्या व्यक्तीची जशी प्रवृत्ती असते तशी त्याची अंतिम गती असते ही बाब स्पष्ट करीत आहेत. एखाद्या व्यक्तीची वृत्ती सत्त्वगुणप्रधान आहे तेव्हा त्याची अंतिम गती निश्चितपणे स्वर्ग सुखाची असेल. जशी दक्षिणेकडे झुकलेली भिंत दक्षिण दिशेलाच कोसळून पडणार विरुद्ध दिशेला उत्तरेला पडणार नाही तशी रजोगुणी व तमोगुणी वृत्तीच्या व्यक्तींची अंतिम गती ही दुःखदायक वा पीडादायक असते. सत्त्वगुणी व्यक्तींच्या वृत्तीबाबत भगवंत म्हणतात, जेव्हा सत्त्वगुणांची अतिवृद्धी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या उत्तम कर्मामुळे त्याला उत्तम गतीच मिळते. अर्थात तो उत्तम कर्मे करणाऱ्यांच्या निर्मळ, दिव्य स्वर्गादी लोकात वास करतो.

14.15

रजसि प्रलयं(ङ्) गत्वा, कर्मसङ्गिषु जायते।
तथा प्रलीनस्तमसि, मूढयोनिषु जायते॥14.15॥

रजोगुण वाढलेला असता मरण पावल्यास कर्मांची आसक्ती असणार्‍या मनुष्यांत जन्मतो. तसेच तमोगुण वाढला असता मेलेला माणूस किडा, पशू इत्यादी मूढ (विवेकशून्य) जातींत जन्मतो.

रजोवृत्ती वाढलेल्या मनुष्याबाबत भगवंत म्हणतात, त्याच्या रजोवृत्तीच्या वाढीमुळे मृत्यूनंतर कर्म सक्तीने, कर्माची आसक्ती असणाऱ्या मनुष्य योनीतच तो पुन्हा जन्म घेतो. त्याचप्रमाणे तमोगुण वाढलेली व्यक्ती मृत्यूनंतर मूढ योनीत म्हणजे किडा, कीटक, पशुपक्षी इत्यादी मूढ (विवेक शून्य) योनीत जन्माला येतो. थोडक्यात सत्त्वगुणी व्यक्ती स्वर्गात जातो, रजोगुणी व्यक्ती मृत्यू लोकात जातो व तमोगुणी व्यक्ती मूढ योनीत जातो.

14.16

कर्मणः(स्) सुकृतस्याहुः(स्), सात्त्विकं(न्) निर्मलं(म्) फलम्।
रजसस्तु फलं(न्) दुःखम्, अज्ञानं(न्) तमसः(फ्) फलम्॥14.16॥

श्रेष्ठ (सात्विक) कर्माचे सात्विक अर्थात सुख, ज्ञान आणि वैराग्य इत्यादी निर्मळ फळ सांगितले आहे. राजस कर्माचे फळ दुःख तसेच तामस कर्माचे फळ अज्ञान सांगितले आहे.

पुन्हा एकदा भगवंत वरील बाबीचेच पुनरुच्चारण करतात. ते म्हणतात, पुण्य कर्म केल्यामुळे म्हणजेच श्रेष्ठ सात्त्विक कर्माचे फळही तसेच सात्त्विक व निर्मळ असते. सुख, ज्ञान, वैराग्य सात्त्विक निर्मळ फळ असे म्हणतात. राजस तथा रजोगुणांचे फळ दुःख हे असते. तसेच तामसकर्माचे, तमोगुणाचे फळ अज्ञान हे असते.
इथे भगवंतांना सुचित करायचं आहे की सत्त्वगुण वाढला तर ज्ञान येईल, सुख प्राप्त होईल, वैराग्य भाव येतील. रजोगुण वाढला तर दुःख भोगावे लागतील आणि तमोगुणाच्या वाढीने केवळ अज्ञान प्राप्त होईल. जेवढी आपली वृत्ती असमाधानी असेल तेवढे आपण अधिक दुःखी असतो. दुःखावेगाने रजोगुण वाढत राहतो. विरुद्ध टोकाच्या वृत्तीने तमोगुणाची वृद्धी झालेली दिसून येते. जी व्यक्ती मानसिकदृष्ट्या समाधानी असते, मग भले ती व्यक्ती श्रीमंत नसेल, त्या व्यक्तीला मोठं घर नसेल, गाडी बंगल्याचा सोस नसेल. मुलं सुनांकडून त्यांचा सांभाळ व्हावा अशी इच्छा नसेल, कोणत्याही मान मरातबाची अपेक्षा नसेल तर अशा व्यक्ती केवळ आपले कर्तव्य कर्म करीत राहतात आणि नेहमी प्रसन्नमुख, आनंदी असतात.

14.17

सत्त्वात्सञ्जायते ज्ञानं(म्), रजसो लोभ एव च।
प्रमादमोहौ तमसो, भवतोऽज्ञानमेव च॥14.17॥

सत्त्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते. रजोगुणापासून निःसंशय लोभ आणि तमोगुणापासून प्रमाद आणि मोह उत्पन्न होतात आणि अज्ञानही होते.

पुन्हा एकदा त्याच अर्थाच्या श्लोकाची पुनरावृत्ती झालेली आहे. भगवंत म्हणतात, सत्त्वगुणांपासून ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून लोभ उत्पन्न होणार यात काय संशय? तमोगुणामुळे मोह आणि प्रमाद निर्माण होणार. या मोह आणि प्रमादामुळे अज्ञानाची उत्पत्ती होणार.

14.18

ऊर्ध्वं(ङ्) गच्छन्ति सत्त्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसाः।
जघन्यगुणवृत्तिस्था, अधो गच्छन्ति तामसाः॥14.18॥

सत्त्वगुणात असलेले पुरुष स्वर्गादी उच्च लोकांना जातात. रजोगुणात असलेले पुरुष मध्यलोकात म्हणजे मनुष्यलोकातच राहतात आणि तमोगुणाचे कार्य असलेल्या निद्रा, प्रमाद आणि आळस इत्यादीत रत असलेले तामसी पुरुष अधोगतीला अर्थात् कीटक, पशू इत्यादी नीच जातींत तसेच नरकात जातात.

सत्त्वगुणात स्थित असलेले पुरुष स्वर्गादी उच्च लोकात स्थान मिळवितात. रजोगुणात असलेले राजसी पुरुष मध्यम लोकात म्हणजे मृत्यू लोकात राहतात आणि तमोगुणाचे कार्य असलेल्या निद्रा, प्रमाद आणि आळस इत्यादीत रत असलेले तामसी पुरुष अधोगतीला जातात अर्थात कीटक, पशु इत्यादी नीच जातीत म्हणजे नरकात जातात म्हणजेचं निकृष्ट योनीत जन्म घेतात.

14.19

नान्यं(ङ्) गुणेभ्यः(ख्) कर्तारं(म्), यदा द्रष्टानुपश्यति।
गुणेभ्यश्च परं(म्) वेत्ति, मद्भावं(म्) सोऽधिगच्छति॥14.19॥

ज्यावेळी द्रष्टा तिन्ही गुणांशिवाय दुसरा कोणीही कर्ता नाही, असे पाहतो आणि तिन्ही गुणांच्या अत्यंत पलीकडे असणार्‍या सच्चिदानंदघनस्वरुप मला परमात्म्याला तत्त्वतः जाणतो, त्यावेळी तो माझ्या स्वरुपाला प्राप्त होतो.

भगवंत म्हणतात, ज्यावेळी द्रष्टा तिन्ही गुणांशिवाय दुसरा कोणीही कर्ता नाही असे पहातो आणि तिन्ही गुणांच्या अत्यंत पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंदघन परमात्मा स्वरूपाला अर्थात मला परमात्म्याला जाणतो तोच मला म्हणजे माझ्या स्वरूपाला प्राप्त करून घेतो.
या पुढील श्लोकातून भगवंतांनी एक वेगळीच बाजू मांडली आहे. तिन्ही गुणांवर आधारित परंतु त्यांच्यापेक्षाही एक वेगळीच बाजू इथे दिसून येते.

14.20

गुणानेतानतीत्य त्रीन्, देही देहसमुद्भवान्।
जन्ममृत्युजरादुःखै:(र्), विमुक्तोऽमृतमश्नुते॥14.20॥

हा पुरुष शरीराच्या उत्पत्तीला कारण असलेल्या या तिन्ही गुणांना उल्लंघून जन्म, मृत्यू, वार्धक्य आणि सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्त होऊन परमानंदाला प्राप्त होतो.

भगवंत म्हणतात, एतां त्रिगुणां अतित्य. या ओळींमधला 'एतान् त्रिगुणान्' म्हणजे या तिन्ही गुणांना एवढा अर्थ पटकन समजतो. पुढला शब्द आहे अतित्य. हीच ती वेगळी बाब भगवंतांनी सांगितलेली आहे. अतित्य म्हणजे पार करून, उल्लंघन करून. आता इथे आणखी एक शंका उपस्थित होते हे उल्लंघन कसं शक्य आहे? भगवंत म्हणतात, जो पुरुष देह उत्पत्तीस कारण असलेल्या या तिन्ही गुणांचे उल्लंघन करतो तो पुरुष जन्म, मृत्यू, वार्धक्य या आणि अशा प्रकारच्या सर्व दुःखातून मुक्त होऊन परमानंदाला प्राप्त होतो.
भगवंतांच्या या सांगण्यावरून अर्जुनाच्या मनात एक प्रश्न येतो. तो विचारतो _

14.21

अर्जुन उवाच
कैर्लिंगैस्त्रीन्गुणानेतान्, अतीतो भवति प्रभो।
किमाचारः(ख्) कथं(ञ्) चैतांस्, त्रीन्गुणानतिवर्तते॥14.21॥

अर्जुन म्हणाला, या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणकोणत्या लक्षणांनी युक्त असतो? आणि त्याचे आचरण कशाप्रकारचे असते? तसेच हे प्रभो! मनुष्य कोणत्या उपायाने या तीन गुणांच्या पलीकडे जातो?

या तिन्ही गुणांना उल्लंघून पलीकडे गेलेला पुरुष कोणकोणत्या लक्षणांनी युक्त असतो? त्याचे आचरण कशा प्रकारचे असते? तसेच तो कोणत्या उपायाने या तीन गुणांचे उल्लंघन करून पलीकडे जातो?
हे प्रभू कृपया करून मला यासंबंधी सांगावे. अर्जुनाला याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. अशा पुरुषाबद्दल त्याला आश्चर्य वाटते म्हणून अत्यंत आश्चर्याने व उत्सुकतेने तो भगवंतांना विचारत आहे.
अर्जुनाच्या या प्रश्नावर भगवंत अत्यंत प्रसन्न झाले. समजून घेण्याचा अधिकारी असलेल्या अर्जुनाला त्यांनी अशा पुरुषाबद्दल सांगितले.

14.22

श्रीभगवानुवाच
प्रकाशं(ञ्) च प्रवृत्तिं(ञ्) च, मोहमेव च पाण्डव।
न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि, न निवृत्तानि काङ्क्षति॥14.22॥

श्रीभगवान म्हणाले, हे अर्जुना! जो पुरुष सत्त्वगुणाचे कार्यरुप प्रकाश, रजोगुणाचे कार्यरुप प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्यरुप मोह ही प्राप्त झाली असता त्यांचा विषाद मानत नाही आणि प्राप्त झाली नाही तरी त्यांची इच्छा करीत नाही,

भगवंत म्हणतात, हे अर्जुना, जो पुरुष सत्त्वगुणाचे कार्यरूप प्रकाश, रजोगुणाचे कार्यरूप प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्यरूप मोह या तीनही स्वरूपांची प्राप्ती झाली असता विषाद मानत नाही आणि जर या स्वरूपांची प्राप्ती नाही झाली तरी त्यांच्या प्राप्तीची ही इच्छा करीत नाही असा व्यक्ती गुणातीत असतो हे पंचवीसाव्या श्लोकाच्या शेवटी भगवंतांनी सांगितले आहे.
श्लोक क्रमांक २२ ते २५ यामध्ये भगवंतांनी गुणातीत पुरुषाच्या वेगवेगळ्या गुणांच्या व्याख्या दिलेल्या आहेत सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांच्या प्राप्तीने अशा व्यक्तीला द्वेष होत नाही. यातून मुक्त झालो असा आनंदही तो व्यक्त करत नाही किंवा या गुणांच्या प्राप्तीचा हव्यासही त्या व्यक्तीला कधी नसतो. अशा प्रकारचे निर्विकारभाव असलेली ती व्यक्ती असते. निर्विकार व्यक्तीला सुखकारक गोष्टीचा अत्यानंद होत नाही किंवा त्याच्याच सोबत घडलेल्या एखाद्या दुःखद प्रसंगाचा त्याला खेदही होत नाही.
अशा निर्विकार प्रकारच्या व्यक्तीच्या आणखी काही गुणांबद्दल भगवंत सांगत आहेत.

14.23

उदासीनवदासीनो, गुणैर्यो न विचाल्यते।
गुणा वर्तन्त इत्येव, योऽवतिष्ठति नेङ्गते॥14.23॥

जो साक्षीरुप राहून गुणांकडून विचलित केला जाऊ शकत नाही आणि गुणच गुणांत वावरत आहेत, असे समजून जो सच्चिदानंदघन परमात्म्यांत एकरुप होऊन राहतो व त्या स्थितीपासून कधी ढळत नाही,

इथे उदासीन म्हणजे दुःखी, उदास असलेला असा अर्थ घ्यावयाचा नाही तर उदासीन म्हणजे उत् + आसिन म्हणजे वर उठलेला. सामान्य मानसिक स्तरावरून निर्विकारतेच्या उच्चस्तरावर पोहोचलेला. मान अपमानाने त्या व्यक्तीमध्ये काही फरक पडत नाही. महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत तुकाराम महाराज यांच्या संबंधित एक प्रसंग _
एकदा तुकाराम महाराजांनी दोन्ही मुठीत माती घेतली. एक मुठ एका बाजूला आणि दुसरी मुठ दुसऱ्या बाजूला फेकून दिली. शिष्यांनी त्यांना अशा कृतीचे कारण विचारले. तुकाराम महाराज म्हणाले, एक मूठ होती ज्यांनी माझा गौरव केला, हार गुच्छ देऊन सत्कार केला, माझे कौतुक केले, सन्मान केला या त्यांच्या कृत्याचा अहंकार व अभिमान मला वाटू नये, हे सत्कार वगैरे मृत्तिकेप्रमाणे तुच्छ समजण्यासाठी मी फेकून दिली. दुसरी मूठ त्या लोकांसाठी होती जे माझा द्वेष करतात. ज्यांना माझा सन्मान, गौरव आवडत नाहीत. जे सतत माझी निंदानालस्ती, टवाळी, आलोचना, टीकाटिप्पणी करीत असतात ते माझ्यासाठी या मृत्तिकेप्रमाणे क्षुल्लक, क्षूद्र आहेत, नगण्य आहेत हे त्यांना कळावे म्हणून दुसऱ्या मुठीतली माती फेकली. ना मला अपमान करणाऱ्यांचा द्वेष आहे ना सन्मान करणाऱ्यांबद्दल अत्यंत जिव्हाळा. दोन्ही बाबतीत समवृत्ती असलेला मी उदासीन आहे.
अर्थात जो साक्षी रूप राहून, गुणांकडून विचलित केला जाऊ शकत नाही, जो अचल स्थिर असतो आणि गुणच गुणात वावरत आहेत असे समजून जो सच्चिदानंदघन परमात्म्यात एकरूप होऊन राहतो, निश्चल, स्थिर राहतो असा तो गुणातीत. उदासीन.
डोळ्यांनी भाकरी पाहिली, हातांनी उचलून घेतली, मुखाने खाल्ली गेली, पोटाने पचविली या सर्वात मी कुठे काय केले? हा प्रश्न आहे. भगवंताने शरीर दिले आहे, वृत्ती दिली आहे. अवयव आपापले काम करतात मग यात मी कुठे येतो? हे प्रश्न ज्याला पडतात तो आपल्या शरीराचे व्यवहारही त्रयस्थपणे पाहत राहतो. आपल्याकडे राम नाम घेण्याची पद्धत आहे. ज्या व्यक्ती हे राम नाम घेतात त्या व्यक्ती स्वतःबद्दल बोलताना सुद्धा त्रयस्थपणे बोलत असतात. त्या व्यक्ती म्हणत असतात, माझा राम जाईल, रामाला भूक लागली आहे, राम जेवेल. वास्तविक या सर्व वाक्यातील जाण्याची, जेवण्याची वगैरे कृती ती व्यक्ती स्वतःच करत असते परंतु स्वतःला राम संबोधून करत असते. या व्यक्ती सामान्य माणसांप्रमाणे स्वतःला संबोधत नाहीत त्यांचे बोल हे गुणातीताचे बोल असतात. पराकोटीच्या उच्च स्तराचे असतात.

14.24

समदुःखसुखः(स्) स्वस्थः(स्), समलोष्टाश्मकाञ्चनः।
तुल्यप्रियाप्रियो धीर:(स्), तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः॥14.24॥

जो पुरुष निरंतर आत्मभावात राहून सुख-दुःख समान मानतो, माती, दगड आणि सोने यांना सारखेच मानतो, ज्याला आवडती व नावडती गोष्ट सारखीच वाटते, जो ज्ञानी आहे आणि स्वतःची निंदा व स्तुती ज्याला समान वाटतात,

जो पुरुष निरंतर आत्मभावात राहून सुखदुःखाला समान मानतो, माती, दगड व सोने यांना एकसमान मानतो, त्याच्यासाठी आवडती व नावडती दोन्ही गोष्टी सारख्याच असतात. स्वतःची स्तुती किंवा निंदा या व्यक्ती धीर वृत्तीने समान मानून घेतात. अत्यंत प्रिय आणि अप्रिय गोष्टीही तेवढ्याच धीर वृत्तीने स्वीकारतात. अशा व्यक्ती ज्ञानी असतात.
भगवद्गीतेमधला एक सुंदर शब्द या श्लोकात आहे, 'समलोष्टाश्मकाञ्चनः’
व्यवहारात आपण म्हणतो की सर्वांना समान न्याय हवा. आपल्या सर्व धर्मग्रंथातूनही समभाव सांगितलेला आहे. कुत्र्यांमध्ये ही विश्वरूप पहा, भगवंताचा अंश पहा असे सांगितलेले आहे. एक उदाहरण घेऊया - कुत्रा भुकेला आहे, वडील भुकेले आहेत, आई भुकेली आहे सर्वांची भूक सारखीच म्हणजे सम दर्शन. परंतु आपले प्रत्येकाबरोबरचे वर्तन, व्यवहार निरनिराळे आहेत. कुत्र्याला आपण आपल्या सोबत डायनिंग टेबलवर जेवायला घालत नाही. घराबाहेर त्याला जेवायला देतो. डायनिंग टेबलवरसुद्धा वडिलांचे जेवण निराळे, आईसाठीचे निराळे, गुरुजींसाठींचे निराळे, मुलांसाठीचे निराळे असे वर्तन व व्यवहार आपण ठेवतो. आपली नेमकी चूक होते कुठे तर आपण समवर्तन आणि समदर्शन यामध्ये गल्लत करतो. ज्याप्रमाणे आपण आपल्या मातापित्यांशी वर्तन करतो तसेच वर्तन आपण इतर मातापित्यांशी करतो का? जर आपले वर्तन सर्वांशी समान असेल तर त्याला समवर्तन असे म्हटले जाईल. पण व्यवहारात अशा वागण्याला फारसे महत्व दिले जात नाही.
सम दर्शन म्हणजे समानता. महात्मा गांधीजींच्या जीवनातील एक प्रसंग :-
स्नानासाठी त्याकाळी साबणाऐवजी एखादा गुळगुळीत दगड वापरला जायचा. एकदा प्रवास करताना गांधीजींच्या स्नानातला तो दगड नजरचुकीने प्रवासातल्या सामानात बांधून घ्यायचा विसरला. दुसऱ्या दिवशी स्नान करताना त्या दगडाची आठवण झाली. मीरा बेनने गांधीजींना त्याबद्दल सांगितले. दुसरा एखादा तशाच प्रकारचा दगड त्या गावातून घेऊन येण्याची तयारी दाखवली. अशा प्रकारचा दगड कुठेही उपलब्ध होऊ शकला असता परंतु मूल्यहीन असलेल्या अशा क्षुल्लक वस्तूंसाठीही गांधीजींसारखे संत महात्मे विशिष्ट मूल्य ठरवितात. त्यांच्या लेखी प्रकृतीतील कोणतीही कमी महत्त्वाची वस्तूसुद्धा अतिशय मौल्यवान ठरते. अगदी साध्या दगडाऐवजी तो दगड सोन्याचा असता तरीही त्यांच्या दृष्टिकोनात कोणताही फरक पडला नसता कारण त्यांच्या दृष्टीने दोन्ही गोष्टींचे मूल्य तेच होते. अखेर ज्या गावात तो दगड विसरलेला होता तिथे जाऊन तो आणावा लागला. तात्पर्य थोर विभूतींसाठी सोने, माती आणि दगड यांचे मूल्य एकच असते. जरी तिन्हींच्या किमतीत फरक असला तरीही त्यांची दृष्टी समान असते. आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींचे समदर्शन त्या वस्तूच्या किमतीवर, मूल्यावर अवलंबून असते. या उलट संत महात्मे त्या वस्तूच्या उपयुक्ततेवरून त्यांचे मूल्य ठरवतात म्हणून त्यांचा दृष्टिकोन हा समदर्शनी आहे असे आपण म्हणू शकतो.

14.25

मानापमानयोस्तुल्य:(स्), तुल्यो मित्रारिपक्षयोः।
सर्वारम्भपरित्यागी, गुणातीतः(स्) स उच्यते॥14.25॥

जो मान व अपमान सारखेच मानतो, ज्याची मित्र व शत्रू या दोघांविषयी समान वृत्ती असते, तसेच सर्व कार्यांत ज्याला 'मी करणारा' हा अभिमान नसतो, त्याला गुणातीत म्हणतात.

जो माणूस मान अपमान सारखेच समजतो, ज्याची वृत्ती मित्र आणि शत्रू दोघांविषयी समान असते, तसेच सर्व कार्यात मी करणारा असा कर्तेपणाचा अभिमान नसतो त्याला गुणातीत म्हटलं जातं. अर्जुनाला आणखी विषद करून समजवण्यासाठी भगवंत पुढे म्हणतात.

14.26

मां(ञ्) च योऽव्यभिचारेण, भक्तियोगेन सेवते।
स गुणान्समतीत्यैतान्, ब्रह्मभूयाय कल्पते॥14.26॥

आणि जो पुरुष अव्यभिचारी भक्तियोगाने मला निरंतर भजतो, तोसुद्धा या तिन्ही गुणांना पूर्णपणे उल्लंघून सच्चिदानंदघन ब्रह्माला प्राप्त होण्यास योग्य ठरतो.

हे अर्जुन, जो पुरुष अव्यभिचारी भक्ती योगाने मला निरंतर भजतो तो सुद्धा या तिन्ही गुणांना पूर्णपणे उल्लंघून, सच्चिदानंद घन ब्रह्माला प्राप्त होण्यास समर्थ होतो.

 सत्त्व, रज, तम या गुणांचा अवलंब आपल्या जीवनात कसा करू शकतो. गुणत्रय 


 सत्त्व, रज, तम.
 
 व्यक्ती: तदनुसार लक्षणम्॥
 लक्षणं तदनुसार व्यक्ती:॥
 या सर्व गोष्टी आपण स्वतःच, स्वतःबद्दलच तपासून पहावयाच्या आहेत. आपले आपणच परीक्षण करायचे आहे की आपण सत्त्वगुणी असेल तर कसे असू, रजोगुणात कसे आणि तमोगुणात कसे असू.
 अकरा लक्षणांवरून आपण कोण आहोत हे समजून येते.

१. व्यवहार : सत्त्वगुणात संतुष्ट, रजोगुणात असंतुष्ट, तमोगुणात संतोष आणि असंतुष्ट दोन्ही प्रकारचा.

 सत्त्वगुणी व्यक्तीचा व्यवहार तक्रार न करणारा संतुष्टो येन केन चित (As, It, is) कलकत्त्याचे शेठजी देवलालजी गोविंद नामक एक व्यापारी होते. एकदा त्यांनी राजस्थानातून दहा ट्रक बाजरी मागविली. इतर व्यापाऱ्यांना ही बातमी कळताच सर्वांचे धाबे दणाणले. धान्याचे भाव गडगडले. त्यांच्या खरेदीइतका भावही त्यांना मिळू शकत नव्हता. सर्वजण शेठजींच्या कडे आले. शेठजींना त्यांच्या येण्याचे प्रयोजन कळल्यावर त्यांना वाईट वाटले. त्यांनी ताबडतोब ट्रक परत फिरविले. आपल्या सहव्यापाऱ्यांचे नुकसान आपल्या धोरणामुळे होणार ही कल्पनाही त्यांना सहन होऊ शकली नाही. अशा प्रकारची वृत्ती ही सत्त्वगुणी वृत्ती, संतोषी वृत्ती होय 
 संत प्रेमानंद जी महाराज यांचेही अशाच प्रकारचे एक उदाहरण आहे. ते रात्री दोन वाजता आपली यात्रा प्रारंभ करीत. भजन कीर्तन करीत. स्थानिकांनी आपली झोप मोड होते अशी तक्रार केली. स्वामी महाराजांनी आपली यात्राच बंद केली. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार असेल तर अशा प्रकारची यात्राच नको अशी सत्त्वगुणाची वृत्ती त्यांनी ठेवली. या दोन्ही प्रसंगात आपल्यासारख्या सामान्य माणसांची वृत्ती कशी असेल विचार करूया. आपली भगवद्गीता ही सुद्धा कोणाच्या रोषाचे, दुःखाचे कारण बनू देऊ नका. आपण जीवनात संतोषाची आशा करतो परंतु स्वतः मात्र कोणाच्या संतोषाचे कारण बनायचा विचार ही करीत नाही. इतरांकडून केवळ अपेक्षा करत राहतो 
 रजोगुणी व्यक्तीचा व्यवहार हा असंतुष्ट असतो. प्रत्येक बाबतीत काथ्याकुट, प्रत्येक बाबतीत निरर्थक चर्चा. अशा व्यक्तींशी व्यवहार करायला इतर तयार होत नाहीत. असंतुष्ट व्यक्तींचा व्यवहार हा इतरांसाठी त्रासदायक असतो कारण यांना इतरांची प्रगती पहावत नाही. स्वतः अशा व्यक्ती निष्क्रिय असतात परंतु दुसऱ्याच्या प्रगतीने मात्र असंतुष्ट बनतात.

२. वाणी : सत्त्वगुणी व्यक्तीची वाणी प्रिय असते. रजोगुणी व्यक्तीची वाणी दम्भयुक्त असते तर तमोगुणी व्यक्तीची वाणी विवेकहीन असते. सतराव्या अध्यायात भगवंत वाणीचे सूत्र सांगतात, 

सत्यम् प्रियम् हितम् च यत्॥
महाभारतात एक सूत्र येते,
सत्यम् ब्रुयात् प्रियम् ब्रुयात् न ब्रुयात् सत्यम् अप्रियम्॥
काही व्यक्ती अशा थाटात बोलतात की मी बोलणारच कारण माझं खरं आहे, ज्याला राग यायचा असेल त्याला येऊ दे अशा व्यक्ती रजोगुणी असतात. खरं बोलणं, सत्य बोलणं कुणालाही सलत नाही सलतो तो बोलण्याचा ढंग. म्हणून सत्य, प्रिय, हितकर असेच बोलावे.
ऐसी वाणी बोलिए, मन का आपा खोय।
औरन को शीतल करे, आपहु शीतल होय।।
ही सत्त्वगुणीची भावना असते तर रजोगुणी म्हणतो - 
ऐसी वाणी बोलिए, सबसे झगड़ा होय
उससे झगड़ा न करे, जो मुझसे तगड़ा होय।।
रजोगुणी व्यक्ती भांडण तंट्याचं कारण शोधत राहतात. रस्त्यावरून जाताना जरी गाडी धडकली नाही तरी न धडकलेल्या गाडीसाठी ही जर गाडी धडकली असती तर अशाप्रकारे भांडण उकरून काढतात. ज्या गोष्टीशी आपला काही संबंध नाही त्या गोष्टीतूनही भांडण, दुसऱ्याचा पाणउतारा करण्यासाठी भांडण, दुसऱ्याचे महत्त्व कमी करण्यासाठी भांडण. अशाच यांच्या भांडणाला सीमाच नसते हे रजोगुणी असतात या रजोगुणींना दुसऱ्यांना कमी लेखायची सवय असते. सर्वांना सत्त्वगुणी व्यक्ती प्रिय असतात, त्यांच्याशी बोलावे असे वाटते परंतु रजोगुणी आणि तमोगुणी व्यक्तीशी कोणतेही कसलेही संबंध ठेवायला मन तयार होत नाही. तमोगुणी लोकांचे वागणे बोलणे अतिशय अप्रिय, अहितकारी असते.

३. भोजन.

 सत्त्वगुणी लोकांचे भोजन बुभुक्षेचे महत्व पटवून देणारे असते. रजोगुणी लोकांचे भोजन केवळ स्वादाला महत्त्व देणारे असते तर तमोगुणी व्यक्तीचे भोजन मादकता व अशुद्धतेने भरलेले असते.
 सत्त्वगुणी व्यक्तींना काय खावयाचे, काय नाही या गोष्टींचा सारासार विचार असतो त्यानुसार सत्त्वगुणी व्यक्ती योग्य प्रकारचा आहार घेतात. रजोगुणी व्यक्ती भोजन स्वादिष्ट आहे किंवा नाही हे प्रथम पाहतात. भुकेपेक्षा त्यांना स्वादाचा अधिक अंश हवा असतो. त्यांच्या मनाप्रमाणे भोजन नसेल तर ते उपाशी राहतील परंतु जेवणार नाहीत. तमोगुणी व्यक्तींना अयोग्य, अप्रिय, कुजलेले कसल्याही प्रकारच्या स्वादाचे भोजन चालते कारण केवळ खाणे हा तमोगुणाचा स्वभाव असतो.

४. वस्त्र.

 सत्त्वगुणी व्यक्ती. सफेद, हलक्या रंगाचे, सुविधा जनक, हवामानाशी अनुकूल, ऋतुमानानुसार योग्य प्रकारचे कपडे परिधान करतात. साधे परंतु अतिशय स्वच्छ व टापटिपीचे असे त्यांचे कपडे असतात . त्यांच्या कपड्यांमधून त्यांचा सत्त्वगुणी स्वभाव दिसून येतो. रजोगुणी व्यक्ती अत्यंत आधुनिक, कसल्याही फॅशनचे कपडे परिधान करतात. सुंदर पोशाख असावा असा त्यांचा अट्टाहास असतो. तमोगुणी व्यक्तीचे कपडे अतिशय गलिच्छ, असुविधाजनक, फाटके तुटके वस्त्र ही फॅशन म्हणून परिधान करणारे अशा प्रकारचा त्यांचा अस्वच्छ पोशाख असतो. त्यांचे सानिध्य कोणालाही आवडत नाही.

५. आवास (घर)

सत्त्वगुणी व्यक्तीचे घर अतिशय स्वच्छ टापटीप असणारे, शुद्धतापूर्ण, वातावरणास अनुकूल, पवित्र भाव दर्शविणारे असे असते. रजोगुणी व्यक्तीचे घर विलासतापूर्ण असते. घरातील प्रत्येक गोष्टीचे प्रदर्शन करण्याची त्यांची हौस असते. किमती सामान कोण कोणत्या ठिकाणाहून आणलेल आहे याचा त्यांना अभिमान असतो. अनेक महागड्या वस्तूंचा, निरुपयोगी वस्तूंचा भरणा त्यांच्या घरात असतो. घराबद्दल त्यांच्या घमेंडीच्या भावना असतात. तमोगुणी व्यक्तीचे घर अतिशय अव्यवस्थित, घरात सर्वत्र गबाळ ग्रंथी कारभार, अस्ताव्यस्तता, अस्वच्छता अपवित्रता अशा नकारात्मक बाबींनी भरलेले असते. अशा व्यक्तींच्या घरात जाणेही नकोसे वाटते.

६. निवेश (संपत्तीचा विनियोग )

 सत्त्वगुणी व्यक्ती आपल्या कुटुंबीयांचा, घराच्या सुरक्षिततेचा विचार करून पैशाचा विनियोग करतात. पीपीएफ, एलआयसी, एफडी, केवायपी गुंतवणुकीच्या योजनांमधून आपला पैसा योग्य प्रकारे सुरक्षित ठेवतात. याशिवाय आपल्या मिळकतीचा एक दशांश भाग दानधर्माच्या कामासाठीही राखून ठेवतात. अशा दानधर्माचे पुण्य त्यांच्या पदरी साठत जाते. रजोगुणी व्यक्ती अधिक नफ्यासाठी धडपडत असतात. शेअर बाजार वगैरे मध्ये, झटपट पैशाच्या योजनांमध्ये जोखीम घेऊन नफा मिळवणाऱ्या योजनांमध्ये ते आपली संपत्ती गुंतवतात. तमोगणी व्यक्ती जुगार, रमी, पत्ते, सट्टा बाजार यासारख्या अधर्म मार्गांनी पैसा कमावण्याचा प्रयत्न करतात. भविष्यासाठी तरतूद ही त्यांची वृत्ती नसतेच.

७. कार्य वृत्ती 
सत्त्वगुणी व्यक्तीची वृत्ती श्रेयस करणारी असते. आपणही करू या इतरांनाही हितकारक करावयाची संधी देऊ या अशी यांची श्रेयस्करवृत्ति असते. रजोगुणी व्यक्ती प्रेयस्कर वृत्तीचे असतात. अशा व्यक्ती मनमर्जीने वागणारे असतात. ज्या गोष्टी त्यांना चांगल्या वाटेल त्याच गोष्टी त्या करीत असतात. तमोगुणी व्यक्ती अतिशय आळशी असतात त्यांच्या कामात विवशता असते. सतत इतरांकडून बोलणी खाऊन काम करण्याची त्यांची वृत्ती असते. कोणतेही काम जबाबदारीने करू शकत नाहीत.

८.  स्वभाव.
 सत्त्वगुणी व्यक्तींचा स्वभाव आपलेही हित पाहणे व आपल्याबरोबर इतरांचेही हित साधणे अशा प्रकारचा परोपकारी स्वभाव असतो. सर्वे भवन्तु सुखिन: असा यांचा स्वभाव असतो. अंगदाने प्रभू रामचंद्रांना विचारले दूत म्हणून रावणाकडे जाऊन मी काय बोलू? प्रभू रामचंद्र सत्त्वगुणी होते. ते म्हणाले_
काजु हमार तासु हित होई।
रिपु सन करेहु बतकही सोई॥

अर्थात ते म्हणाले, असे बोल ज्याने आपले हित होईलच पण शत्रूचेही कल्याणच होईल.  सर्वांना हितकारक होईल असे बोलावे. रजोगुणी व्यक्ती अपना काम बनता, भाड़ में जाए जनता। अशा विचाराच्या,  केवळ कामाशी मतलब राखणाऱ्या असतात. आपल्याला त्या कामातून काय मिळणार याचा सतत विचार करतात. आपल्या फायद्याचे असेल तेच काम अशा व्यक्ती पाहतात. तमोगुणी व्यक्ती आपली लाभ हानी पहात नाही, दुसऱ्यांचेही पहात नाही. किंबहुना दुसऱ्यांचे नुकसान करण्याकडेच यांची प्रवृत्ती असते. जसं धान्यावर पडणाऱ्या गारांचा वर्षाव त्या धान्याचा नाशच करतो कशी ह्या तमोगुणी व्यक्तींची वृत्ती असते.

९. रुची.

सत्त्वगुणी वृत्तींना धर्माबद्दल अत्यंत आदर असतो. त्यांची वृत्ती ही सेवाभावी असते. परोपकारी असते. धर्मपालन करणारी असते. आपल्यामुळे कोणाचेही नुकसान होऊ नये याची जाणीव असते. रजोगुणी व्यक्ती केवळ दंभ, केवळ काम केल्याचा देखावा, थोडसं काम केलं तरी मोठेपणा सांगण्याची बढाई या त्यांना रुची असते तमोगुणी व्यक्ती मुद्दाम चुका करून, एखाद्याचे जास्तीत जास्त नुकसान कसे होईल हे पहात असतात. एखाद्याचे वाईट झाले की यांना आनंद वाटत असतो. यांची वृत्ती आसुरी असते.

१०. इच्छा. 

सत्त्वगुणी वृत्ती आवश्यक गोष्टींना महत्त्व देणारी असते. ज्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत त्यासंबंधी त्यांना कोणत्याही प्रकारचा लोभ नसतो. आपल्या गरजेनुसार, आवश्यक तेवढेच मिळवायचे, हव्यास करावयाचा नाही अशी वृत्ती असते. रजोगुणी व्यक्तींना इच्छा अतिशय महत्त्वाच्या वाटतात. अनेक अप्राप्य, असाध्य गोष्टींचा हव्यास, अशा गोष्टींच्या प्राप्तीची इच्छा त्यांच्या मनात नेहमीच असते कोणत्याही मार्गाने आपल्या इच्छापूर्तीचा अशा व्यक्ती प्रयत्न करीत असतात. तमोगुणी व्यक्ती सर्वांसाठीच घातक असतात. दुसऱ्यांच्या इच्छा कशा पूर्ण होऊ शकणार नाहीत अशा प्रकारच्या विघ्न संतोषी व्यक्ती म्हणजे तमोगुणी व्यक्ती होत.

११. सहवास( संग, संगत, मैत्री)

 सत्त्वगुणी व्यक्ती सज्जन व्यक्तींचा संग पसंत करतात. त्यांना सत्संग प्रिय असतो. विनू सत्संग विवेक न होय, या वचनावर त्यांचा विश्वास असतो. अशा व्यक्ती प्रामाणिक, दयावान, क्षमा शील, सदाचारी असतात. व आपल्यासारख्या स्वभावाच्या व्यक्तींशी मैत्री करतात. रजोगुणी व्यक्तींची वृत्ती प्रदर्शनीय असते. मोठ्या लोकात यांची उठ बस असते. कोणाकडून काम साधून घेता येईल याचा ते नेहमीच विचार करीत असतात आणि अशा लोकांचीच मैत्री करीत असतात. आपले काम साधून घेतले की मैत्रीलाही ते पाठ फिरवितात. तमोगुणी व्यक्ती आपल्यासारख्या व्यक्तींच्या सहवासातच रमतात. मद्यपान, दुष्कृत्य, लूटमार वगैरे अवैध कृत्य करणाऱ्या व्यक्तींची यांची मैत्री असते चांगल्या लोकांची मैत्री, सज्जन लोकांची मैत्री आवडत नाही.
 संगतीवरुन गुण कळून येतात. धुळीचा कण वाऱ्याच्या सानिध्यात आकाशात झेप घेतो तर चिखलाच्या सानिध्यात चिखल होऊन जातो. कधी कधी एखाद्या सज्जन माणसांमध्ये ही एखादा दुर्गुण दिसून येऊ शकतो परंतु याचा अर्थ ती व्यक्ती पूर्णतः वाईट आहे असा होत नाही. विचाराने, संयमाने अशा व्यक्ती पुन्हा सत्त्वगुणी बनू शकतात 
 सर्वांमध्ये सत्त्व, रज आणि तम हे गुण आहेतच. ज्या गुणांचे प्राबल्य असेल त्या गुणांनी ती व्यक्ती युक्त असते. एकदा गांधीजींकडे एक व्यक्ती दहा-बारा पानांचे सूचना वजा पत्र लेखन घेऊन आली. गांधीजींनी वाचन केले, त्या पत्राची टाचणी काढून ठेवली बाकी कागद त्याला परत दिले. त्या व्यक्तीने त्यांच्या कृतीचे कारण विचारल्यावर गांधीजी म्हणाले, उपयोगी वस्तू ठेवून घेतली, निरुपयोगी वस्तू परत करत आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येक प्रसंगी प्रत्येकाला एकदम टाकून बोलायचे. एखाद्या व्यक्तीला त्याची चूक सुद्धा अतिशय नम्रतेने दाखवून देण्याचा मार्ग अधिक श्रेयस्कर असतो.
या श्लोकातला 'अव्यभिचारी भक्तीयोग’ हा सुद्धा प्राय: चिंतनशील शब्द आहे. असे भाव असतात, अरे मी तर रामभक्त आहे मी भगवान शंकराची पूजा कशी करू? किंवा मी शिवभक्त आहे तेव्हा विष्णूंची पूजा कशी करू?
भगवंतांच्या पूजेसाठी प्रथम आपण समर्थ आहोत की नाही हे पाहावे. आपण नाम, गोत्र वगैरे निरर्थक गोष्टीत अधिक रस घेतो. जो मुख्य भक्तीचा भाव हवा त्यामध्ये आपण कमी पडतो भगवंतांच्या मते हा व्यभिचार आहे असा व्यभिचार भगवंतांना मान्य नाही. आपल्या बल, बुद्धी, अधिकार, संपत्ती यांच्या जोरावर केलेली पूजा ही व्यभिचारी भक्ती होय. या उलट भगवंतांबद्दल समदृष्टी ठेवून केली जाणारी पूजा ही अव्यभिचारी भक्ती होय. कितीही सामर्थ्यवान असले तरी आपली बुद्धी, बल, अधिकार, संपत्ती या सर्व गोष्टी भगवंतांच्या भक्तीच्या तुलनेत कस्पटासमान आहेत. अनेक उदाहरणे आपण पाहतो की जेव्हा व्यक्तीचे सामर्थ्य अपुरे पडते तेव्हा त्याला भगवंताची आठवण होते. रामचरितमानस मधला एक दोहा _
जननी जनक बंधु सुत दारा । तनु धनु भवन सुहृदु परिवारा।
सब कर ममता ताग बटोरी । मम पद मनहिं बाँधि बर डोरी।
मनुष्याला दहा प्रकारची असक्ती असते. जननी, जनक, बंधू, सूत, दारा ( पत्नी) तन, मन, धन, भवन ( घर) स्वजन आणि परिवार ही दहा आसक्ती स्थाने आहेत. भगवंत म्हणतात या सर्वांठाई असलेली तुझी आसक्ती, तुझी ममता एका कटोऱ्यात बंद कर आणि माझ्याकडे ये. अर्थात व्यभिचारी भक्तीचा त्याग करून अव्यभिचारी भक्ती कर.

14.27

ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम्, अमृतस्याव्ययस्य च।
शाश्वतस्य च धर्मस्य, सुखस्यैकान्तिकस्य च॥14.27॥

कारण त्या अविनाशी परब्रह्माचा, अमृताचा, नित्य धर्माचा आणि अखंड एकरस आनंदाचा आश्रय मी आहे.

  भगवंत म्हणतात, हे अर्जुना, मी तर अविनाशी परब्रह्माचा, अमृताचा, नित्य धर्माचा आणि अखंड एक रस आनंदाचा शाश्वत धर्म आणि एकांत सुखाचा आश्रय आहे.
एकदा एका व्यक्तीने एका संतांना विचारले, भगवत गीतेचे सार काय आहे? त्या संतांनी एका वाक्यात सांगितले, 'शरणागती ' भगवंत स्वतः म्हणतात, मामेकम् शरणम् व्रज. भगवंत म्हणतात, समस्त चराचरसृष्टीचा आशय मीच आहे ही बाब ज्याच्या ध्यानात आली त्याने मला, माझ्या परमात्मा स्वरूप रूपाला प्राप्त करून घेतले.

|| ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु ||
हरी शरणं, हरी शरणं या भजनाने विवेचनाची सांगता झाली.


प्रश्नोत्तर चर्चा

संजना दीदी
प्रश्न: भगवान अर्जुनाला गीताज्ञान सांगत असताना इतर रथी महारथी काय करीत होते?
उत्तर: कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद चालू असताना इतर वीर युद्धाच्या इतर तयारी मध्ये गुंतलेले होते. जाणून-बुजून त्यांच्या संवादात लक्ष घालण्याचे विचार त्यांच्या मनात आले असतील किंवा नसतील ही. शिवाय कृष्ण अर्जुन यांचा संवाद दिव्य स्वरूपातला होता.

सपना दीदी
प्रश्न: आपल्या जीवनाचा उद्देश काय असावा?
उत्तर: मनुष्य जीवनाचा एक मात्र उद्देश आहे मोक्षप्राप्ती. परंतु केवळ एवढी एकच गोष्ट गृहीत धरायची नाही कारण शेकडो गोष्टी आपण सोबत घेऊन फिरत असतो असे किती काळ आपण भरकटतच राहणार आहोत याचा मनाशी विचार करावा. शिवाय अनुकूलता असताना या विषयावर फारसे चिंतन होत नाही कारण उद्वेग नसतो. परंतु प्रतिकूलता आली की मी का जगत आहे, यापेक्षा या यातनातून भगवंतांनी मला सोडवलं तर बरं अशा प्रकारचे प्रश्न, असे उद्वेगाचे विचार मनात निर्माण होऊ लागतात. जीवनाला दु:खालय म्हटलेले आहे. करोडो दुःखातून, पुनरपी जननम् पुनरपी मरणम्, यातून सुटण्यासाठी मोक्षप्राप्तीचे ध्येय, भगवत्प्राप्तीचे ध्येय मनात ठेवले पाहिजे. मोक्षप्राप्ती होईपर्यंत सेवा धर्म हा मार्गही योग्य आहे.

शीला दीदी
प्रश्न: नियंताचा अर्थ काय? सूत्रात्मा म्हणजे काय ?
उत्तर: सर्वांचे नियंत्रण करणारा तो नियंत्रक. भगवंत सर्व सृष्टीचे नियंत्रण करतो म्हणून भगवंताला नियंता असे म्हटले आहे. सूत्रात्मा याचा अर्थ आहे मुख्य सूत्रधार. सृष्टीचा मुख्य सूत्रधार भगवंत हाच आहे.

चित्रा दीदी
प्रश्न: तब्येत चांगली राखण्यासाठी कोणता अध्याय म्हणावा?
उत्तर: ज्या अध्यायात भोजन, भजन, नामजप यासंबंधी सांगितले आहे तो अध्याय म्हणावा. व्यवहारामध्ये भोजन कमी, भजन अधिक अशी वृत्ती ठेवावी. तसं पाहिलं तर प्रकृती स्वास्थ्यासाठी दररोज रामरक्षा म्हणावी.

पवन दीदी
प्रश्न: पूजा कोणाची करावी?
उत्तर: आपल्या मनात कोणाबद्दल अधिक श्रद्धा असेल त्याच देवाची पूजा करावी. आपण जर शिवभक्त असाल तर शिवाची पूजा करावी एवढेच नव्हे तर भगवद्गीतासुद्धा त्या शिवभक्तीच्या श्रद्धेने वाचावी. पूजेमध्ये श्रद्धा भाव अधिक महत्त्वाचा.

मालती दीदी
प्रश्न: आपण विवेचनादरम्यान जी गीते सांगता ती कोणत्या पुस्तकातली आहेत?
उत्तर: तुलसीदासरचित तुलसी रामायण मधील चौपाईंचा संदर्भ विवेचनादरम्यान घेतला जातो. वाल्मीकिरामायण मधील काही श्लोक यांचाही संदर्भ घेतला जातो. गीता प्रेसने या सर्व पुस्तकांच्या आवृत्ती प्रकाशित केलेल्या आहेत.

प्रश्न: सर्वांमध्ये तीनही गुण आहेत, तेव्हा कोणती व्यक्ती कोणत्या गुणाची हे कसे ओळखायचे?
उत्तर: आपल्या स्वतःच्या व्यवहारातच आपण तीन गुणांचा अनुभव घेतो. जर आपल्याला सत्त्वगुण वाढवायचा असेल तर बाकी इतर रजोगुण व तमोगुण यांचे महत्त्व कमी केले पाहिजे. हे काम आपले आपल्यालाच करावे लागते. अत्यंत जागरूकतेने आपल्याला सत्त्वगुणांची जोपासना करावी लागते. यासाठी सतत चिंतन मनन यांचा उपयोग होतो.

विश्वनाथ जी
प्रश्न: गुणातीत कसे होऊ शकतो?
उत्तर: वास्तविक गुणातीत म्हणजे सत्त्वगुणाची वाढ असं ढोबळमानाने आपण म्हणू शकतो. ही एक प्रकारची साधना आहे आणि या साधनेतून सिद्धी प्राप्त होते. रजोगुण व तमोगुण कमी करून सत्त्वगुणांची वाढ करणे ही एक दीर्घ प्रक्रिया आहे, साधना आहे. सत्त्वगुणात स्थिर राहण्यासाठी गुरु कृपा, ईश्वर कृपा जरुरी आहे. सत्त्वगुणवाढीचे प्रयत्न केले पाहिजेत. त्याच्या पलीकडे भगवत कृपेने आपण सिद्धी प्राप्त करून घेऊ शकतो.

प्रश्न: जपमाळ कोणत्या देवाची व कशी जपावयाची?
उत्तर: जर तुमच्या गुरूंनी तुम्हाला बीजमंत्र दिला असेल आणि जपसंख्या सांगितली असेल त्या मंत्राचा जप करावयाचा. इतर कोणत्या देवाचा नाम जप करायची इच्छा असेल त्यानुसार आपण नामजप करू शकतो. वास्तविक ज्या मंत्राने आपले मन परमात्म्याची एकरूप होते तो मंत्र जप श्रेष्ठ आहे म्हणून गुरु मंत्राचा जप करणे अधिक श्रेयस्कर आहे. बीज मंत्राचा माला जप करावा पूजा करतानाही मला जप करावा.

प्रश्न: रविवारी जर द्वादशी असेल तुळशीला पाणी घालावयाचे की नाही?
उत्तर: जर आपला विशिष्ट नेम असेल तर रविवारी तुळशीला पाणी नाही घातले तरी चालते तुळशीला पाणी न घालण्यासंबंधी कोठेही उल्लेख नाही. एकादशी, द्वादशी या दिवशी तुळशी पत्र तोडू नये, तुळशीला स्पर्श करू नये असे शास्त्र सांगते. तेव्हा पाणी घातले तरी चालेल नाही घातले तरी चालेल.

प्रश्न: मनाची चंचलता कमी करून स्थिरता कशी आणावी
उत्तर: मनाची चंचलता कमी करण्यासाठी साधन उपाय अभ्यास म्हणून करावयाचे आहे. सोबत वृत्तीमध्ये वैराग्य भावना आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपला मोह हा बाधक ठरतो त्या मोहावर नियंत्रण करावे. कधी कधी कर्तव्यपालनाच्या धावपळीत यामध्ये बाधा येऊ शकते त्यामुळे सतर्क राहून, जागरूक राहून साधना करावी. प्रत्येक साधनेत निश्चय पाहिजे. संतांची जीवन चरित्रे वाचून त्यातून काही शिकावे.

प्रश्न :लहान मुलांना मोबाईल पासून कसे रोखावे?
उत्तर: आज सर्वांच्या पुढे हे एक आव्हान बनले आहे. पालक म्हणून कधी कधी दबाव तंत्राचा अवलंब करावा. लहान मुलांना पुरस्काराचे प्रलोभन असते. तेव्हा त्यांना अशा प्रकारची प्रलोभने दाखवून मोबाईलपासून दूर करावे. चांगल्या पुस्तकांच्या वाचनाची गोडी लावावी. विविध मार्गांचा अवलंब युक्ती प्रयुक्तीने करावा.
समारोपाच्या प्रार्थनेनंतर विवेचन सत्राची सांगता झाली.
|| ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु ||