विवेचन सारांश
चित्तशुद्धी आणि निर्मम बुद्धीतून विकारांवर काबू

ID: 1292
मराठी
रविवार, 14 ऑगस्ट 2022
अध्याय 5: कर्मसन्यासयोग
2/2 (श्लोक 11-29)
विवेचक: गीता विशारद डॉ आशू गोयल जी


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सर्व साधकांना शुभेच्छा देण्यात आल्या. स्वामी गोविंद देव गिरीजी महाराजांना वंदन करून आरंभीची प्रार्थना झाली. यानंतर स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सर्वांच्या ह्रदयात देश भक्तीचा दीप लावूया या विचाराने दीप प्रज्वलन करण्यात आले. जगद्गुरू श्रीकृष्णाला व सर्व गुरूंना वंदन करून सत्राची सुरूवात झाली.
आजचा दिवस विशेष आहे. आपल्या परमपूज्य स्वामीजींनी 'हर घर गीता, हर कर गीता' हा मंत्र आपल्याला दिला. तर आजच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या प्रसंगी आपल्या माननीय पंप्रधानांनी आपल्याला 'हर घर तिरंगा' हा देशप्रेमाचा मंत्र दिला आहे. भगवद्गीतेचा अर्थ समजून घेऊन जीवन सफल करण्यासाठी आपण उत्सुक झालो आहोत. गीतेचा अभ्यास, चिंतन, मनन करण्याची प्रेरणा आपणास होते आहे हे आपल्या पूर्व जन्मांची पुण्याई, संतांचे आशिर्वाद व भगवंताची कृपा यामुळे शक्य झाले आहे.
तिसऱ्या व चौथ्या अध्यायात आपण कर्मयोगाचा विचार केला. आता पाचव्या अध्यायात आपण कर्मसंन्यास योगाचा विचार करतो आहोत. पाचव्या अध्यायात आतापर्यंत कर्मयोगी तेरा विविध प्रकारची कर्मे कशी करतो हे  पाहिले  . या तेरा कर्मांमध्ये पाच प्रकारची कर्मे ज्ञानेंद्रियांची, पाच कर्मेंद्रियांची असतात. या शिवाय निद्रा, श्वसन आणि पापण्यांची हालचाल अशी आणखीन तीन मिळून तेरा कर्मे होतात. कर्मयोगी सर्व कर्मे गुणागुणेषु वर्तन्त या भावनेने करतो. दहाव्या श्लोकात कमळाच्या पानाचे उदाहरण दिले होते. कमळ पाण्यात राहून सुद्धा जसे अलिप्त असते त्याप्रमाणे कर्मयोगी वरील सर्व प्रकारची कर्मे करून सुद्धा त्यात रमत नाही, अलिप्त राहतो.




5.11

कायेन मनसा बुद्ध्या, केवलैरिन्द्रियैरपि।
योगिनः(ख्) कर्म कुर्वन्ति, सङ्गं(न्) त्यक्त्वात्मशुद्धये॥5.11॥

कमयोगी ममत्वबुद्धी सोडून केवळ इन्द्रिये, मन, बुद्धि आणि शरीर यांच्याद्वारे आसक्ती सोडून अन्त:करणाच्या शुद्धीसाठी कर्म करतात.

आपल्याला असे अनेक लोक दिसतात जे वर्षानुवर्षे सत्संग करतात, पूजा करतात, ध्यानधारणा, तासंतास नामजप इत्यादी भगवद्प्राप्तीची अनेक साधने करतात. पण हेच लोक व्यवहारात खोटे बोलतात, दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतात, आपल्याच भावंडांवर कोर्ट केस सुद्धा लावतात. मग भगवंताची इतकी भक्ती करणारे लोक असे कसे वागतात असा प्रश्न पडतो. याचे कारण अंतःकरणशुद्धीचा अभाव. भगवंत पंधराव्या अध्यायात देखील या अर्थाचा एक श्लोक उद्धृत करतात. ते म्हणतात यत्न करणाऱ्या मोठमोठ्या योग्यांना देखील चित्त शुद्धी झाल्याखेरीज सिद्धी प्राप्त होत नाहीत. या बाबतीत भगवद्गीता वेगळी ठरते. भगवद्गीता साधनापेक्षा साध्याला महत्त्व देते. तुम्ही साधन कोणते करता हे महत्त्वाचे नाही, तर त्याने साध्य काय केले, तुमचे चित्त शुद्ध झाले का हे भगवद्गीता विचारते. म्हणूनच भगवंताने दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली, बाराव्या अध्यायात भक्त लक्षणे सांगितली, तेराव्या अध्यायात ज्ञानी माणसाची लक्षणे सांगितली, चौदाव्या अध्यायात गुणातीताची लक्षणे सांगितली तर सोळाव्या अध्यायात दैवी आणि आसुरी गुणांची लक्षणे सांगितली. भगवंतांनी कुठेही साधनाला महत्त्व दिलेले नाही तर त्या साधनाने तुमच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम झाला, तुमच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, व्यवहारामध्ये काय फरक पडला, तुमची आसक्ती कमी झाली का हे तपासणे महत्त्वाचे आहे हेच बिंबवले. फक्त गीतेची प्रवचने ऐकून फायदा नाही आपण आचरणात काय आणतो हे पाहायला हवे. भगवंताने दैवी गुणांची सव्वीस लक्षणे सांगितली आहेत, त्यातली आपल्यात किती उतरली याचा विचार करायला हवा, ती अंगी बाणण्याचा प्रयत्न करायला हवा. 

5.12

युक्तः(ख्) कर्मफलं(न्) त्यक्त्वा, शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्꠰
अयुक्तः(ख्) कामकारेण, फले सक्तो निबध्यते॥5.12॥

कर्मयोगी कर्मांच्या फळांचा त्याग करुन भगवत्प्राप्तीरुप शांतीला प्राप्त होतो आणि कामना असलेला पुरुष कामनांच्या प्रेरणेमुळे फळांत आसक्त होऊन बद्ध होतो.

आपण सुखांमध्ये शांती शोधतो. आपल्याला सारखे काहीतरी हवे असते. लहानपणापासून आपण आई वडिलांकडे सुद्धा काही ना काही तरी सारखे मागतच असतो. सुख भोगांतून मिळते. कोणी स्त्री सुखाची लालसा ठेवतो, कोणाला संपत्ती हवी, कोणाला घर, कोणाला गाडी. सुखातून शांती शोधण्याचा आपला सतत प्रयत्न चालू असतो.  पण सुखोपभोगांची ही यादी न संपणारी आहे. त्यातून शांती काही मिळत नाही. कर्मयोग्याला कर्मफलाच्या त्यागातून शांती मिळते. जोपर्यंत सुखांचा, लालसांचा त्याग आपण करत नाही तोपर्यंत शांती मिळणे अशक्य आहे. 

5.13

सर्वकर्माणि मनसा, सन्न्यस्यास्ते सुखं(म्) वशी।
नवद्वारे पुरे देही, नैव कुर्वन्न कारयन्॥5.13॥

अन्तःकरण ज्याच्या ताब्यात आहे, असा सांख्ययोगाचे आचरण करणारा पुरुष कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा न होताच नऊ दरवाजांच्या शरीररुपी घरात सर्व कर्मांचा मनाने त्याग करुन आनंदाने सच्चिदानन्दघन परमात्म्याच्या स्वरुपात स्थित राहतो.

नवद्वारे पुरे देही चा जरा विचार करू. श्रीमद्भागवताच्या चतुर्थ स्कंधातील पंचविसाव्या अध्यायात पुरंजन उपाख्यान आहे. या पुरंजनाची कथा काय आहे ते बघू. ही कथा नारदांनी प्राचीन बहिर ऋषींना सांगितली होती. दोन मित्र होते, अविज्ञात आणि पुरंजन. या मित्रांची नावे अन्वर्थ नावे होती. अन्वर्थ नाव म्हणजे काय तर ज्याच्या अंगी नावाप्रमाणे गुण आहेत त्याचे नाव अन्वर्थ नाव होईल. जसे भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचलला त्यामुळे त्यांना गिरीधर नाव मिळाले. हे झाले अन्वर्थ नाम. काहींचे याच्या बरोबर उलट असते. जसे नाव गिरीधर असेल पण छोटी बॅग उचलायला देखील हमालाची मदत लागते.
तर या कथेतील दोघे मित्र अविज्ञात आणि पुरंजन यांचे गुण त्यांच्या नावाला साजेसे होते. अविज्ञात म्हणजे ज्याच्याविषयी कसलीही माहिती मिळत नाही, ज्ञान होत नाही असा. त्याप्रमाणेच या अविज्ञाताच्या जन्माविषयी, त्याच्या कर्माविषयी, त्याच्या विचारांविषयी, मनातील भावनांविषयी कोणालाच फार काही माहिती नव्हते. दुसरा होता पुरंजन, पूर अधिक अंजन म्हणजे पुरात किंवा नगरात राहणारा. आता हे दोघे मित्र होते. एक दिवस पुरंजन अविज्ञाताला म्हणाला की मित्रा तुला तर कसलीच इच्छा होत नाही, तू एकदम शांत स्वभावाचा आहेस पण मला मात्र फिरायला जायची इच्छा होते आहे. मी खूप दूर काही काळासाठी फिरायला जायचा विचार करतो आहे. त्यावर अविज्ञात म्हणाला ठीक आहे मित्रा, तुला जायचे तर तू जा पण मी इथे तुझी वाट बघतो आहे हे ध्यानात असू दे. मला विसरू नकोस. पुरंजन म्हणाला मित्रा तू माझा अत्यंत जवळचा आहेस, मी तुला कसा विसरेन. झाले, पुरंजन यात्रेला निघाला. त्याने नगरांना भेटी दिल्या, अनेक लेणी, सुंदर सुंदर राजवाडे बघितले. निरनिराळ्या प्रकारची वने, वृक्ष, सरोवरे बघत तो मार्गक्रमण करत राहिला. काही काळाने त्याला एक अत्यंत भव्य किल्ला आणि त्यावरील प्रासाद दिसला. तीन मजली प्रासाद अतिशय सुंदर होता. त्याला नऊ दरवाजे होते.  दोन दरवाजे खाली होते. मधल्या मजल्यावर एकही दार नव्हते. सर्वात वरच्या मजल्यावर सात द्वारे होती. पुरंजन प्रासादात गेला. आत शोभेच्या असंख्य वस्तू होत्या. प्रासाद अतिशय उत्तम रीतीने सजवलेला होता. तिथे एक सुंदर स्त्री तिच्या सेवकांबरोबर राहत होती. ते सेवक तिची सर्व कामे करत. शिवाय तिच्याकडे एक पंचमुखी सर्प होता. त्या सुंदर स्त्रीला आणि तिच्या त्या वैभवाला पाहून पुरंजन भुलला. तो तिच्यात आसक्त झाला. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. तिनेही त्याची मागणी स्वीकारली. पुरंजन आनंदीत झाला. त्याने तिचे नाव विचारले. ती म्हणाली मला नाव नाही. पुरंजन म्हणाला हरकत नाही आजपासून मी पुरंजन तर तू माझी पुरंजनी. दोघेही प्रासादात संसार करू लागले. काही वर्षे लोटली. पुरंजन पुरंजनी मध्ये पुरता गुरफटला, तो ती म्हणेल ते, ती म्हणले तसेच वागत असे. तिच्या तालावर सर्व काही चालू होते. एकदा तिथे एक अत्यंत कुरूप म्हातारी आली. 'जरा' तिचे नाव. तिने प्रासाद बघितला. ती पुरंजनाला म्हणाली तुमचे भवन फार सुंदर आणि मोठे आहे, मला पण इथे राहू द्या. त्यावर तो म्हणाला माझे घर, माझी पत्नी, आमचे सर्व दास-दासी इतकेच काय तर आमच्याकडील पंचमुखी सर्प देखील सुंदर आहेत. इथे तुझ्यासारख्या कुरूप व्यक्तीचे काय काम. तू इथून चालती हो. जरेने खूप विनवणी करून देखील पुरंजनाने तिला हाकलून दिले. जरा तिथून आपला भाऊ चण्डवेग याच्याकडे गेली. ती म्हणाली मला त्या प्रासादात राहायचे आहे, तू काही कर. चण्डवेगाने ३६५ गोऱ्या आणि ३६५ काळ्या सैनिकांची फौज उभी केली. जरा म्हणाली अरे चण्डवेगा तो किल्ला मजबूत आहे. अनेक बलाढ्य सैनिक आणि दास दासी त्याच्या रक्षणासाठी सदैव सज्ज आहेत, तुझी ही छोटी फौज तो किल्ला जिंकायला पुरी पडेल का. त्यावर चण्डवेग म्हणाला जरे तू चिंता करू नकोस माझे सैनिक संख्येने कमी असतील, दिसायला दुबळे वाटतील पण ते कधीही हार मानणार नाहीत. जरा आपल्या भावाचे सैन्य घेऊन किल्ल्यावर चालून गेली. रोज सैनिक जात आणि हल्ला करत, काही ना काही नुकसान करून परत येत. कधी एखादा बुरुज ढासळे, कधी एखादी वीट निसटे, कधी संरक्षक जाळीचे नुकसान होई. पुरंजन पुरंजनी झालेले नुकसान आपल्या सेवकांच्या मदतीने रोज दुरूस्त करत. पण जरेचे सैन्य रोज काहीतरी उपद्रव करत राही, ते हार मानत नसत. असेच चालू राहिले आणि अखेरीस किल्ल्याचे सैन्य कमी पडू लागले आणि एक दिवस त्यांचा पाडाव झाला. जरेने किल्ल्याचा ताबा घेतला आणि ती किल्ल्यावर राहू लागली. जरेबरोबर तिथे राहणे काही पुरंजनाला पसंत नव्हते. तो दुःखाने झुरत चालला आणि एक दिवस त्या दुःखाने त्रस्त होऊन पुरंजनाने प्राणत्याग केला. प्राण सोडते समयी पुरंजनीचे आपल्या मागे कसे होईल या विचारात त्याला मरण आले. आता मरते समयी जो विचार, इच्छा असते त्याप्रमाणे जन्म प्राप्त होतो या न्यायाने त्याला एका स्त्रीचा जन्म प्राप्त झाला. या स्त्रीचा विवाह झाला, पुढे तिच्या पतीचा मृत्यु झाला आणि ती स्त्री सती जाण्यासाठी आपल्या पतीबरोबर चितेवर चढली.
इकडे खूप काळ मित्राची वाट पाहत असलेला अविज्ञात मित्राच्या शोधासाठी निघाला आणि तो शोधत शोधत जिथे स्त्री जन्मातील पुरंजन चितेवर आरूढ झालेला होता तिथे आला. अविज्ञाताने त्याच्या दिव्य शक्तीने ही स्त्री म्हणजे पुरंजन आहे हे ओळखले. त्याने त्या स्त्री ला तिच्या पूर्व जन्माविषयी सर्व सांगितले. ते सर्व ऐकून ती स्त्री आणि अविज्ञात तिथून निघाले आणि आपल्या नगरात परत आले आणि सुखाने राहू लागले. 
बहिर ऋषींनी नारदांना विचारले महाराज ही काय कथा आहे मला काही बोध झाला नाही. नारद म्हणाले मुनीवर हा पुरंजन आणि अविज्ञात म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा आहेत. सुरूवातीला हे मित्र एकत्र असतात. पुढे जीवात्मा परमात्म्याला सोडून जातो. तो वेगवेगळ्या योनींमधून प्रवास करत शेवटी मनुष्य योनीच्या नऊ द्वारे असलेल्या शरीरात प्रवेश करतो. त्यातली खालची दोन द्वारे म्हणजे लिंग आणि गुदद्वार. वरती जी सात दारे आहेत त्यात दोन डोळे, दोन कान, दोन नासिका आणि एक तोंड येते. बुद्धी ही त्यात निवास करणारी पुरंजनी होय. कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये हे तिचे दास दासी तिच्या तालावर नाचतात. पंचमुखी सर्प म्हणजे पंच तन्मात्रा जे पंच ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत. या बुद्धी मध्ये जीवात्मा आसक्त होतो आणि तो या नवद्वाराच्या मानव शरीर रूपी प्रासादात अडकतो. जरा म्हणजे वृद्धापकाळ. चाळिशीनंतर जरा या प्रासादावर साद देऊ लागते. एखादा केस पांढरा होतो, कुठे सुरकुत्या दिसू लागतात. जीवात्म्याला हे आवडत नाही. ही जरा जेंव्हा तिच्या भावाकडे म्हणजे काळाकडे जाते तेंव्हा तो भाऊ ३६५ गोरे आणि ३६५ काळे सैनिक पाठवतो. हे सैनिक म्हणजे ३६५ दिवस आणि रात्र. हे सतत हल्ला करत राहतात. मनुष्य शरीराची डागडुजी करत राहतो पण म्हातारपण काही टळत नाही. शेवटी जरा देहाचा ताबा घेते. जीवात्मा काम बुद्धी च्या चिंतनात म्हणजे पुरंजनीच्या चिंतनात अखेर देह सोडतो, तो अविज्ञाताला म्हणजे परमात्म्याला विसरतो.  कामनेप्रमाणे जन्म या न्यायाने पुढील जन्म प्राप्त होतो. पुढे कुठल्या तरी संतांच्या आशिर्वादाने अविज्ञात मदतीला येतो. संतांची वचने, सत्कर्मे काही ना काही करून तो पुरंजनाला त्याच्या मूळ स्वरूपाची आठवण देत राहतो. अखेरीस जन्म, जरा आणि मृत्यु या चक्रातून पुरंजन रूपी जीवात्म्याची सुटका होते आणि त्याचे आणि परमात्म्याचे म्हणजे अविज्ञाताचे मिलन होते.
इथे भगवंत म्हणतात ज्याचे अंतःकरण त्याच्या ताब्यात आले तो मनाने सर्व कामनांचा आणि कर्मांचा त्याग करतो.

5.14

न कर्तृत्वं(न्) न कर्माणि, लोकस्य सृजति प्रभुः।
न कर्मफलसंयोगं(म्), स्वभावस्तु प्रवर्तते॥5.14॥

परमेश्वर मनुष्यांचे कर्तेपण, कर्में किंवा कर्मफलांशी संयोग उत्पन्न करीत नाही; तर प्रकृतीच खेळ करीत असते.

एकदा एक मोठा उद्योजक होता. त्याचे नाना प्रकारचे खूप उद्योग होते. आपल्या असंख्य उद्योगांवर देखरेख करण्यासाठी त्याने व्यवस्थापन केलेले होते. वर्षभर तो निरनिराळ्या उद्योगांना भेटी देत असे आणि तिथला कारभार योग्य पद्धतीने चालला आहे ना याची खातरजमा करून घेत असे. एकदा असाच तो आपल्या एका उद्योग संस्थेच्या भेटीसाठी गेला. त्याला पाहून तिथे काम करणारा एक कामगार आपली तक्रार घेऊन त्याच्याकडे आला. तो त्याला म्हणाला साहेब, मी माझ्या कामामध्ये खूप मेहनत घेतो तरीही गेले काही महिने मला कमी पगार मिळतो आहे. त्याच कामासाठी माझ्या मित्राला मात्र माझ्यापेक्षा जास्त मोबदला मिळतो, हे कसे. त्यावर उद्योजक त्याला म्हणाला, तुला काम काय द्यावे, तुझा पगार किती, तुला सुट्ट्या किती द्याव्यात, पैसे किती आणि कसे कापावेत या गोष्टी ठरवण्यासाठी मी 'दैनंदीन कारभार, मनुष्यबळ, आर्थिक व्यवहार' अशी वेगवेगळी खाती नेमली आहेत. त्या खात्यांनी त्यांच्या कामाचे नियम ठरवले आहेत. सर्व गोष्टी या ठरलेल्या नियमांप्रमाणे होतात. यात मी हस्तक्षेप करत नाही.
याप्रमाणेच भगवंत म्हणतात की मी प्रकृतीच्या मदतीने एक सर्वंकष पद्धत तयार केलेली आहे. त्यानुसार प्रत्येकाला आपल्या कर्माप्रमाणे फळ मिळते. यात मी ढवळाढवळ करत नाही.

5.15

नादत्ते कस्यचित्पापं(न्), न चैव सुकृतं(म्) विभुः।
अज्ञानेनावृतं(ञ्) ज्ञानं(न्), तेन मुह्यन्ति जन्तवः॥5.15॥

सर्वव्यापी परमेश्वही कोणाचेही पापकर्म किंवा पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाही. परन्तु अज्ञानाने ज्ञान झाकलेले आहे. त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात.

ज्याप्रमाणे गंगामाता तिच्यात कोणी पापी स्नान करतो आहे का पुण्यवान हे पाहत नाही सर्वाना समान जल देते किंवा सूर्य पाप्याला प्रकाश देणार नाही आणि फक्त पुण्यवान माणसालाच प्रकाश देईन असे म्हणत नाही तद्वत भगवंत कोणाच्याही पाप पुण्याचा विचार करत नाहीत. 
ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान. कोणाला आपण ज्ञान देऊ शकतो, अज्ञान देऊ शकत नाही. तसेच प्रकाश दानासाठी दिवा लावतात, अंधार करण्यासाठी कुठले उपकरण नसते. अंधाराला स्वतःचे अस्तित्व नसते. प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार. ढग जसे सूर्याला झाकतात तसे अज्ञानाने ज्ञान झाकलेले असते.

5.16

ज्ञानेन तु तदज्ञानं(म्), येषां(न्) नाशितमात्मनः।
तेषामादित्यवज्ज्ञानं(म्), प्रकाशयति तत्परम्॥5.16॥

परन्तु ज्यांचे ते अज्ञान परमात्मज्ञानाने नाहीसे झाले आहे, त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानन्दघन परमात्म्याला प्रकाशित करते.

मन आणि बुद्धी भगवंताला अर्पण केली की मनुष्य परमात्म्यात स्थिर होतो. वेदान्तामध्ये ज्ञान देण्याची परंपरा नाही तर अज्ञान निवारण करण्याची परंपरा आहे.

5.17

तद्बुद्धयस्तदात्मान:(स्), तन्निष्ठास्तत्परायणाः।
गच्छन्त्यपुनरावृत्तिं(ञ्), ज्ञाननिर्धूतकल्मषाः॥5.17॥

ज्यांचे मन व बुद्धि तद्रूप झालेली आहे आणि सच्चिदानन्दघन परमात्म्यांतच ज्यांचे नित्य ऐक्य झाले आहे, असे ईश्वरपरायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परम गतीला प्राप्त होतात.

5.17 writeup

5.18

विद्याविनयसम्पन्ने, ब्राह्मणे गवि हस्तिनि।
शुनि चैव श्वपाके च, पण्डिताः(स्) समदर्शिनः॥5.18॥

ते ज्ञानी पुरुष विद्या व विनय यांनी युक्त असलेला ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीनेच पाहातात.

समदर्शन म्हणजे समत्व वृत्तीने पाहणे. याचा अर्थ समवर्तन असा मात्र होत नाही. ब्राह्मणाला आणि कुत्र्याला भूक निवारणाच्या समदृष्टीने पाहणे एक गोष्ट आहे. पण पोळी खायला घालताना ब्राह्मणाला आपल्या पंक्तीला बसवून आपण जेवण देतो तर कुत्र्याला दाराबाहेर पोळी घालतो. इथे वर्तनात फरक आहे. सर्वांभूती परमेश्वर ही समदृष्टी आहे. पण आई, पत्नी आणि मुलगी यांच्याबरोबरचा आपला व्यवहार म्हणून एकसारखा नसतो. प्रेम सर्वांवर असते पण व्यवहार करताना या सर्वांबरोबर वेगळाच करावा लागतो. 

5.19

इहैव तैर्जितः(स्) सर्गो, येषां(म्) साम्ये स्थितं(म्) मनः।
निर्दोषं(म्) हि समं(म्) ब्रह्म, तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः॥5.19॥

ज्यांचे मन समभावात स्थिर झाले, त्यांनी या जन्मीच संपूर्ण संसार जिंकला. कारण सच्चिदानंदघन परमात्मा निर्दोष आणि सम आहे. म्हणून ते सच्चिदानन्दघन परमात्म्यातच स्थिर असतात.

काही लोकांना मृत्यु पश्चात मोक्ष मिळेल असे वाटते. भगवंत म्हणतात मोक्षासाठी मृत्यु ची आवश्यकता नाही तो मन स्थिर करून आत्ता आणि इथेच मिळवता येतो. 

5.20

न प्रहृष्येत्प्रियं(म्) प्राप्य, नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम्।
स्थिरबुद्धिरसम्मूढो, ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः॥5.20॥

जो पुरुष प्रिय वस्तु मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असना उद्विग्न होत नाही, तो स्थिर बुद्धि असलेला संशयरहित ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चिदानन्दघन परब्रह्म परमात्म्यात ऐक्यभावाने नित्य स्थित असतो.

साधनात किती प्रगती झाली आहे ते तपासायचे असेल तर भगवंतांनी इथे सांगितलेल्या कसोटीचा वापर करता येईल. प्रिय वस्तू प्राप्त होण्याने जो आनंदीत होत नाही आणि अप्रिय घडले तर दुःखात बुडत नाही त्याची बुद्धी स्थिर झाली असे भगवंत सांगतात. 
सर्व पांडव धर्माने वागणारे होते पण फक्त युधिष्ठीरालाच धर्मराज म्हणतात. महाभारतात एक कथा आहे. एकदा पांडव वनातून चालले होते. त्यांना खूप तहान लागली होती. वाटेत त्यांना एक तलाव दिसला. ते सर्वजण तलावाकडे पाणी पिण्यास गेले. एका यक्षाकडे त्या तलावाची मालकी होती. पांडवांना तिथे आलेले पाहून तो यक्ष प्रकट झाला आणि म्हणाला तुम्हाला जर या तलावाचे पाणी प्यायचे असेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. त्यानंतरच मी तुम्हाला पाणी पिऊ देईन. उत्तरे न देता पाणी प्याल तर तुम्हास मृत्यु येईल. सहदेव, नकुल, भीम आणि अर्जुन कोणासही यक्षाची ही मागणी मान्य नव्हती. यक्षाच्या परवानगी शिवाय त्याच्या प्रश्नांची उत्तरे न देताच हे चारही भाऊ पाणी प्यावयास गेले आणि तात्काळ मृत्युस प्राप्त झाले. आता युधिष्ठिर पुढे आला. त्याच्या चारही भावांचा मृत्यु झाला होता, त्याची तहानही शामली नव्हती. यक्षाच्या परवानगीखेरीज पाणी पिता येणार नव्हते.  या परिस्थितीत युधिष्ठिर डगमगला नाही, तो शांत राहिला, उद्विग्न झाला नाही. त्याने शांत चित्ताने यक्षाच्या शंभर प्रश्नांची उत्तरे दिली. यक्ष प्रसन्न झाला तो म्हणाला हे युधिष्ठिर, तुझ्या उत्तरांवर मी खूष झालो आहे. तुझ्या कुठल्याही एका भावाला मी जीवन दान देतो. तू सांग मी कोणाला जिवंत करू. अशा प्रसंगी साधारण मनुष्याने व्यवहार्य विचार केला असता आणि जे सर्वात ताकतवान होते अशा भीम आणि अर्जुन यांपैकी कोणालातरी जिवंत करा असे विनवले असते. पण युधिष्ठिराने तसे केले नाही. त्याने यक्षाकडे सहदेवाचे प्राण मागितले. यक्ष या मागणीने आश्चर्यचकित झाला. त्याने याचे कारण विचारले. यावर युधिष्ठिर म्हणाला, महाराज माझ्या दोन माता आहेत. मी कुंती मातेचा पुत्र आहे. माद्री मातेचे दोन्ही पुत्र मृत झाले आहेत. माद्री मातेने तिच्या पुत्रांना विश्वासाने माझ्या हवाली केले होते. तिचा एक तरी पुत्र जिवंत असावा असे मला वाटते म्हणून मी सहदेवासाठी जीवदान मागितले. हे ऐकून यक्ष प्रसन्न झाला आणि त्याने चारही पांडवांना जीवदान दिले.
या प्रसंगात विचार करण्यासारखी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आहे की आलेल्या संकटाने युधिष्ठिर डगमगले नाहीत, उद्विग्न झाले नाहीत आणि अत्यंत स्थिर बुद्धीने विचार करू शकले म्हणून त्यांना धर्मराज म्हणतात.

5.21

बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा, विन्दत्यात्मनि यत्सुखम्।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा, सुखमक्षयमश्नुते॥5.21॥

ज्याच्या अन्तः करणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते, असा साधक आत्म्यात असलेल्या, ध्यानामुळे मिळणाऱ्या सात्विक आनंदाला प्राप्त होतो. त्यानंतर तो सच्चिदानन्दघन परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगात ऐक्यभावाने स्थिति असलेला पुरुष अक्षय आनन्दाचा अनुभव घेतो.

इथे ध्यान लावणे म्हणजे भगवंतामध्ये ध्यान लावणे असा अर्थ होत नाही. भगवंत आपल्या आंत आहेतच. पण ते विषयांच्या, इच्छांच्या, कामनांच्या आवरणाने झाकले आहेत. या आवरणांवरून ध्यान हटले की ते आपोआप भगवंतापाशी लीन होईल. जसे आपण कपडा साफ करू शकत नाही, तो साफच असतो, आपण त्यावरील मळ दूर करू शकतो तसेच विषयांचे आवरण दूर केले तर भगवंत आपल्या जवळच आहे.

5.22

ये हि संस्पर्शजा भोगा, दुःखयोनय एव ते।
आद्यन्तवन्तः(ख्) कौन्तेय, न तेषु रमते बुधः॥5.22॥

जे हे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग आहेत, ते जरी विषयी पुरुषांना सुखरुप वाटत असले, तरी तेही दुःखालाच कारण होणारे आणि अनित्य आहेत. म्हणून हे अर्जुना! बुद्धिमान विवेकी पुरुष त्यांत रमत नाहीत.

तीन प्रकारची दुःखे आहेत. एक इंद्रियसंयोगाने होणाऱ्या परिणामाने होणारे दुःख. इंद्रियांमुळे फक्त सुखच मिळते असे नव्हे तर त्याच्या बरोबर परिणामस्वरूप दुःख देखील पदरात पडते. दुसरे म्हणजे दुसऱ्याचे सुख पाहून होणारे दुःख आणि तिसरे भूतकाळातील सुखाच्या आठवणीने होणारे दुःख. माणसे वृद्धापकाळी तारुण्याच्या आठवणीत रमतात, हळहळतात. पण विवेकी मनुष्य या तीनही प्रकारच्या दुःखांपासून दूर राहतो.

5.23

शक्नोतीहैव यः(स्) सोढुं(म्), प्राक्शरीरविमोक्षणात्।
कामक्रोधोद्भवं(म्) वेगं(म्), स युक्तः(स्) स सुखी नरः॥5.23॥

जो साधक या मनुष्यशरीरात शरीर पडण्याआधीच काम - क्रोधामुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो, तोच योगी होय व तोच सुखी होय.

भगवंत म्हणतात विकार वाईट नसतात. त्यांची आसक्ती, आवेग वाईट असतो. जिलबी खावीशी वाटली आणि ती मिळाली तर जरूर खावी. पण जिलबी खावीशी वाटली आणि ती मिळत नसेल तर ती येनकेन प्रकारेण मिळावी म्हणून सर्व सोडून त्याच्या मागे लागणे हे वाईट आहे. याने मनुष्य त्यात गुंततो आणि नाश ओढवतो. संत म्हणतात विकार जर काबूत असतील तर ते अलंकारांसारखे शोभून दिसतात. विकारांची जीवनात आवश्यकता असते. पण त्यांच्या आवेगात अडकाल तर फसाल. आवेग आवरणे ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे.

5.24

योऽन्तःसुखोऽन्तरारामः(स्), तथान्तर्ज्योतिरेव यः।
स योगी ब्रह्मनिर्वाणं(म्), ब्रह्मभूतोऽधिगच्छति॥5.24॥

जो पुरुष अन्तरात्म्यातच सुखी, आत्म्यातच रमणारा आणि आत्म्यातच ज्ञान मिळालेला असतो, तो सच्चिदानन्दघन परब्रह्म परमात्म्यासह ऐक्यभावाला प्राप्त झालेला सांख्ययोगी शान्त ब्रह्माला प्राप्त होतो.

5.24 writeup

5.25

लभन्ते ब्रह्मनिर्वाणम्, ऋषयः क्षीणकल्मषाः।
छिन्नद्वैधा यतात्मानः(स्), सर्वभूतहिते रताः॥5.25॥

ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले आहे, ज्यांचे सर्व संशय ज्ञानामुळे फिटले आहेत, जे प्राणिमात्राच्या कल्याणात तत्पर आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन निश्चलपणे परमात्म्यात स्थिर असते, ते ब्रहमवेत्ते शान्त ब्रह्माला प्राप्त होतात.

एका सुंदर भजनाचा दाखला इथे दिला आहे. संदर्भ: https://drive.google.com/file/d/1-T0ipZN69-k4WTn1hS8r1x8xvYWsfzOy/view?usp=sharing
हे अत्यंत सुंदर भजन परमश्रद्धेय प्रतिकजी महाराजांचे आहे. 

5.26

कामक्रोधवियुक्तानां(म्), यतीनां(म्) यतचेतसाम्।
अभितो ब्रह्मनिर्वाणं(म्), वर्तते विदितात्मनाम्॥5.26॥

काम - क्रोध मावळलेले, मन जिंकलेले, परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करुन घेतलेले जे ज्ञानी पुरुष असतात, त्यांना सर्व बाजूंनी शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्ण असतो.

5.26 writeup

5.27

स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्, चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः।
प्राणापानौ समौ कृत्वा, नासाभ्यन्तरचारिणौ॥5.27॥

बाहेरच्या विषयभोगांचे चिन्तन न करता ते बाहेरच ठेवून, दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करुन तसेच नाकातून वाहणारे प्राण व अपान सम करुन,

5.27 writeup

5.28

यतेन्द्रियमनोबुद्धि:(र्), मुनिर्मोक्षपरायणः।
विगतेच्छाभयक्रोधो, यः(स्) सदा मुक्त एव सः॥5.28॥

ज्याने इंद्रिये, मन व बुद्धि जिंकली आहेत, असा मोक्षतत्पर मुनी इच्छा, भय आणि क्रोध यांनी रहित झाला की, तो सदोदित मुक्तच असतो.

भगवंताने सहाव्या अध्यायात ध्यानयोगाविषयी सांगितले आहे. इथे त्याची भूमिका तयार करतात. भगवंत इथे म्हणतात ध्यानासाठी बाहेरील सर्व विषयांचा त्याग करून, दृष्टी भृकुटी मध्यावर स्थिर करून, नाकाद्वारे वाहणारे प्राण आणि अपान वायू सम करावेत. ध्यानाची अशी थोडक्यात तोंडओळख इथे करून देतात. पुढील अध्यायात याचे सविस्तर वर्णन आले आहे.

5.29

भोक्तारं(म्) यज्ञतपसां(म्), सर्वलोकमहेश्वरम्।
सुहृदं(म्) सर्वभूतानां(ञ्), ज्ञात्वा मां(म्) शान्तिमृच्छति॥5.29॥

माझा भक्त मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोक्ता, सर्व लोकांच्या ईश्वरांचाही ईश्वर, प्राणिमात्रांचा सुह्रद अर्थात स्वार्थरहित दयाळू आणि प्रेमी, असे तत्वतः समजून शांतीला प्राप्त होतो.

राम चरित मानस मधील सुंदर ओळींचा संदर्भ इथे दिला आहे.
जननी जनक बंधू सूत दारा ।
तनु धनु भवन सुहृद परिवारा ।।
सबकी ममता ताग बटोरी  । 
मम पद मनही बांधी वर डोरी ।।

जननी, जनक, बंधू, सूत, दारा, तन, धन, भवन, मित्र, परिवार अशा दहा ठिकाणी आपले ममत्व असते. इथे मन गुंतते. कोणाचे आई, वडिलांमध्ये तर कोणाचे पत्नी व मुलामध्ये, कोणाचे संपत्ती मध्ये, घरामध्ये तर कोणाचे परिवारामध्ये ममत्व असते. तुळसीदासजी म्हणतात या सर्व ममत्वाच्या दोऱ्यांचे पेड करून एकत्र बांधा आणि ती एक दोरी भगवंताच्या चरणी अर्पण करा म्हणजे ममत्व आपोआप सुटेल.
इथे आजचे विवेचन पूर्ण झाले. यानंतर एक मिनिटाच्या नाम संकीर्तनानंतर सत्राची सांगता झाली.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।