विवेचन सारांश
त्रिगुणांचा प्रभाव आणि गुणातीताची लक्षणे

ID: 3950
मराठी
रविवार, 05 नोव्हेंबर 2023
अध्याय 14: गुणत्रयविभागयोग
2/2 (श्लोक 9-27)
विवेचक: गीता प्रवीण कविता जी वर्मा


दीपप्रज्वलन करून विवेचन सत्राची सुरुवात झाली. गुरु परंपरेला वंदन करून गीता ध्यानाने विवेचनाला प्रारंभ झाला.
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्।
देवकीपरमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुम्॥
सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम्।
अस्मदाचार्य पर्यन्तां वन्दे गुरु परम्पराम्॥
ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं
व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्।
अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीं
अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्॥
भगवान श्रीकृष्ण आणि सद्गुरूंना वंदन करून विवेचनास आरंभ करण्यात आला.

भगवद्गीतेच्या या गुणत्रयविभागयोग नामक चौदाव्या अध्यायाच्या मागील सत्रात आपण पाहिले की भगवंत अर्जुनाला सत्त्व, रज आणि तम या तीन गुणां विषयीचे ज्ञान देत आहेत. 

आता कुणालाही हा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे की या ज्ञानाची आपल्याला काय आवश्यकता आहे? ज्या कुणाला त्याच्या आयुष्यात डॉक्टर, इंजिनिअर, वकील असं जे काही बनायचं असतं त्याचे आवश्यक ते ज्ञान मिळवण्यासाठी तो त्या त्या विद्याशाखेत प्रवेश घेतो. त्रिगुणांचे ज्ञान त्यासाठी आवश्यक आहे का?

मनुष्याने जीवनात जरी कोणताही व्यवसाय निवडलेला असला तरी त्या व्यवसायात आणि एकूणच जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर हे ज्ञान अत्यावश्यक आहे. जीवनात नायक तोच बनू शकतो ज्याच्याकडे सोळाव्या अध्यायात सांगितलेल्या दैवी संपत्तीचा संचय आहे.
अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः ।
दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्‌ ॥ १६-१ ॥
भयाचा संपूर्ण अभाव, अंतःकरणाची पूर्ण निर्मळता, तत्त्वज्ञानाकरता ध्यानयोगात निरंतर दृढ स्थिती आणि सात्त्विक दान, इंद्रियांचे दमन, भगवान, देवता आणि गुरुजनांची पूजा, तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्मांचे आचरण, त्याचप्रमाणे वेदशास्त्रांचे पठन-पाठन, भगवंतांच्या नामांचे व गुणांचे कीर्तन, स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे आणि शरीर व इंद्रियांसह अंतःकरणाची सरलता…
अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम्‌ ।
दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्‌ ॥ १६-२ ॥
काया-वाचा-मनाने कोणालाही कोणत्याही प्रकाराने दुःख न देणे, यथार्थ व प्रिय भाषण, आपल्यावर अपकार करणाऱ्यावरही न रागावणे, कर्मांच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग, अंतःकरणात चंचलता नसणे, कोणाचीही निंदा वगैरे न करणे, सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी निर्हेतुक दया, इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणे, कोमलता, लोकविरुद्ध व शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा, निरर्थक हालचाली न करणे…
तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता ।
भवन्ति सम्पदं दैवीमभिजातस्य भारत ॥ १६-३ ॥
तेज, क्षमा, धैर्य, बाह्य शुद्धी, कोणाविषयीही शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे –
हे भारता! (अर्थात भरतवंशी अर्जुना), दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची ही सर्व लक्षणे आहेत.

ज्यांच्याकडे या दैवी संपत्ती ऐवजी आसुरी संपत्तीचा संचय असतो ते खलनायक मानले जातात. अर्जुन हा नायक आहे. त्याच्याकडे या दैवी संपत्तीचा संचय आहे. त्याला यशस्वी बनण्यासाठी हे ज्ञान आवश्यक होते म्हणून भगवंत त्याला आणि त्याच्या निमित्ताने आपल्यालाही हे ज्ञान देत आहेत.

14.9

सत्त्वं(म्) सुखे सञ्जयति, रजः(ख्) कर्मणि भारत।
ज्ञानमावृत्य तु तमः(फ्), प्रमादे सञ्जयत्युत॥14.9॥

हे अर्जुना! सत्त्वगुण सुखाला, रजोगुण कर्मांना तसेच तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमाद करण्याला ही प्रवृत्त करतो.

हे त्रिगुण जीवावर कसे प्रभुत्व गाजवतात ते भगवंत आता सांगत आहेत. सत्त्वगुण जीवाला सात्त्विक सुखामध्ये आसक्त करतो, रजोगुण कर्मामध्ये आसक्त करतो व ज्याप्रमाणे आकाशात ढग सूर्याला झाकतो तसा तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमाद करण्यामध्ये आसक्त करतो. असे हे त्रिगुण जीवावर प्रभुत्व गाजवतात. 

14.10

रजस्तमश्चाभिभूय, सत्त्वं(म्) भवति भारत।
रजः(स्) सत्त्वं(न्) तमश्चैव, तमः(स्) सत्त्वं(म्) रजस्तथा॥14.10॥

आणि हे अर्जुना! रजोगुण आणि तमोगुण यांना दडपून सत्त्वगुण वाढतो. सत्त्वगुण व तमोगुणाला दडपून रजोगुण वाढतो. तसेच सत्त्वगुण व रजोगुणाला दडपून तमोगुण वाढतो.

आता हे त्रिगुण एकत्रितपणे जीवावर प्रभुत्व गाजवतात का? जरी व्यष्टी आणि समष्टी त्रिगुणात्मक असले तरीही जीवामध्ये इतर दोन गुणांना दडपून तिसरा गुण प्रभावी होत असतो, त्यामुळे फक्त एकच प्रबळ गुण विशेषत्वाने दिसू शकतो किंवा ओळखता येऊ शकतो आणि त्या व्यक्तीला तो गुण प्रधान असलेली व्यक्ती असे म्हणतात. त्या व्यक्तीची प्रवृत्ती त्या गुणाला अनुसरून होत असते.

रामायणातील सुंदरकांडामधील एका कथानकात हनुमंतांची परीक्षा घेण्यासाठी देवांनी सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांचे प्रतिनिधित्व करणारे मैनाक पर्वत, सुरसा आणि लंकिनी यांना हनुमंतांना अडविण्यासाठी सामोरे केले असता हनुमंतांनी त्यांच्यावर कसा विजय प्राप्त केला हे अतिशय सुंदर पद्धतीने सांगितले आहे.

हनुमंतांकडे सीतेच्या शोधासाठी समुद्र लंघून जायची शक्ती होती पण शापामुळे त्यांना त्या शक्तीचा विसर पडला होता. 
कवन सो काज कठिन जग माहि। जो नहीं होय तात तुम पाही॥
राम काज लगि तव अवतारा। सुनतहिं भयउ पर्बताकारा॥
कनक भूधराकार शरीरा। समर भयंकर अतिबल बीरा॥
असे बोलून जांबुवंतांनी हनुमंतांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून दिल्यावर हनुमंतांचे तेज जागृत झाले आणि त्यांनी आकाशात झेप घेतली. परंतु ते काम इतके सोपे नव्हते. समुद्र लंघून जात असताना समुद्रातून मैनाक पर्वत प्रगट झाला आणि म्हणाला,
जलनिधि रघुपति दूत बिचारी। तैं मैनाक होहि श्रम हारी॥
मैनाक पर्वत हे हनुमंताचे वडील पवनदेवांचे मित्र होते. ते हनुमंतांना म्हणाले, "हे वीर हनुमान तुम्ही पवनपुत्र आहात आणि पवन माझा मित्र आहे. थोडे थांबा. थोडी विश्रांती घ्या, जलपान करा आणि मग मार्गस्थ व्हा." आता मैनाक हनुमंतांना विश्रांती घेण्याची विनंती करत होते. ते सत्त्वगुणी होते. विश्रांती घेऊन पुढे मार्गस्थ व्हायला सांगत होते. यांना नाही कसे म्हणावे. पण भगवत्कार्यात सत्त्वगुण जरी समोर आडवा आला तरी त्याची बाधा बनता काम नये हे हनुमंत जाणत होते. मग हनुमंतांनी काय केले? तर ते मैनाक पर्वताला प्रदक्षिणा घालून प्रणाम करून म्हणाले,
सम्भल हनुमान तेहि परसा कर पुनि कीन्ह प्रनाम।
राम काजु कीन्हें बिनु मोहि कहां विश्राम॥
रामाचे काम केल्याशिवाय मी विश्रांती घेऊ शकत नाही.

आता देवतांना हनुमंताच्या शक्ती आणि युक्तीची  परीक्षा घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी नागांची माता सुरसा हिला पाठवले.
जात पवनसुत देवन्ह देखा। जानैं कहुँ बल बुद्धि बिसेषा॥
सुरसा नाम अहिन्ह कै माता। पठइन्हि आइ कही तेहिं बाता॥
रजोगुणाचे प्रतीक असलेली सुरसा गडगडाटी हास्य करून म्हणाली, 
आजु सुरन्ह मोहि दीन्ह अहारा। सुनत बचन कह पवनकुमारा॥
"वा! आज मला उत्तम आहार मिळाला आहे."
हे ऐकून हनुमंतांनी तिला समजावले,
राम काजु करि फिरि मैं आवौं। सीता कइ सुधि प्रभुहि सुनावौं॥
"मी हे रामाचे काम करून येतो, सीतेबद्दलची माहिती त्यांना सांगतो आणि मग तू मला खा".
सुरसा रजोगुणाचे प्रतीक आहे. रजोगुण बाधा आणतो. मैनाक पर्वत सत्त्वगुणी होता, त्याने बाधा आणली नाही. पण रजोगुण युक्तीवाद करतो, मग त्याला त्याच प्रकारे उत्तर द्यावे लागते. सुरसा काही मागे हटण्यास तयार नव्हती.  हनुमंतांनी आपल्या मुखात प्रवेश केलाच पाहिजे असा तिने हट्ट धरला आणि हनुमंतांना आपल्या मुखात सामावून घेण्यासाठी आपले शरीर मोठे केले. 
कवनेहुँ जतन देइ नहिं जाना। ग्रससि न मोहि कहेउ हनुमाना॥
मग हनुमंतांनी सुद्धा आपले शरीर तिच्या दुप्पट केले.
जोजन भरि तेहिं बदनु पसारा। कपि तनु कीन्ह दुगुन बिस्तारा॥
सोरह जोजन मुख तेहिं ठयऊ। तुरत पवनसुत बत्तिस भयऊ॥
सुरसेने आपली शरीर सोळा योजने वाढवले तेव्हा हनुमंतांनी आपले शरीर बत्तीस योजने मोठे केले.
जस जस सुरसा बदनु बढ़ावा। तासु दून कपि रूप देखावा॥
जसे सुरसे आपले शरीर वाढवत होती, हनुमंत आपले शरीर त्याच्या दुप्पट वाढवत होते. पण शब्दाने शब्द वाढवत नेणे याला काही अंत नसतो. किती काळ युक्तिवादात अडकायचे हे समजणे आवश्यक आहे. कोठे थांबायचे हे समजायला हवे. हनुमंतांनी आता चातुर्य दाखवले. 
सत जोजन तेहिं आनन कीन्हा। अति लघु रूप पवनसुत लीन्हा॥
जेव्हा सुरसेने आपले मुख शंभर योजने एवढे वाढवले तेव्हा हनुमंतांनी एकदम छोटे रूप धारण केले.
बदन पइठि पुनि बाहेर आवा। मागा बिदा ताहि सिरु नावा॥
मोहि सुरन्ह जेहि लागि पठावा। बुधि बल मरमु तोर मै पावा॥
त्यांनी तिच्या मुखात प्रवेश केला आणि पटकन बाहेर आले. त्यांनी अशा प्रकारे सुरसेच्या मुखात प्रवेश करण्याची तिची इच्छा पूर्ण केली आणि त्यांनी सुरसेच्या रजोगुणी वृत्तीला, युक्तिवादाला रजोगुणानेच उत्तर दिले. बाहेर येऊन त्यांनी तिला मस्तक लवून वंदन केले आणि जाऊ देण्याची विनंती करू लागले. ते तिला म्हणाले, "माते, तुझ्या इच्छेनुसार मी तुझ्या मुखात प्रवेश केला आता मला जाऊ दे." 
राम काजु सबु करिहहु तुम्ह बल बुद्धि निधान।
आसिष देह गई सो हरषि चलेउ हनुमान॥
हनुमंतांच्या शक्ती आणि युक्तीची परीक्षा घेऊन सुरसा प्रसन्न झाली. त्यांची कामावरची निष्ठा पाहून तिने त्यांना आशीर्वाद देऊन पुढे जाण्यास सांगितले.

अशाप्रकारे सत्त्वगुणाला सत्त्वगुणाने आणि रजोगुणाला रजोगुणाने जिंकून हनुमंत पुढे निघाले. हनुमंतांनी उड्डाण केले आणि पुढचा प्रवास सुरु केला.

आता तमोगुणाचे प्रतीक असलेल्या एका राक्षसीशी त्यांची गाठ पडली. त्यांच्या लक्षात आले आपण हवेत उडतो तर आहोत पण आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यांनी खाली वाकून बघितले तर त्यांना एक राक्षसी दिसली. ती हवेतून उडणाऱ्या पक्ष्यांची सावली धरत असे. सावली धरल्यावर उडणारा जीव खाली पडे आणि मग ती राक्षसी त्याला खाई.
निसिचरि एक सिंधु महुँ रहई। करि माया नभु के खग गहई।।
जीव जंतु जे गगन उड़ाहीं। जल बिलोकि तिन्ह कै परिछाहीं॥
आता ही राक्षसी म्हणजे मूर्तिमंत तमोगुण होती. सत्त्वगुणीला समजावता येते. रजोगुणीशी युक्तिवाद करता येतो. इथे यातले काहीच चालणार नव्हते.
सोइ छल हनूमान कहँ कीन्हा। तासु कपटु कपि तुरतहिं चीन्हा॥
ताहि मारि मारुतसुत बीरा। बारिधि पार गयउ मतिधीरा॥
अशा तमोगुणी राक्षसीशी हनुमंताने काहीही वार्तालाप केला नाही. त्यांनी तिला एक ठोसा मारला, गारद केले आणि ते पुढे निघाले. तमोगुणापुढे शक्ती आणि युक्ती खर्च करण्यात काही अर्थ नसतो, त्याकडे दुर्लक्षच करावे लागते.

अशाप्रकारे सत्त्वगुणाला प्रणाम करून, रजोगुणामध्ये फसून न जाता त्याला रजोगुणानेच जिंकून आणि तमोगुणाचे दमन करून हनुमंत समुद्र लंघून पुढे गेले आणि लंकेच्या द्वारावर पोहोचले. हनुमंतांनी मच्छरासारखे छोटे रुप धरण केले आणि नरदेहधारी प्रभू रामचंद्रांचे स्मरण करुन ते लंकेच्या द्वारापाशी आले. 
मसक समान रूप कपि धरी। लंकहि चलेउ सुमिरि नरहरी॥
नाम लंकिनी एक निसिचरी। सो कह चलेसि मोहि निंदरी॥
द्वारावर लंकिनी नावाची राक्षसी दाराचे रक्षण करण्यासाठी उभी होती. तिने हनुमंतांना छोटे रूप धारण करून पुढे जाण्याबद्दल जाब विचारला.
जानेहि नहीं मरमु सठ मोरा। मोर अहार जहाँ लगि चोरा॥
हे मूर्ख! तू मला ओळखले नाहीस. इथे येणारे सर्व चोर माझा आहार आहेत.
मुठिका एक महा कपि हनी। रुधिर बमत धरनीं ढनमनी॥
महाकपि हनुमंतांनी तिच्या मुखावर मुष्टीप्रहार केल्याबरोबर ती रक्ताची उलटी करून जमिनीवर  पडली. 
पुनि संभारि उठि सो लंका। जोरि पानि कर बिनय संसका॥
मुखातून रक्त येऊ लागल्यावर तिने उठून उलटा प्रहार केला नाही. मोठ्या मुश्किलीने ती राक्षसी उठली आणि तिने हनुमंतांना प्रणाम केला. हनुमंतांना मोठे आश्चर्य वाटले. तेव्हा त्या राक्षसीने सांगितले की,
जब रावनहि ब्रह्म बर दीन्हा। चलत बिरंचि कहा मोहि चीन्हा॥
“ब्रह्मदेव जेव्हा रावण आणि कुंभकर्ण यांना वरदान देऊन जात होते तेव्हा मी त्यांना विचारले की तुम्ही या राक्षसांना वरदान देऊन जात आहात. परंतु यांचा अंत कसा होईल?  भगवंत अवतार घेऊन राक्षसांचा संहार करतील असे ब्रह्मदेवांनी सांगितले होते. त्या संहाराची वेळ आली आहे हे मला कसे समजेल असा प्रश्न मी ब्रह्मदेवांना केला होता. तेव्हा प्रभूंचा वानर दूत येईल तेंव्हा तुला समजेल असे त्यांनी मला सांगितले होते.
बिकल होसि तैं कपि कें मारे। तब जानेसु निसिचर संघारे॥
तात मोर अति पुन्य बहूता। देखेउँ नयन राम कर दूता॥
“जेव्हा एका त्या मर्कटाच्या प्रहारामुळे तू घायाळ होशील तेव्हा समजून जा की या राक्षसांचा अंत जवळ आला आहे. मला या जन्मी प्रभूंचे दर्शन होणार नाही पण तरीही मी पुण्यवान आहे कारण मी तुझ्यासारख्या रामदूताचे दर्शन घेतले”.
ती पुढे म्हणाली,
तात स्वर्ग अपबर्ग सुख धरिअ तुला एक अंग।
तूल न ताहि सकल मिलि जो सुख लव सतसंग॥
“स्वर्ग आणि मोक्षाची सर्व सुखे तराजूच्या एका पारड्यात टाकली तरीही त्यांचे वजन दुसऱ्या पारड्यातील एक क्षण देखील मिळालेल्या संत संगतीच्या बरोबरीचे होऊ शकत नाही. 
प्रबिसि नगर कीजे सब काजा। हृदयँ राखि कोसलपुर राजा॥
“तुम्ही अयोध्या नरेश श्रीरामांना हृदयात ठेवून लंकेत प्रवेश करा तुमचे काम नक्की होईल”. 

अशा रीतीने सत्त्वगुणी मैनाक पर्वताला नमस्कार करुन, रजोगुणी सुरसेला युक्तिवादाने व बुद्धिबळाने तर तमोगुणी राक्षसीला प्रहाराने हरवून हनुमंत पुढे आले होते. लंकिनीमधे तीनही गुणांचे प्राबल्य होते. तिच्यावरही त्यांनी मात केली. त्यांना कार्यापासून परावृत्त करण्यासाठी देवांनी सात्त्विक, राजसी आणि तामसी अशी तीनही प्रलोभने ठेवली होती पण हनुमंत त्या प्रलोभनांना बळी न पडता परीक्षेत उत्तीर्ण झाले.

14.11

सर्वद्वारेषु देहेऽस्मिन्, प्रकाश उपजायते।
ज्ञानं(म्) यदा तदा विद्याद्, विवृद्धं(म्) सत्त्वमित्युत॥14.11॥

ज्यावेळी या देहात तसेच अंतःकरणात व इंद्रियांत चैतन्य आणि विवेकशक्ती उत्पन्न होते, त्यावेळी असे समजावे की, सत्त्वगुण वाढला आहे.

जेव्हा या देहात, अंतःकरणात व इंद्रियांत विवेकशक्तीरूपी प्रकाश उत्पन्न होतो, त्यावेळी असे समजावे की रजोगुण आणि तमोगुण यांना दडपून सत्त्वगुणाची वृद्धी होत आहे.

आयुष्यात आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत याबद्दल ज्याची धारणा निश्चित असते, त्याच्यात सत्त्वगुण प्रबळ असतो. ज्यावेळी आपल्या मनात, चित्तात आणि बुद्धीत विवेक शक्ती आणि चेतना जागृत होते तेव्हा असे निश्चित समजावे की आपला सत्त्वगुण प्रबळ झाला आहे. स्वतःसाठी काय उत्तम आहे, कोणती गोष्ट श्रेयस्कर आहे हे अशा व्यक्तीला समजते. 
विषादाने भ्रमित झालेल्या अर्जनाने दुसऱ्या अध्यायात भगवंतांना श्रेयस काय आहे हे सांगण्याची व उपदेश देण्याची विनंती केली होती.- 
कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः।
यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्॥
“करुणाव्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे आणि धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हाला विचारत आहे की जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे, ते मला सांगा कारण मी तुमचा शिष्य आहे. म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला उपदेश करा”.

आपल्या मनात भीती उत्पन्न झाली आहे हे अर्जुनाला कळले कारण त्याचा सत्त्वगुण प्रबळ होता. रजोगुणी आणि तमोगुणी व्यक्तींना तर हे कळणारही नाही.

आपल्या सर्वांची अवस्था 'कळतं पण वळत नाही' अशी असते. आपल्याला आपल्या बुद्धीकडून आणि देहाकडून धूम्रपान, मद्यपान अशा अनेक हानिकारक गोष्टी करण्याआधी त्या करू नये असे संकेत मिळत असतात.  तरीही आपण त्या करतोच. जेव्हा सत्त्वगुण प्रबळ होतो तेव्हा आपण तीच गोष्ट करतो, जी करणे आवश्यकच असते.

14.12

लोभः(फ्) प्रवृत्तिरारम्भः(ख्), कर्मणामशमः(स्) स्पृहा।
रजस्येतानि जायन्ते, विवृद्धे भरतर्षभ॥14.12॥

हे अर्जुना! रजोगुण वाढल्यावर लोभ, प्रवृत्ती, स्वार्थाने प्रेरित होऊन फळाच्या इच्छेने कर्मांचा आरंभ, अशांती आणि विषयभोगांची लालसा ही सर्व उत्पन्न होतात.

लोभ, त्या लोभाच्या पूर्तीसाठी कर्म करण्याची प्रवृत्ती, स्वार्थाने प्रेरित होऊन फळाच्या इच्छेने कर्मांचा आरंभ, त्यात काही अडथळे निर्माण झाले की अशांती आणि वासना हे दुर्गुण उत्पन्न झाले तर सत्त्वगुण आणि तमोगुण यांना दडपून रजोगुणाची वृद्धी होऊ लागली आहे असे समजावे. येथे भगवंतांनी लोभ, प्रवृत्ती, अशांती आणि वासना हा क्रमच स्पष्ट केला आहे.

सर्व विकारांमध्ये लोभ हा अतिशय त्रासदायक विकार आहे. हा विकार माणसांमध्ये सतत अस्तित्वात असतो. मनुष्याच्या लोभाला अंत नसतो. कितीही मिळाले तरी त्याची तृप्ती होत नाही. उलट तो वाढतच असतो. अति लाभ झाला असता अति लोभ निर्माण होतो. बहुतांश वेळा माणसाकडे येणारा पैसा जसजसा वाढतो तसतशी त्याची दानत कमीकमी होत जाते. ही एक सार्वत्रिक प्रवृत्ती आहे.
लोभ आणि मोह या दोन विकारांमधला फरक म्हणजे वस्तूमुळे जो होतो तो 'लोभ' आणि व्यक्तीमुळे जो होतो तो 'मोह'! जेव्हा आपल्याला स्वतःसाठी एखादी गोष्ट जेव्हा हवी असते तेव्हा त्याला लोभ म्हणतात. परंतु जेव्हा आपल्या माणसांसाठी एखादी गोष्ट हवी असते तेव्हा त्याला मोह म्हणतात. 'ज्या वस्तूला स्पर्श करेन ती वस्तू सोन्याची होईल' असा वर मागणाऱ्या मिडास राजाची गोष्ट सर्वांना ठाऊक असेल. सोन्याच्या लोभामुळे ज्या ज्या वस्तूला स्पर्श करत गेला आणि ती ती वस्तू सोन्याची झाली आणि शेवटी त्याने आपल्या मुलीला हात लावला तेव्हा तीही सोन्याची झाली. म्हणूनच अति लोभ अतिशय वाईट असतो! यासाठी आपली संस्कृती 'अति सर्वत्र वर्जयेत्।' अर्थात् सर्व ठिकाणी अतिरेक टाळावा अशी शिकवण देते.

माणसाला यशाचाही लोभ होतो. जोपर्यंत यशासाठी माणूस चांगले काम करण्यास प्रवृत्त होतो तोपर्यंत यशाचा लोभ वाईट नसतो. परंतु या लोभाचा अतिरेक झाला तर माणसाची चांगल्या फळाच्या प्राप्तीसाठीच काम करण्याची प्रवृत्ती होऊ लागते. यशाचा लोभ खूपच वाढला तर स्वतःलाच यश मिळाले पाहिजे, दुसऱ्याला यश मिळू नये अशीही तामसिक प्रवृत्ती होऊ शकते.  

माणसांमध्ये सहसा सत्तेचा लोभ, स्थावर मालमत्तेचा लोभ, पदाचा लोभ आणि स्त्रियांमध्ये दागिन्यांचा लोभ हे सर्वसामान्यपणे अनुभवास येतात. लोभामुळे मनुष्याचे पतन होते. लोभी वृत्तीच्या माणसाने सतत लोभ केल्यास लोभ ही त्याची प्रवृत्ती बनते आणि मग त्याचे प्रत्येक आचरण लोभी होते. लोभामुळे तो काहीही करण्यास प्रवृत्त होतो. असा लोभग्रस्त मनुष्य नेहमीच अशांत असतो. जितके अधिक मिळेल तितका माणूस बेचैन होत जातो. लोभाच्या अग्नीवर संतोषाचे पाणी टाकले तरच तो थंड होतो.

14.13

अप्रकाशोऽप्रवृत्तिश्च, प्रमादो मोह एव च।
तमस्येतानि जायन्ते, विवृद्धे कुरुनन्दन॥14.13॥

हे अर्जुना! तमोगुण वाढल्यावर अंतःकरण व इंद्रिये यांत अंधार, कर्तव्यकर्मांत प्रवृत्ती नसणे, व्यर्थ हालचाली आणि झोप इत्यादी अंतःकरणाला मोहित करणार्‍या वृत्ती, ही सर्व उत्पन्न होतात.

या श्लोकात भगवंतांनी तमोगुणी व्यक्तीचे वर्णन केले आहे. तमोगुणी मनुष्य आपल्या हितकर्त्याला ओळखत नाही. प्रत्येक काम टाळण्याकडे त्याची वृत्ती असते. आयुष्याचा वेळ तो अनुत्पादक कामे करण्यात व्यतीत करतो. याला प्रमाद म्हणतात.

अंतःकरण व इंद्रिये यांमध्ये अविवेकाचा अंधार, जे केले पाहिजे ते न करता जे करू नये ते करायची वृत्ती आणि मोह इत्यादी सर्व उत्पन्न होतात तेव्हा सत्त्वगुण व रजोगुण यांना दडपून तमोगुणाची वृद्धी होत आहे असे समजावे. 

प्रत्येक व्यक्ती दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरात वेगवेगळ्या पद्धतीने वागते. प्रत्येक वेळी तिचा सत्त्व, रज किंवा तम यापैकी कोणता तरी एक गुण प्रबळ असतो. त्याची प्रत्येक क्रिया या तिन्ही गुणांनी युक्त असते. 

एकच क्रिया सत्त्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी व्यक्ती कशा पद्धतीने करेल याचा आपण विचार अकरा वेगवेगळ्या सूत्रांच्या आधारे करूया. 

१) व्यवहार -
सत्त्वगुणी व्यक्ती संतुष्ट असते. ती तक्रार करत नाही. भगवद्गीतेत बाराव्या अध्यायात भगवंतांनी सांगितले त्याप्रमाणे 'संतुष्ट: सततं योगी: ' अशी ती व्यक्ती असते. त्याचप्रमाणे 'संतुष्टो येन केनचीत् |' कुठल्याही परिस्थितीत ती नेहमीच समाधानी असते. समाधानी राहण्यासाठी तिला कोणत्याही अधिक गोष्टीची आवश्यकता नसते.
रजोगुणी व्यक्ती 'हे झाले तर मी समाधानी होईन', 'ते झाले तर मी समाधानी होईन' असे म्हणत रहाते. त्यामुळे ती कधीच समाधानी नसते.
तमोगुणी माणसाला आळस अतिशय प्रिय असतो. दुसऱ्याच्या प्रगतीमुळे त्याला दुःख होते.
अशाप्रकारे प्रत्येकाचा व्यवहार गुणांनुसार वेगवेगळा असतो आणि तसेच वेगवेगळ्या वेळी व्यक्तीचा सत्त्व, रज किंवा तमोगुण प्रबळ असतो.

२) वाणी- सत्त्वगुणी, रजोगुणी आणि व्यक्तींची वाणी कशी असते हे आता आपण पाहू.
सत्त्वगुणी व्यक्तीची वाणी वर्णन करण्यासाठी कबीराचा हा दोहा अगदी योग्य आहे.
ऐसी वाणी बोलिए मन का आप खोए।
औरन को शीतल करे आपहुं शीतल होए॥
आपण अशी बोली बोलली पाहिजे जी ऐकल्यानंतर समोरच्याला सुखाची अनुभूती झाली पाहिजे. तसेच स्वतःला सुद्धा आनंद मिळाला पाहिजे.
सत्यं ब्रूयात्प्रियं ब्रूयान्न ब्रूयात्सत्यमप्रियम्।
प्रियं च नानृतम्ब्रूयात् एष धर्मः सनातन:॥
सत्य बोलले पाहिजे. प्रिय बोलले पाहिजे. सत्य परंतु अप्रिय बोलू नये. प्रिय परंतु असत्य बोलू नये. हाच सनातन धर्म आहे.
बोलताना उच्च स्वरात बोलू नये. तसेच सावकाश बोलावे. हे सत्त्वगुणाचे लक्षण आहे.
अत्यंत आक्रमक पद्धतीने, स्वतःला श्रेष्ठ समजून दुसऱ्याला तुच्छ समजणाऱ्या स्वरात बोलणारी व्यक्ती रजोगुणी असते. 
तमोगुणी व्यक्ती बोलताना विवेकाचा वापर करत नाही. सारासार विचार न करता बोलणारी, सर्वांशी भांडणारी व्यक्ती तमोगुणी असते. 

३) भोजन -
सत्त्वगुणी व्यक्ती प्रसन्नता पूर्वक शरीराला आवश्यक तेवढेच भोजन ग्रहण करते.
रजोगुणी व्यक्तीला भोजनामध्ये भुकेपेक्षा स्वादाचे महत्व जास्त असते. मनासारखे जेवण नसेल तर तो जेवणारही नाही.
तमोगुणी व्यक्ती जेवताना काहीही विधीनिषेध बाळगत नाही. स्वतःला खाल्ल्यानंतर त्रास होणार आहे हे माहीत असूनही असे पदार्थही ते खातात.

४) वस्त्र -वस्त्रावरूनही माणूस सत्त्वगुणी, रजोगुणी अथवा तमोगुणी आहे याची परीक्षा होते. 
सत्त्वगुणी व्यक्ती पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे कपडे परिधान करतात. त्यांचे कपडे सोयीस्कर असतात.
रजोगुणी व्यक्ती रंगीबेरंगी, नवीन पद्धतीचे कपडे वापरतात.
तमोगुणी व्यक्ती मळके, असुविधाजनक आणि असभ्य कपडे परिधान करतात.

५) निवासस्थान - निवासस्थानावरूनही माणसाच्या तीन गुणांची पारख होते.
सत्त्वगुणी व्यक्तीचे घर शुद्ध, स्वच्छ, हवेशीर असते.
रजोगुणी व्यक्तीचे घर अतिशय विलासी असते.
तमोगुणी व्यक्तीचे घर अशुद्ध, अव्यवस्थित असते.

६) निवेश (इन्व्हेस्टमेंट) - 
सत्त्वगुणी व्यक्तीची इन्व्हेस्टमेंट पी पी एफ, एलआयसी, एफ. डी., के व्हि पी  अशा सुरक्षित ठिकाणी असते. अशी व्यक्ती दानधर्मही करते.
शेअर्स, म्युच्युअल फंड यासारखी इन्व्हेस्टमेंट रजोगुणी व्यक्तीची असते.
जुगार, पत्ते खेळणे यासारखे निवेश तमोगुणी असतात.

७) कार्यपद्धती-
सत्त्वगुणी व्यक्ती आपले प्रत्येक काम कर्तव्य भावनेने करते. प्रत्येक कामाचे दायित्व ती घेते.
रजोगुणी व्यक्ती स्वतःच्या मनाला येईल तसेच कार्य करते.
अजगर करै न चाकरी पंछी करै न काम।
दास मलूका कह गए, सब के दाता राम॥
या दोह्यात सांगितल्याप्रमाणे तमोगुणी व्यक्ती काम करते. एका गावात एक मनुष्य राहत होता. काहीही काम न करता केवळ बायकोने कष्ट करून मिळवलेल्या पैशावर तो मौज करत असे. एकदा त्यांच्या गावात एक थोर संत आले. या माणसाची बायको त्याला त्या संतांकडे घेऊन गेली आणि त्याच्याबद्दल तक्रार करू लागली.  संतांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तू दारुड्या मनुष्य म्हणाला, "महाराज, तुम्ही तुमच्या प्रवचनात  'सबके दाता राम' असे सांगता. या गोष्टीवर माझा पक्का विश्वास आहे. म्हणूनच मी काहीही करत नाही. तरीही मी कधीच उपाशी राहत नाही." तमोगुणी व्यक्ती अशा वृत्तीची असते. जेवढे आवश्यक आहे तेवढेच काम अशी व्यक्ती करते.

८) स्वभाव -
सत्त्वगुणी व्यक्ती कार्य करताना स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या हिताचा विचार करते. लंकाकांडात प्रभू रामचंद्र जेव्हा समुद्र लंघून लंकेत पोहोचले तेव्हा त्यांनी शांततेसाठी अंतिम प्रयत्न म्हणून अंगदाला रावणाकडे शांतीदूत म्हणून पाठवले. रावणाशी काय बोलायचे असे अंगदाने विचारल्यावर प्रभू रामचंद्र म्हणाले,
काजु हमार तासु हित होई। रिपु सन करेहु बतकही सोई॥
शत्रूशी अशी बोलणी कर  की त्यामुळे आपलेही काम होईल आणि त्याचेही कल्याण होईल. अशाप्रकारे प्रभू रामचंद्र हे शत्रुच्याही हिताचा विचार करत असत.
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत्॥
सर्व सुखी होवोत, सगळे रोगमुक्त राहोत, सगळे चांगल्या, मंगल घटनांचे साक्षीदार बनावेत व कोणाच्या वाट्याला दुःख ना येवो, अशी सत्वगुणी लोकांची वृत्ती असते.
रजोगुणी व्यक्ती फक्त स्वतःच्या कामाशी मतलब ठेवते. फक्त स्वतःच्याच हिताचा विचार अशा व्यक्ती  करतात.
तमोगुणी व्यक्ती दुसऱ्याच्या वाईटाचा विचार करतात. गोस्वामी तुलसीदास म्हणतात,
जिमि हिम उपल कृषी दलि गरहीं॥
बंदउँ खल जस सेष सरोषा।
सहस बदन बरनइ पर दोषा॥
ज्याप्रमाणे गारा शेतीचा नाश करून स्वतःही नष्ट होतात त्याचप्रमाणे हे लोक दुसऱ्याचे अहित करण्यासाठी स्वतःचे शरीर सुद्धा सोडून देतात. तमोगुणी व्यक्ती अशा असतात.

९) आवड-   
धर्मकार्य आणि सेवा ही सत्त्वगुणी व्यक्तींची आवड असते.
रजोगुणी व्यक्ती मान सन्मान मिळवण्यासाठी काम करतात.
तमोगुणी व्यक्तींना अधर्माने वागायला आवडते.

१०) इच्छा-
सत्त्वगुणी व्यक्ती आवडीपेक्षा गरजेला जास्त महत्व देते.
रजोगुणी व्यक्ती आपल्या इच्छांनाच आवश्यकता मानतात.
तमोगुणी व्यक्ती दुसऱ्यांच्या इच्छेमधे बाधा आणण्याचे काम करतात.

११) संगत-
सत्त्वगुणी व्यक्ती सज्जनांची, चांगल्या व्यक्तींची संगत धरतात.
रजोगुणी व्यक्ती मोठ्या लोकांची संगत धरतात.
तमोगुणी व्यक्ती चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहत नाहीत. गोस्वामी तुलसीदास म्हणतात, 
गगन चढ़इ रज पवन प्रसंगा। कीचहिं मिलइ नीच जल संगा॥
वाऱ्याच्या संगतीत धूळ आकाशात वर चढते आणि तीच खाली वाहणाऱ्या पाण्याबरोबर चिखलात जाते. त्यामुळे आपल्या आयुष्याला वाऱ्याबरोबर राहून वर चढू द्यायचे की खाली वाहणाऱ्या पाण्याबरोबर राहून चिखलात मिळवायचे हे आपण ठरवायचे असते.

व्यवहारात प्रत्येक मनुष्य हा या तिन्ही गुणांनी युक्त असतो. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे गुण प्रबळ असतात. 
जड़ चेतन गुन दोषमय बिस्व कीन्ह करतार।
संत हंस गुन गहहिं पय परिहरि बारि बिकार॥
विधात्याने या जड़-चेतन विश्वाला गुण-दोषमय रचले आहे. परंतु संत रूपी हंस, दोष रूपी जलाला सोडून गुण रूपी दूधच ग्रहण करतात.

एकदा गांधीजींना एका व्यक्तीने एक पत्र लिहून दिले. त्या पत्रात गांधीजींनी केलेल्या चुका, काँग्रेस नीती मधील दोष असे सर्व वर्णन केले होते. ते पत्र वाचून गांधीजींनी त्याला लावलेली टाचणी काढून घेतली आणि ते पत्र त्या माणसाला परत केले. त्या माणसाने त्याबाबत विचारताच गांधीजी म्हणाले, "या पत्रातील जेवढी उपयोगाची गोष्ट आहे तेवढी मी घेतली. बाकीचे तुला परत केले." अशाप्रकारे उत्तम लोक दुसऱ्याचे दोषांकडे न बघता त्याच्यातील जेवढे चांगले आणि घेण्यासारखे गुण आहेत तेवढेच घेतात.
ही सर्व सूत्रे विवेचन करणाऱ्या चित्रफीतींची लिंक -

14.14

यदा सत्त्वे प्रवृद्धे तु, प्रलयं(म्) याति देहभृत्।
तदोत्तमविदां(म्) लोकान्, अमलान्प्रतिपद्यते॥14.14॥

जेव्हा हा मनुष्य सत्त्वगुण वाढलेला असताना मरण पावतो, तेव्हा तो उत्तम कर्मे करणाऱ्यांच्या निर्मळ दिव्य स्वर्गादी लोकांत जातो.

मृत्यूसमयी प्रभावी असणाऱ्या गुणानुसार मृत्योत्तर गती प्राप्त होते. ज्या वृत्तीसह मनुष्य मृत्यू पावतो, त्यानुसार त्याला वेगवेगळ्या योनींत जन्म मिळतो.

सत्त्वगुणाची अतिशय वृद्धी झालेली असताना ज्याचा मृत्यू होतो तो उत्तम तत्त्वे जाणणार्‍यांचा निर्मल लोक प्राप्त करतो.

14.15

रजसि प्रलयं(ङ्) गत्वा, कर्मसङ्गिषु जायते।
तथा प्रलीनस्तमसि, मूढयोनिषु जायते॥14.15॥

रजोगुण वाढलेला असता मरण पावल्यास कर्मांची आसक्ती असणार्‍या मनुष्यांत जन्मतो. तसेच तमोगुण वाढला असता मेलेला माणूस किडा, पशू इत्यादी मूढ (विवेकशून्य) जातींत जन्मतो.

रजोगुणाची अतिशय वृद्धी झालेली असताना ज्याचा मृत्यू होतो तो कर्मांमध्ये अतिशय आसक्ती ठेवणार्‍या मनुष्य योनीत जन्म घेतो.

तमोगुणाची अतिशय वृद्धी झालेली असताना ज्याचा मृत्यू होतो तो कीटक, पशू आदी मूढ योनींमध्ये जन्म घेतो.

ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण झाला की A, B, C, D, E, F अशा वेगवेगळ्या श्रेणी असतात, त्याचप्रमाणे मनुष्याने वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म घेतला तरी त्यातही विविध श्रेणी असतात. उदाहरणार्थ मनुष्य जन्मातही रूप, गुण, वर्ण, आरोग्य इत्यादींप्रमाणे वेगवेगळ्या श्रेणी असतात. त्याचप्रमाणे पशूंच्या मध्ये जन्म घेतल्यानंतर सुद्धा पाळीव प्राणी, हिंस्र प्राणी, जलचर, वनचर इत्यादी विविध श्रेणी असू शकतात.

आता तमोगुण प्रभावी असताना मृत्यू झाला तर पशू योनीत जन्म का होतो? तमोगुणी व्यक्तीला अज्ञानामुळे उन्नती करण्यात रुची नसते आणि अज्ञानातून बाहेर पडण्याची इच्छाही नसते.
आहारनिद्राभयमैथुनानि सामान्यमेतत्पशुभिर्नराणाम् ।
ज्ञानं नराणामधिको विशेषो ज्ञानेन हीनाः पशुभिः समानाः॥ 
आहार, निद्रा, भय आणि मैथुन हे पशु आणि मनुष्यामध्ये समान आहेत. परंतु मनुष्यामध्ये ज्ञान हा अधिकचा विशेष गुण आहे. अन्यथा ज्ञानाविना मनुष्य पशुसमानच आहे. त्यामुळे तमोगुण प्रभावी असताना मृत्यू झाला तर पशू योनीत जन्म होतो.

14.16

कर्मणः(स्) सुकृतस्याहुः(स्), सात्त्विकं(न्) निर्मलं(म्) फलम्।
रजसस्तु फलं(न्) दुःखम्, अज्ञानं(न्) तमसः(फ्) फलम्॥14.16॥

श्रेष्ठ (सात्विक) कर्माचे सात्विक अर्थात सुख, ज्ञान आणि वैराग्य इत्यादी निर्मळ फळ सांगितले आहे. राजस कर्माचे फळ दुःख तसेच तामस कर्माचे फळ अज्ञान सांगितले आहे.

सत्त्वगुणी व्यक्ती नेहमी प्रसन्न व शांतचित्त असतात. कितीही दुःखद घटना घडली तरी त्यांची शांतता ढळत नाही. रजोगुणी व्यक्ती नेहमीच तणावजन्य आणि दुःखी असतात. तमोगुणी व्यक्ती अज्ञानी असतात आणि अज्ञानातच सुख मानतात.

14.17

सत्त्वात्सञ्जायते ज्ञानं(म्), रजसो लोभ एव च।
प्रमादमोहौ तमसो, भवतोऽज्ञानमेव च॥14.17॥

सत्त्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते. रजोगुणापासून निःसंशय लोभ आणि तमोगुणापासून प्रमाद आणि मोह उत्पन्न होतात आणि अज्ञानही होते.

सत्त्वगुणापासून चांगले काय आणि वाईट काय याचा विवेक उत्पन्न होऊन मनुष्य चांगली कर्मे करत रहातो आणि वाईट कर्मे करते टाळतो. त्यामुळे परत त्याच्या सत्त्वगुणाची वृद्धीच होते.

तसेच रजोगुणापासून निःसंशय लोभ आणि त्यातून लोभाविष्ट होऊन मनुष्य कर्म करत रहातो आणि कर्माचे अपेक्षित फळ न मिळाल्याने तो दु:खी होतो .

तमोगुणापासून प्रमाद आणि मोह उत्पन्न होतात आणि अज्ञानही होते.

14.18

ऊर्ध्वं(ङ्) गच्छन्ति सत्त्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसाः।
जघन्यगुणवृत्तिस्था, अधो गच्छन्ति तामसाः॥14.18॥

सत्त्वगुणात असलेले पुरुष स्वर्गादी उच्च लोकांना जातात. रजोगुणात असलेले पुरुष मध्यलोकात म्हणजे मनुष्यलोकातच राहतात आणि तमोगुणाचे कार्य असलेल्या निद्रा, प्रमाद आणि आळस इत्यादीत रत असलेले तामसी पुरुष अधोगतीला अर्थात् कीटक, पशू इत्यादी नीच जातींत तसेच नरकात जातात.

आता हे ऐकून प्रश्न पडेल की या रज आणि तम या गुणांच्या प्रभावातून जीव कधीच मुक्त होणार नाही का? जीवाला जेव्हा योग्य माध्यम आणि प्रेरणा  मिळते तेव्हा त्याला प्रतिसाद दिला असता हे होऊ शकते.

भगवद्गीता शिकण्याची संधी वेळोवेळी मिळाली असूनही त्यावेळी तिला प्रतिसाद न देणारेही पूर्वसुकृताच्या बळावर योग्य वेळ येताच तिला प्रतिसाद देऊन आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करू लागतात.

14.19

नान्यं(ङ्) गुणेभ्यः(ख्) कर्तारं(म्), यदा द्रष्टानुपश्यति।
गुणेभ्यश्च परं(म्) वेत्ति, मद्भावं(म्) सोऽधिगच्छति॥14.19॥

ज्यावेळी द्रष्टा तिन्ही गुणांशिवाय दुसरा कोणीही कर्ता नाही, असे पाहतो आणि तिन्ही गुणांच्या अत्यंत पलीकडे असणार्‍या सच्चिदानंदघनस्वरुप मला परमात्म्याला तत्त्वतः जाणतो, त्यावेळी तो माझ्या स्वरुपाला प्राप्त होतो.

आता गुणातीताच्या विषयावर चर्चेला प्रारंभ होत आहे. केवळ रज आणि तम या गुणांवर मात करून भागत नाही. सत्त्वगुणाचे प्राबल्य असताना मृत्यू झाला की उच्च लोकात स्थान मिळते. हे जरी खरे असले तरी पुण्याचा संचय असेपर्यंतच ते टिकते. तो संचय नष्ट झाला की परत मृत्यूलोकात यावेच लागते. जोपर्यंत जीव सत्त्वगुणालाही ओलांडून जात नाही तोपर्यंत त्याला मुक्ती मिळत नाही. यासाठी भगवंत अर्जुनाला गुणातीत होण्यास सांगत आहेत.

14.20

गुणानेतानतीत्य त्रीन्, देही देहसमुद्भवान्।
जन्ममृत्युजरादुःखै:(र्), विमुक्तोऽमृतमश्नुते॥14.20॥

हा पुरुष शरीराच्या उत्पत्तीला कारण असलेल्या या तिन्ही गुणांना उल्लंघून जन्म, मृत्यू, वार्धक्य आणि सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्त होऊन परमानंदाला प्राप्त होतो.

भौतिक शरीराशी संबंधित सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण आत्म्याला शरीरात जखडून ठेवतात. या तिन्ही गुणांना उल्लंघून जाणारा जीव गुणातीत असतो व तो जन्म, मृत्यू, वार्धक्य आणि सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्त होऊन परमानंदाला प्राप्त होतो.

14.21

अर्जुन उवाच
कैर्लिंगैस्त्रीन्गुणानेतान्, अतीतो भवति प्रभो।
किमाचारः(ख्) कथं(ञ्) चैतांस्, त्रीन्गुणानतिवर्तते॥14.21॥

अर्जुन म्हणाला, या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणकोणत्या लक्षणांनी युक्त असतो? आणि त्याचे आचरण कशाप्रकारचे असते? तसेच हे प्रभो! मनुष्य कोणत्या उपायाने या तीन गुणांच्या पलीकडे जातो?

येथे अर्जुनाने गुणातीताची लक्षणे विचारली. (लिंग म्हणजे लक्षणे)

14.22

श्रीभगवानुवाच
प्रकाशं(ञ्) च प्रवृत्तिं(ञ्) च, मोहमेव च पाण्डव।
न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि, न निवृत्तानि काङ्क्षति॥14.22॥

श्रीभगवान म्हणाले, हे अर्जुना! जो पुरुष सत्त्वगुणाचे कार्यरुप प्रकाश, रजोगुणाचे कार्यरुप प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्यरुप मोह ही प्राप्त झाली असता त्यांचा विषाद मानत नाही आणि प्राप्त झाली नाही तरी त्यांची इच्छा करीत नाही,

गुणातीत ही श्रेणी फार उच्च दर्जाची असते. कठोर साधना करूनच ही श्रेणी प्राप्त होते. सर्वसामान्य माणसाला ही श्रेणी कळण्यासही कठीण आहे. जी व्यक्ती या श्रेणीला पोहोचते तिची लक्षणे आपोआप तशीच होतात, जशी भगवंतांनी पुढील श्लोकांमध्ये वर्णन केलेली आहेत.

अर्थात गुणातीत ही अनुभूतीची अवस्था आहे. त्याचे कितीही वर्णन केले तरी जोपर्यंत त्याची प्रत्यक्ष अनुभूती येत नाही तोपर्यंत ते आपल्याला कळणार नाही.

अशा गुणातीत व्यक्तींना सत्त्वगुणाचा प्रकाश, रजोगुणाची प्रवृत्ती आणि तमोगुणाचा मोह हे प्राप्त झाले  किंवा प्राप्त झाले नाही तरी त्यांचा हर्ष अथवा विषाद तसेच कार्य करणे आणि न करणे या दोन्ही मध्ये रस अथवा द्वेष नसतो.

14.23

उदासीनवदासीनो, गुणैर्यो न विचाल्यते।
गुणा वर्तन्त इत्येव, योऽवतिष्ठति नेङ्गते॥14.23॥

जो साक्षीरुप राहून गुणांकडून विचलित केला जाऊ शकत नाही आणि गुणच गुणांत वावरत आहेत, असे समजून जो सच्चिदानंदघन परमात्म्यांत एकरुप होऊन राहतो व त्या स्थितीपासून कधी ढळत नाही,

अशी गुणातीत  व्यक्ती साक्षी भावाने राहते. उदाहरणार्थ आपण जेव्हा भोजन करतो तेव्हा  'मला भूक लागली', 'मी जेवलो' ‘मी अन्न पचवले’ असे समजत असतो.

गुणातीत व्यक्ती मात्र 'शरीराला भूक लागली आहे', 'डोळ्यांनी अन्न पाहिले आहे', 'हाताने घास उचलला आहे', 'तोंडाने ग्रहण केला आहे', 'शरीराने पचवले आहे' अशा साक्षीभाव वृत्तीने भोजन करते. यात 'मी' कोठेही नसतो. 

14.24

समदुःखसुखः(स्) स्वस्थः(स्), समलोष्टाश्मकाञ्चनः।
तुल्यप्रियाप्रियो धीर:(स्), तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः॥14.24॥

जो पुरुष निरंतर आत्मभावात राहून सुख-दुःख समान मानतो, माती, दगड आणि सोने यांना सारखेच मानतो, ज्याला आवडती व नावडती गोष्ट सारखीच वाटते, जो ज्ञानी आहे आणि स्वतःची निंदा व स्तुती ज्याला समान वाटतात,

गुणातीत व्यक्तींना निरंतर आत्मभाव असल्याने सुख-दुःख, माती-दगड-सोने हे समान दिसतात. थोडक्यात त्या सर्व बाबतीत समदर्शनी असतात. पण समदर्शनी असणे आणि समवर्तनी असणे यात मोठा फरक आहे. उदाहरणार्थ काही व्यक्ती कुत्रा पाळतात. पशुंवर प्रेम करणे, त्यांना खायला देणे ही गोष्ट उचित आहे. परंतु त्यांना आपल्या शेजारी बसवून त्यांच्याबरोबर जेवणे हे अनुचित आहे. सर्वांमध्ये परमात्मा पाहणे हे समदर्शन आहे. परंतु प्रत्येकाशी व्यवहार मात्र आपापल्या योग्यते प्रमाणेच असावा. शास्त्रांमध्ये 'सम‌दर्शन' करण्यास सांगितले आहे, 'समवर्तन' नव्हे. अशा गुणातीत व्यक्ती मनाला आवडती किंवा नावडती अशी घटना घडली तरी  समभावाने रहातात. त्यांच्यासाठी निंदा अथवा स्तुती सारखीच असते.

14.25

मानापमानयोस्तुल्य:(स्), तुल्यो मित्रारिपक्षयोः।
सर्वारम्भपरित्यागी, गुणातीतः(स्) स उच्यते॥14.25॥

जो मान व अपमान सारखेच मानतो, ज्याची मित्र व शत्रू या दोघांविषयी समान वृत्ती असते, तसेच सर्व कार्यांत ज्याला 'मी करणारा' हा अभिमान नसतो, त्याला गुणातीत म्हणतात.

जो मान मिळाला तर हुरळून जात नाही आणि अपमान झाला तर संतप्त होत नाही, जो मित्र व शत्रू या दोघांशीही एकसमान वागतो, तसेच ज्याला 'मी करणारा' हा अभिमान नसतो, (नाहं कर्ता इति) आणि म्हणूनच कर्मफलात आसक्त नसतो त्याला गुणातीत म्हणतात.

14.26

मां(ञ्) च योऽव्यभिचारेण, भक्तियोगेन सेवते।
स गुणान्समतीत्यैतान्, ब्रह्मभूयाय कल्पते॥14.26॥

आणि जो पुरुष अव्यभिचारी भक्तियोगाने मला निरंतर भजतो, तोसुद्धा या तिन्ही गुणांना पूर्णपणे उल्लंघून सच्चिदानंदघन ब्रह्माला प्राप्त होण्यास योग्य ठरतो.

येथे अव्यभिचारी भक्ती असा शब्द वापरला आहे याचा अर्थ अन्य कोणावरही अवलंबून न रहाता एका परमात्म्यावर निष्ठा ठेवणे. 
संत मीराबाई म्हणतात,
मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई |
याचा अर्थ माझा आधार फक्त एक परमेश्वर आहे. दुसरा कोणीही नाही. गुणातीत होण्यासाठी अशा प्रकारची भक्ती असली पाहिजे.
या जगाचा आश्रय सोडून जो परमात्म्याच्या आश्रयाला जातो त्याची भक्ती अव्यभिचारिणी असते.

रामचरितमानसात संत तुलसीदास यांनी एक सुंदर दोहा सांगितला आहे,
जननी जनक वंधु सुत दारा।
तनु धनु भवन सुह्रद परिवारा॥
सबकै ममता ताग बटोरी।
मम पद मनहिं बाँधि वर डोरी॥
माता, पिता, भाऊ, पुत्र, पत्नी, शरीर, धन, भवन, सुहृद आणि कुटुंब, या सर्वांकडे आपल्या मनातील भावना आकर्षित होतात. या सर्व भावनांना, सर्वांच्या ममतेच्या धाग्यांना एकत्रित करून एक जाड दोर बनवला पाहिजे आणि त्या दोरीने भगवंतांना बांधून ठेवले पाहिजे. मनाने आपण त्याच्या चरणांशी बांधून घेतले पाहिजे.  
जो हे करतो तोच गुणातीत होऊ शकतो.

14.27

ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम्, अमृतस्याव्ययस्य च।
शाश्वतस्य च धर्मस्य, सुखस्यैकान्तिकस्य च॥14.27॥

कारण त्या अविनाशी परब्रह्माचा, अमृताचा, नित्य धर्माचा आणि अखंड एकरस आनंदाचा आश्रय मी आहे.

अविनाशी परब्रह्माचा, अमृताचा, नित्य धर्माचा आणि अखंड एकरस आनंदाचा आश्रय भगवंतच आहेत त्यामुळे अन्य कोणावरही अवलंबून न रहाता केवळ भगवंतांशी एकनिष्ठ रहायचे आहे. 

प्रश्नोत्तर सत्र

प्रश्न
अभिषेक जी:- रज आणि तम गुणांचा प्रभाव कमी करून सत्त्वगुणाची वृद्धी कशी करावी?
उत्तर:- सतराव्या अध्यायात भगवंतांनी विशिष्ट गुणाचे प्राबल्य असलेल्या व्यक्तींचा आवडता आहार तसेच विहार इत्यादी सविस्तर माहिती दिली आहे. जर सत्त्वगुणप्रधान व्यक्तींच्या आवडीनिवडी जाणीवपूर्वक आपल्या अंगी बाणवून घेतल्या तर रज आणि तम गुणांचा प्रभाव कमी करून सत्त्वगुणाची वृद्धी होऊ शकते. तसेच सत्संग, भगवद्गीतेसारख्या आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास मदत करतो. मी चांगला वागतो म्हणून माझे या भौतिक जगात सर्व चांगलेच होणार ही एक अवास्तव अपेक्षा आहे. जिथे साक्षात कालीमातेशी संभाषण करणार्‍या श्री रामकृष्ण परमहंस यांना घशाचा कँसर होऊन त्रास होत होता तिथे सामान्य माणसाची काय कथा हे विसरून चालणार नाही. सत्त्वगुण प्रभावी व्हायला कर्म, प्रारब्ध आणि संस्कार हे घटक प्रभावी असतात.

प्रश्न
दिनेश जी:- श्रद्धेचा विषय मन, बुद्धी वा अहंकार सगळ्यांशी निगडित आहे का? श्रद्धा विचलित का होते?
उत्तर:- श्रद्धा हे विशेषण आहे. ते सगळ्यांनाच लागू पडते. मनाची श्रद्धा काय आहे, बुद्धीची श्रद्धा काय आहे, श्रद्धा सात्त्विक आहे की राजसी आहे की तामसी, तात्कालिक आहे की शाश्वत आहे असे श्रद्धेचे अनेक विभाग असू शकतात. श्रद्धा असेल तरच मनुष्य काहीतरी करू शकतो. ज्याची जशी श्रद्धा तसा तो बनतो. श्रद्धावान व्यक्तीलाच ज्ञान मिळते.
सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत।
श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः॥
श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति॥
ज्या मनुष्याच्या स्वतःबद्दल, जगाबद्दल अवास्तव अपेक्षा असतात त्याचीच श्रद्धा विचलित होत असते. नित्य परिवर्तनशील जगात सुख आणि दुःख येत जात असतात, यातलं काहीच शाश्वत नाही हे जो समजून घेत नाही, त्याचा अपेक्षाभंग झाला तर त्याची श्रद्धा विचलित होते.

प्रश्न 
रमा जी:- जेव्हा समोर कोणी छान गात असेल, उत्कृष्ट भाषण करत असेल, सुंदर नृत्य करत असेल; तर त्या व्यक्तीच्या जागी मनातल्या मनात मी स्वतःला बघत असते. हे कोणत्या गुणाचे लक्षण आहे?
उत्तर:- जगात जे जे काही आकर्षक, प्रभावी आहे ते आपल्याकडे हवे हे रजोगुण प्रबळ असल्याचे लक्षण आहे तर माझे विहीत कर्तव्यकर्म काय आहे हे जाणून ते आचरणात आणण्यासाठी दक्ष रहाणे हे सत्त्वगुण प्रबळ असल्याचे लक्षण आहे.

प्रश्न
रतन जी:- मी प्रत्येक दिवशी कामानिमित्त पंधरा पंधरा तास घराबाहेर असलो तरी घरी आल्यावर माझा शीण लक्षात न घेता सर्वजण कटकट करतात, त्यामुळे क्रोध अनावर होतो.
उत्तर:- दिवसभर फक्त आपणच दमतो, इतरांना आपली पर्वा नाही या सर्व आपल्या चुकीच्या धारणा असल्यामुळे आपल्याला क्रोध अनावर होत असतो. आपण त्याचे खापर इतरांवर फोडत असतो.

प्रश्न
राकेश जी:- परधर्मीय जेव्हा आपल्या सनातन धर्माची निंदा करतात तेव्हा त्यांना प्रतिक्रिया देणं योग्य की अयोग्य असते?
उत्तर:- परधर्मीयांना आपण कशी प्रतिक्रिया देतो यापेक्षा त्यांच्या निंदेचा आपल्यावर आणि आपल्या धर्मावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून भगवद्गीतेचा अभ्यास आणि प्रसार यामार्फत आपले आत्मबल वाढवणे हे अधिक महत्त्वाचे नाही का?