विवेचन सारांश
श्रद्धा एक मौलिक भावना जी देते व्यक्तिमत्वाला आकार.
देवकीपरमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुम् ||
मागील विवेचनात आपण सतराव्या अध्यायाचा पूर्वार्ध पाहिला. या अध्यायात पहिल्याच श्लोकामध्ये शास्त्रांचे ज्ञान असणाऱ्या अर्जुनाने भगवंतांना विचारले की जर कोणी श्रद्धापूर्वक कर्म करीत असेल परंतु शास्त्रविधींची उपेक्षा करत असेल तर त्याची श्रद्धा कशा प्रकारची ओळखली जाईल. अर्जुनाच्या या प्रश्नाचे उत्तर देताना भगवंतांनी अर्जुनाला श्रद्धेविषयी ज्ञान दिले.
श्रद्धेचे स्वरूप समजण्यासाठी एखाद्या माध्यमाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ एखादा रंग जाणून घ्यायचा असेल तर आपण त्या रंगाची वस्तू दर्शवतो जसे की खडू पांढऱ्या रंगाचा आहे, झाड हिरव्या रंगाचे आहे. रंग हे विशेषण आहे. एखाद्या वस्तूशिवाय रंगाचे आकलन होत नाही. तसेच श्रद्धेचे आहे. तुलसीदासजींची श्रीरामांवर अपार श्रद्धा आहे हे रामचरितमानस मधून दिसून येते. आपली जशी श्रद्धा असते तसे आपले व्यक्तित्व बनते.
सातव्या श्लोकामध्ये भगवंतांनी आहार यज्ञ दान आणि तप या चार गोष्टींच्या माध्यमातून पुरुषाची श्रद्धा कशाप्रकारे सात्विकी राजसी आणि तामसी असू शकते याविषयीचा फरक अर्जुनाला समजावून सांगण्यास सुरुवात केली.
येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पुरुष ही एक संज्ञा आहे. येथे स्त्री-पुरुष मधला पुरुष म्हणजे नर असा अर्थ अपेक्षित नाही तर सर्वांसाठीच पुरुष हे संबोधन वापरले आहे.
समाजामध्ये आपण पाहतो की जशी श्रद्धा असते त्यानुसार कार्य घडत असते. बालकांमध्ये ज्या प्रकारच्या श्रद्धेचे रोपण होते तसाच तो पुढे जाऊन कार्य करतो. क्रिकेटमध्ये श्रद्धा असलेला एखादा बालक विसाव्या वर्षी रणजी करंडक गाजवतो. एखाद्या उद्योजकाचा मुलगा वडिलांचे काम बघता बघता विसाव्या वर्षीच वडिलांच्या कार्यालयामध्ये जाऊन एखाद्या पदाचा कार्यभार स्वीकारतो. एखाद्या व्यापाऱ्याचा समजदार मुलगा लवकरच वडिलांचा व्यापार व्यवस्थित सांभाळू लागतो. लहानपणापासून मोबाईल मध्येच श्रद्धा ठेवून वागणारा मुलगा पुढेही त्यातच रमतो. त्याचे व्यक्तित्व देखील पूर्णपणे भिन्न बनते.
मागील सप्ताहामध्ये आपण पाहिले की भगवंतांनी सर्वांना प्रिय असलेला आहार हा विषय घेऊन आहारातील पदार्थांचे रसमय स्निग्ध, स्थिर आणि प्रिय या प्रकारांतील वर्गीकरण सांगून सात्त्विक आहार आयु, बल आणि सुख कसे वाढवतो हे सांगितले.
यापुढील दोन श्लोकांत राजसी आणि तामसी भोजनाविषयी भगवंत सांगत आहेत.
17.9
कट्वम्ललवणात्युष्ण, तीक्ष्णरूक्षविदाहिनः|
आहारा राजसस्येष्टा, दुःखशोकामयप्रदाः||17.9||
यातयामं(ङ्) गतरसं(म्), पूति पर्युषितं(ञ्) च यत्|
उच्छिष्टमपि चामेध्यं(म्), भोजनं(न्) तामसप्रियम्||17.10||
गतरसम् - जे अन्न अथवा फळे वाळवली जातात तेव्हा त्यातील रस निघून जातो. असे अन्न अथवा फळ हा तामसी आहार समजला जातो.
पूति पर्युषितम् - यामध्ये दुर्गंधी येणारे पदार्थ, उदाहरणार्थ लसूण कांदा तसेच शिळे अन्न यांचा समावेश होतो. शास्त्रानुसार मीठ आणि पाणी घालून जे पदार्थ बनवले जातात ते एक रात्र सरल्यानंतर शिळे झालेत असे समजावे.
उच्छिष्टम् - उरलेले अन्न, भोजनाच्या ताटात टाकलेले अन्न यांवर कुत्रा, मांजर या पशूंचा अधिकार असतो ते त्यांनाच दिले गेले पाहिजे.
अमेध्यम् - अपवित्र अन्न, मांस मासे अंडी हे पदार्थ तामसी प्रभाव वाढवणारे आहेत.
या सर्व तामसी आहाराच्या परिणामाविषयी भगवंतांनी या श्लोकात काहीच भाष्य केलेले नाही. आहारामधील त्या त्या पदार्थांच्या मात्रेवर तो आहार सात्त्विक आहे की राजसी आहे की तामसी आहे हे अवलंबून असते.
आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आपला आहार जर तामसी प्रवृत्तीकडे नेणारा असेल तर त्याचे प्रमाण आपणच हळूहळू कमी केले पाहिजे व सात्त्विक आहाराचे प्रमाण वाढवले पाहिजे तरच आपले जीवन आनंदमय, सुखमय होईल आणि आध्यात्मिक साधनेच्या दृष्टीने उत्तम होईल. हे सर्व हळूहळू अभ्यासाने साध्य होते. सात-आठ दिवसांच्या सवयीने देखील हे साध्य होते.
रामदेवजींच्या पतंजली आश्रमामध्ये साधकांना मीठ विरहित भोजन दिले जाते. जे लोक निष्ठेने सात दिवस तेथे भोजन घेतात त्यांना अशा भोजनाची सवय होऊन जाते. शरीर देखील अनुकूल होऊन जाते. ही एक मानसिक धारणा असते. सवयीने आणि अभ्यासाने ती बदलू शकते.
अफलाकाङ्क्षिभिर्यज्ञो, विधिदृष्टो य इज्यते|
यष्टव्यमेवेति मनः(स्), समाधाय स सात्त्विकः||17.11||
जेव्हा आपण मात्यापित्यांना नमस्कार करतो तेव्हा मनात कोणती इच्छा धरलेली असेल अथवा त्यांच्याकडून काही प्राप्त होण्याच्या मनिषेने त्यांना नमस्कार केला असेल तर ते राजस कर्म होय.
अभिसन्धाय तु फलं(न्), दम्भार्थमपि चैव यत्|
इज्यते भरतश्रेष्ठ, तं(म्) यज्ञं(म्) विद्धि राजसम्||17.12||
माझी प्रशंसा व्हावी या उद्देशाने तो कर्म करीत असतो.
एखादा युवक उत्तम कपडे परिधान करतो ते केवळ सर्वांनी आपल्याला विचारावे आणि आपल्याकडे पाहावे म्हणून!
घरी पाहुणे आलेले असताना दिवसभर पूजापाठामध्ये काही लोक व्यग्र राहतात. पाहुण्यांनी आपल्याला अत्यंत धार्मिक समजावे अशी त्यांची इच्छा असते.
कर्म कोणी दुसरे करते व त्याचे श्रेय एखादा माणूस स्वतःकडे घेतो अशा प्रकारचे दंभाचरण हे पाप समजले जाते. समजा सुनेने छान पदार्थ बनवला. जेवताना घरातील सर्वांनी सासूची प्रशंसा केली आणि सासू गप्प राहिली. तर हे देखील सुनेचे श्रेय लाटण्यासारखेच आहे. हा दांभिकपणा झाला.
असे हे दंभाचरण रजोगुणाकडून हळूहळू तामसाकडे घेऊन जाते. त्यामुळे त्यापासून संभाळून राहावे.
विधिहीनमसृष्टान्नं(म्), मन्त्रहीनमदक्षिणम्|
श्रद्धाविरहितं(म्) यज्ञं(न्), तामसं(म्) परिचक्षते||17.13||
स्वामीजी स्वतःच्या लहानपणाची एक गोष्ट नेहमी सांगतात. त्यांचे वडील नियमित आचरणवादी होते, त्यांना अनुष्ठान प्रिय होते. एकदा त्यांच्याकडे एक यजमान आले. त्यांच्या मुलीचे लग्न होते. त्यांनी वडिलांना सांगितले की लग्नविधी तुम्ही एक तासामध्ये पूर्ण करा. वडिलांनी त्यांना ते जमणार नाही असे सांगितले तेव्हा ते गृहस्थ म्हणाले की हवे तर तुम्हाला दुप्पट तिप्पट दक्षिणा देऊ परंतु आपणच हे कार्य करावे, परंतु तरी देखील अत्यंत नम्रपणे नकार देऊन वडिलांनी त्यांना परत पाठवले. त्यानंतर स्वामीजींनी वडिलांना विचारले की आपण असे का केले, तेव्हा वडील म्हणाले की मी माझी सवय बिघडू इच्छित नाही.
गोष्ट छोटीशीच असते, परंतु याने काय फरक पडतो असे म्हणून आपण त्या गोष्टीची अवहेलना करतो. आपणच आपल्या चांगल्या सवयी बिघडून टाकतो. गणेशोत्सव, नवरात्र हे अत्यंत चांगले उत्सव आहेत परंतु या उत्सवात बऱ्याच ठिकाणी मूर्तींची शास्त्रविधीवत पूजा होत नाही. केवळ मूर्ती मंडपात बसवली जाते, मोठ्या आवाजामध्ये गाणी लावली जातात. दिसायला धार्मिक कृत्य दिसते, परंतु खरे तर हे तामसी कृत्य होय.
देवद्विजगुरुप्राज्ञ, पूजनं(म्) शौचमार्जवम्|
ब्रह्मचर्यमहिंसा च, शारीरं(न्) तप उच्यते||17.14||
जे नित्य अग्निहोत्र करतात, शुद्धतेने राहतात, ज्यांची प्रज्ञा जागृत आहे ते सर्व ब्राह्मण पूजनीय आहेत.
आदि शंकराचार्यांनी गृहस्थाश्रमीने पंचायतनाची पूजा नित्य करावी असे सांगितले आहे. सूर्य, विष्णू, शिव, देवी व गणेश यांची उपासना करण्यास सांगितले आहे.
ब्रह्मचर्य म्हणजे इंद्रियांचे संयमन करणे.
अहिंसा - दुसऱ्या कोणाच्या कष्टाचे कारण मी नसावे यासाठी प्रयत्न करणे. या संबंधातील बिकानेरवासी श्री सत्यनारायण राठी यांची एक कथा विवेचकांनी सांगितली.-
बिकानेर मध्ये सत्यनारायणजींचे एक दुकान होते. रोज दुपारी ते आपल्या घरी जेवण्यासाठी जात असत. एक दिवस असेच दुपारची वेळ होती. घरी जाण्यासाठी ते दुकानाच्या बाहेर पडले. मग परत दुकानात आले. दहा मिनिटांनी जातो म्हणाले. पुन्हा दहा मिनिटांनी गेले आणि परत दुकानात आले व म्हणाले थोडा वेळाने जातो. तेव्हा दुकानातील सेवकांनी त्यांना विचारले की काय झाले, तेव्हा ते म्हणाले की माझ्या स्कूटर च्या खाली एक कुत्र्याचे छोटे पिल्लू झोपले आहे. मी जर स्कूटर चालू करायला गेलो तर ते बिचारे उठेल. या दुपारच्या वेळी मी त्याला कोणतेही कष्ट देऊ इच्छित नाही. एखाद दिवस मी उशिरा जेवलो तरी चालेल.
अशीच एक कथा स्वतःच्या वडिलांविषयी विवेचकांनी सांगितली.-
त्यांच्या घरी गवंडी घराला प्लास्टरचे काम करीत होता. भर दुपार होती. वडील बाहेरून आले आणि त्यांनी पाहिले की गवंडी उन्हातच काम करत आहे तेव्हा त्यांनी त्याला ताबडतोब खाली उतरवले व त्याला सांगितले की थोडा वेळ आराम कर. जरा उन उतरल्यानंतर काम पूर्ण कर. इतरांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांची काळजी घेणे हे देखील एक प्रकारचे तपच आहे.
अनुद्वेगकरं(म्) वाक्यं(म्), सत्यं(म्) प्रियहितं(ञ्) च यत्|
स्वाध्यायाभ्यसनं(ञ्) चैव, वाङ्मयं(न्) तप उच्यते||17.15||
प्रियं च नानृतं ब्रूयादेष धर्मः सनातनः॥
तुलसीदासजींचा एक दोहा आहे-
बसीकरन इक मंत्र है परिहरू बचन कठोर॥
यानंतर भगवंत मनाच्या तपाविषयी सांगत आहेत.
मनः(फ्) प्रसादः(स्) सौम्यत्वं(म्), मौनमात्मविनिग्रहः|
भावसंशुद्धिरित्येतत्, तपो मानसमुच्यते||17.16||
प्रसाद म्हणजेच प्रसन्नता. भगवंतांना आपण आपला भाव अर्पण केला की प्रसन्नतारुपात आपल्याला प्रसाद नक्कीच मिळतो. यासाठी मनाच्या शुद्धतेकडे नेहमी लक्ष द्यावे. कुठलीही इच्छा न करता जो प्रसाद मिळतो तो ग्रहण करणे, हीच मनाची प्रसन्नता असू द्यावी. नेहमी हसत रहावे.
मनाच्या अधीन न होता मनाला आपल्या अधीन करावे - हे सूत्र पकडून चालावे.
श्रद्धया परया तप्तं(न्), तपस्तत्त्रिविधं(न्) नरैः|
अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः(स्), सात्त्विकं(म्) परिचक्षते||17.17||
सत्कारमानपूजार्थं(न्), तपो दम्भेन चैव यत्|
क्रियते तदिह प्रोक्तं(म्), राजसं(ञ्) चलमध्रुवम्||17.18||
मूढग्राहेणात्मनो यत्, पीडया क्रियते तपः|
परस्योत्सादनार्थं(म्) वा, तत्तामसमुदाहृतम्||17.19||
दातव्यमिति यद्दानं(न्), दीयतेऽनुपकारिणे|
देशे काले च पात्रे च, तद्दानं(म्) सात्त्विकं(म्) स्मृतम्||17.20||
वैष्णव पंथामध्ये उत्पन्नाचा दहावा हिस्सा हा दानासाठी ठेवावा असे सांगितले गेले आहे.
दान हे केवळ पैशांचे नसून सुवर्ण, भूमी, अन्न, वस्त्र, प्राण, यश यांचे देखील करता येते.
तुम्ही हसून कोणाशी बोला, इतरांना हसवा. हे प्रसन्नतेचे दान होते.
शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात हे ज्ञानाचे दान होते.
गीतेच्या विवेचनातून साधकांमध्ये भक्ती निर्माण होते. हे भक्तीचे दान समजले जाते.
याशिवाय गुरु शिष्याला मंत्रदीक्षा देतात. हे दीक्षेचे दान असते.
विवाह प्रसंगी माता-पिता कन्येचे दान करतात.
एखाद्याला दिलेले कर्ज माफ केले तर ते दातव्यमुक्तीचे दान म्हणून ओळखले जाते.
या सर्वांपेक्षाही श्रेष्ठ दान म्हणजे मृत्यूशय्येवर असलेल्या मनुष्याला भगवद्गीता सांगणे किंवा भजन ऐकवणे.
दान ही एक मौलिक भावना आहे. निरपेक्ष दृष्टीने केलेले दान हे सात्विक दान होय.
यत्तु प्रत्युपकारार्थं(म्), फलमुद्दिश्य वा पुनः|
दीयते च परिक्लिष्टं(न्), तद्दानं(म्) राजसं(म्) स्मृतम्||17.21||
अदेशकाले यद्दानम्, अपात्रेभ्यश्च दीयते|
असत्कृतमवज्ञातं(न्), तत्तामसमुदाहृतम्||17.22||
ॐ तत्सदिति निर्देशो, ब्रह्मणस्त्रिविधः(स्) स्मृतः|
ब्राह्मणास्तेन वेदाश्च, यज्ञाश्च विहिताः(फ्) पुरा||17.23||
आकाशातत्त्व हे ईश्वराच्या अत्यंत निकट आहे. प्रकृतीमध्ये सर्वात प्रथम आकाश निर्माण झाले आणि या आकाशात जो पहिला शब्द प्रकट झाला तो म्हणजे हा ॐ. म्हणूनच याला प्रणव असे म्हटले जाते. शब्दब्रह्म असेही म्हटले जाते.
अकार, उकार आणि मकार या तीन अक्षरांनी हा शब्द बनलेला आहे.
यामध्ये अकार म्हणजे वैखरी आहे, जी बोलली आणि ऐकली जाते. हा स्थूल असून याचे कार्य उत्पत्ती हे आहे आणि रजोगुण याची स्थिती आहे.
उकाराची स्थिती ही मध्यमा आहे. हावभावाने ही प्रकट होते. स्पर्शाने याची अभिव्यक्ती होते. याचे रूप सूक्ष्म आहे. पोषण हे याचे कार्य असून याची स्थिती सत्त्वगुणी आहे.
मकार म्हणजे पश्यंती. संकल्प मात्रेनेच याची उत्पत्ती होते. संहार याचे कार्य आहे आणि तमोगुण याची स्थिती आहे.
या तीन पूर्ण अक्षरांव्यतिरिक्त एक हलंत अक्षर देखील या ॐ मध्ये सामावलेले आहे. हे हलंत म्हणजे एक परा आहे. ही एक पलीकडची गोष्ट आहे जी कोणी झटकन समजू शकत नाही. ज्याने रसगुल्ला खाल्लाच नाही त्याला त्याची चव समजून येत नाही, अशा प्रकारचे याचे स्वरूप आहे. प्रत्यक्ष अनुभूती हे याचे कार्य आहे म्हणूनच ते गुणातीत आहे.
ॐकाराविषयीच्या पूर्ण माहितीसाठी खालील तक्ता अतिशय उपयुक्त आहे.
या तक्त्यामध्ये एका तुरिया अवस्थेचा उल्लेख आहे. ही सर्वात उच्च स्थिती आहे. सिद्धीची परमोच्च अवस्था आहे. केवळ सिद्ध पुरुषच तिला जाणू शकतात. उदाहरणच द्यायचे झाले तर ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांची भेट घेतली तो प्रसंग सांगता येईल. केवळ सोळा वर्षांचे ज्ञानेश्वर आपल्या भावंडासह एका भिंतीवर बसले होते. समोरून चांगदेव येताना दिसले ज्यांची आयु चौदाशे वर्षे होती. तेव्हा त्यांना सामोरे जाण्यासाठी ज्ञानदेवांनी भिंतच चालवली. सिद्धीची परम अवस्था ज्ञानेश्वरांना प्राप्त असल्यामुळे ते हे करू शकले.
ॐ हे एक पूर्ण अक्षर आहे.
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।
तस्मादोमित्युदाहृत्य, यज्ञदानतपः(ख्) क्रियाः|
प्रवर्तन्ते विधानोक्ताः(स्), सततं(म्) ब्रह्मवादिनाम्||17.24||
तदित्यनभिसन्धाय, फलं(म्) यज्ञतपः(ख्) क्रियाः|
दानक्रियाश्च विविधाः(ख्), क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभि:||17.25||
सद्भावे साधुभावे च, सदित्येतत्प्रयुज्यते|
प्रशस्ते कर्मणि तथा, सच्छब्दः(फ्) पार्थ युज्यते||17.26||
यज्ञे तपसि दाने च, स्थितिः(स्) सदिति चोच्यते|
कर्म चैव तदर्थीयं(म्), सदित्येवाभिधीयते||17.27||
अश्रद्धया हुतं(न्) दत्तं(न्), तपस्तप्तं(ङ्) कृतं(ञ्) च यत्|
असदित्युच्यते पार्थ, न च तत्प्रेत्य नो इह||17.28||
यानंतर हरी शरणम् या भजनाने विवेचनाची सांगता झाली.
प्रश्नोत्तरे
मंजू जी - आपण सांगितले की जे आपल्या मनाला चांगले वाटते ते नेहमी केले पाहिजे असे नाही. आपल्यामध्ये दैवी आणि आसुरी दोन्ही गुण असतात, तर हे आपल्याला कसे समजावे?
श्रेय आणि प्रेय काय आहे हे समजले पाहिजे. सात्त्विक मनुष्याचे प्रेय देखील श्रेय होऊन जाते.
शाकाहारी लोकांनी प्रोटीन मिळवण्यासाठी मांसाहार घेतला पाहिजे असे बोलले जाते हे खरे आहे का?
अजिबात नाही. मांसाहार तर नेहमीसाठी व्यर्ज्य आहे. प्रोटीन प्राप्त होण्यासाठी डाळी कडधान्य दूध यांचा आहारात समावेश करा.
परंतु याने गॅसचा त्रास होतो.
आहारामध्ये याचा वापर योग्य तेवढाच केला पाहिजे म्हणजे गॅसचा त्रास होणार नाही.
मुरलीजी - पुत्रदान हे कसे होते?
दशरथाने विश्वामित्रांना यज्ञ रक्षणासाठी आपले पुत्र दिले होते. हे पुत्र दानच होते.
गौरीजी - तीर्थस्थानाच्या ठिकाणी दर्शनासाठी तिकीट लावले जाते. हे योग्य आहे का?
परमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहणे हे शारीरिक तप आहे. तुम्ही रांगेत उभे राहून व्यवस्थित दर्शन घेतले तरी तुम्हाला दर्शन होते व लवकर दर्शन व्हावे म्हणून तिकीट काढून रांगेत उभे न राहता दर्शन घेतले तरी देवाचे दर्शन होते, परंतु असे तिकीट काढून दर्शन घेतल्याने दर्शनाचे फळ हे निश्चितच कमी होते. परंतु जेथे देवस्थानची व्यवस्थाच अशी आहे की तिकीट न घेता तुम्हाला देवाचे दर्शन होतच नाही अशा ठिकाणी तुम्ही तिकीट घेतलेत व देवाचे दर्शन घेतले तर मात्र पूर्ण फळ प्राप्त होते.
अलकाजी - महाभारतामध्ये अर्जुन एकही युद्ध हरला नव्हता परंतु कृष्णाच्या निर्वाणानंतर मात्र एक युद्ध तो युद्ध हरला होता. याचा अर्थ असा होतो का की कृष्ण होता म्हणून अर्जुनाचा विजय होत होता?
पहिली गोष्ट म्हणजे अर्जुन आणि कृष्ण हे नर नारायण आहेत. त्यांचा जन्मोजन्मीचा सहवास आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अर्जुन जेव्हा ३२ वर्षांचा होता तेव्हा त्याची कृष्णाशी प्रथम भेट झाली होती. याचा अर्थ त्यापूर्वी लढलेली सर्व युद्धे अर्जुनाने जिंकली होती. हे मात्र नक्की की कृष्णाच्या निर्वाणानंतर अर्जुनाचे मनोबल कमी झाले होते आणि म्हणून तो ते युद्ध हरला असावा.
रोझी जी - असे म्हणतात की भगवान कणाकणात आहे. मग तो प्रकट दिसत कसा नाही?
आता हे पहा H20 म्हणजे पाणी. समजा आपल्याला तहान लागली आणि आपण ओंजळ समोर धरली आणि हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एक अणू घशात गेला तर आपली तहान भागते का? नाही ना! पाणी प्रकट करण्याची एक प्रक्रिया अथवा विधी असते तेव्हाच ते प्रकट होते. काडेपेटीच्या काडीमध्ये अग्नी आहे परंतु त्याचे घर्षण झाल्यानंतरच तो प्रकट होतो. तसेच कणाकणातील भगवान श्रद्धा आणि भक्तीने व साधनेने साधकासमोर प्रकट होऊ शकतो.
उर्मिला जी - आपण म्हणता मूगडाळ सात्त्विक आहे. मग कांदा आणि लसूण हा कशा प्रकारचा आहार आहे?
या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे ज्या पदार्थातून दुर्गंध येते तो सर्व तामसी आहार आहे आणि म्हणूनच कांदा आणि लसूण हा तामसी आहार आहे.
सीमाजी - आम्ही आत्ता घराचे रिनोवेशन केले तेव्हा संगमरवरी छोटे मंदिर घरामध्ये बांधले आहे. त्या जागी पूर्वीचे लाकडी मंदिर होते व काही जुने कागदाचे विग्रह होते ज्यांची आम्ही रोज पूजा करीत होते आता या दोन्ही गोष्टींचे काय करावे?
लाकडी देव्हारा जर दुसऱ्या कोणाला उपयोगी येत असेल तर जरूर देऊन टाकावा. अन्यथा या दोन्ही गोष्टींना भूमीसमाधी द्यावी. नदीमध्ये विसर्जन करू नये त्याने पाण्याचे प्रदूषण होते किंवा या वस्तू जाळूनही टाकू नये कारण भगवंतांच्या वस्तू जाळणे शोभा दायक अजिबात नाही.
यानंतर समापन प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥