विवेचन सारांश
जाणुनी गुणातीताची लक्षणे, अवलोकावे आपणासी आपणे.

ID: 5260
मराठी
रविवार, 04 ऑगस्ट 2024
अध्याय 14: गुणत्रयविभागयोग
2/2 (श्लोक 9-27)
विवेचक: गीता विशारद डॉ आशू गोयल जी


सर्वप्रथम प्रार्थनेने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली. त्यानंतर केलेल्या दीपप्रज्वलनाने  सर्व साधकांचे अंतर्मन प्रकाशित झाले.
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् ।
देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॥

योगेशं सच्चिदानंदं ,वासुदेवं व्रजप्रियम् ।

धर्म संस्थापकमं वीरं ,कृष्णम् वंदे जगतगुरुम् ॥
गुरुचरणकमलवंदना होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली.

जणू आपले सद्भाग्य जागृत झाले आहे, त्यामुळेच आपण सर्वजण भगवद्गीतेच्या चिंतनाचा आनंद घेत आहोत. ही काही साधारण गोष्ट नाही. भगवंताच्या कृपेशिवाय हे शक्य नाही आणि त्यासाठी आपले या जन्मातील अथवा पूर्व जन्मातील पुण्यकर्म आणि आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत.

चौदाव्या अध्यायाचे आठ श्लोक आपण मागील आठवड्यात पाहिले. गुरुआज्ञेने आणि  गुरुकृपेने गुणत्रयविभागयोग या विषयावरील सारगर्भित विवेचन ऐकण्याचा आपण प्रयत्न करूया.

14.9

सत्त्वं(म्) सुखे सञ्जयति, रजः(ख्) कर्मणि भारत।
ज्ञानमावृत्य तु तमः(फ्), प्रमादे सञ्जयत्युत॥14.9॥

हे अर्जुना! सत्त्वगुण सुखाला, रजोगुण कर्मांना तसेच तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमाद करण्याला ही प्रवृत्त करतो.

सत्त्व, रज आणि तम हे प्रकृतीचे तीन गुण आहेत. सृष्टीतील सर्व प्राणिमात्रांमध्ये हे तीनही गुण आवश्यक रूपात आहेतच. मनुष्याच्याही मूळ स्वभावामध्ये हे तीनही गुण स्वाभाविकपणे असतातच. प्रत्येक मनुष्यामध्ये या गुणांची प्रधानता मात्र वेगवेगळी असते. ज्यावेळी ज्या गुणाचा प्रभाव अधिक असतो त्यानुसार मनुष्याचा स्वभाव सात्विक, राजसी किंवा तामसी असा ओळखला जातो. या गुणांची मात्रा कमी अधिक करण्याची सोय भगवंतांनी मनुष्याला दिलेली आहे. यासाठी आपण हे तीनही गुण ओळखणे जरुरीचे आहे.
सत्त्वगुण हा प्रकाशमय असतो. सत्त्वगुणी मनुष्य स्थिर राहून सावधानतेने कार्य करतो आणि शांती प्राप्त करतो.
रजोगुण हा कर्मप्रधान असतो. त्यामुळे रजोगुणी मनुष्य सतत काही ना काही कार्य करीत राहतो. रजोगुणी मनुष्य एक तर सत्त्वगुणान्मुख असतो किंवा तमोगुणान्मुख असतो. त्याच्यातील रजोगुणामुळे तो कार्यप्रवृत्त तर असतोच, पण सत्त्वगुणांकडे झुकणारा असेल तर चांगले कार्य करण्याची प्रेरणा त्याला मिळते व तो परोपकारी जीवन व्यतीत करतो, जसे की या गीता महायज्ञामध्ये तो गीतासेवी बनतो. हाच रजोगुणी मनुष्य जर तमोगुणान्मुख असेल तर तो असे कार्य करतो की ज्याने दुसऱ्याचे काम बिघडेल किंवा दुसरा अयशस्वी होईल. असा मनुष्य मग दारू पितो, जुगार खेळतो. हे सर्व त्याच्यातील तमोगुणाच्या प्रभावामुळे घडून येते.
तमोगुणप्रधान मनुष्य कोणतेही कार्य न करता बसून राहतो. आळशीपणामुळे काम टाळण्याकडे त्याचा कल असतो. तमोगुणाने ज्ञान झाकले जाऊन प्रमाद उत्पन्न होतो.

महापुरुष या तीनही गुणांनी आपल्या ताब्यात ठेवतो त्यामुळे तो या गुणांच्या बंधनात कधीच अडकत नाही.

सुंदरकांडमध्ये गोस्वामी तुलसीदासजींनी हनुमानाने या तीनही गुणांचा अडथळा कसा पार केला याचे अत्यंत रोचक वर्णन केले आहे.-
सीतेमातेला शोधण्यासाठी जेव्हा हनुमानाने लंकेच्या दिशेने झेप घेतली तेव्हा वाटेत प्रथम मैनाक पर्वत लागला. मैनाक पर्वताने हनुमानाला विनंती केली की थोडा वेळ विश्राम करावा व पुढे जावे. काका या नात्याने आतिथ्याचा स्वीकार करून मगच पुढे जावे असा आग्रह त्यांनी हनुमानाला केला. मैनाक पर्वत सत्त्वगुणी होता. त्याने अतिशय चांगल्या भावनेने हनुमानाचे स्वागत केले होते, तरीही अत्यंत विनम्रतेने हनुमानाने त्यांना सांगितले-
हनुमान ते हीं परसा कर, पुनी कीन परणाम।
राम काज कीन्हें बिना, मोहे कहाँ आराम।।
श्रीरामांच्या कार्यासाठी मी चाललो आहे आणि ते कार्य पूर्ण केल्याशिवाय मला विश्रांती नाही, असे म्हणून पर्वताला प्रणाम करून हनुमानजी पुढे निघाले. मैनाक पर्वताने देखील यशस्वी होण्याचा आशीर्वाद देऊन पुढे जाण्याची परवानगी दिली.

त्यानंतर पुढे नागमाता सुरसा राक्षसीचे रूप घेऊन हनुमंता समोर आली. देवांनीच हनुमानाच्या बलबुद्धीची परीक्षा घेण्यासाठी तिला पाठवले होते. सुरसा हनुमंताला म्हणाली-
सुरसा नाम अहिन्ह कै माता। पठइन्हि आइ कही तेहिं बाता।।
आजु सुरन्ह मोहि दीन्ह अहारा। सुनत बचन कह पवनकुमारा।।
तू माझा आहार आहेस. मी आता तुला खाणार. त्यावर तिला हनुमंत म्हणाले- 
राम काजु करि फिरि मैं आवौं। सीता कइ सुधि प्रभुहि सुनावौं।।
तब तव बदन पैठिहउँ आई। सत्य कहउँ मोहि जान दे माई।।
माते!, मी राम कार्यासाठी चाललो आहे. ते काम पूर्ण करून मी परत येईन तेव्हा तू मला खा. मी तुला वचन देतो. मला आत्ता जाऊ दे.
सुरसा रजोगुणी होती एकदा विनंती करून तिने जेव्हा हनुमंताची विनंती मान्य केली नाही तेव्हा हनुमान तिला म्हणाले, "ठीक आहे. तर मग खा मला." त्यानंतर जेव्हा सुरसाने हनुमानाला गिळण्यासाठी आपले तोंड उघडले तेव्हा हनुमानजींनी आपल्या शरीराचा आकार वाढवला. ते पाहून सुरसा देखील आपले शरीर वाढवत राहिली आणि हनुमान देखील तिच्या दुप्पट आपले शरीर वाढवत राहिले.
जोजन भरि तेहिं बदनु पसारा। कपि तनु कीन्ह दुगुन बिस्तारा।।
सोरह जोजन मुख तेहिं ठयऊ। तुरत पवनसुत बत्तिस भयऊ।।
जस जस सुरसा बदनु बढ़ावा। तासु दून कपि रूप देखावा।।
अखेर सुरसाने आपले शरीर जेव्हा १०० योजने इतके दूरपर्यंत वाढवले तेव्हा हनुमानाने एकदम लघु रूप धारण केले व तिच्या मुखात प्रवेश केला. एवढे मोठे झालेले तोंड सुरसाने बंद करण्याच्या आतच हनुमान तिच्या मुखातून बाहेर देखील आले.
सत जोजन तेहिं आनन कीन्हा। अति लघु रूप पवनसुत लीन्हा।।
रजोगुणाला समजून घेण्याची देखील एक मिती असते. रजोगुणी व्यक्तीबरोबर थोडे शक्तीने व थोडे युक्तीने घ्यावे लागते. हनुमानजींना ही मिती बरोबर साधली होती.
हनुमान जी तिला म्हणाले, "आता तुझे वचनही पूर्ण झाले. आता मला पुढे जाऊ दे."
बदन पइठि पुनि बाहेर आवा। मागा बिदा ताहि सिरु नावा।।
तेव्हा सुरसा हनुमानजींना म्हणाली-
मोहि सुरन्ह जेंहि लागि पठावा। बुधि बल मरमु तोर मैं पावा।।
मला देवांनीच तुझ्या बुद्धि आणि बलाची परीक्षा घेण्यासाठी पाठवले होते, जे काम आता पूर्ण झाले आहे. तू तुझ्या कार्यात अवश्य यशस्वी होशील, असा आशीर्वाद तिनेही दिला.
अशाप्रकारे संघर्ष आणि बुद्धी या दोन्हीच्या सहाय्याने हनुमंताने रजोगुणाचा सामना केला.

त्यानंतर हनुमानजी पुढे निघाले तेव्हा तमोगुण एका राक्षसीच्या रूपात आडवा आला. या राक्षसीला असे वरदान प्राप्त होते की समुद्रावर उडणाऱ्या ज्या पक्षाची सावली ती पकडेल, त्याला ती खाऊ शकत होती. तिने हनुमानाला पकडण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु हनुमानाने एका शब्दानेही तिच्याशी वार्ता न करता आपल्या बलाने एकच ठोसा मारून तिला पार केले.
तमोगुणी मनुष्य कोणाचेच ऐकत नाही त्यामुळे अशा व्यक्तीबरोबर शाब्दिक गोष्टींमध्ये गुंतून पडू नये. तमोगुणी मनुष्याकडे दुर्लक्ष केलेलेच चांगले असते.

हनुमंताने जसे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये या तीन गुणांवर विजय मिळवला तसा बोध आपणही घेतला पाहिजे. 

नेहमी सत्त्वगुण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कधी कधी काय होते, आपण आपल्या चुका ओळखत नाही व इतरांना दोष देत राहतो.
उम्र भर मैं ये खता करता रहा, धूल चेहरे पर जमी थी, आईना साफ करता रहा।
या विधानास पुष्टी देणारी एक कथा आहे -
एकदा एक व्यक्ती डॉक्टरकडे जाते आणि डॉक्टरांना सांगते की माझ्या पूर्ण शरीरात कुठेही बोट लावले की दुखते. डॉक्टरांनी त्या व्यक्तीच्या कपाळाला, चेहऱ्याला, मानेला, हाताला बोट लावून परीक्षण केले, परंतु तसे कोणतेच कारण डॉक्टरांना लक्षात आले नाही. जेव्हा त्यांनी त्या व्यक्तीचे बोट पाहिले तेव्हा त्या बोटाला सूज आलेली होती. दरवाजा बंद करताना बोट दारात अडकले होते. डॉक्टरांनी त्या व्यक्तीला सांगितले की दुखणे शरीरात नाहीये तर केवळ त्या बोटामध्ये आहे.

14.10

रजस्तमश्चाभिभूय, सत्त्वं(म्) भवति भारत।
रजः(स्) सत्त्वं(न्) तमश्चैव, तमः(स्) सत्त्वं(म्) रजस्तथा॥14.10॥

आणि हे अर्जुना! रजोगुण आणि तमोगुण यांना दडपून सत्त्वगुण वाढतो. सत्त्वगुण व तमोगुणाला दडपून रजोगुण वाढतो. तसेच सत्त्वगुण व रजोगुणाला दडपून तमोगुण वाढतो.

कोणता गुण वरचढ होईल यासाठी आपली प्रवृत्ती जबाबदार असते. ज्या प्रवृत्ती मध्ये आपण आपला अधिक वेळ घालवू त्याचा प्रभाव गुणांवर पडतो.

समजा आपल्या घरी पूजेचे आयोजन केले आहे. सर्वजण जमले आहेत आणि आदल्या दिवशी रात्री सर्वजण सिनेमा पहात जागत राहिले तर दुसऱ्या दिवशी सकाळी होणाऱ्या पूजाकार्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. याउलट जर आदल्या दिवशी भजन कीर्तनामध्ये व सत्संगामध्ये वेळ घालवला तर घरामध्ये शुभकार्यास पोषक अशी वातावरण निर्मिती होते. कार्यही आनंदाने, वेळेत व शांततेत पार पडते.

14.11

सर्वद्वारेषु देहेऽस्मिन्, प्रकाश उपजायते।
ज्ञानं(म्) यदा तदा विद्याद्, विवृद्धं(म्) सत्त्वमित्युत॥14.11॥

ज्यावेळी या देहात तसेच अंतःकरणात व इंद्रियांत चैतन्य आणि विवेकशक्ती उत्पन्न होते, त्यावेळी असे समजावे की, सत्त्वगुण वाढला आहे.

पाचव्या अध्यायातील तेराव्या श्लोकात भगवंतांनी 'नवद्वारे पुरे देही' असे म्हटले आहे, म्हणजेच या शरीराला नऊ दरवाजे असणारे एक नगर अशी उपमा दिलेली आहे. पाच ज्ञानेन्द्रिये आणि अंतकरण चतुष्टय मिळून हे नऊ दरवाजे शरीराला आहेत. ज्यावेळी या सर्व द्वारांमध्ये ज्ञानाचा प्रकाश प्रकट होतो तेव्हा तो मनुष्य सात्विक म्हणून ओळखला जातो.

14.12

लोभः(फ्) प्रवृत्तिरारम्भः(ख्), कर्मणामशमः(स्) स्पृहा।
रजस्येतानि जायन्ते, विवृद्धे भरतर्षभ॥14.12॥

हे अर्जुना! रजोगुण वाढल्यावर लोभ, प्रवृत्ती, स्वार्थाने प्रेरित होऊन फळाच्या इच्छेने कर्मांचा आरंभ, अशांती आणि विषयभोगांची लालसा ही सर्व उत्पन्न होतात.

या श्लोकामध्ये रजोगुणी प्रवृत्तीचे वर्णन आहे.
लोभ म्हणजेच आसक्ती. मनुष्याला जीवनात जेवढे धन, यश, बल इत्यादी जितके मिळते त्यापेक्षा अधिक प्राप्त करण्याची आकांक्षा निर्माण होते.
प्रवृत्ती - समाजात आपण पाहतो की एखादा धनिक छोटेसे दान देताना देखील हजारदा विचार करतो. हे सुद्धा लोभी प्रवृत्तीमुळे होते. या उलट एखादा गरीब मनुष्य आर्थिक परिस्थिती नसतानाही जमेल तेवढी मदत दुसऱ्याला करत असतो. हीच ती मनुष्याची प्रवृत्ती.
कधी कधी इच्छा चुकीची नसते परंतु त्याच्याबरोबर लोभ जडल्यामुळे चुकीचे कर्म घडते. संपत्ती, यश, सत्ता मिळवण्यासाठी अन्यायकारक मार्ग अवलंबला जातो.
अशम - जेव्हा लोभामुळे चुकीचे कर्म करण्याची प्रवृत्ती वाढते तेव्हा मन अशांत व चंचल बनते.
स्पृहा - म्हणजे विषय वासना, भोगाना चिकटून राहण्याची सवय. दुसऱ्याकडे एखादी चांगली वस्तु आहे हे पाहिले की ती माझ्याकडे पण हवी अशी इच्छा धरणे.
वर उल्लेख केलेली सर्व लक्षणे जर आपल्यात असतील तर रजोगुणाची वृद्धी झाली आहे असे समजावे.

14.13

अप्रकाशोऽप्रवृत्तिश्च, प्रमादो मोह एव च।
तमस्येतानि जायन्ते, विवृद्धे कुरुनन्दन॥14.13॥

हे अर्जुना! तमोगुण वाढल्यावर अंतःकरण व इंद्रिये यांत अंधार, कर्तव्यकर्मांत प्रवृत्ती नसणे, व्यर्थ हालचाली आणि झोप इत्यादी अंतःकरणाला मोहित करणार्‍या वृत्ती, ही सर्व उत्पन्न होतात.

तमोगुणाची वाढ झाली तर-
अप्रकाश म्हणजेच अज्ञानाचा अंधकार वाढतो. योग्य गोष्टी सुद्धा चुकीच्या वाटू लागतात. अशा माणसाला त्याच्या हिताची गोष्ट सांगावयास गेले तर त्याला ती अहितकर वाटते. असा मनुष्य सरळ विचार सोडून उलट्या विचाराने वागू लागतो. त्याच्याकडून सर्व कामे चुकीच्या पद्धतीने होऊ लागतात. जे काम अगोदर प्राधान्याने करावयास पाहिजे ते त्याच्याकडून शेवटी केली जाते. अप्रवृत्ती वाढते. काम टाळण्याकडे तमोगुणी मनुष्याचा कल असतो. अशा माणसाला थोडेसे जरी काम सांगितले तरी अख्ख्या जगाचे ओझे त्याच्या डोक्यावर ठेवले आहे अशा पद्धतीने तो वर्तन करतो आणि तेवढेही काम न करता त्या कामापासून दूर पळण्यासाठी पर्याय शोधत राहतो. हीच ती अप्रवृत्ती.
प्रमाद - तमोगुणी व्यक्ती जे काम करावयास पाहिजे ते न करता फालतू गोष्टींमध्ये वेळ वाया घालवतो. मोह हा तमोगुणी माणसाच्या बुद्धीमध्ये मूढता निर्माण करतो. आपले हित अहित, हानी लाभ कशात आहे हे त्याला समजत नाही.

पंचतंत्रामध्ये मगरीची आणि माकडाची एक सुंदर कथा आहे-
एक मगर आणि एक माकड यांची मैत्री असते. नदीच्या काठी एका झाडावर माकड राहत असते आणि ते मगराला रोज गोड जांभळे खायला देत असते. कधी कधी मगर आपल्या पत्नीसाठी देखील जांभळे घेऊन जात असे. एकदा मगराची पत्नी मगराला म्हणते, "हे माकड रोज इतके गोड जांभूळ खाते तर त्याचे काळीज किती गोड असेल! तुम्ही एकदा त्या माकडाला घेऊन या म्हणजे आपण त्याचे काळीज खाऊ." त्यानंतर एकदा मगर माकडाला आपल्या घरी जेवणाचे निमंत्रण देतो व त्याला आपल्या पाठीवर बसवून पाण्यातून बरेच अंतर पुढे घेऊन जातो व त्यानंतर आपल्या पत्नीची इच्छा त्याला सांगतो. परंतु माकड हुशार असते. ते मगराला म्हणते की तू आधी का सांगितले नाहीस. माझे काळीज तर मी झाडावर काढून ठेवले आहे. ते ऐकून मगर त्याला पुन्हा झाडाजवळ घेऊन येतो तेव्हा माकड पटकन उडी मारून झाडावर निघून जाते व मगराला म्हणते, "आजपासून आपली मैत्री संपली." मोहात अडकून मगर एक चांगला मित्र गमावतो.

तमोगुणी मनुष्य मोहामुळे सारे संबंध तोडून टाकतो आणि आपले हितैषी सुद्धा गमावतो.

अशा प्रकारे या तीन गुणांच्या तीन वृत्तींबद्दल ऐकून अर्जुनाला असा प्रश्न पडतो की या तीन गुणांनी युक्त असलेल्या मनुष्याला मृत्यूनंतर कोणती गती प्राप्त होती असावी! याचे उत्तर भगवंत पुढील तीन श्लोकांमध्ये देत आहेत.

14.14

यदा सत्त्वे प्रवृद्धे तु, प्रलयं(म्) याति देहभृत्।
तदोत्तमविदां(म्) लोकान्, अमलान्प्रतिपद्यते॥14.14॥

जेव्हा हा मनुष्य सत्त्वगुण वाढलेला असताना मरण पावतो, तेव्हा तो उत्तम कर्मे करणाऱ्यांच्या निर्मळ दिव्य स्वर्गादी लोकांत जातो.

मृत्युसमयी सत्त्वगुण प्रधान असेल तर त्या मनुष्याला स्वर्गलोक प्राप्त होतो.

14.15

रजसि प्रलयं(ङ्) गत्वा, कर्मसङ्गिषु जायते।
तथा प्रलीनस्तमसि, मूढयोनिषु जायते॥14.15॥

रजोगुण वाढलेला असता मरण पावल्यास कर्मांची आसक्ती असणार्‍या मनुष्यांत जन्मतो. तसेच तमोगुण वाढला असता मेलेला माणूस किडा, पशू इत्यादी मूढ (विवेकशून्य) जातींत जन्मतो.

मृत्युसमयी रजोगुण प्रधान असलेल्या मनुष्याला कर्माच्या आसक्तीमुळे पुन्हा मनुष्यजन्म प्राप्त होतो.
मृत्युसमयी तमोगुण प्रधान असलेल्या मनुष्याला कीटक, पशु अशा मूढयोनीमध्ये जन्म घ्यावा लागतो.

14.16

कर्मणः(स्) सुकृतस्याहुः(स्), सात्त्विकं(न्) निर्मलं(म्) फलम्।
रजसस्तु फलं(न्) दुःखम्, अज्ञानं(न्) तमसः(फ्) फलम्॥14.16॥

श्रेष्ठ (सात्विक) कर्माचे सात्विक अर्थात सुख, ज्ञान आणि वैराग्य इत्यादी निर्मळ फळ सांगितले आहे. राजस कर्माचे फळ दुःख तसेच तामस कर्माचे फळ अज्ञान सांगितले आहे.

कोणता गुण प्रधान असेल तर कोणते फळ मिळते याविषयी भगवंत या श्लोकात सांगत आहेत.
सत्त्वगुणी मनुष्य नेहमी श्रेष्ठ कर्म करीत राहतो ज्यामुळे त्याला सुख आणि शांती प्राप्त होते. त्याचे जीवन तणावमुक्त होते. कोणत्याही प्रकारच्या लाभ आणि हानीचा त्याच्यावर परिणाम होत नाही. यासंबंधात संत कबीरदास यांच्या आयुष्यातील एक घटना पाहू-
कबीरदासांची एक गाय चोरीला गेली. शेजारी त्यांच्याकडे सांत्वना देण्यासाठी आले व गाईच्या गुणांची चर्चा करीत राहिले. परंतु कबीरदासजींना गाईच्या चोरीचे एवढे वाईट वाटले नाही. ते म्हणाले, 'बरे झाले. आता तिचे शेण वगैरे साफसफाई करावे लागणार नाही. डासांपासून सुद्धा सुटका मिळेल.' संध्याकाळी ती गाय परत घरी आली तेव्हा तेच लोक त्यांचे अभिनंदन करावयास आले. तेव्हा कबीरदास म्हणाले, "ठीक आहे. आता गाय आली तर गाईचे दूध मिळेल."
गायीची चोरी झाली होती तेव्हा देखील कबीरजी प्रसन्नच होते आणि गाय मिळाली तेव्हा देखील ते प्रसन्नच राहिले. दोन्ही परिस्थितीत ते विचलित झाले नाहीत.
परिस्थिती येते आणि जाते हे सत्त्वगुणी मनुष्य जाणून असतो. मनुष्याच्या अशा अवस्थेचे वर्णन करणारे पथिक जी महाराजांचे एक सुंदर भजन आहे-
कभी सुख है कभी दुःख है, इसी का नाम जीवन है, 
जो दुःख में भी न घबराए उसे इन्सान कहते हैं।
किसी के काम जो आए उसे इन्सान कहते हैं।।

रजोगुणी मनुष्य
मात्र परिस्थितीने प्रभावित होतो. लोभी प्रवृत्तीमुळे अधिकाधिक प्राप्त करण्याच्या ईर्ष्येने तो संतुष्ट न राहता दुःखी राहतो.

तमोगुणी व्यक्ती अज्ञानातच आपले जीवन व्यतीत करत असतो त्यामुळे त्याला सुखदुःख हित अहित याची चिंता नसते कारण त्याबाबतीत तो अनभिज्ञ असतो.

14.17

सत्त्वात्सञ्जायते ज्ञानं(म्), रजसो लोभ एव च।
प्रमादमोहौ तमसो, भवतोऽज्ञानमेव च॥14.17॥

सत्त्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते. रजोगुणापासून निःसंशय लोभ आणि तमोगुणापासून प्रमाद आणि मोह उत्पन्न होतात आणि अज्ञानही होते.

14.17 writeup

14.18

ऊर्ध्वं(ङ्) गच्छन्ति सत्त्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसाः।
जघन्यगुणवृत्तिस्था, अधो गच्छन्ति तामसाः॥14.18॥

सत्त्वगुणात असलेले पुरुष स्वर्गादी उच्च लोकांना जातात. रजोगुणात असलेले पुरुष मध्यलोकात म्हणजे मनुष्यलोकातच राहतात आणि तमोगुणाचे कार्य असलेल्या निद्रा, प्रमाद आणि आळस इत्यादीत रत असलेले तामसी पुरुष अधोगतीला अर्थात् कीटक, पशू इत्यादी नीच जातींत तसेच नरकात जातात.

सत्त्वगुणी मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो.
राजसी व्यक्ती मोहामुळे अडकून पडते आणि आपल्या कामनापूर्तीसाठी मृत्युलोकातच पुन्हा पुन्हा जन्म घेत राहते.
तमोगुणी मनुष्य आपल्या निष्क्रियतेमुळे अधोगती प्राप्त करतो.

14.19

नान्यं(ङ्) गुणेभ्यः(ख्) कर्तारं(म्), यदा द्रष्टानुपश्यति।
गुणेभ्यश्च परं(म्) वेत्ति, मद्भावं(म्) सोऽधिगच्छति॥14.19॥

ज्यावेळी द्रष्टा तिन्ही गुणांशिवाय दुसरा कोणीही कर्ता नाही, असे पाहतो आणि तिन्ही गुणांच्या अत्यंत पलीकडे असणार्‍या सच्चिदानंदघनस्वरुप मला परमात्म्याला तत्त्वतः जाणतो, त्यावेळी तो माझ्या स्वरुपाला प्राप्त होतो.

आपल्या सर्व कर्मांचा खरा कर्ता म्हणजेच हे तीन गुण आहेत हे जो जाणून घेतो तो या गुणांच्या बंधनापासून मुक्त होतो आणि तोच मला प्राप्त होतो.

14.20

गुणानेतानतीत्य त्रीन्, देही देहसमुद्भवान्।
जन्ममृत्युजरादुःखै:(र्), विमुक्तोऽमृतमश्नुते॥14.20॥

हा पुरुष शरीराच्या उत्पत्तीला कारण असलेल्या या तिन्ही गुणांना उल्लंघून जन्म, मृत्यू, वार्धक्य आणि सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्त होऊन परमानंदाला प्राप्त होतो.

जो मनुष्य सत्त्वगुणालाही पार करून विरक्त होतो, तो या भौतिक जगाच्या मोहजालापासून, वृद्धावस्थेच्या दुःखापासून आणि जन्ममृत्युच्या फेऱ्यापासून मुक्ती मिळवून अमरत्वाचा अनुभव करतो.

14.21

अर्जुन उवाच
कैर्लिंगैस्त्रीन्गुणानेतान्, अतीतो भवति प्रभो।
किमाचारः(ख्) कथं(ञ्) चैतांस्, त्रीन्गुणानतिवर्तते॥14.21॥

अर्जुन म्हणाला, या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणकोणत्या लक्षणांनी युक्त असतो? आणि त्याचे आचरण कशाप्रकारचे असते? तसेच हे प्रभो! मनुष्य कोणत्या उपायाने या तीन गुणांच्या पलीकडे जातो?

अर्जुनाला आश्चर्य वाटते की तीन गुणांनी युक्त असणारा मनुष्य गुणातीत कसा होऊ शकतो म्हणून तो भगवंतांना गुणातीताची लक्षणे सांगण्याची विनंती करतो. गुणातीत मनुष्य जो सर्व बंधनांच्या पलीकडे जातो त्याचे आचरण कसे असते हे सांगण्याची विनंती तो भगवंतांना करतो.

14.22

श्रीभगवानुवाच
प्रकाशं(ञ्) च प्रवृत्तिं(ञ्) च, मोहमेव च पाण्डव।
न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि, न निवृत्तानि काङ्क्षति॥14.22॥

श्रीभगवान म्हणाले, हे अर्जुना! जो पुरुष सत्त्वगुणाचे कार्यरुप प्रकाश, रजोगुणाचे कार्यरुप प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्यरुप मोह ही प्राप्त झाली असता त्यांचा विषाद मानत नाही आणि प्राप्त झाली नाही तरी त्यांची इच्छा करीत नाही,

सत्त्वगुणामुळे येणाऱ्या ज्ञानप्रकाशाचा त्याग, रजोगुणामुळे येणाऱ्या कार्यप्रवृत्तीचा त्याग आणि तमोगुणामुळे असणाऱ्या मोहाचा त्याग करून जो निवृत्त होतो तोच गुणातीत म्हणून ओळखला जातो. असा मनुष्य जे कर्तव्य समोर येईल ते निभावतो. काही काम नसले तरी तो विचलित होत नाही. अशा व्यक्तीला आपला मानापमान अथवा सुखदुःख  याची चिंता नसते. साक्षी भावाने तो सर्वत्र पाहतो. भाजीमध्ये मीठ जास्त झाले अथवा मीठ अजिबात नसले तरी त्याला काही फरक पडत नाही. जसे मिळेल तसे तो ग्रहण करतो. कोणी त्याची निंदा केली तर त्याला तो अपमानही वाटत नाही किंवा त्याला रागही येत नाही व कोणी प्रशंसा केली तरी तो स्थितप्रज्ञ राहतो.

14.23

उदासीनवदासीनो, गुणैर्यो न विचाल्यते।
गुणा वर्तन्त इत्येव, योऽवतिष्ठति नेङ्गते॥14.23॥

जो साक्षीरुप राहून गुणांकडून विचलित केला जाऊ शकत नाही आणि गुणच गुणांत वावरत आहेत, असे समजून जो सच्चिदानंदघन परमात्म्यांत एकरुप होऊन राहतो व त्या स्थितीपासून कधी ढळत नाही,

14.23 writeup

14.24

समदुःखसुखः(स्) स्वस्थः(स्), समलोष्टाश्मकाञ्चनः।
तुल्यप्रियाप्रियो धीर:(स्), तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः॥14.24॥

जो पुरुष निरंतर आत्मभावात राहून सुख-दुःख समान मानतो, माती, दगड आणि सोने यांना सारखेच मानतो, ज्याला आवडती व नावडती गोष्ट सारखीच वाटते, जो ज्ञानी आहे आणि स्वतःची निंदा व स्तुती ज्याला समान वाटतात,

या श्लोकाचा अर्थ समजून घेताना थोडी गल्लत होऊ शकते. चुकीचा अर्थ घेतला जाऊ शकतो. समलोष्टाश्मकाञ्चनः असा शब्द इथे वापरला आहे. याचा अर्थ गुणातीत मनुष्याला माती दगड आणि सोने हे एकसारखे असते म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की तो सोन्याला सुद्धा मातीच्या भावात तोलतो. समदर्शी आणि समभाव यात फरक आहे. गुणातीत मनुष्यासाठी 'वासुदेवः सर्वमिति' म्हणजेच त्याच्यासाठी सर्व प्राण्यांमध्ये भगवंताचा अंश आहे. ही समानता आहे, याचा अर्थ असा होत नाही की त्याने सर्वांशी एकसारखाच व्यवहार करावा. कुत्र्यांमध्ये आपल्याप्रमाणेच परमेश्वराचा अंश आहे म्हणून त्याला आपल्याबरोबर झोपवणे किंवा आपल्या थाळीत जेवावयास घेणे हा व्यवहार चुकीचा आहे. इथेच गडबड होते. आजकाल आपण पाहतो की काही लोक कित्येक दिवसात आपल्या भावंडांबरोबर एकत्र बसून भोजन करीत नाहीत परंतु आपल्या पाळीव कुत्र्याला मात्र आपल्याबरोबर जेवणाच्या टेबलावर घेतल्याशिवाय  जेवण करीत नाहीत. कुत्र्याला भाकरीचा तुकडा जरूर द्यावा पण तो घराच्या बाहेर आणि एखादा साधू दाराशी आला तर मात्र त्याला घरात बोलवून आसन देऊन त्याचे आदरातिथ्य केले पाहिजे.

14.25

मानापमानयोस्तुल्य:(स्), तुल्यो मित्रारिपक्षयोः।
सर्वारम्भपरित्यागी, गुणातीतः(स्) स उच्यते॥14.25॥

जो मान व अपमान सारखेच मानतो, ज्याची मित्र व शत्रू या दोघांविषयी समान वृत्ती असते, तसेच सर्व कार्यांत ज्याला 'मी करणारा' हा अभिमान नसतो, त्याला गुणातीत म्हणतात.

14.25 writeup

14.26

मां(ञ्) च योऽव्यभिचारेण, भक्तियोगेन सेवते।
स गुणान्समतीत्यैतान्, ब्रह्मभूयाय कल्पते॥14.26॥

आणि जो पुरुष अव्यभिचारी भक्तियोगाने मला निरंतर भजतो, तोसुद्धा या तिन्ही गुणांना पूर्णपणे उल्लंघून सच्चिदानंदघन ब्रह्माला प्राप्त होण्यास योग्य ठरतो.

या श्लोकामध्ये  भगवंत गुणातीत व्यक्तीच्या एका लक्षणाविषयी सांगतात ती म्हणजे अव्यभिचारी भक्ती म्हणजेच अनन्य भक्ती. आज-काल काही तथाकथित गुरू या श्लोकाचा चुकीचा अर्थ काढून लोकांची दिशाभूल करतात. ते सांगतात की एकाच देवाची पूजा करा, एकालाच गुरू माना, त्या व्यतिरिक्त दुसऱ्या एखाद्या देवाला किंवा गुरूला मानणे हा अपराध आहे. अव्यभिचारी भक्ती याचा अर्थ एकाच देवाची उपासना करणे असा अजिबात नाही. परमेश्वराची अनेक रूपे आहेत. आपला इष्ट देव कोणीही असो, त्याची आराधना करताना त्यात परमात्म्याचे रूप पहावयाचे ही अनन्यभक्ती. गुणातीत व्यक्तीची प्रवृत्ती ही भोगांमध्ये नसून भगवंतामध्ये असते आणि आम्हाला म्हणजे सर्वसामान्य माणसाला भोग आणि भगवान हे एकत्र हवे असतात हा व्यभिचार आहे.

व्यक्ती, तिची लक्षणे आणि तिचे गुण या तीनही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. व्यक्ती आणि तिचे गुण यांचे अवलोकन करण्यासाठी महत्त्वाच्या ११ कसोट्या खालील प्रमाणे आहेत. यातील प्रत्येक लक्षणाचा अभ्यास करून आपण स्वतःचे उत्तम अवलोकन करू शकतो आणि कुठल्या लक्षणासाठी आपण सत्त्वगुणी आहोत  कुठल्या लक्षणासाठी रजोगुणी आहोत व कुठल्या लक्षणासाठी आपण तमोगुणी आहोत हे आपले आपल्यालाच जाणून घेता येते आणि त्यानंतर पुढे जाऊन आपण सत्त्वगुणप्रधान आहोत की रजोगुणप्रधान आहोत की तमोगुणप्रधान आहोत हे ठरवता येते व त्यानुसार आपल्या वर्तनामध्ये आवश्यक बदल घडवून आणता येतात व सत्त्वगुणाप्रति वाटचाल करता येते. त्याच्या पुढची पायरी म्हणजे गुणातीत होऊन मोक्ष प्राप्ती करता येते.

व्यक्तीप्रमाणे लक्षण आणि लक्षणानुसार व्यक्ती - ११ कसोट्या

प्रकृती ही पदार्थ आणि क्रिया यांनी मिळून बनलेली आहे. येथील प्रत्येक पदार्थ आणि क्रिया या सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांच्या प्रभावाखाली आहेत, म्हणूनच आपण या तीन गुणांच्या बंधनात आहोत. येथे गुणांची प्रधानता ही महत्त्वपूर्ण आणि लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे. आपल्या मध्ये कोणता गुण प्रधान आहे हे जर ओळखता आले तर त्याची प्रधानता कमी जास्त करण्याची सुविधा भगवंतांनी विवेक बुद्धीच्या रूपाने सर्वांना दिलेली आहे.

१.व्यवहार 
सत्त्वगुणी व्यक्ती संतुष्ट असते, समाधानी असते. तक्रार करण्याचा तिचा स्वभाव नसतो. जशी परिस्थिती असेल त्यामध्ये असा मनुष्य समाधानी असतो.
रजोगुणी मनुष्य संतुष्टी प्राप्त करण्यासाठी जीवनभर धावत असतो. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा त्याच्या मनात निर्माण होते आणि त्या मागे तो धावत राहतो. पूर्ण संतोषाची स्थिती तो कधीच अनुभव करत नाही.
तमोगुणी मनुष्य आळशीपणातच संतुष्ट असतो. तो दुसऱ्याच्या प्रगतीने असंतुष्ट होतो. दुसऱ्याचे यश पाहून तो दुःखी होतो.

२.वाणी 
सत्त्वगुणी मनुष्य नेहमी प्रिय आणि हितकारी आणि सत्य असेच वचन बोलतो, तेही अत्यंत मृदू आवाजात. अप्रिय असेल तर ते सत्य तो सहसा सांगत नाही.
रजोगुणी माणसाची वाणी तीक्ष्ण असते. जणू तो भांडण करण्यासाठीच बोलतो. मी जे बोलतो तेच सत्य आहे हे सांगण्यासाठी तो उच्च स्वरामध्ये बोलतो. त्याच्या बोलण्यातून नेहमी दुसऱ्याला कमी लेखण्याची प्रवृत्ती दिसून येते.
तमोगुणी मनुष्य अज्ञानामुळे मूढतापूर्ण भाष्य करतो आणि निंदा आणि उपहासाचा  धनी होतो. 

३.भोजन
सत्त्वगुणी मनुष्य भुकेचे महत्त्व जाणत असतो. जेवढी भूक असेल तेवढेच अन्न तो ग्रहण करतो. जेव्हा भूक नसेल तेव्हा तो खात नाही. त्याचे भोजन  केवळ क्षुधापूर्तीसाठी असते.
रजोगुणी मनुष्याला स्वादाचे महत्त्व अधिक वाटते. आवडीचे भोजन नसेल तर तो जेवत नाही किंवा भोजन झाल्यानंतर एखादा आवडीचा पदार्थ समोर आल्यास तो भूक नसली तरीही खाईल. त्यामुळे रजोगुणी व्यक्तीला अपचनामुळे दुःख सहन करावे लागते.
तमोगुणी माणसासाठी ना भूक महत्त्वाची असते ना स्वाद महत्त्वाचा असतो. मांस, मदिरा, उष्टे, शिळे असे अन्न सुद्धा तो प्रसंगी खातो.

४.वस्त्र 
सत्त्वगुणी मनुष्य पांढऱ्या रंगाचे, फिक्या रंगाचे आणि सुविधाजनक असे कपडे वापरतो.
रजोगुणी मनुष्याचा कल गडद रंगाचे, छान दिसणारे आणि फॅशनेबल कपडे वापरण्याकडे असतो, मग भले ते कपडे कम्फर्टेबल नसले तरीही मी त्यात सर्वांत उठून दिसले पाहिजे अशी त्याची विचारधारणा असते.                तमोगुणी मनुष्याचा स्वतःच्या कपड्यांबद्दल काहीच विचार नसतो. असभ्य, असुविधाजनक, अस्वच्छ असे कपडे तो परिधान करतो. त्याचे त्याला काहीच वाटत नाही.

५.आवास
सत्त्वगुणी मनुष्याचे घर कदाचित लहान असेल परंतु ते अत्यंत स्वच्छ आणि नीटनेटके ठेवलेले आढळून येते. घरामध्ये नैसर्गिक उजेड आणि हवा खेळती असते.
रजोगुणी मनुष्याचे घर विलासी असते. अशा माणसाच्या घरामध्ये तुम्हाला उंची वस्तू पहावयास मिळतील. उंची वस्तूंनी घर सुशोभित केलेले आढळेल. घराविषयीही दिखावा आणि मोठेपणा!
तमोगुणी माणसाच्या घरामध्ये सदैव पसारा पहावयास मिळेल. सर्वत्र अव्यवस्थेतता आढळून येईल. घर अस्वच्छ असले तरी अशा मनुष्याला काहीच फरक पडत नाही.

६.निवेश
सत्त्वगुणी मनुष्य आपल्याजवळ असलेल्या धनाची गुंतवणूक शक्यतो सुरक्षिततेचा विचार करूनच करतो. नफ्याचा तो फारसा विचार करत नाही आणि म्हणूनच तो पीपीएफ, एलआयसी फिक्स्ड डिपॉझिट, किसान विकास पत्रे यामध्ये आपली संपत्ती गुंतवतो, इतकेच नाही तर आपल्या पुढल्या जीवनासाठी तो काही भाग हा दान करून पुण्य देखील कमवतो.
रजोगुणी मनुष्य केवळ नफ्याचाच विचार करतो. थोड्या अवधीत जास्त परतावा मिळेल अशा योजनांमध्ये व म्युच्युअल फंडामध्ये, शेअर मार्केटमध्ये तो आपला पैसा गुंतवतो.
तमोगुणी मनुष्य अविचारी असतो. तो जुगारांमध्ये आपल्याकडे पैसा लावतो. कधी त्याला धन मिळते तर कधी ते जसे येते तसे निघूनही जाते. अज्ञानामुळे फसव्या, भुलवणाऱ्या आणि आकर्षक योजनांमध्ये तो पैसे गुंतवतो.
 
७.कार्य
सत्त्वगुणी मनुष्याचे कार्य हे श्रेय या स्वरूपामध्ये मोडते. स्वतःच्या बुद्धीने पारखून तो कार्य करतो. आपले कर्तव्य प्राधान्याने निभावतो.
रजोगुणी  मनुष्याचे कार्य प्रेय या स्वरूपाचे असते. त्याला जे आवडते ते काम तो अगोदर करतो. दहा मिनिटे मी आधी झोपतो किंवा दहा मिनिटे मी मोबाईल पाहतो आणि नंतर काम करतो, अशी त्याची  वृत्ती असते.
तमोगुणी माणसाच्या बाबतीत कामाची विवशता पहावयास मिळते. त्याला काम करण्याची इच्छा नसतेच. 'असेल हरी तर देई खाटल्यावरी' अशी त्याची वृत्ती असते.

८.स्वभाव  
सत्त्वगुणी माणसाचा स्वभाव हा स्वतः बरोबरच दुसऱ्याचेही हित जपण्याचा असतो.
रजोगुणी माणसाचा स्वभाव माझे काम झाले पाहिजे मग दुसऱ्याचे काम बिघडले तरी चालेल, अशा प्रकारचा असतो.
तमोगुणी मनुष्य स्वतः असे काम करेल की ज्यामुळे दुसऱ्याचे अहितच होईल.

९.रुची
सत्त्वगुणी माणसाला  धर्म आणि सेवा याची आवड जास्त असते. तो पूजापाठ करेल, जप करेल, सत्संग करेल, सत्कार्य करेल.
रजोगुणी मनुष्य मान मिळवण्यासाठी दिखाव्यासाठी एखाद्या कामात रुची दाखवेल. घरी पाहुणे येतील तेव्हा त्यांना दाखवण्यासाठी जास्त काळ पूजेमध्ये घालवेल  अथवा त्यांच्यावर प्रभाव पडावा म्हणून टीव्हीवर प्रवचन लावून बसेल.
तमोगुणी माणसाची रुची ही अधर्माकडे असते. याचे कारण म्हणजे त्याची विचारधारा उलटीच वाहत असते. त्या मनुष्याला भोगामध्ये जास्त रुची असते.

१०.इच्छा
सत्त्वगुणी मनुष्य केवळ आवश्यकता असेल तरच एखाद्या गोष्टीची इच्छा धरतो. त्याच्यासाठी आवश्यकतेचे महत्त्व अधिक असते.
रजोगुणी मनुष्य एखाद्या गोष्टीची आवश्यकता नसेल तरीदेखील तिची इच्छा धरतो. त्याच्या दृष्टीने इच्छा पूर्ण होणे महत्त्वाचे असते. मोबाईल व्यवस्थित काम करत असला तरी सुद्धा बाजारात एखादे नवीन मॉडेल आले की तो विकत घेणारच अशी त्याची वृत्ती असते.
तमोगुणी व्यक्तीला समोरच्या माणसाची इच्छा पूर्ण झालेली बघवतच नाही. त्यामुळे तो दुसऱ्याच्या इच्छेमध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न करतो.

११.संग
सत्त्वगुणी मनुष्य नेहमी सज्जनांच्या संगतीत राहणे पसंत करतो. 
रजोगुणी व्यक्तीच्या ठायी उच्च संगाचा दंभ असतो. प्रभावशाली व्यक्तीबरोबर आपली चांगली ओळख असल्याचा तो देखावा करतो. केवळ इतरांना दाखवण्यासाठी व बढाई मारण्यासाठी तो प्रभावशाली व्यक्तींबरोबर आपली मैत्री असल्याचे नाटक वटवतो.
तमोगुणी मनुष्य चुकून सुद्धा सज्जनांच्या संगतीत जात नाही. ज्ञानाच्या व धर्माच्या गोष्टी करणाऱ्या लोकांजवळ तो फिरकत नाही.
संगतीचा प्रभाव हा परिणामकारक असतो.
गगन चलै रज पवन प्रसङ्ग, कीच ही मिल हिं नीच जल सङ्ग।।
मातीचे कण जेव्हा वायू बरोबर जातात तेव्हा आकाशाची उंची प्राप्त करतात व तेच मातीचे कण जेव्हा पाण्याचा संग करतात तेव्हा चिखल बनून  जातात.  म्हणूनच कोणाचा स्वभाव ओळखायचा असेल तर त्याची संगत कशी आहे हे बघितले जाते.

जडचेतन, गुणदोष यांनी ही सृष्टी बनलेली आहे. संत सज्जनांची दृष्टी अशी असते की ते वाईटातूनही काहीतरी चांगले शोधून घेतातच व वाईटाची उपेक्षा देखील करत नाहीत. हा त्यांचा गुण निश्चितच ग्रहणीय आहे.
एकदा महात्मा गांधीजींकडे एक कार्यकर्ता आला. त्याने दहा-बारा पानांवर काही मजकूर लिहून आणला होता. कदाचित त्याच्या कार्याविषयी असेल, सूचनांविषयी असेल. त्याने ती पाने गांधीजींच्या हातात दिली . गांधीजींनी एकेक पान उलटून मजकूर वाचला. त्या दहा-बारा पानांना एक टाचणी लावलेली होती. ती टाचणी तेवढी गांधीजींनी काढून घेतली आणि ती सर्व पाने त्या कार्यकर्त्याला परत दिली. कार्यकर्ता आश्चर्यचकित होऊन पहात राहिला. तेव्हा गांधीजी म्हणाले, "यातली माझ्या उपयोगाची जी गोष्ट होती  तेवढीच मी घेतली." गांधीजी त्याला ना मजकुरा विषयी काही बोलले, ना त्याच्या विचारांविषयी काही निंदा केली, ना की एका शब्दाने त्याला दुखावले! 

14.27

ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम्, अमृतस्याव्ययस्य च।
शाश्वतस्य च धर्मस्य, सुखस्यैकान्तिकस्य च॥14.27॥

कारण त्या अविनाशी परब्रह्माचा, अमृताचा, नित्य धर्माचा आणि अखंड एकरस आनंदाचा आश्रय मी आहे.

या शेवटच्या श्लोकात सारे सार भगवंतांनी सांगितले आहे. भगवान श्रीकृष्ण हेच ब्रह्म आहेत आणि ब्रह्म म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आहेत.
ज्याप्रमाणे खीर बनवल्यावर ती चाखून तिची चव जाणता येते व तिच्या सुगंधावरूनही तिच्या स्वादाची कल्पना येते तसेच ती बघूनही मन तृप्त होते. वेगवेगळ्या इंद्रियांनी जरी खीरीचे परीक्षण केले तरी अंतिमतः ती खीरच असते. आकर्षण खीरीचेच असते. त्याप्रमाणे भगवंताची अनेक रूपे असली तरी आकर्षण त्या परमात्म्याचेच हवे.
याबरोबरच हरीशरणम् या भजनाने विवेचनाची सांगता झाली आणि प्रश्नोत्तराच्या सत्रास सुरुवात झाली.

प्रश्नोत्तरे

नीती दीदी - संसारी जीवनात राहून गीतेतील १८ अध्यायांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण बनू शकतो का?
मला एक सांगा, आत्ता मी ज्या अकरा कसोट्या सांगितल्या त्यावर चिंतन करून सत्त्वगुणी बनण्याची जी गोष्ट आहे ती तुम्हाला जमेल असे वाटते का? याचे उत्तर जर हो असेल तर नक्कीच हे शक्य आहे. आपल्याला मनातून एखादी गोष्ट करायची असते पण प्रत्यक्षात आपण करू इच्छित नसतो. फक्त सुरुवात करण्याची खोटी असते. जेव्हा तुम्ही गीतेत सांगितल्याप्रमाणे दोन गोष्टी करता तेव्हा तिसरी गोष्ट आपोआप होते. सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. बाकी सर्व हळूहळू होते.

मुरली जी - समदर्शन आणि समवर्तन यात काय फरक आहे?
समदर्शन म्हणजे सर्वांप्रत प्रेमभाव जागवणे आणि समवर्तन हा शब्द वर्तणुकीशी संबंधित आहे. ज्या सर्वांप्रति तुमच्या मनात प्रेम भाव आहे त्या सर्वांविषयी तुमचा व्यवहार मात्र वेगळा असू शकतो. व्यवहाराचे वर्तन योग्य असले पाहिजे.

माधुरी दीदी - मी सत्त्वगुणी आणि रजोगुणी आहे असे मला वाटते. तरी देखील जीवनात सर्व गोष्टी व्यवस्थित होत नाहीत असे वाटते.
हे सर्व हळूहळू होत असते. थोडी संयमाची आवश्यकता असते.

अंजू जी - आपल्यामध्ये कोणता गुण जास्त आहे हे कसे ओळखावे?
मगाशी उल्लेख केलेल्या ११ कसोट्यांपैकी प्रत्येक कसोटीवर आपले गुण पारखून पहावे. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आपण किती वेळा सत्त्वगुणात वावरतो, रजोगुणात वावरतो अथवा तमोगुणात वावरतो हे पहावे. आपली आवड, आहार, आपण कोणते कपडे परिधान करतो हे पहावे व त्याप्रमाणे जर जास्त फॅशनेबल कपडे घालत असाल आणि त्यांनी तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल तर आपल्याला कम्फर्टेबल असणारे कपडे वापरायला सुरुवात करावी. अशा प्रकारे हळूहळू एकेका गोष्टीवर काम करावे.

अलका दीदी - सत्त्वगुणी मनुष्य अहंकारी असू शकतो का?
हो. असू शकतो. पुराणातील दुर्वास ऋषी याचे उत्तम उदाहरण आहेत. सत्त्वगुणाचा देखील अहंकार होऊ शकतो व त्याने तमोगुण वाढतो.

बजरंग जी
- या लोकात जो मनुष्य सुखी असतो तो परलोकात देखील सुख प्राप्त करतो हे खरे आहे का?
प्रत्येकाच्या जीवनात सुख आणि दुःख हे येतच असते. त्यातही आपण असे म्हणू शकू की प्राधान्याने या जीवनात सुखभोगणारा मनुष्य हा सत्त्वगुणी असतो.

राणी मिश्रा - आपण जी आराधना अनुष्ठान इष्टदेवतेसाठी करतो ते इष्टदेवतेलाच अर्पण करू शकतो का?
जर तुम्ही सकाम अनुष्ठान ठेवले असेल म्हणजे काहीतरी इच्छा मनात धरून जर आराधना करत असाल तर त्या बदल्यात तुम्हालाच इष्टदेवतेकडून काही प्राप्त होणार असते. त्यामुळे असे अनुष्ठान तुम्ही त्या देवतेला अर्पण करू शकत नाही.

कधीकधी कामात एवढे व्यस्त असतो की अनुष्ठानासाठी वेळ मिळत नाही. त्यासाठी काय करावे?
एक - कमीत कमी वेळेचे बंधन स्वतःला घालून घ्यावे व तेवढ्या वेळासाठीच अगदी पाच मिनिटांसाठी सुद्धा एका जागी व्यवस्थित आसन लावून नियमाने अनुष्ठान करावे. एवढा नियम पाळल्यानंतर बाकीच्या गोष्टी म्हणजे पूजापाठ, जप इत्यादी येता जाता, काम करता करता देखील करू शकता. असे केले तर त्यात गैर काहीच नाही. यास आपण फार तर उत्तम, मध्यम आणि निम्न अवस्थेचे स्तर असे वर्गीकरण करू शकू.

सविता दीदी - आमच्या परिवारातील एक एक जण आम्हाला सोडून गेले. मुलगी पण गेली. तिचा परिवार पूर्ण उध्वस्त झाला. त्यामुळे माझा देवावरचा विश्वासच उडून गेला.
जीवन अनित्य आहे. मृत्यू हेच सर्वात मोठे सत्य आहे जे कोणीही टाळू शकत नाही. आपले जीवन मायेने बांधले गेलेले असते. जीवनामध्ये आपल्याला जे काही प्राप्त होते ते आपल्याच कर्मानुसार मिळत असते. यासाठी धर्मपालन, पूजाअर्चा, जपजाप्य याचा काहीही संबंध नसतो. यक्षाने युधिष्ठिराला जे १०० प्रश्न विचारले, त्यातील एक प्रश्न हा होता - 'किंम् आश्चर्यम्?' तेव्हा युधिष्ठिराने उत्तर दिले - मनुष्य दुसऱ्याच्या मरणानंतर ज्या तऱ्हेने शोक करतो जसे की तो स्वतः कधी मरणारच नाहीये हेच सर्वात मोठे आश्चर्य आहे.
मी जे काही धर्मपालन केले त्यामुळे माझी बुद्धी कशी स्थिर झाली हे पाहणे महत्त्वाचे आहे. चांगले आयुष्य लाभावे यासाठी योग करावा लागतो. मुलीच्या परिवाराची चिंता करण्याची आवश्यकता नाही. परमेश्वर सगळ्यांना विवेकबुद्धी देऊन पाठवत असतो.

यानंतर समापन प्रार्थनेने  कार्यक्रमाची सांगता झाली.
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥