विवेचन सारांश
ज्ञानयोग, भक्ती आणि ध्यानयोगाचे वर्णन
देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॥
योगेशं सच्चिदानंदं ,वासुदेवं व्रजप्रियम् ।
धर्म संस्थापकमं वीरं ,कृष्णम् वंदे जगतगुरुम् ॥
आपण जीवन सफल करण्यासाठी या जन्मातच नाही तर पुढच्या जन्मातही यशस्वी होण्यासाठी गीतेचे पठण करण्यास आणि ती जीवनात उतरवण्यास अग्रेसर झालो आहोत. आपले या जन्माचे सुकृत, पूर्वजन्मीचे पुण्य, संतमहात्म्म्यांची कृपा या सर्वांमुळे भगवद्गीतेचे सान्निध्य आपल्याला मिळाले. भगवद्गीतेसमान मनुष्याचे कल्याण करणारा सुगम ग्रंथ इतर कोणताही नाही. शेकडो वर्षांपासून भगवद्गीतेवर टीकाटिप्पणी केली जाते आहे. या सर्व टीका वाचणे, समजून घेणे हे सर्व अद्भुत आहे. केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही तत्त्वचिंतक भगवद्गीतेमुळे प्रभावित झाले आहेत.
कर्मयोगाचा हा महत्त्वपूर्ण अध्याय आहे. याचे नाव कर्मसंन्यासयोग आहे. या अध्यायाच्या आठव्या आणि नवव्या श्लोकात भगवंताने तेरा क्रियांचे वर्णन केले आहे. पाच क्रिया ज्ञानेंद्रियाच्या आणि पाच क्रिया कर्मेंद्रियांच्या आहेत. एक अंत:करण,एक प्राण आणि एक कुर्मप्राणाची अशा या १३ क्रिया आहेत. या तेरा क्रियांमध्ये योगी 'मी' काहीच करत नसून भगवंत हे सर्व करतो या साक्षीभावाने बघतो.
दहाव्या श्लोकात भगवंत म्हणतात योगी कमलपत्राप्रमाणे असून कशातही लिप्त होत नाही.
ब्रह्मण्याधाय कर्माणि, सङ्गं त्यक्त्वा करोति यः꠰
लिप्यते न स पापेन, पद्मपत्रमिवाम्भसा॥५.१०꠱
योगी संसारात विचरण करतो. सगळ्यांशी व्यवहारही करतो. सगळे आवश्यक कर्तव्यही करतो पण आसक्तीरहित राहून कर्म करत असतो.
5.11
कायेन मनसा बुद्ध्या, केवलैरिन्द्रियैरपि।
योगिनः(ख्) कर्म कुर्वन्ति, सङ्गं(न्) त्यक्त्वात्मशुद्धये॥5.11॥
एखादा लहान मुलगा त्याच्या वडिलांना वाढदिवसानिमित्त भेट देतो. ही भेट विकत घेण्यासाठी त्याच्या पिगीबँकमधल्या पैशांचा तो वापर करतो किंवा वडिलांकडून शंभर रुपयाची नोट तो मागतो. जेव्हा ही भेट तो वडिलांना देतो तेव्हा वडील ती आनंदाने स्वीकारतात. भेट घेताना त्या भेटीमागील प्रेम आणि मुलाच्या भावना याचाच विचार वडील करतात. त्याचप्रमाणे भगवंत आपला भाव बघत असतात. आपण स्वयंपाक करतो आणि आधी भगवंताला नैवेद्य दाखवतो. नैवेद्य दाखवून लगेच जेवायला सुरुवात करतो. ही सगळी क्रिया यांत्रिकपणे न करता भगवंतासाठी मी करतो आहे ही भावना त्यामध्ये असली तर ती भगवंतापर्यंत पोहोचते. सगळे काही भावात आहे. जप, ध्यान, पूजा, तीर्थयात्रा, गीतापठण यामुळे भगवंताची प्राप्ती आपल्याला होणार नाही. भगवत्प्राप्तीसाठी जरी आपण हे सर्व करत असलो तरी अंतर्यामी शक्तीला जागृत करून जर आपण हे केले तरच ते योग्य असते.
आरशावर धूळ असेल तर आपले प्रतिबिंब दिसत नाही. आरसा पुसल्यावर प्रतिबिंब स्पष्ट दिसते. त्याचप्रमाणे आपल्या अंतःकरणातील मळ नाहीसा झाला आणि ते शुद्ध झाले तरच भगवंतापर्यंत आपण पोहोचू शकतो. अंत:करण शुद्ध नसेल तर या सर्व गोष्टींचा काही उपयोग नाही. रोज पहाटे तीन वाजता उठणे, ध्यान करणे, योग करणे, गीतापारायण ककरणेरते अशा सवयी काही लोकांना असतात. या सवयी चांगल्याच आहेत. रोज केल्याने या अंगवळणी पडतात. परंतु हे सर्व करण्यामागे अंतःकरण शुद्धीचा हेतू नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही.
काही लोक रोज तीन, चार तास देवपूजेत व्यतित करतात. असे असून सुद्धा हेच लोक थोड्या फायद्यासाठी पटकन खोटे बोलताना आढळतात. इच्छा, लोभ, वासना यांच्यामध्ये खूप भरलेल्या असतात. वास्तविक पूजा करताना आपल्यातील दुर्गुण कसे कमी होतील असा भाव असायला हवा. पण त्यांच्या वर्तनातून तसे काही होते असे दिसत नाही. याचे कारण त्यांचे पूजेचे विधी यांत्रिक असतात. त्यात अंतःकरणशुद्धीचा हेतू नसतो. पूजेचा मुख्य हेतू चित्ताशुद्धी असायला हवा.
गीतेचे काही साधक काही वर्षे गीतापरिवरात गीता शिकत आहेत. त्यांचे पठणाचे चार स्तर दोनदोनदा पूर्ण झाल्याचे ते सांगतात. हे सर्व चांगलेच आहे. परंतु यातून आपल्या स्वभावात, दृष्टीकोनात काही परिवर्तन झाले की नाही हे आपण स्वतः तपासून पहावे. आपल्या जीवनात सत्य, प्रेम, औदार्य वाढले की नाही हे पाहावे. आपल्या जीवनातील कपट, वासना कमी झाल्या की नाही हे पाहावे. सद्गुण वाढत नसतील तर नुसत्या क्रियांना अर्थ नसतो. सत्कर्माने काही ना काही चांगला बदल घडत असतो, भलेही तो अप्रत्यक्ष असेल पण केलेले चांगले कार्य कधीही वाया जात नाही.
श्रीमद्भगवद्गीता वारंवार पठण केल्याने त्याचे पुण्यफळ नक्की मिळेल पण केवळ पुण्य प्राप्त करणे हा हेतू नसावा. अंतःकरण शुद्धी हा मुख्य हेतू असला पाहिजे. हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे असे भगवंत सांगतात. चित्तशुद्धीखेरीज भगवत्प्राप्ती अशक्य आहे. जप, तप, योग, पूजा ही साधने साबणासारखी आहेत. यांनी आपल्या चित्तातील मळ धुवून निघतो. योगी सुखदुःखाचा त्याग करुन भगवत्प्राप्तीसाठी आपले अंतःकरण शुद्ध करतात.
युक्तः(ख्) कर्मफलं(न्) त्यक्त्वा, शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्꠰
अयुक्तः(ख्) कामकारेण, फले सक्तो निबध्यते॥5.12॥
सीताराम सीताराम सीताराम कहिये l
जाहि विधि राखे राम ताहि विधि रहीए ll
राम आपल्याला जसे ठेवेल तसे आपण आपले कर्तव्यकर्म करत आनंदाने राहावे.
जो कर्म फळाची अपेक्षा ठेवतो त्याला परत जन्माला येऊन दुःखांशी सामना करावा लागतो. तो पुनरपि जननम् पुनरपि मरणम् या चक्रात अडकतो.
सर्वकर्माणि मनसा, सन्न्यस्यास्ते सुखं(म्) वशी।
नवद्वारे पुरे देही, नैव कुर्वन्न कारयन्॥5.13॥
आपल्या देहाची नऊ द्वारे म्हणजे दोन डोळे, दोन कान, एक मुख, दोन नासिका, एक लिंग, गुदा. शास्त्रात आणखी दोन द्वारे सांगितली आहेत. त्यातील एक म्हणजे नाभी. आईच्या गर्भात असताना बालकाचे पोषण करण्याचे काम नाभीतून होत असते. जन्म झाल्यावर, नाळ कापल्यानंतर नाभी बंद होते. अकरावे द्वार म्हणजे ब्रह्मरंध्र. योग्यांना योगाच्या सहाय्याने यामधून प्राण बाहेर काढता येतो. नऊ द्वारांचे आपले शरीर आहे याविषयी भागवत महापुराणात प्राचीन बहिर ऋषींना नारदाने कथा सांगितली.
दोन मित्र होते. एकाचे नाव अविज्ञात होते. त्याच्या नावाप्रमाणे त्याच्याविषयी किंवा त्याच्या जन्माविषयी कोणाला काहीही माहित नव्हते. दुसऱ्याचे नाव पुरंजन होते. पुरंजन चंचल स्वभावाचा होता.एक दिवस पुरंजन अविज्ञाताला म्हणाला की मित्रा तुला तर कसलीच इच्छा होत नाही, तू एकदम शांत स्वभावाचा आहेस पण मला मात्र फिरायला जायची इच्छा होते आहे. मी खूप दूर काही काळासाठी फिरायला जायचा विचार करतो आहे. त्यावर अविज्ञात म्हणाला ठीक आहे मित्रा, तुला जायचे तर तू जा पण मी इथे तुझी वाट बघतो आहे हे ध्यानात असू दे. मला विसरू नकोस. पुरंजन म्हणाला मित्रा तू माझा अत्यंत जवळचा आहेस, मी तुला कसा विसरेन. झाले, पुरंजन यात्रेला निघाला. त्याने नगरांना भेटी दिल्या, अनेक लेणी, सुंदर सुंदर राजवाडे बघितले. निरनिराळ्या प्रकारची वने, वृक्ष, सरोवरे बघत तो मार्गक्रमण करत राहिला. काही काळाने त्याला एक अत्यंत भव्य किल्ला आणि त्यावरील प्रासाद दिसला. तीन मजली प्रासाद अतिशय सुंदर होता. त्याला नऊ दरवाजे होते. दोन दरवाजे खाली होते. मधल्या मजल्यावर एकही दार नव्हते. सर्वात वरच्या मजल्यावर सात द्वारे होती. पुरंजन प्रासादात गेला. आत शोभेच्या असंख्य वस्तू होत्या. प्रासाद अतिशय उत्तम रीतीने सजवलेला होता. तिथे एक सुंदर स्त्री तिच्या सेवकांबरोबर राहत होती. ते सेवक तिची सर्व कामे करत. शिवाय तिच्याकडे एक पंचमुखी सर्प होता. त्या सुंदर स्त्रीला आणि तिच्या त्या वैभवाला पाहून पुरंजन भुलला. तो तिच्यात आसक्त झाला. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. तिनेही त्याची मागणी स्वीकारली. पुरंजन आनंदीत झाला. त्याने तिचे नाव विचारले. ती म्हणाली मला नाव नाही. पुरंजन म्हणाला हरकत नाही आजपासून मी पुरंजन तर तू माझी पुरंजनी. दोघेही प्रासादात संसार करू लागले. पुरंजन पुरंजनी मध्ये पुरता गुरफटला, तो ती म्हणेल ते, ती म्हणले तसेच वागत असे. तिच्या तालावर सर्व काही चालू होते. काही वर्षे लोटली.
एकदा तिथे एक अत्यंत कुरूप म्हातारी आली. 'जरा' तिचे नाव. तिने प्रासाद बघितला. ती पुरंजनाला म्हणाली तुमचे भवन फार सुंदर आणि मोठे आहे, मला पण इथे राहू द्या. त्यावर तो म्हणाला माझे घर, माझी पत्नी, आमचे सर्व दास-दासी इतकेच काय तर आमच्याकडील पंचमुखी सर्प देखील सुंदर आहेत. इथे तुझ्यासारख्या कुरूप व्यक्तीचे काय काम. तू इथून चालती हो. जरेने खूप विनवणी करून देखील पुरंजनाने तिला हाकलून दिले. जरा तिथून आपला भाऊ चण्डवेग याच्याकडे गेली. ती म्हणाली मला त्या प्रासादात राहायचे आहे, तू काही कर. चण्डवेगाने ३६५ गोऱ्या आणि ३६५ काळ्या सैनिकांची फौज उभी केली. जरा म्हणाली अरे चण्डवेगा तो किल्ला मजबूत आहे. अनेक बलाढ्य सैनिक आणि दास दासी त्याच्या रक्षणासाठी सदैव सज्ज आहेत, तुझी ही छोटी फौज तो किल्ला जिंकायला पुरी पडेल का. त्यावर चण्डवेग म्हणाला जरे तू चिंता करू नकोस माझे सैनिक संख्येने कमी असतील, दिसायला दुबळे वाटतील पण ते कधीही हार मानणार नाहीत. जरा आपल्या भावाचे सैन्य घेऊन किल्ल्यावर चालून गेली. रोज सैनिक जात आणि हल्ला करत, काही ना काही नुकसान करून परत येत. कधी एखादा बुरुज ढासळे, कधी एखादी वीट निसटे, कधी संरक्षक जाळीचे नुकसान होई. पुरंजन पुरंजनी झालेले नुकसान आपल्या सेवकांच्या मदतीने रोज दुरूस्त करत. पण जरेचे सैन्य रोज काहीतरी उपद्रव करत राही, ते हार मानत नसत. असेच चालू राहिले आणि अखेरीस किल्ल्याचे सैन्य कमी पडू लागले आणि एक दिवस त्यांचा पाडाव झाला. जरेने किल्ल्याचा ताबा घेतला आणि ती किल्ल्यावर राहू लागली. जरेबरोबर तिथे राहणे काही पुरंजनाला पसंत नव्हते. तो दुःखाने झुरत चालला आणि एक दिवस त्या दुःखाने त्रस्त होऊन पुरंजनाने प्राणत्याग केला. प्राण सोडते समयी पुरंजनीचे आपल्या मागे कसे होईल या विचारात त्याला मरण आले. आता मरते समयी जो विचार, इच्छा असते त्याप्रमाणे जन्म प्राप्त होतो या न्यायाने त्याला एका स्त्रीचा जन्म प्राप्त झाला. या स्त्रीचा विवाह झाला, पुढे तिच्या पतीचा मृत्यु झाला आणि ती स्त्री सती जाण्यासाठी आपल्या पतीबरोबर चितेवर चढली.
इकडे खूप काळ मित्राची वाट पाहत असलेला अविज्ञात मित्राच्या शोधासाठी निघाला आणि तो शोधत शोधत जिथे स्त्रीजन्मातील पुरंजन चितेवर आरूढ झालेला होता तिथे आला. अविज्ञाताने त्याच्या दिव्य शक्तीने ही स्त्री म्हणजे पुरंजन आहे हे ओळखले. त्याने त्या स्त्रीला तिच्या पूर्व जन्माविषयी सर्व सांगितले. ते सर्व ऐकून ती स्त्री आणि अविज्ञात तिथून निघाले आणि आपल्या नगरात परत आले आणि सुखाने राहू लागले.
बहिर ऋषींनी नारदांना विचारले महाराज ही काय कथा आहे मला काही बोध झाला नाही. नारद म्हणाले मुनीवर हा पुरंजन आणि अविज्ञात म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा आहेत. सुरूवातीला हे मित्र एकत्र असतात. पुढे जीवात्मा परमात्म्याला सोडून जातो. तो वेगवेगळ्या योनींमधून प्रवास करत शेवटी मनुष्य योनीच्या नऊ द्वारे असलेल्या शरीरात प्रवेश करतो. त्यातली खालची दोन द्वारे म्हणजे लिंग आणि गुदद्वार. वरती जी सात दारे आहेत त्यात दोन डोळे, दोन कान, दोन नासिका आणि एक तोंड येते. बुद्धी ही त्यात निवास करणारी पुरंजनी होय. कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये हे तिचे दास दासी तिच्या तालावर नाचतात. पंचमुखी सर्प म्हणजे पंच तन्मात्रा जे पंच ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत. या बुद्धीमध्ये जीवात्मा आसक्त होतो आणि तो या नवद्वाराच्या मानव शरीररूपी प्रासादात अडकतो.
बडे भाग मानुष तन पाया l
सुर दुर्लभ सब ग्रंथन्ही गावा ll
जरा म्हणजे वृद्धापकाळ. चाळिशीनंतर जरा या प्रासादावर साद देऊ लागते. एखादा केस पांढरा होतो, कुठे सुरकुत्या दिसू लागतात. जीवात्म्याला हे आवडत नाही. ही जरा जेंव्हा तिच्या भावाकडे म्हणजे काळाकडे जाते तेंव्हा तो भाऊ ३६५ गोरे आणि ३६५ काळे सैनिक पाठवतो. हे सैनिक म्हणजे ३६५ दिवस आणि रात्र. हे सतत हल्ला करत राहतात. मनुष्य शरीराची डागडुजी करत राहतो पण म्हातारपण काही टळत नाही. शेवटी जरा देहाचा ताबा घेते. जीवात्मा कामबुद्धीच्या चिंतनात म्हणजे पुरंजनीच्या चिंतनात अखेर देह सोडतो, तो अविज्ञाताला म्हणजे परमात्म्याला विसरतो. कामनेप्रमाणे जन्म या न्यायाने पुढील जन्म प्राप्त होतो. पुनरपि जननम् पुनरपि मरणम् या दुष्टचक्रात जीव अडकतो. पुढे कुठल्या तरी संतांच्या आशिर्वादाने अविज्ञात मदतीला येतो. संतांची वचने, सत्कर्मे काही ना काही करून तो पुरंजनाला त्याच्या मूळ स्वरूपाची आठवण देत राहतो. अखेरीस जन्म, जरा आणि मृत्यु या चक्रातून पुरंजनरूपी जीवात्म्याची सुटका होते आणि त्याचे आणि परमात्म्याचे म्हणजे अविज्ञाताचे मिलन होते.
पुरंजन आपले प्रतीक आहे. आपण या नवद्वारातून सुटण्याचा प्रयत्न करायला हवा. इथे भगवंत म्हणतात ज्याचे अंतःकरण त्याच्या ताब्यात आले तो मनाने सर्व कामनांचा आणि कर्मांचा त्याग करतो.
न कर्तृत्वं(न्) न कर्माणि, लोकस्य सृजति प्रभुः।
न कर्मफलसंयोगं(म्), स्वभावस्तु प्रवर्तते॥5.14॥
नादत्ते कस्यचित्पापं(न्), न चैव सुकृतं(म्) विभुः।
अज्ञानेनावृतं(ञ्) ज्ञानं(न्), तेन मुह्यन्ति जन्तवः॥5.15॥
दसमुख कहा मरमु तेहिं सुना l पुनि पुनि कालनेमि सिरू धुना ll
देखत तुम्हहि नगरू जेहिं जारा l तासु पंथ को रोकन पारा ll
रावण त्याला सर्व समजावतो. ऐकल्यावर कालनेमी आपले डोके आपटून खेद प्रकट करतो. त्याच्या मनात येते की ज्याने तुझे नगर जाळले, त्याचा मार्ग कोण रोखू शकेल? वास्तविक रावणाने रामाचे भजन करून त्याला प्रसन्न करायला हवे. तो रावणाला वारंवार समजावतो. तेव्हा रावण क्रोधित होतो.
शेवटी कालनेमी हनुमानाला मोहात टाकून संजीवनीबुटीपासून दूर ठेवण्यास तयार होतो.
असं कहि चला रचिसि मग माया l सर मंदिर बर बाग बनाया ll
मारुतसुत देखा सुब आश्रम l मुनिहि बूझि जल पियौ जाइ श्रम ll
ठरल्याप्रमाणे कालनेमी सुंदर आश्रम जंगलात मायेने निर्माण करतो. तलाव मंदिर आणि सुंदर बाग तयार करतो. यतीवेश धारण करतो. संजीवनीसाठी निघालेल्या हनुमानाला जेव्हा सुंदर आश्रम दिसतो तेव्हा तेथील मुनीला विचारून आपण पाणी पिऊन थकवा दूर करण्याचा विचार हनुमंताच्या मनात येतो. त्याप्रमाणे मारुती त्या यतीजवळ जाऊन नम्रतेने मस्तक टेकवले आणि तो श्रीरामाच्या गुणांची कथा ऐकू लागला.
होत महा रन रावन रामहिं l जितिहहिं राम न संसय या महिं ll
इहाँ भऍ मैं देखऊ भाई l ग्यानदृष्टी बल मोहि अधिकाई ll
यती म्हणाला रावण आणि रामात महान युद्ध चालू आहे. राम जिंकणार यामध्ये काही संशय नाही. मी इथे असलो तरी ज्ञानदृष्टीने मला सगळे दिसते.
मागा जल तेहिं दीन्ह कमंडल l कह कपि नहिं अघाऊ थोरें जल ll
सर मज्जन करि आवहु l दिच्छा देऊ ग्यान जेहिं पावहु ll
हनुमानाने त्याला पाणी मागितले. यतीने त्याला कमंडलु दिला. हनुमान म्हणाला, एवढ्या थोड्या पाण्याने माझी तहान जाणार नाही. तेव्हा कालनेमी त्याला म्हणाला की तू तलावात जाऊन स्नान कर. लगेच परत ये. मी तुला दीक्षा देतो आणि मग तुला ज्ञान प्राप्त होईल.
सर पैठत कपि पद गहा मकरीं तब अकुलान l
मारी सो धरि दिब्य तनु चली गगन चढी जान ll
तलावात प्रवेश करताच एका मगरीने हनुमानाचा पाय पकडला. हनुमानाने तिला मारले. अप्सरेचा दिव्य देह धारण करून ती आकाशात निघून गेली. जाताना ती म्हणाली हे वानर! तुझ्या दर्शनाने मी पापरहित झाली. मुनीचा शाप नष्ट झाला. हे कपि हा यती नाही, तो घोर निशाचर आहे. मी सत्य बोलते.
सिर लंगूर लपेटि पछारा l निज तनु प्रगटेसि मरती बारा ll
राम राम कहि छाडेसि प्राना l सुनि मन हरषि चलेउ हनुमाना ll
अप्सरा जाताच हनुमानाने निशाचराजवळ जाऊन, पहिले गुरूदक्षिणा घ्या आणि नंतर मला मंत्र द्या असे म्हंटले. त्याने त्याचे डोके आपल्या शेपटीने बांधले आणि त्याला आपटले. मरताना त्याने आपले शरीर प्रगट केले. राम राम म्हणून कालनेमीने आपले प्राण सोडले.
हनुमान इतका ज्ञानी असूनही फसला. आपण तर सामान्य आहोत. असे आपण फसू नये म्हणून सत्संगात राहावे. वेदांताचा विचार केल्यास अज्ञानाचे निवारण होऊन ज्ञानाची प्राप्ती होते.
ज्ञानेन तु तदज्ञानं(म्), येषां(न्) नाशितमात्मनः।
तेषामादित्यवज्ज्ञानं(म्), प्रकाशयति तत्परम्॥5.16॥
तद्बुद्धयस्तदात्मान:(स्), तन्निष्ठास्तत्परायणाः।
गच्छन्त्यपुनरावृत्तिं(ञ्), ज्ञाननिर्धूतकल्मषाः॥5.17॥
विद्याविनयसम्पन्ने, ब्राह्मणे गवि हस्तिनि।
शुनि चैव श्वपाके च, पण्डिताः(स्) समदर्शिनः॥5.18॥
इहैव तैर्जितः(स्) सर्गो, येषां(म्) साम्ये स्थितं(म्) मनः।
निर्दोषं(म्) हि समं(म्) ब्रह्म, तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः॥5.19॥
न प्रहृष्येत्प्रियं(म्) प्राप्य, नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम्।
स्थिरबुद्धिरसम्मूढो, ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः॥5.20॥
वनवासाच्या प्रसंगात पाच पांडव वनात फिरत होते. फिरता फिरता ते एका तलावापाशी पाणी पिण्यासाठी आले. एकेक करून ते पाणी पिताना यक्षाच्या प्रश्नांची उत्तरे न सांगता पाणी पिऊन मरून गेले. धर्मराज युधिष्ठिर तहानेने व्याकुळ असूनही आणि समोर चार भावांचे कलेवर बघूनही शांततेत राहिला. त्याने यक्षाला नम्रतेने प्रणाम केला आणि बुद्धीपूर्वक उत्तरे दिली. हे कर्मयोग्याचे लक्षण आहे.
बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा, विन्दत्यात्मनि यत्सुखम्।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा, सुखमक्षयमश्नुते॥5.21॥
जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती होणार नाही.
ये हि संस्पर्शजा भोगा, दुःखयोनय एव ते।
आद्यन्तवन्तः(ख्) कौन्तेय, न तेषु रमते बुधः॥5.22॥
विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रेऽमृतोपमम्।
परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम्।।१८.३८।।
जे सुख विषय आणि इंद्रियांच्या संयोगाने उत्पन्न होते, ते प्रथम भोगताना अमृता सारखे वाटत असले तरी परिणामी विषासारखे असते. म्हणून ते सुख राजस म्हटले गेले आहे.
शक्नोतीहैव यः(स्) सोढुं(म्), प्राक्शरीरविमोक्षणात्।
कामक्रोधोद्भवं(म्) वेगं(म्), स युक्तः(स्) स सुखी नरः॥5.23॥
योऽन्तःसुखोऽन्तरारामः(स्), तथान्तर्ज्योतिरेव यः।
स योगी ब्रह्मनिर्वाणं(म्), ब्रह्मभूतोऽधिगच्छति॥5.24॥
लभन्ते ब्रह्मनिर्वाणम्, ऋषयः क्षीणकल्मषाः।
छिन्नद्वैधा यतात्मानः(स्), सर्वभूतहिते रताः॥5.25॥
हे नाथ अब तो ऐसी दया हो, जीवन निरर्थक जानेन पाये l
यह मन न जाने क्या क्या कराये ,कुछ बन ना पाया आपने बनाये ll
कामक्रोधवियुक्तानां(म्), यतीनां(म्) यतचेतसाम्।
अभितो ब्रह्मनिर्वाणं(म्), वर्तते विदितात्मनाम्॥5.26॥
स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्, चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः।
प्राणापानौ समौ कृत्वा, नासाभ्यन्तरचारिणौ॥5.27॥
यतेन्द्रियमनोबुद्धि:(र्), मुनिर्मोक्षपरायणः।
विगतेच्छाभयक्रोधो, यः(स्) सदा मुक्त एव सः॥5.28॥
बाहेरील विषयांना विकारांना बाहेरच ठेवून, आपली दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून, प्राण आणि अपान सम करून, मन आणि बुद्धी जिंकली आहेत असा परमेश्वराच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करणारा, मोक्षाची इच्छा करणारा योगी, विकारांना जिंकल्यामुळे सदोदित मुक्त असतो.
भोक्तारं(म्) यज्ञतपसां(म्), सर्वलोकमहेश्वरम्।
सुहृदं(म्) सर्वभूतानां(ञ्), ज्ञात्वा मां(म्) शान्तिमृच्छति॥5.29॥
परमपूज्य गुरुदेवांच्या आज्ञेनुसार हे विवेचन सांगितले गेले. आपण हे सर्व विचार गुरुकृपेने जीवनात आणून जीवन सार्थक करावे. हरी शरणम या भगवत चिंतनाने विवेचनाची सांगता झाली आणि प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली.
प्रश्न उत्तरे -
१- सुरेंद्र घाटेजी - आपण सांगता की हे दहा मोह दोरीला बांधून भगवंताला अर्पण करावे. माझा मुलगा परदेशात राहतो तो मला विचारत नाही त्यामुळे मी दुःखी आहे. त्यावर उपाय काय आहे तुम्ही मला सांगा.
उत्तर- आपण यावर जास्त विचार करू नये. त्या ठिकाणी आपले अंतर्मन उघडून स्वतःला म्हणावे की माझे काय चुकले म्हणून मला असे भोगावे लागते. नेहमी परिस्थिती सारखीच राहत नाही परिस्थिती बदलल्यावर सगळे काही ठीक होईल.आपण धैर्यपूर्वक वाट बघावी. सारे संबंध बदलणारे असतात नित्य परमात्मा आहे म्हणून परमात्मा कडे लक्ष ठेवावे. बाकी सारे देवावर सोडावे.
२- ओमप्रसादजी - बारा आणि पंधरावा अध्याय महात्म्याने सांगितल्याने तो रोज म्हणावा का?
उत्तर- संतांद्वारे आज्ञा झाल्यावर ते माझ्या कल्याणासाठी आहे असा विचार करून तो नक्की वाचावा.
३- माधुरी जी - मनावर आपण का निर्भर राहतो?
उत्तर- आपण मनाचे गुलाम असतो. मनाला नियंत्रित केल्याशिवाय आपले कल्याण होणार नाही. अभ्यास आणि वैराग्याने हे सहज होऊ शकते. भोगा पासून वैराग्य घेऊन मन नियंत्रित ठेवता येते. हठयोगाने हे करता येईल.
४- अरुणजी - सांख्ययोग काय आहे?
उत्तर- संख्यात्मक विचार यामध्ये येतो. इथे २७ तत्वांचा विचार होतो.
५- पद्मिनीजी - ज्ञानयोगी म्हणतात मी जीवात्मा नाही मी आत्मा आहे हे कसे?
उत्तर- आपल्याकडे सुंदर सुंदर दागिने असतात. ते विकताना आपले लक्ष त्याच्या सुंदर नक्षी कडे असते. सोनाराचे मात्र लक्ष त्यातील फक्त सोन्याकडे असते. त्याचप्रमाणे ज्ञानयोगी ब्रम्हांडात ईश्वर नावाचे तत्व आहे, परमात्मा आहे हेच बघतो.
६- राणी जी - रुद्र ब्राह्मणांकडून करून घ्यावे की आपण म्हणावे?
उत्तर- ब्राह्मण भोजन आणि दक्षिणा दिल्याने अनुष्ठान पूर्ण होते. तुम्ही रुद्र स्वतः म्हटले तरी हरकत नाही मात्र शेवटी ब्राह्मणाला बोलवून त्याला दक्षिणा व भोजन नक्की द्या.
प्रश्नोत्तरानंतर हनुमान चालीसाने पाचव्या अध्यायाची सांगता झाली.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।