विवेचन सारांश
एकच लक्ष्य - परमात्मा
प्रकृती आणि प्रपंच याविषयी या अध्यायामध्ये सांगितले गेले आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आणि मन, बुद्धी, अहंकारसहित ही अष्टधा प्रकृती, हिलाच अपरा प्रकृती म्हणतात हे आपण पाहिले. ही अचेतन प्रकृती आहे.
संत ज्ञानेश्वरांनी याचे फार सुंदर स्पष्टीकरण केले आहे. ते म्हणतात- सुवर्णाचे मणी सोन्याच्या तारेमध्ये ओवावेत तशी ही सृष्टी परमात्म्यामध्ये ओवली गेली आहे.
पुढे भगवंत म्हणतात- या संसारामध्ये मला पहायचे असेल तर माझ्या विभूती बघा. 'रसोऽहमप्सु'- या सृष्टीमध्ये रसभरी फळे आहेत. या फळांमध्ये रस मी आहे. येथे भूतमात्रांमध्ये जीवन मी आहे. तपस्वी लोकांचे तप बघून आपण त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. त्यांचे तप मी आहे.
या विश्वामध्ये ज्या ज्या वस्तू निर्माण झाल्या त्यांचे बीज परमात्माच आहे, आणि ते कधीपासून आहे? तर ते सनातन आहे. त्याचा आदि कोणीच जाणू शकत नाही. श्रेष्ठ वैज्ञानिक, संशोधक, गणिती हे सर्व बुद्धिमान असतात. आपण त्यांचे स्मरण करतो. त्यांच्यामध्ये बुद्धीरूपात भगवंतच विराजमान असतात. संत महात्म्यांच्या सहवासात आपण त्यांच्या तेजाची अनुभूती घेतो. हे तेज देखील परमात्म्याचे स्वरूप आहे.
धर्माच्या विरोधात नसलेली म्हणजेच धर्माला अनुकूल अशी कामना हीसुद्धा भगवंतस्वरूप आहे. उदाहरणार्थ, एखाद्या गृहस्थासाठी कुटुंब असावे, राहण्यासाठी घर असावे अशा इच्छा असणे चुकीचे नाही, परंतु यासाठी लागणारे धन मी कोणत्याही मार्गाने मिळवण्याची इच्छा धरणे हे विपरीत आहे. अशी कामना धर्माविरुद्ध आचरण करण्यास प्रवृत्त करते.
7.12
ये चैव सात्त्विका भावा, राजसास्तामसाश्च ये।
मत्त एवेति तान्विद्धि, न त्वहं(न्) तेषु ते मयि॥7.12॥
सूक्ष्मतम अशा परमाणूमध्ये देखील काय आहे? त्यातही इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे आहेतच. इलेक्ट्रॉन सतत फिरत असतात. ते रजोगुणाचेच प्रतीक आहेत. प्रोटॉन हे इलेक्ट्रॉन वर नियंत्रण ठेवतात. ते सत्त्वगुणाचे प्रतीक आहेत आणि न्यूट्रॉन हे तटस्थ असतात. ते काहीच करत नाहीत ते तमोगुणाचे प्रतीक आहेत.
माऊली स्पष्टीकरण करतात,
परी त्याचाच अंकुर होऊन । होय काष्ठ ॥
मग तया काष्ठात । असते का बीजत्व
तो धागाही सोनेरी, ते मणीही सोनेरी आणि सोनेरी धाग्यात सोनेरी मणी ओवून बनलेली माळही सोनेरी आहे तर ही बनलेली माळ आहे की सोने आहे? उत्तर असे आहे की ती माळ आहे आणि तीही सोन्याची आहे. तिचे मूळ रूप सोने आहे आणि दृश्य रूप माळ आहे. त्याचप्रमाणे, हे दृश्य स्वरूपातील जग आहे, परंतु या जगाला एकत्र बांधणारा, आतून आणि बाहेरून धारण करणारा परमात्मा ते बनवणारा असूनही दिसत नाही. तो कशामुळे दिसत नाही?
त्रिभिर्गुणमयैर्भावै:(र्), एभिः(स्) सर्वमिदं(ञ्) जगत्।
मोहितं(न्) नाभिजानाति, मामेभ्यः(फ्) परमव्ययम्॥7.13॥
परमात्म्याच्या मायेच्या या तीन गुणांच्या प्रभावामुळे माणूस त्या अव्यक्त, अविनाशी परमात्म्याला ओळखू शकत नाही. भगवंतांनीच निर्माण केलेली माया त्यांच्या आणि जीवाच्या मध्ये येते. ही माया पार करणे सरळ व सोपे नाही.
दैवी ह्येषा गुणमयी, मम माया दुरत्यया।
मामेव ये प्रपद्यन्ते, मायामेतां(न्) तरन्ति ते॥7.14॥
मृगजळ म्हणजे हवेच्या वेगवेगळ्या तापमानामुळे आणि घनतेमुळे प्रकाशाचे अपवर्तन होते, हे अपवर्तन प्रकाशाची दिशा बदलू शकते, ज्यामुळे वस्तू किंवा आकाशाची प्रतिमा विस्थापित किंवा विकृत दिसते. त्यामुळे दूरच्या वस्तूंची किंवा आकाशाची अगदी खरी वाटणारी प्रतिमा दिसते. ही प्रतिमा पाण्यासारखी दिसते आणि लोकांना अनेकदा ते पाणी आहे असे वाटते. त्यामुळे दृष्टीभ्रमाला मृगजळ हे नाव पडले आहे. मायेमुळे माणसाला असेच दृष्टीभ्रम होत असतात.
परंतु भगवंत म्हणतात, “(मम माया दुरत्यया) माझी तरून जाण्यास फार कठीण असलेली माया (ये माम् एव प्रपद्यन्ते ते एताम् मायाम् तरन्ति) जे केवळ मलाच शरण येतात, ते या मायेला ओलांडून जातात”, अर्थातच जे केवळ भगवंतांनाच शरण आले आहेत, तेच या भवसंसारातून तरून जातात.
परमात्म्याची ही अति अद्भुत त्रिगुणात्मक माया पार करण्याचा एकमेव मार्ग आहे, शरणागती! ज्याने हे मायाजाल रचले आहे, त्या परमात्म्यालाच जो संपूर्णपणे शरण जातो, तोच या मायेला पार करतो. माया पार करून जाणे म्हणजे या मोहपाशातून मुक्त होणे. जेव्हा माणूस मोहमायेच्या पलीकडचा विचार करतो तेव्हा त्याला भगवत्प्राप्ती होते.
माया तरुन जाण्याच्या या समस्येवर काहीही उपाय (solution) नाही, केवळ विघटन (dissolution) आहे. वास्तवात माया अशी काही समस्या आहे का? There is no solution for the problem. कारण तिथे Problem च नाही. There needs to be only dissolution of the delusion. मायेमुळे भवसागर पार करायला रस्ता मिळत नाही तर मायाच नष्ट होते. माया म्हणजे केवळ एक भ्रमाचे धुके आहे, ते विरले की परमात्मा लख्खपणे दिसू लागतो, हे लक्षात आलं की हा मोठा प्रश्न सुटतो.
न मां(न्) दुष्कृतिनो मूढाः(फ्), प्रपद्यन्ते नराधमाः।
माययापहृतज्ञाना, आसुरं(म्) भावमाश्रिताः॥7.15॥
मायेच्या प्रभावामुळे ज्यांच्या ज्ञानाचे अपहरण झालेले असते ते लोक या संसारात पूर्णपणे बुडालेले असतात. असे लोक भगवंतांना कधीच शरण येत नाहीत. काही नराधम आपल्याच अहंकारात जगत असतात. त्यांना तर ज्ञान मिळवण्याची साधी प्रेरणासुद्धा होत नाही! हे सर्व लोक आसुरी संपदा धारण करणारे असतात. याविषयी सोळाव्या अध्यायामध्ये विस्ताराने वर्णन केले गेले आहे
इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् ॥
ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान्सुखी ॥
काही लोक मात्र दैवीसंपदा घेऊन जन्माला येतात आणि अशा दैवी प्रकृतीच्या लोकांचे देखील चार प्रकार असतात. ते पुढील श्लोकात पाहू.
चतुर्विधा भजन्ते मां(ञ्), जनाः(स्) सुकृतिनोऽर्जुन।
आर्तो जिज्ञासुरर्थार्थी, ज्ञानी च भरतर्षभ॥7.16॥
आर्त भक्त - जेव्हा मनुष्य अशा काही गहन संकटात सापडतो, ज्यातून सुटका होण्यासाठी अन्य काहीही मार्ग नसतो तेव्हा तो भगवंतांना पुकारतो. महाभारतामध्ये वस्त्रहरण प्रसंगी द्रौपदीने जेव्हा हा अनुभव घेतला की तिचे पाच पराक्रमी पती किंवा भीष्म, द्रोण, विदुर आदी सभेतील सर्व ज्येष्ठ तिची काहीच मदत करू शकत नाहीत तेव्हा तिने भगवंतांना आर्ततेने पुकारले होते आणि भगवंतही लगेच धावून आले. भगवंत म्हणतात संकटात का होईना ते माझे स्मरण करतात आणि माझे भक्त होऊन जातात.
जिज्ञासू भक्त - ज्याला परमात्मा कसा आहे हे जाणायचे आहे, ज्याच्या मनात परमात्म्याला प्राप्त करायचे आहे, ही तळमळ, हा एकच ध्यास असते तो त्यासाठी भगवद्गीता शिकतो, शास्त्रे जाणून घेतो. त्यासाठी ग्रंथ वाचतो, संतांच्या सहवासात जातो, त्याला जिज्ञासू भक्त म्हणतात. स्वामी विवेकानंद असे जिज्ञासू भक्त होते. विवेकानंद जिकडे तिकडे फिरत होते आणि ज्याला त्याला विचारत होते की तुम्ही परमेश्वर पाहिला आहे काय. जेव्हा ठाकूर रामकृष्ण यांच्याशी त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनाही विवेकानंदांनी हाच प्रश्न विचारला. ठाकूर म्हणाले, "हो मी पाहिला आहे परमेश्वर. अगदी असाच जसा मी तुला आत्ता पाहतो आहे." नंतर त्यांनी ठाकूर रामकृष्ण यांनाच आपले गुरु मानले.
अर्थार्थी भक्त - काही लोक सुख संपत्तीची इच्छा धरतात आणि काही लोकांची भगवंतांवर केवळ आपली कामनापूर्ती व्हावी यासाठी श्रद्धा असते आणि त्यासाठीच ते भगवंताची पूजा करीत असतात. केवळ अर्थप्राप्तीसाठी का होईना ते भगवंताचे स्मरण करतात म्हणून ते देखील भक्त म्हणूनच ओळखले जातात.
ज्ञानी भक्त - हे परमात्म्याला जाणत असतात. परमात्म्याशिवाय मला दुसरे काहीच नको हे जो जाणतो तो खरा ज्ञानी भक्त होय.
सकाळी बालक झोपलेला असतो तेव्हा वडील कामावर निघून जातात आणि रात्री उशिरा जेव्हा वडील कामावरून परत येतात तेव्हाही बालक झोपलेलाच असतो. रविवारी सुट्टीच्या दिवशी वडील मुलासाठी खूप सारी खेळणी घेऊन येतात तेव्हा तो म्हणतो, 'मला खेळणी नको. मला तुम्ही हवे आहात.' बालक जाणत असतो की हे माझे वडील आहेत आणि त्याला त्यांचे प्रेमच फक्त पाहिजे असते.
तसेच ज्ञानी भक्ताला सुद्धा परमात्म्याचे प्रेमच हवे असते. त्याला अन्य काही नको असते.
ज्ञानी भक्त कसा असतो? माऊली म्हणतात,
आणि मीही त्यास आत्मा बोले । उचंबळोनि ॥
या चारही प्रकारच्या भक्तांमध्ये कोणता भक्त श्रेष्ठ आहे हे पुढील श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत.
तेषां(ञ्) ज्ञानी नित्ययुक्त, एकभक्तिर्विशिष्यते।
प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थम्, अहं (म्) स च मम प्रियः॥7.17॥
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,
हें न म्हणावें परि काय कीजे । न बोलणें बोलों ॥
उदाराः(स्) सर्व एवैते, ज्ञानी त्वात्मैव मे मतम्।
आस्थितः(स्) स हि युक्तात्मा, मामेवानुत्तमां(ङ्) गतिम्॥7.18॥
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,
अर्थार्थी तो अर्थसिद्ध्यर्थ । भजतो मला ॥
परंतु त्या चौथ्यास काही । कर्तव्य उरलेले नाही ।
म्हणून खरा भक्त पाही । ज्ञानी तो ॥
भगवंतांना केवळ भगवंतच जाणू शकतात. ज्ञानी भक्त भगवंतांना समग्रपणे जाणत असतो, त्यामुळे तो भगवंतस्वरूप बनतो. तो जाणून असतो की ज्ञानविज्ञानाचा पाया भक्तीच आहे. भक्ती शिवाय ज्ञान प्राप्त होत नाही आणि म्हणूनच ज्ञानी भक्त निरंतर भगवंतांचे स्मरण करतो. असा भक्त भगवंतांना सर्वात प्रिय आहे.
संत तुकारामांना पांडुरंगाचे दर्शन घडले असे कधीही बोलले जात नाही. ते भगवंतांशी एकरूप झाले.
काही लोकांच्या मुला-मुलींचे विवाह झाले असले तरी त्यांची प्रवृत्ती दुसऱ्यांच्या मुला-मुलींचे विवाह जमवायची असते. यात त्यांचा काहीही स्वार्थ नसतो, ते इतरांसाठी खटपट करत रहातात.
बहूनां(ञ्) जन्मनामन्ते, ज्ञानवान्मां(म्) प्रपद्यते।
वासुदेवः(स्) सर्वमिति, स महात्मा सुदुर्लभः॥7.19॥
भक्ती आणि उपासना यामध्ये फरक आहे. अनेक जन्मांच्या साधनेनंतर भगवंतांची भक्ती प्राप्त होते. भक्ती प्राप्त होण्यासाठी जी पूजारुपी भक्ती केली जाते ती उपासना होय. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जी भक्ती प्राप्त होते ती ज्ञानोत्तर भक्ती होय. भगवंत म्हणजे माझे चैतन्यस्वरूप आहेत, अशी ती भक्ती होय.
अनेक जन्मांच्या साधनेनंतर तत्त्वज्ञान प्राप्त करून घेऊन शेवटी
महाभारतात भगवंतांनी भौतिक स्वरूपात प्रकट होऊन अर्जुनाला उपदेश केला होता. आपल्याला प्रश्न पडतो की आपल्याला कोण उपदेश करेल? आपल्याला भगवद्गीता मिळाली आहे. तीच आपल्याला आपल्या अंतिम ध्येयापर्यंत घेऊन जाऊ शकते.
हा भक्तियोगु निश्चित । जाण माझा ॥
कामैस्तैस्तैर्हृतज्ञानाः(फ्), प्रपद्यन्तेऽन्यदेवताः।
तं(न्) तं(न्) नियममास्थाय, प्रकृत्या नियताः(स्) स्वया॥7.20॥
काहीही कार्याचा प्रारंभ करत असताना
गणितातील एक सूत्र (formula) आहे: A = B, याचाच अर्थ असा
तेरे रुप अनेक तू एक ही है।
आपल्या वेगवेगळ्या कामनांना अनुसरून आपण भगवंतांची वेगवेगळ्या रूपांमध्ये पूजा करतो. आपण भगवंतांच्या त्या बाह्य रूपांत अडकतो, त्या रूपांना वेगळे मानतो आणि म्हणून आपण भगवंतांना शीघ्र प्राप्त करू शकत नाही.
यो यो यां(म्) यां(न्) तनुं(म्) भक्तः(श्), श्रद्धयार्चितुमिच्छति।
तस्य तस्याचलां(म्) श्रद्धां(न्), तामेव विदधाम्यहम्॥7.21॥
ज्याप्रमाणे बालकाचे हृदय माताच जाणते, बाळाच्या भुकेची, झोपेची, खेळाची जाणीव केवळ मातेलाच होते त्याचप्रमाणे आपल्या भक्ताची कामना जाणून त्याच्या अंतःकरणात त्या त्या देवतेच्या उपासनेची श्रद्धा जागृत करून त्या आराध्य देवतेची उपासना करण्याची प्रेरणा देणारे एकमेव स्वयं भगवंतच आहेत, हे गुपित भगवंत इथे प्रकट करतात. उदाहरणार्थ भक्ताची शक्ती सामर्थ्याची गरज ओळखून भगवंत त्याच्या अंतःकरणात हनुमंताची उपासना करण्याची प्रेरणा निर्माण करतात. वास्तविक हनुमंत हेही भगवंताचेच स्वरूप आहेत.
एखाद्या शासकीय कामासाठी आपल्याला संबंधित कार्यालयातच जावे लागते. जमिनीसंबंधीच्या कामासाठी त्या संबंधित कार्यालयात गेलो तरच आपले काम होऊ शकते. त्याऐवजी आपण पोलीस कमिशनरच्या कार्यालयात गेलो तर आपले काम होऊ शकणार नाही. या कामासाठी थेट पंतप्रधानांकडे जाण्यातही काही हशील नाही. त्याप्रमाणे कोणत्या इच्छेसाठी कोणत्या देवतेची उपासना करायची याची अचूक प्रेरणा भगवंत स्वतः आपल्या हृदयात निर्माण करत असतात.
आपल्या घरात मीटरमध्ये जी वीज येते ती कशी येते? जिथे वीजनिर्मिती केंद्र आहे तिथे ती निर्माण होते. तेथून मुख्य जनित्रातून (generator) मधून रोहित्राद्वारे (transformer) खांबांवरून जाणाऱ्या तारांमधून घरातील मीटरपर्यंत पोहोचते. या मीटरद्वारे घरात येणारी वीज वेगवेगळ्या खोल्यात जोडलेल्या विजेच्या दिव्यांमधून प्रकाश देते. आपण घरात आपल्याला जेवढ्या विद्युत दाबाची (voltage) गरज आहे त्यानुसारच वीज घेतो. ही वीज तर प्रामुख्याने जनित्रातून आलेली असते हीच बाब आपण विसरत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला उपासना करण्याची प्रेरणा देणारा भगवंत आणि आपण ज्याची उपासना करतो ते भगवंताचे रूप दोन्हीही एकच आहेत या बाबी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. इथे अजून एक महत्त्वपूर्ण बाब लक्षात घेतली पाहिजे. आपण ज्या आराध्य देवतेची उपासना करतो केवळ त्याच रूपाला सामर्थ्यशाली मानतो. अन्य देवता गौण समजतो. हा आपपरभाव सोडून भगवंत एकच आहे हा भाव मनी ठेवावा.
सर्व देव हे देखील भगवंतांचीच रूपे आहेत. भगवंत वेगवेगळ्या देवांच्या रूपात प्रकट झाले आहेत. देवांची पूजा करण्यासोबतच, आपण हे देखील जाणून घेतले पाहिजे की ते देवाचे कार्य करत आहेत. सर्व देवांबद्दल तसेच सर्व धर्मांबद्दल समादर (समान आदर) असला पाहिजे.
नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव॥
= शिवमहिम्नस्तोत्रम् =
प्रत्येक जण आपल्या आवडीप्रमाणे इच्छेप्रमाणे वेगवेगळ्या देवतांची पूजा करत असला तरी ती सर्व एकाच परमात्म्याची रूपे आहेत. हीच तर आमची शिकवण आहे. भारतातील लोक लहानपणापासून हा श्लोक म्हणतात. निरनिराळ्या लोकांना निरनिराळ्या गोष्टीत रुची आणि इच्छा असते त्यानुसार ते वेगवेगळ्या देवतांची पूजा करतात, पण त्या देवता परमात्म्याचीच विविध रूपे आहेत. अथर्वशीर्ष म्हणताना आपण
वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुव: स्वरोम्॥
स तया श्रद्धया युक्त:(स्), तस्याराधनमीहते।
लभते च ततः(ख्) कामान्, मयैव विहितान्हि तान्॥7.22॥
अन्तवत्तु फलं(न्) तेषां(न्), तद्भवत्यल्पमेधसाम्।
देवान्देवयजो यान्ति, मद्भक्ता यान्ति मामपि॥7.23॥
अव्यक्तं(म्) व्यक्तिमापन्नं(म्), मन्यन्ते मामबुद्धयः।
परं(म्) भावमजानन्तो, ममाव्ययमनुत्तमम्॥7.24॥
आपण सामान्य माणसं परमात्म्याचे परम स्वरूप न जाणता फक्त त्याचे रूप बघून तेच सत्य आहे असे समजून घेतो. ज्या रूपात आपण त्याला बघतो ते रूप मात्र सत्य आणि बाकी सगळं मिथ्या आहे असे आपण समजतो. भगवंताचे कुठलेही रूप परमात्म्याचे स्वरूप आहे ही गोष्ट आपण समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
अलिकडे इमारतींवर परावर्तक काचा बसवता. या काचेवर विशेष लेप असतो, जो प्रकाशास आणि उष्णतेला परावर्तित करतो. त्यामुळे, या काचेतून जास्त प्रकाश आत प्रवेश करत नाही आणि इमारतीचे तापमान कमी राहते, ग्लास म्हणतात या काचेचा चष्मा जे लोक लावतात त्यांना बाहेरचे जग दिसू शकते परंतु इतर लोकांना मात्र चष्मा घालणाऱ्याचे डोळे दिसू शकत नाहीत. भगवंतांची माया या परावर्तक काचेसमान असते. मायेमुळे आपण त्यांना पाहू शकत नाही.
भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण यांना व्यक्तीच्या रूपात न पाहता त्यांचा परमभाव, त्यांचे अंतरंग पहावे. आपण म्हणतो,
नाहं(म्) प्रकाशः(स्) सर्वस्य, योगमायासमावृतः।
मूढोऽयं(न्) नाभिजानाति, लोको मामजमव्ययम्॥7.25॥
वेदाहं(म्) समतीतानि, वर्तमानानि चार्जुन।
भविष्याणि च भूतानि, मां(न्) तु वेद न कश्चन॥7.26॥
आता वैज्ञानिक युगात ही गोष्ट कशी पटेल? तथापि आईन्स्टाईननेच एक सिद्धांत मांडला होता. एका लांबलचक आगगाडीची कल्पना करा, जिच्या ड्रायव्हरने हिरवा दिवा दाखवला तर गार्डाला तो दिवा दिसायला दोन महिन्यांचा अवधी लागेल इतकी ती गाडी लांबलचक आहे. आता जो कोणी अशा ठिकाणी उभा आहे जिथून त्याला इंजिन आणि गार्डाचा डबा दोन्ही दिसू शकत आहेत तर एकाच वेळी तो भूतकाळ (ड्रायव्हरने दाखवलेला हिरवा दिवा) आणि भविष्यकाळ (गार्ड पहाणार असलेला हिरवा दिवा) वर्तमानातच बघणार नाही का?
परंतु कोणीही मला जाणत नाही असे भगवंत का म्हणतात? ज्ञानी भक्त तर भगवंतांना जाणतो ना? ज्ञानी भक्त भगवंतांना जाणतो कारण तो भगवंतांच्या परमभावाला प्राप्त झालेला असतो. आकाशाची लांबी रुंदी आकाशच जाणू शकते. त्याचप्रमाणे परमात्म्याचे स्वरूप परमात्माच जाणू शकतो आणि ज्याने परमात्म्याच्या भक्तीची प्राप्ती केलेली आहे, तो ज्ञानी भक्त स्वतःच परमात्मास्वरूप झालेला आहे त्यामुळे तो त्यांना जाणू शकतो अन्य कोणीही जाणू शकत नाहीत.
इच्छाद्वेषसमुत्थेन, द्वन्द्वमोहेन भारत।
सर्वभूतानि सम्मोहं(म्), सर्गे यान्ति परन्तप॥7.27॥
येषां(न्) त्वन्तगतं(म्) पापं(ञ्), जनानां(म्) पुण्यकर्मणाम्।
ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता, भजन्ते मां(न्) दृढव्रताः॥7.28॥
जरामरणमोक्षाय, मामाश्रित्य यतन्ति ये।
ते ब्रह्म तद्विदुः(ख्) कृत्स्नम्, अध्यात्मं(ङ्) कर्म चाखिलम्॥7.29॥
साधिभूताधिदैवं(म्) मां(म्), साधियज्ञं(ञ्) च ये विदुः।
प्रयाणकालेऽपि च मां(न्), ते विदुर्युक्तचेतसः॥7.30॥
भारतमातेला स्वतंत्र करण्याची उत्कटतेने कामना बाळगणारे क्रांतिकारक मृत्यू समीप असतानाही विचलित झाले नाहीत कारण ते त्यांच्या ध्येयाशी समर्पित होते आणि दृढनिश्चयी होते.
या श्लोकात भगवंतांनी अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ आदी नव्या पारिभाषिक संज्ञा वापरलेल्या आहेत. कुठल्याही शास्त्राची एक परिभाषा असते. ती समजून घेण्यासाठी त्यातील पारिभाषिक शब्द आणि त्यांचे अर्थ समजून घ्यावे लागतात. या पुढील अक्षरब्रह्मयोग या आठव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात अर्जुन भगवंतांना याच संज्ञाबद्दल विचारणा करणार आहे, तेव्हा भगवंत याबद्दल संपूर्ण स्पष्टीकरण देतीलच. तूर्तास हा सातवा अध्याय इथेच समाप्त होत आहे.
ईश्वरचरणी वंदन करून हा सुंदर ज्ञानविज्ञानयोग नामक अध्याय समाप्त झाला. हे विवेचन भगवंतालाच अर्पण करून विवेचन समाप्त झाले.
राधेश्याम जी:- भगवंतांना शरण जावे असे आपण वारंवार ऐकत म्हणत आलो आहोत पण ही शरणागती नेमकी कशी असते?
उत्तर:- शरणागती ही केवळ एकदाच खऱ्या अर्थाने शरणागती होते, ज्यावेळी आपल्या मनात सर्व काही सोडून मला फक्त भगवंतच हवे ही भावना असते आणि आपण स्वतःला संपूर्णपणे भगवंतांच्या हवाली केलेली असते. भगवंत जे काही करतील ते होईल या भावनेने जेव्हा आपण आपले कर्तव्य कर्म करत असतो, तेव्हा ती संपूर्ण शरणागती (ज्याला प्रपत्ती म्हणतात) ती असते. अन्यथा आपण वारंवार शरण जात असतो पण ते आपल्या कामनापूर्तीसाठी असते. एखाद्या नेहमी आपले व्यसन सोडणार्या व्यसनाधीन व्यक्तीच्या व्यसनमुक्तीप्रमाणे तात्कालिक शरणागती असते. आपण जेव्हा भगवत्प्राप्तीसाठी शरणागत होतो तेव्हा खऱ्या अर्थाने संपूर्णपणे शरणागत होतो. मग वारंवार शरण जायला लागत नाही.
प्रश्न
वीणा जी:- आपण आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी असे भक्तांचे प्रकार सांगितलेले आहेत. मी माझ्या खोलीमध्ये सर्वत्र श्रीकृष्णाचे फोटो लावलेले आहेत आणि त्याची चिंतन करतच माझी सर्व कामे सुरू असतात. माझी भक्ती कशा प्रकारची म्हणावी?
उत्तर:- बाराव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे जर आपण आपले संपूर्ण कर्तव्यकर्म भगवंतांचेच काम करत असल्याप्रमाणे भगवंतांना साक्षी ठेवून करत असलो आणि त्या कर्माचे कर्तेपण सोडून देऊन त्या कर्माचे फळ भगवंतांनाच अर्पण करत असलो तर ती संपूर्ण शरणागती आहे. तुम्ही तशा प्रकारची भक्ती करण्याचा प्रयत्न करत असलात तर ते चांगलेच आहे.
प्रश्न
दीनू जी:- आर्त या शब्दाचा अर्थ काय? आर्त म्हणजे स्मरण असते का?
उत्तर:- जेव्हा मनुष्य अशा काही गहन संकटात सापडतो, ज्यातून सुटका होण्यासाठी त्याचे बळ अपुरे असते आणि त्याला सुटकेसाठी अन्य काहीही मार्ग नसतो तेव्हा तो निर्वाणीचा उपाय म्हणून भगवंतांना तळमळीने पुकारतो, अशा भक्तीला आर्त भक्ती म्हणतात. ही भक्ती ही वाईट म्हणता येत नाही, निदान ह्या निमित्ताने तरी भगवंतांची आठवण होते.
प्रश्न
रजनीश जी:- भगवंत म्हणतात की त्यांच्यापासूनच गुण निर्माण झालेले आहेत पण त्या गुणांमध्ये ते नाहीत. यातून आपण काय बोध घ्यायचा आहे?
उत्तर:- समुद्राच्या पाण्यामध्ये वाऱ्यामुळे ऊर्जा येण्याने लाट निर्माण होते, ही समुद्राच्या पृष्ठभागावर तयार होणारी एक अस्थायी हालचाल आहे, अशा लाटा म्हणजे समुद्र नसतो तर समुद्राचे पाणी म्हणजे समुद्र असतो. त्याचप्रमाणे गुण भगवंतांपासून निर्माण झाले असले तरी त्या गुणांमध्ये भगवंत नसतात, ते गुणांच्या पलिकडे, गुणातीत असतात. चौदाव्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला व आपल्याला गुणातीत व्हायला सांगितले आहे कारण जो गुणातीत झाला तो व्यक्ती न रहाता जणू परमात्मा बनतो.
प्रश्न
दीप्ती जी:- भगवंत आपल्या सर्वांमध्ये आहेत, आपल्याला पाहू शकतात पण तरीही आपण भगवंत नाही हे कृपया स्पष्ट करावे.
उत्तर:- मघाशी आपण समुद्र आणि लाटांची चर्चा केली. तेच उदाहरण घेऊ या. आपण समुद्रात निर्माण होणाऱ्या लाटांप्रमाणे भगवंतांपासून निर्माण झालो तरी भगवंत गुणातीत असल्यामुळे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. दुसरे असे की संकटसमयी आपल्याला भगवंतांचे स्मरण बळ देते. मन कुविचारांपासून मुक्त करण्यासाठी भगवंतांचे नामस्मरण सहाय्यक ठरते. यावरून आपण भगवंत नाही हे लक्षात येते.
समारोपाच्या प्रार्थनेने सत्राची सांगता झाली.
धर्मसंस्थापकं वीरं कृष्णंवन्दे जगद्गुरुम्॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥